konkandhara.com

Editorial

konkandhara 2026 05 09T113856.734

रोहा तालुक्यात अनेक वर्ष योजना राबविल्या. पाणी टंचाई मात्र कायम.

कोलाड ८. मे (शरद जाधव) सध्या उन्हाला वाढत असल्याने उष्णतेचा पारा चढत आहे. अशावेळी शासकीय यंत्र नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहेत .अशातच रोहा तालुक्यात प्रत्येक गावात गेले अनेक वर्ष दोन-चार योजना राबविल्या गेले आहेत. तरीदेखील पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असल्याने रोहा तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात उदंड झाल्या पाणी योजना टंचाई मात्र कायम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रोहा तालुक्यावर खासदार सुनील तटकरेंचे अनेक वर्ष राजकीय वर्चस्व आहे. सर्वच ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली आहेत. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची फळी आहे .मात्र गेली कित्येक वर्ष ग्रामीण भागासाठी आणलेल्या निधीचा दुरुपयोग झाला आहे. निधीतून गावचा विकास झाला की कुणाचा हे सुद्धा नागरिकांना समजले आहे .केवळ फक्त ग्रामपंचायत राष्ट्रवादी पक्षाच्या अधिपत्त्याखाली ठेवून मतदान मिळवून राजकीय कारभार चालवला गेला असा आरोप होत आहे. प्रत्येक गावाला विकासासाठी काय हवंय .चांगला रस्ता, शुद्ध पाणी, आणि वीज ,परंतु या देखील सुविधा कमी अधिक प्रमाणात पोहचल्या आहेत. गावचा तालुक्याचा विकासाचा ध्यास न घेता वर्षानुवर्ष आपल्या घराण्याकडे सत्ता कशी राहील याचा ध्यास घेतल्याने विकास झाला नाही .परिणामी आज असंख्य जावे पाणीटंचाई कृती आराखडा आहेत. असे बोलले जाते. प्रत्येक गावात भारत निर्माण व पायलट योजना अशा योजना राबवल्या गेल्या आहेत. नंतर सध्या सुरू असलेली जलजीवन मिशन योजनेची माहिती घेतली असता प्रचंड गोंधळ सुरू आहे नियोजन नाही. त्यामुळे या योजना जर फेल गेल्या तर भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल याकरता स्थानिक गावकऱ्यांनी जातीने लक्ष घालून आपल्या गावाच्या पाणी योजनेचे काम दर्जेदार होते का हे पाहिले पाहिजे नाहीतर अधिकारी हे बाहेरचे आहेत बदली होऊन जातील ठेकेदार बीड पुण्याचे ते पण निघून जातील पाणी मात्र आपल्या गावासाठी आहे याचा विचार करून गावातील तरुणांनी या पाणी योजना संदर्भात जागरूक राहून लक्ष दिले पाहिजे.

रोहा तालुक्यात अनेक वर्ष योजना राबविल्या. पाणी टंचाई मात्र कायम. Read More »

konkandhara 2026 05 09T113031.227

दापोलीत महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन; एस.टी. कर्मचाऱ्याचे निलंबन

दापोली : महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी एस.टी.च्या वाहक-कम-चालक कर्मचाऱ्याविरोधात अखेर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी एस.टी. प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे लेखी आदेश जारी केले. या प्रकरणी दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी शुक्रवारी दुपारी दापोली आगार व्यवस्थापक राजेंद्र उबाळे यांची भेट घेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. “आमच्या आया-बहिणींची अब्रू इतकी स्वस्त नाही. संबंधित विकृत मनोवृत्तीच्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू,” असा इशारा ऋषिकेश गुजर यांनी दिला होता. यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची कारवाई केली. या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

दापोलीत महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन; एस.टी. कर्मचाऱ्याचे निलंबन Read More »

konkandhara 2026 05 08T153543.800

“सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा !” — आरोग्यमंत्री बैठकीत मोठे निर्णय ; सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्थेला मिळणार नवे बळ

दोडामार्ग: भूषण सावंत : मुंबईतील आरोग्य भवनात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित आरोग्य प्रश्नांवर अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांच्या मागणीनुसार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील आरोग्य सुविधांबाबत मोठे निर्णय घेण्यात आले. सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालयांतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, महात्मा फुले आरोग्य योजनेतील अडथळे, पंचकर्म केंद्रे, आयुष वेलनेस क्लिनिक आणि आरोग्य केंद्रांच्या इमारतींसाठी निधी अशा विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. बैठकीला आमदार दीपक केसरकर यांच्यासह जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, राजघराण्याचे युवराज लखमराजे भोसले, कुमार भोगले, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सात वर्षांपासून रखडलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला अखेर गती सावंतवाडीतील बहुचर्चित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीचा प्रश्न यावेळी केंद्रस्थानी होता. जागेचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे या प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. मात्र बैठकीत राजघराण्याच्या प्रतिनिधींनी हॉस्पिटल उभारणीस कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट करत लवकरात लवकर न्यायालयात ना हरकत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सहमती दर्शवली. यामुळे सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीचा मार्ग आता जवळपास मोकळा झाल्याचे मानले जात आहे. तब्बल सात वर्षे प्रकल्प रखडल्याने नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रस्तावित हॉस्पिटललगत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीला दोन मजली विस्तार देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. रिक्त डॉक्टर पदांवर महिनाभरात भरतीचे आदेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची पदे दीर्घकाळ रिक्त असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा बैठकीत जोरदारपणे मांडण्यात आला. यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीची दखल घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे येत्या महिनाभरात भरण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. परिचारिकांच्या रिक्त पदांमुळे निर्माण झालेल्या अडचणींवरही गंभीर चर्चा झाली असून त्यावर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले. गोवा व बेळगावमधील महात्मा फुले योजनेची सेवा पुन्हा सुरू होणार ? सिंधुदुर्गातील रुग्णांना गोवा मेडिकल कॉलेज आणि के.एल.ई. हॉस्पिटल बेळगाव येथे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार मिळत होते. मात्र पोर्टलवरील कोड बंद झाल्यामुळे ही सुविधा थांबवण्यात आली असून त्यामुळे सीमाभागातील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. हा गंभीर प्रश्न आमदार दीपक केसरकर यांनी बैठकीत आक्रमकपणे मांडला. त्यावर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी लवकरात लवकर ही सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले. रेडी, आंबोली आणि आचरा येथे पंचकर्म केंद्र उभारणीला गती पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गमध्ये आयुर्वेद, योग, पंचकर्म आणि नेचरोपॅथी सेवांसाठी मोठी मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर रेडी, आंबोली आणि आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पंचकर्म सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी ही मागणी लावून धरल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी संबंधित प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुष वेलनेस सेंटर सुरू करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली. आरोग्य सुविधांबाबत सरकार गंभीर ; सिंधुदुर्गला दिलासा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या इमारती, कर्मचारी भरती, आधुनिक आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर या बैठकीत व्यापक चर्चा झाली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यातील आरोग्य समस्यांवर लवकरात लवकर ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

“सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा !” — आरोग्यमंत्री बैठकीत मोठे निर्णय ; सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्थेला मिळणार नवे बळ Read More »

ए.जी. विद्यालयाची विद्यार्थिनी रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण हिने SSC परीक्षेत 100 टक्के गुण मिळवत दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.

ए.जी.ची रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण 100 टक्के गुण मिळवून दापोली तालुक्यात प्रथम

दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूलची कुमारी रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण हिने नुकत्याच लागलेल्या एसएससी परीक्षेत दापोली तालुक्यात 100 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त करून यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयतून एकूण 262 विद्यार्थी परीक्षेत बसले होते पैकी 255 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल 97.32% इतका लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण 100 टक्के, द्वितीय क्रमांक नीळ उदय फडके 96.20 टक्के, तृतीय क्रमांक क्रांति विरेंद्र केळस्कर 95.40 टक्के, चौथा क्रमांक पल्लवी विजय भुवड 94.80 टक्के तर पाचवा क्रमांक सई आशिष शिगवण 94.60 टक्के गुण मिळवून विद्यालयामध्ये अनुक्रमे क्रमांक प्राप्त केले आहेत. तर 80% च्या वरती तब्बल 48 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर, कार्यवाह डॉ. विनोद जोशी, सर्व संचालक मंडळ, शालेय समिती चेअरमन श्री. रवींद्र कालेकर, सदस्य श्रीकांत निजामपूरकर, सदस्या सौ.स्मिता सुर्वे,मुख्याध्यापक एस.एम. कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. अर्जुन घुले, पर्यवेक्षक श्री. अनिल पेठकर, श्री. मगदूम एस.आय. सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांनी विशेष कौतुक केले आहे.

ए.जी.ची रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण 100 टक्के गुण मिळवून दापोली तालुक्यात प्रथम Read More »

konkandhara 2026 05 08T152454.098

कोकण दहावीतही अव्वल ! ९७.६२ टक्के निकाल; मुलींची सरशी

रत्नागिरी । प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वी (SSC) चा निकाल ०८ मे २०२६ रोजी जाहीर केला असून, यामध्ये कोकण विभागीय मंडळाने पुन्हा एकदा राज्यात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ही माहिती कोकण बोर्डाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी दिली. यावर्षी राज्याचा एकूण नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९२.०९ टक्के लागला असताना, कोकण विभागाचा निकाल ९७.६२ टक्के इतका लागून तो राज्यातील सर्व नऊ विभागीय मंडळांमध्ये सर्वाधिक ठरला आहे. कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९७.३७ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.१३ टक्के इतका नोंदवला गेला आहे. या परीक्षेत नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून, राज्यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.९६ आहे, जी मुलांच्या ८९.५६ टक्क्यांपेक्षा ५.४० टक्क्यांनी अधिक आहे. कोकण विभागाचा विचार करता मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.५५ टक्के असून मुलांचे प्रमाण ९६.७३ टक्के इतके आहे.शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी ‘कॉपीमुक्त अभियान’ अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आले, ज्याचा सकारात्मक परिणाम निकालावर दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कोकण विभागातील सर्व ११४ परीक्षा केंद्रांवर CCTV कॅमेरे अनिवार्य करण्यात आल्यामुळे परीक्षा कालावधीत एकही गैरप्रकार घडला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ४१२ माध्यमिक विद्यालये आणि ७३ परीक्षा केंद्रे होती, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२८ विद्यालये आणि ४१ परीक्षा केंद्रे होती. संपूर्ण राज्यातून सुमारे १५.५५ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी ६,६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच, ६४ विषयांपैकी २० विषयांचा निकाल १०० टक्के लागला असून ४.२२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी मिळवली आहे.निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, त्यांच्यासाठी मंडळाने ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गुणपडताळणीसाठी ९ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. तसेच, उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जून-जुलै २०२६ मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाणार आहे, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी यावर्षी परीक्षेच्या वेळापत्रकात प्रमुख विषयांच्या पेपरमध्ये सुट्टी देण्यात आली होती आणि १० समुपदेशकांची नियुक्तीही करण्यात आली होती. कोकण विभागाने सन २०१२ पासून आपले प्रथम स्थान सातत्याने टिकवून ठेवल्याबद्दल मंडळाने सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.

कोकण दहावीतही अव्वल ! ९७.६२ टक्के निकाल; मुलींची सरशी Read More »

konkandhara 2026 05 06T152951.520

‘कुंभार्ली घाटाचा राजा 2026’ ईश्वर पाटील तर ‘कुंभार्ली घाटाची राणी 2026’ श्रावणी परिट

‘किंग ऑफ कुंभार्ली 2026’ राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद चिपळूण : सह्याद्रीच्या कुशीत रंगलेल्या प्रतिष्ठेच्या आणि रोमहर्षक ‘किंग ऑफ कुंभार्ली 2026’ राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत यंदा देशभरातून जवळपास ४०० स्पर्धक सहभागी झाले होते. चिपळूण सायकलिंग क्लब आयोजित या स्पर्धेच्या पाचव्या आवृत्तीत पुरुष गटात धाराशिवच्या ईश्वर पाटील याने अवघ्या १ तास १ मिनिट १३ सेकंद या विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करत ‘कुंभार्ली घाटाचा राजा 2026’ हा मानाचा किताब पटकावला. तर महिलांच्या गटात पुण्याच्या श्रावणी परिट हिने १ तास २६ मिनिटे ३४ सेकंदात स्पर्धा पूर्ण करत ‘कुंभार्ली घाटाची राणी 2026’ बनण्याचा मान मिळवला. यंदाच्या स्पर्धेत प्रत्येक गटात तुफान चुरस पाहायला मिळाली. अनेक गटांमध्ये अवघ्या काही मिलीसेकंदांच्या फरकाने विजेते निश्चित झाले. स्पर्धेची सुरुवात सकाळी सहा वाजता सावरकर मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून करण्यात आली. साहिल डेव्हलपर्स चिपळूणचे सचिन कदम आणि रत्नागिरी ट्रायथलीट क्लबचे संस्थापक अमित कवितके यांच्या हस्ते स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. कुंभार्ली घाट माथ्यावर स्पर्धेचा समारोप झाला. त्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या समारंभात अनिरुद्ध निकम, जयेंद्रशेठ खताते, दशरथ दाभोळकर, नितीन ठसाळे, मंगेश पेढांबकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रमुख देणगीदार सचिन कदम, विनती ऑरगॅनिक्सचे प्रतिनिधी सुमेर तारे, कृष्णा केमिकल्सचे प्रतिनिधी सुयोग चव्हाण, सारस्वत बँकेचे प्रतिनिधी कल्पेश महाडीक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार शेखर निकम यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल चिपळूण सायकलिंग क्लब आणि स्वयंसेवकांचे कौतुक केले. अल्पावधीत राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झालेल्या या स्पर्धेसाठी स्थानिक उद्योग आणि नेत्यांनी अधिक सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. महिला मास्टर गटात अंजली भलिंगे (पुणे) प्रथम, रुपाली गिरमकर (पिंपरी-पुणे) द्वितीय तर ब्लांशे थेमुडो (गोवा) तृतीय ठरल्या. महिला एलिट गटात श्रावणी कृष्णात परिट (पुणे) प्रथम, योगेश्वरी महादेव कदम (सांगली) द्वितीय आणि श्रावणी उमेश घोडेस्वार (कोल्हापूर) तृतीय ठरली. पुरुष किड्स गटात आर्यन सुनील मालगे (कोल्हापूर) प्रथम, आर्यन संदीप जाधव (पलूस) द्वितीय तर साईराज तुषार भोईते (सातारा) तृतीय आला. पुरुष ज्येष्ठ गटात महेश किणी (ठाणे) प्रथम, प्रशांत तिडके (पुणे) द्वितीय आणि संतोष पवार (पुणे) तृतीय ठरले. पुरुष मास्टर गटात अनुप पवार (मुंबई) प्रथम, संजीव कुमार शर्मा (दिल्ली) द्वितीय तर श्रधीर सागर शिरझेम (नोएडा) तृतीय ठरले. पुरुष खुल्या गटात ईश्वर पाटील (धाराशिव) प्रथम, निहाल नदाफ (सांगली) द्वितीय आणि सिद्धेश पाटील (कोल्हापूर) तृतीय आला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पोफळी वीज मंडळ, राष्ट्रीय महामार्ग विभाग, विविध रुग्णालयांची वैद्यकीय पथके, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभल्याबद्दल चिपळूण सायकलिंग क्लबने कृतज्ञता व्यक्त केली.

‘कुंभार्ली घाटाचा राजा 2026’ ईश्वर पाटील तर ‘कुंभार्ली घाटाची राणी 2026’ श्रावणी परिट Read More »

konkandhara 2026 05 06T151651.404

चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील अतिक्रमणे हटवली

रत्नागिरी नगर परिषदेची धडक कारवाई; ८० बांधकामे जमीनदोस्त रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी नगर परिषदेने बुधवारी शहरातील चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील बहुचर्चित अतिक्रमणांवर मोठी कारवाई करत तब्बल ८० अनधिकृत बांधकामे हटवली. सकाळपासून सुरू झालेल्या या मोहिमेत नगरपालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील अनधिकृत दुकाने आणि पक्की बांधकामे जमीनदोस्त केली. चर्मालय ते कोकणनगर हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मुख्य मार्ग असून, रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. तसेच, ११ केव्ही भूमिगत उच्चदाब विद्युत वाहिनी टाकण्याचे महत्त्वाचे कामही या अतिक्रमणांमुळे रखडले होते. ही कारवाई काही दिवसांपूर्वीच होणार होती. मात्र, सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन प्रशासनाने ती तात्पुरती पुढे ढकलली होती. त्यावेळी संबंधित दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवण्यासाठी मुदत मागितली होती. प्रशासनाने दिलेल्या मुदतीनंतरही अतिक्रमणे कायम असल्याने अखेर नगर परिषदेला कठोर पावले उचलावी लागली. बुधवारी सकाळी नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, जेसीबी मशीन आणि आवश्यक फौजफाट्यासह चर्मालय-कोकणनगर परिसरात दाखल झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू झालेल्या या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये एकच धावपळ उडाली. या कारवाईमुळे आता ११ केव्ही भूमिगत विद्युत वाहिनीचे काम वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार असून, रस्ता रुंदीकरणाचाही मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील अतिक्रमणे हटवली Read More »

konkandhara 2026 05 06T131417.499

बिनविरोध निवडीनंतर आमदार प्रमोद जठार यांचा सिंधुदुर्ग दौरा ठरला ; दोन दिवसांत आठही तालुक्यांमध्ये धडाकेबाज भेटी !

दोडामार्ग : भूषण सावंत : विधानपरिषद आमदार म्हणून प्रमोद जठार यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर संबंधित आमदारांचा ७ व ८ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा निश्चित झाला असून, या दौऱ्यात ते जिल्ह्यातील आठही तालुक्यांना भेट देत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, पक्ष संघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 👉 ७ मे रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे :सकाळी १० वाजता दोडामार्ग भाजप कार्यालयात भेट, त्यानंतर सकाळी ११:३० वाजता सावंतवाडी येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद. दुपारी २ वाजता वेंगुर्ला येथे बैठक होणार असून, सायंकाळी ४ वाजता कुडाळ आणि सायंकाळी ६ वाजता मालवण येथे दौऱ्याचा पुढील टप्पा पार पडणार आहे. 👉 ८ मे रोजीचा दौरा :सकाळी १०:३० वाजता देवगड येथे सुरुवात होऊन, सकाळी ११:३० वाजता पडेल येथे भेट दिली जाणार आहे. दुपारी १ वाजता वैभववाडी येथे कार्यकर्त्यांशी चर्चा होणार असून, सायंकाळी ३:३० वाजता कणकवली ग्रामीण भागात, सायंकाळी ५ वाजता कणकवली शहरात बैठक पार पडेल. दौऱ्याचा समारोप सायंकाळी ६:३० वाजता तळेरे येथे गावकऱ्यांच्या सत्काराने होणार आहे. ⚡ संघटन मजबूत करण्यावर भरया दौऱ्यात स्थानिक पातळीवरील प्रश्न, संघटनात्मक अडचणी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती यावर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याचा स्पष्ट प्रयत्न या दौऱ्यातून दिसून येत आहे. 📌 राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेलादोन दिवसांच्या या तुफानी दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, विविध ठिकाणी होणाऱ्या बैठका आणि संवादामुळे राजकीय समीकरणांमध्ये हालचाली वेगाने घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बिनविरोध निवडीनंतर आमदार प्रमोद जठार यांचा सिंधुदुर्ग दौरा ठरला ; दोन दिवसांत आठही तालुक्यांमध्ये धडाकेबाज भेटी ! Read More »

konkandhara 2026 05 06T065535.012

धाडसी पुढाकार ! माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांचे सरसावले पाऊल ; रस्त्यांवर कोसळलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत

दोडामार्ग / भूषण सावंत : दोडामार्ग शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात अचानक रस्त्यावर कोसळलेल्या फणसाच्या झाडामुळे नागरिक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. अंधारातच वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला आणि अपघाताचा धोका निर्माण झाला होता. मात्र, या गंभीर परिस्थितीत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी तात्काळ पुढाकार घेत परिस्थिती हाताळत नागरिकांना मोठा दिलासा दिला. हातात कुऱ्हाड घेत संतोष नानचे स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने झाड कापण्याचे काम हाती घेतले. कोणतीही यंत्रणा येण्याची वाट न पाहता त्यांनी तातडीने कृती करत रस्त्यावर पडलेले झाड हटवले आणि काही वेळातच रस्ता पूर्णपणे मोकळा केला. यामुळे अडकलेल्या वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या कामात ओंकार पेडणेकर, शिवम पांचाळ, लक्ष्मण परब, महेश रवार, फोंडू हडीकर आणि चिन्मय प्रसादी आदी तरुणांनी सक्रिय सहभाग घेत मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळला. स्थानिक नागरिकांकडून संतोष नानचे आणि सहकार्य करणाऱ्या तरुणांचे कौतुक होत असून, प्रशासनानेही अशा प्रसंगी तात्काळ प्रतिसाद देण्याची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. ही घटना म्हणजे जनतेसाठी पुढे सरसावणाऱ्या नेतृत्वाचा आदर्श ठरली आहे.

धाडसी पुढाकार ! माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांचे सरसावले पाऊल ; रस्त्यांवर कोसळलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत Read More »

konkandhara 2026 05 05T222036.402

“अंधश्रद्धेच्या विळख्यात समाज; विज्ञानाचा दिवा पेटवण्याची गरज!” – सिंधुदुर्गात जागृतीची हाक

दोडामार्ग : भूषण सावंत : अज्ञान आणि भीतीवर आधारलेल्या अंधश्रद्धा आजही समाजाच्या मुळावर घाव घालत असून, आर्थिक व शारीरिक शोषणाला खतपाणी घालत आहेत. काळी जादू, जादूटोणा, भूत-प्रेत, अनिष्ट रूढी यांसारख्या प्रथांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा घातक प्रवृत्तींपासून मुक्त होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, असे ठाम प्रतिपादन डॉ. संजीव लिंगवत यांनी केले. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा २०१३ असूनही पुरेशी जनजागृती न झाल्याने अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या टिकून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मांजर आडवे जाणे, कावळ्याच्या ओरडण्यावरून संकेत काढणे, रात्री नखे कापणे टाळणे, लिंबू-मिरची लटकवणे, नागाला दूध पाजणे किंवा महिलांना मंदिरात मज्जाव करणे यांसारख्या प्रथांवर त्यांनी कठोर टीका केली. डॉ. रा. धो. खानोलकर मठ येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत अंधश्रद्धेविरोधात जोरदार प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमात कार्याध्यक्ष विजय चौकेकर यांनी विविध शास्त्रीय प्रयोग सादर करून अंधश्रद्धा कशी निर्माण केली जाते, हे प्रत्यक्ष दाखवून दिले. त्यांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली. यावेळी शालेय वाचनालयासाठी काही महत्त्वाची पुस्तकेही भेट देण्यात आली. कवी भाऊसाहेब गोसावी यांनी आपल्या प्रभावी कवितांमधून अंधश्रद्धेविरोधात समाजजागृतीची ठिणगी पेटवली. त्यांच्या ओजस्वी सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळेच धारदार स्वरूप प्राप्त झाले. या कार्यक्रमास हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील जाधव, शिक्षिका स्वप्नाली कांबळी, शिक्षक जी. एम. गोसावी, योगेश वराडकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जी. एम. गोसावी यांनी केले, तर आभारप्रदर्शन स्वप्नाली कांबळी यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडून विज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्याची गरज अधोरेखित करत हा उपक्रम समाजासाठी एक दिशादर्शक ठरला.

“अंधश्रद्धेच्या विळख्यात समाज; विज्ञानाचा दिवा पेटवण्याची गरज!” – सिंधुदुर्गात जागृतीची हाक Read More »