दोडामार्ग : भूषण सावंत: जिल्ह्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अवकाळी पावसात वारंवार खंडित होणारी वीज सेवा, तासन्तास अंधारात राहणारी गावे, दुरुस्तीला होणारा विलंब तसेच ग्राहकांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महावितरणच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी पावसाळ्यात वीज विभाग सक्षमपणे सेवा देऊ शकेल का? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य विज ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक २५ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत कुडाळ येथील जिल्हा अधीक्षक अभियंता कार्यालयात जाब विचारणा आंदोलन छेडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तमाम विज ग्राहकांनी आपल्या लेखी तक्रारींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड, समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर आणि सोशल मीडिया प्रमुख मनोज घाटकर यांनी केले आहे.
“पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वीज यंत्रणा कोलमडत असेल तर मुसळधार पावसात परिस्थिती किती बिकट होईल, याची कल्पना न केलेली बरी,” असा आक्रमक इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. वारंवार होणारे वीज खंडित प्रकार, झाडांच्या फांद्या न छाटणे, जुनाट तारांमुळे उद्भवणारे धोके, ग्रामीण भागातील दुर्लक्षित सेवा आणि ग्राहकांना मिळणारी असमाधानकारक वागणूक याबाबत प्रशासनाला थेट जाब विचारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी आता शांत न बसता आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















