konkandhara.com

Editorial

konkandhara 2026 05 10T204447.649

थोर कीर्तनकार व समाज प्रबोधनकार वैकुंठवासी ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांना मरणोत्तर राष्ट्रीय आध्यात्मिक पुरस्कार जाहीर.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुटुंबीय स्वीकारणार पुरस्कार. कोलाड :(शरद जाधव) महाराष्ट्र ही संतांची भूमी.या भूमीत संत जन्मलाआले. आजही त्यांच्या संत कार्याचा गौरव होतो. समाजात ज्या काही चांगल्या व्यक्ती जन्माला येतात त्या व्यक्तीच मरणानंतर सुद्धा नाव कायम समाजात राहते .असे एक वारकरी परंपरेतील व चळवळीतील थोर कीर्तनकार समाज सुधारक ह भ प वैकुंठवासी पुरुषोत्तम महाराज पाटील यांना मरणोत्तर राष्ट्रीय अध्यात्मिक पुरस्कार जाहीर झाला आहे. आज समाजातून निघून गेलेल्या थोर विभूतीची आठवण ठेवून त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान होत असल्याने वारकरी सांप्रदायाने आयोजकांचे आभार मानले आहेत.रायगड जिल्हा आगरी समाजातर्फे आगरी समाजातील काही महनिय व्यक्तींना सांस्कृतिक अध्यात्मिक परंपरेला नवीन ऊर्जा देणाऱ्या 20 महंतांचा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे. सदर संमेलन सोहळा शुक्रवार दिनांक 15 मे रोजी पेन नगरपालिका मैदान येथे होणार आहे. आगरी समाजाची देखील आध्यात्मिक ओळख देशपातळीवर पोहोचवण्याकरता या संमेलनाचा उद्देश असल्याचे आयोगातर्फे सांगण्यात आले आहे. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे मूळ गाव पेण तालुक्यातील आहे नोकरी निमित्त अनेक वर्ष घाटाव गावामध्ये वास्तव्यास होते. अध्यात्माची ओढ व वारकरी सांप्रदायिक असल्याने रोहा तालुक्यात वारकरी संप्रदायात समरस झाले. व कधी पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे पुरुषोत्तम महाराज धाटावकर झाले हे कळले नाही एवढा प्रचंड नावलौकिक त्यांनी मिळवला. वारकरी संप्रदाय जो जगद्गुरु तुकोबारायाचा ,ज्ञानेश्वर माऊलींचा, सावता माळी ,संत नामदेवांचा , जनाबाई ,मुक्ताई चा वारकरी सांप्रदाय . बापूंनी खऱ्या अर्थाने रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात रुजविला. आज असंख्य तरुण माळकरी होऊन वारकरी परंपरेला जोडलेले दिसत आहेत .पुरुषोत्तम महाराज उर्फ बापू म्हणजे एक जिव्हाळा होता.संसारात रंजले गांजलेल्या व व्यसनाधीन झालेल्या अनेक कुटुंबीयांना त्यांनी वारकरी सेवेत आणून सुधारले होते. समाजातील चांगली माणसे देवाला आवडतात त्याप्रमाणे ते इहलोक लोक सोडून गेले . परंतु आज त्यांच्या पश्चात त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते त्यांचे कुटुंबीय पुरस्कार स्वीकारणार आहेत. तरी सर्व वारकरी संप्रदायिक व आगरी समाज बांधवांनी या भव्य दिव्य सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन रोहा तालुका आगरी समाज अध्यक्ष हरिश्चंद्र मोरे यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत रोठ गावचे तंटामुक्त गाव कमेटी अध्यक्ष. व आगरी समाज चळवळीतील अभ्यासू कार्यकर्ते किशोर मोरे उपस्थित होते.

थोर कीर्तनकार व समाज प्रबोधनकार वैकुंठवासी ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांना मरणोत्तर राष्ट्रीय आध्यात्मिक पुरस्कार जाहीर. Read More »

konkandhara 2026 05 10T203950.898

स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग आघाडीवर

वेंगुर्ल्यातील मूठ गाव ठरले राज्यातील पहिले १०० टक्के स्वगणना पूर्ण करणारे महसुली गाव सिंधुदुर्गनगरी : भूषण सावंत :स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करत राज्यातील पहिले महसुली गाव म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हे यश प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ गावांमध्ये सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण झाली असून, जिल्ह्याने राज्यासाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्यामुळे मोहिमेला अभूतपूर्व यश मिळाले. गावागावांत महसूल यंत्रणा, ग्रामपंचायत पदाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि स्थानिक स्वयंसेवक यांनी संयुक्तरीत्या जनजागृती मोहीम राबवली. नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडवत स्वगणना प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे अल्पावधीतच अनेक गावांतील सर्व कुटुंबांची स्व गणना पूर्ण झाली आहे.सामूहिक सहभाग, जबाबदारीची जाणीव आणि प्रभावी नियोजन यांच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, हे या मोहिमेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. तालुकानिहाय स्वगणना पूर्ण झालेल्या गावांची संख्या पुढीलप्रमाणे : कुडाळ तालुका – कांडरगावकणकवली तालुका – उपनगर व नवानगर, वेंगुर्ला तालुका – मूठ,वैभववाडी तालुका –ग्रामपंचायत निमअरुळे (निमअरुळे, माईंनकरवाडी, कुंभारवाडी व बौध्दवाडी),दोडामार्ग तालुका – फोंड्ये,देवगड तालुका – शेरिघेराकामते,मोरवे,सावंतवाडी तालुका – पडवे, उडेली, दाभील ,मालवण तालुका – कोळंब, मसुरे, पेंडुर, पोइप, आचरे आणि श्रावण या गावांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही यशस्वी वाटचाल राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भारत सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना होत आहे. याद्वारे सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने अधिकृत se.census.gov.in या संकेतस्थळावर भरता येणार आहे.सिंधुदुर्गचा आदर्श घेत इतर जिल्ह्यांनी देखील गावांची १००% स्व-गणना पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील इतर गावांनी देखील स्व-गणना पूर्ण करावी, असे आवाहन आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग आघाडीवर Read More »

konkandhara 2026 05 10T202139.482

बालभवन इब्रामपुरच्या गुणदर्शन कार्यक्रमात बालकलाकारांचा रंगला सुरेल जल्लोष !

दोडामार्ग : भूषण सावंत : इब्रामपुर येथील बालभवन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराच्या गुणदर्शन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालकलाकारांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकत संपूर्ण वातावरण कला, संगीत आणि उत्साहाने भारावून गेले. या कार्यक्रमासाठी इब्रापूर गावचे सरपंच अशोक धाऊसकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर बालभवन पणजीचे रिसोर्स पर्सन कमलाकांत गवस, ग्रामपंचायत सदस्य स्मिता गवस, उर्मिला परब, अजित शेटकर आणि गोविंद सावंत हे सन्मानित पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालभवन केंद्राच्या केंद्रप्रमुख रूपा नाईक होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी संवादिनी वादन, तबला वादन, नृत्य, गायन अशा विविध कलाविष्कारांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांकडून भरभरून दाद मिळवली. छोट्या कलाकारांचा आत्मविश्वास, कलागुण आणि सादरीकरणातील सफाई पाहून उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी प्रांजल नाईक आणि नित्या गवस यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण शैलीत केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी रूपा नाईक यांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी बालभवन केंद्राचे शिक्षक पुनेश राणे, रामा गवस, अशोक केणी, समीक्षा गवस आणि रितिक शेटये उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि कलाप्रेमींनी उपस्थित राहून बालकलाकारांना उत्स्फूर्त प्रोत्साहन दिले.

बालभवन इब्रामपुरच्या गुणदर्शन कार्यक्रमात बालकलाकारांचा रंगला सुरेल जल्लोष ! Read More »

konkandhara 2026 05 10T201135.139

रोहे शहरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी येणार. फुलांचे शहर बनवण्यासाठी नगरपालिकेची धावपळ.

कोलाड १० मे (शरद जाधव) रोहे शहरांमध्ये सुमारे पंधरा कोटीच्या विकास कामांच्या निधीच्या भूमिपूजन सोहळ्याकरता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार येणार आहेत. त्यामुळे रोहे शहराच्या मुख्य रस्त्यावर फुलांची झाडे लावून. रोहा फुलांचे शहर बनवण्याकरता नगरपालिकेची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. दिवंगत लोकनेते अजित दादा पवार रोह्यात वारंवार विकास कामांच्या सोहळ्या करता येत असत. परंतु त्यांना रोहे शहर हे झाडा फुलांचे शहर कधी दिसले नाही. आणि आता सुनेत्रा वहिनी पहिल्यांदाच रोहे शहरात विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी येत असल्याने फुलांच्या झाडामुळे थोडाफार का होईना बारामती लुक त्यांना वाटला पाहिजे याकरता रोहा नगरपालिकेची झाडे लावण्याकरता धावपळ उडाली असल्याचे. दिसून येते. रोहा नगरपालिकेवर वनश्री शेडगे नगराध्यक्षपदी विराजमान होताच विकास कामांना सुरुवात झाली आहे. रोहे शहरातील काही प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न होत आहे. शहराच्या सांडपाण्याने कुंडलिका प्रदूषित होते असा आवाज संघर्ष समिती दिलीप वडके यांनी उठविला होता. याची दखल घेत नदीचे संवर्धन करण्याकरता खूप मोठा निधी सुनील तटकरे यांनी आणला आहे. आज ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके यांच्यासारखी चळवळीतली माणसे समाजात काम करीत असल्याने लोकप्रतिनिधी व सत्ताधाऱ्यांवर अंकुश आहे. उद्या सुनेत्रा वहिनी येणार म्हणून घाई घाईत झाडे लावण्याची गरज नव्हती. लावत असलेली झाडे ही येणाऱ्या पाहुण्यांना दाखवण्यासाठी लावण्यात येत आहेत अशी शंका रोहेकर व्यक्त करीत आहेत. आजच्या दिवसात झाडे सर्व लावली जातील व निश्चितच फुलांचे शहर म्हणून सुमित्रा वहिनींना आनंद वाटेल परंतु आता लावलेली झाडे जगवण्याचे काम रोहा नगरपालिकेने प्रामाणिक करावे. नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांचे रोहे शहरातील विविध विकास कामांवर जातीने लक्ष असल्याने त्या निश्चित फुलांचे शहर म्हणून ही झाडे जगवतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला.

रोहे शहरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी येणार. फुलांचे शहर बनवण्यासाठी नगरपालिकेची धावपळ. Read More »

konkandhara 2026 05 09T231406.170

चारही बाजूंनी पाणी असलेल्या पाणखोल जुवा बेटावर पोहचले महसूल प्रशासन स्व-गणनेत गावाने घडवला आदर्श !

सर्व कुटुंबांची स्व-गणना पूर्ण; महसूल यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून मोहिमेला अभूतपूर्व यश सिंधुदुर्ग : भूषण सावंत चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरणाऱ्या मालवण तालुक्यातील जुवा पाणखोल गावाने स्व-गणना मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रशासनासमोर आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, बेटासारख्या दुर्गम भागात प्रत्यक्ष पोहोचून महसूल प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील सर्व कुटुंबांची स्व-गणना यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. महसूल यंत्रणा आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून हे प्रेरणादायी यश साकार झाले आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात स्व-गणना मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी स्वतःहून डिजिटल माध्यमातून आपली माहिती ऑनलाइन नोंदवावी, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली. जुवा गावातील ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोहिमेला सकारात्मक साथ दिली.जुवा गावात एकूण २७ घरे असून ३२ कुटुंबे वास्तव्यास आहेत. गावाची एकूण लोकसंख्या ११९ इतकी आहे. या सर्व कुटुंबांनी स्व-गणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवत तालुक्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांनी मोहिमेचे नियोजन काटेकोरपणे करत प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात प्रभावी समन्वय साधला. बेटावरील नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांना स्व-गणनेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि मदतही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि संपूर्ण गावाने निर्धारित कालावधीत स्व-गणना पूर्ण केली. शासनाच्या निर्देशानुसार दि. १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना ही माहिती se.census.gov.in या संकेतस्थळावर भरता येत असल्याची माहिती तहसीलदार श्री. लव्हे यांनी दिली. या मोहिमेत कोळंब मंडळ अधिकारी मिनल चव्हाण, सर्व ग्राम महसूल अधिकारी, सरपंच तसेच पोलिस पाटील यांनी सक्रिय सहकार्य केले.

चारही बाजूंनी पाणी असलेल्या पाणखोल जुवा बेटावर पोहचले महसूल प्रशासन स्व-गणनेत गावाने घडवला आदर्श ! Read More »

konkandhara 2026 05 09T230356.826

रोहा तांबडी रस्त्याबाबत आमदार खासदारांची उदासीनता.प्रवाशांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास.

कोलाड ९ मे (शरद जाधव) रोहा तांबडी रस्त्याला साईट पट्टीच नाहीत. रस्ता अरुंद व खराब याकडे सार्वजनिक बांधकाम खाते कित्येक वर्ष डोळेझाक करीत आहे. मात्र येथील आमदार खासदार या रस्त्याबाबत उदासीन असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने. परिसरातील नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. रोहा तांबडी रस्त्याला प्रचंड वर्दळ असते. या रस्त्याला लागून अनेक फार्म हाऊस आहेत. पुढे याच रस्त्याने प्रवास होतो त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो .परंतु गेले कित्येक वर्ष या रस्त्याची परिस्थिती इतकी भयानक आहे .की कधीही या ठिकाणी अपघात होऊ शकतो. मुळात रस्ता खराब व अरुंद आणि त्यातच साईट पट्ट्या नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूने येणाऱ्या मोठ्या गाड्या पास होत नाहीत. आणि अशावेळी मोटर सायकल चालवणाऱ्या व्यक्तीला कसरत करावी लागते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात घडले आहेत. परंतु या रस्त्याकडे कोणी लक्ष देत नाही. खराब रस्त्याचा त्रास मात्र सामान्य माणसाला होत आहे. गरीब माणूस नोकरीसाठी, खरेदीसाठी, शालेय विद्यार्थी ,याच रस्त्यावरून प्रवास करतात अपघात झाला तर जीव गरीबाचा जातो श्रीवर्धन मतदारसंघातला हा रस्ता आहे .मंत्री आदिती तटकरे त्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. मग यांचे विकासाचे कोट्यावधीची आकडे पाहता हा रस्ता का होत नाही. हा प्रश्न अनेक नागरिकांना पडला आहे. काही दिवसापूर्वी मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर नजीक मंत्री महोदया ट्रॅफिक मध्ये अडकल्या होत्या. प्रचंड वैतागल्या. गाड्या फेकून टाका ही भाषा. मग गेली सतरा वर्ष रस्ता होत नाही प्रवाशांचे काय हाल होत असतील याचा देखील त्यांनी विचार केला पाहिजे. रोहा तांबडी रस्ता करता येत नाही. की आमदार खासदार जाणून बुजून दुर्लक्ष करतात. हा प्रश्न सामान्य ना पडला आहे. विकास केला नाही तरी पाच वर्षांनी प्रचंड मताधिक्य मिळते हेच फावत. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचा वाली कोण राहिला नाही. हेच या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेवरून दिसून येत आहे.

रोहा तांबडी रस्त्याबाबत आमदार खासदारांची उदासीनता.प्रवाशांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास. Read More »

konkandhara 2026 05 09T225539.963

जामगाव हद्दीत बेसुमार माती उत्खनन. महसूल खात्याचे दुर्लक्ष

कोलाड ९ मे (शरद जाधव) रोहा तालुक्यातील जामगाव हद्दीत बेसुमार माती मुरूम चे उत्खन करण्यात आल्याची धक्का दायक बाब उघडकिस आली आहे. मात्र सदर झालेल्या उत्खननांमध्ये महसूल खात्याचे दुर्लक्ष झाले असल्याची चर्चा सुतारवाडी नाक्यावर सुरू आहे. जामगाव पहूर भाला परिसरात मुंबई दिल्ली कॉरिडॉर दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र याकरता शेतकरी वर्गाच्या जमिनी गेल्या आहेत. एमआयडीसी जमिनी घेत आहे. आपल्याला काही मिळणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने जमिनी विकल्या. परंतु त्यानंतर ज्या वर्गाने जमिनी घेतल्या त्या धनदांडग्यांना 18 लाख रुपये एकरी भाव मिळाला. याचा फायदा फार कमी शेतकऱ्यांना झाला. दिल्ली कॉरिडोर साठी गेलेल्या जमिनीतून जामगाव येथे बेसुमार उत्खनन झाले असल्याची माहिती स्थानिक नागरिक यांनी पत्रकारांना दिली. तर सदर उत्खनना कडे संबंधित महसूल खात्याने दुर्लक्ष केले असल्याची चर्चा आहे. एकंदरीत प्रकरण काय याचा खुलासा अधिकारी वर्गाने करावा व खरोखरच माती चोरी झाले असेल तर संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जामगाव हद्दीत बेसुमार माती उत्खनन. महसूल खात्याचे दुर्लक्ष Read More »

konkandhara 2026 05 09T225019.327

कामगारांसाठी पाकळे फाऊंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

आमदार चषक 2026 मध्ये 300 कूपनचा लकी ड्रॉ; कंपनीला लागलेली मोटारसायकल कामगारांना अर्पणचिपळूण :संदिप घागशेखर निकम प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक 2026 स्पर्धेनिमित्त उद्योगपती सचिन पाकळे यांनी 300 कूपन खरेदी करून लकी ड्रॉमध्ये सहभाग घेतला होता. या सोडतीत त्यांच्या कंपनीच्या नावावर मोटारसायकल लागली. मात्र, ही मोटारसायकल स्वतःकडे न ठेवता कामगारांना देण्याचा निर्णय घेत त्यांनी कंपनीतील कामगारांमधून स्वतंत्र लकी ड्रॉ काढत सामाजिक बांधिलकी जपली.चिपळूण-संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या हस्ते ही सोडत पार पडली. सुभाष पाकळे फाऊंडेशनच्या माध्यमातून सचिन कात कंपनी व तिरुपती कात कंपनी, तसेच सचिन पाकळे व संजय पाकळे यांनी हा कामगाराभिमुख उपक्रम राबविला.कामगारांमधून काढलेल्या या विशेष लकी ड्रॉमध्ये एका भाग्यवान कामगाराला मोटारसायकल प्रदान करण्यात आली. याशिवाय मिक्सर, कुकर, हॉटपॉट, स्टील डबे, पाण्याच्या टाक्या, टॉर्च, इस्त्री, ब्लूटूथ स्पीकर, गॅस शेगडी, सिलिंग फॅन आदी वस्तूंचेही वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास पूनम पाकळे, इरा डेव्हलपमेंटचे सुरेश सावर्डेकर, महावितरणचे निवृत्त अधिकारी अशोक काजरोळकर, शेखर निकम प्रतिष्ठानचे देवराज गरगरटे, सतीश सावर्डेकर, राजेश सुर्वे, विकास भंडारी, सुमित भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आमदार शेखर निकम, उद्योगपती सचिन पाकळे तसेच सचिन कात व तिरुपती कात कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदिप घाग, सचिन गुरव, बाळा सावंत, सुयोग खेडेकर, सुरेश सूर्यवंशी, शरद चव्हाण, प्रणय चव्हाण, सुगंधा घाणेकर, सुरक्षा घाग, प्रणय साबळे, अनुराग चव्हाण, प्रणय मोरे, महेश सावंत, अमित म्हापार्ले, राहुल पवार, सुमित, सुजित बिजितकर आदींनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.कामगारांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कामगारांसाठी पाकळे फाऊंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम Read More »

konkandhara 2026 05 09T115708.210

सिंधुदुर्गनगरी येथेअस्सल गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ

प्राधिकरण क्षेत्राला मिळाली हक्काची बाजारपेठ; शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला चालना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग : भूषण सावंतसिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून येथे वास्तव्यास असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांसाठी स्थानिक स्तरावर दर्जेदार आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होणे काळाची गरज होती. ओरोस एस.टी. स्टँड परिसरात सुरू करण्यात आलेल्या “अस्सल गावठी आठवडा बाजारामुळे” आता प्राधिकरण क्षेत्राला स्वतःची हक्काची बाजारपेठ मिळाली असून नागरिकांना ताज्या भाज्या, फळे आणि स्थानिक सेंद्रीय शेतीमाल सहज उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा प्राधिकरण अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांनी केले. ओरोस येथील एस.टी. स्टँड परिसरात आज अस्सल गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साहिल, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, प्राधिकरण सदस्य प्रभाकर सावंत, ओरोसचे उपसरपंच पाडूरंग मालवणकर, रानबांबूळीचे सरपंच परशुराम परब, ग्रामपंचायत सदस्य राजश्री नाईक, संतोष वालावलकर यांच्यासह नागरिक, शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, गावठी बाजार सुरू करण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिकांनी घेतलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. या बाजारामुळे आता प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांना भाज्या आणि शेतीमाल सिंधुदुर्ग नगरी येथेच चांगल्या प्रतीचा आणि ताजा माल उपलब्ध होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनाही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.” त्यांनी पुढे सांगितले की, प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून भविष्यात प्राधिकरण क्षेत्रातील मूलभूत सुविधा, बाजार व्यवस्था आणि नागरिकांच्या गरजांनुसार आवश्यक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकाभिमुख उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शुभारंभानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बाजारातील प्रत्येक स्टॉलला भेट देत विक्रीसाठी ठेवलेल्या विविध भाज्या, फळे आणि सेंद्रीय उत्पादनांची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. तसेच या उपक्रमात उत्साहाने सहभागी झालेल्या शेतकरी आणि विक्रेत्यांचे अभिनंदनही त्यांनी केले.हा “अस्सल गावठी आठवडा बाजार” दर शनिवारी सकाळी ७.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत भरविण्यात येणार असून येथे स्थानिक सेंद्रीय शेतीमालाचे “शेतकरी ते ग्राहक” थेट विक्री केंद्र कार्यरत राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ताजा आणि नैसर्गिक शेतीमाल मिळण्यासोबतच स्थानिक शेतकऱ्यांनाही हक्काची विक्रीची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राधिकरण सदस्य प्रभाकर सावंत यांनी मानले.

सिंधुदुर्गनगरी येथेअस्सल गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ Read More »

konkandhara 2026 05 09T114701.330

सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा; पर्यटन हंगामात तुटवड्याची समस्या तीव्र

रत्नागिरी, प्रतिनिधी : जिल्ह्यात पर्यटन हंगामाला वेग आल्याने शहरासह किनारी तालुक्यांतील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः सुट्यांच्या दिवसांत सीएनजीची उपलब्धता वाढविण्याची गरज असल्याची मागणी वाहनचालक आणि रिक्षा व्यावसायिकांकडून होत आहे. आखाती देशांमधील युद्धानंतर देशभरात इंधनटंचाई निर्माण झाली होती. त्या काळात प्रशासनाने योग्य नियोजन केल्यामुळे वाहनांच्या रांगा टाळण्यात यश आले होते. मात्र सध्या पर्यटन हंगामाच्या ऐन काळातच सीएनजीचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. रत्नागिरी शहरासह समुद्रकिनारी असलेल्या तालुक्यांमध्ये ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सीएनजी पंपांबाहेर रिक्षा तसेच पर्यटकांच्या वाहनांची गर्दी होत आहे. वाहनांना गॅस भरण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने पर्यटकांचा वेळ वाया जात आहे. तसेच रिक्षा व्यावसायिकांच्या दैनंदिन उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे. सुट्यांच्या कालावधीत सीएनजीचा अतिरिक्त साठा उपलब्ध करून देत वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा; पर्यटन हंगामात तुटवड्याची समस्या तीव्र Read More »