रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यू व इतर किटकजन्य आजारांवर नियंत्रणासाठी वर्षभर विविध जनजागृती व प्रतिबंधात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. याबाबत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून एडिस डासाच्या मादीच्या चाव्यामुळे त्याचा प्रसार होतो. डेंग्यूसह इतर किटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे. साचलेले पाणी हे डासांच्या उत्पत्तीचे प्रमुख कारण असल्याने “आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस” ही संकल्पना प्रभावीपणे राबविल्यास डासांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातूनच किटकजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात २०२३ मध्ये डेंग्यूचे २३९ रुग्ण, २०२४ मध्ये २५६ रुग्ण, तर २०२५ मध्ये ४२ रुग्ण आढळले होते. मात्र आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे २०२६ मध्ये जानेवारीपासून आजपर्यंत केवळ ३ रुग्ण आढळून आले आहेत.
डेंग्यू प्रतिबंधासाठी ग्रामपंचायतींनी परिसर स्वच्छ ठेवणे, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, कायमस्वरूपी पाणीसाठ्यांमध्ये गप्पी मासे सोडणे, पाणी साठवणुकीची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून स्वच्छ करणे, तसेच प्लास्टिक, टायर व भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे, अशा उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तुंबलेली गटारे वाहती करणे, डबकी बुजविणे, शौचालयांच्या व्हेंट पाईपला जाळी बसविणे आणि गावपातळीवर जनजागृती करणे यावरही भर देण्यात आला आहे.
याशिवाय, पाणी शुद्धीकरणासाठी योग्य प्रमाणात टीसीएल पावडरचा वापर करणे, पाणी उकळून व गाळून पिणे, तसेच टायर व भंगार व्यावसायिकांनी परिसरात पावसाचे पाणी साचू न देण्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात तयार होणाऱ्या डबक्यांमध्ये आळीनाशकांचा वापर किंवा गप्पी मासे सोडण्याच्या उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.
संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करून टायर, फुटकी भांडी आणि प्लास्टिक साहित्याची विल्हेवाट लावणे, तसेच शासकीय इमारती, दवाखाने, एसटी डेपो आणि रेल्वे स्थानक परिसरात डासोत्पत्ती स्थाने आहेत का याची नियमित तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
नागरिकांनी सहकार्य करून या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेत राबवल्यास डास व आळी घनता कमी होऊन किटकजन्य आजारांचा उद्रेक टाळता येईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.















