रत्नागिरी, प्रतिनिधी : जिल्ह्यात पर्यटन हंगामाला वेग आल्याने शहरासह किनारी तालुक्यांतील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः सुट्यांच्या दिवसांत सीएनजीची उपलब्धता वाढविण्याची गरज असल्याची मागणी वाहनचालक आणि रिक्षा व्यावसायिकांकडून होत आहे.
आखाती देशांमधील युद्धानंतर देशभरात इंधनटंचाई निर्माण झाली होती. त्या काळात प्रशासनाने योग्य नियोजन केल्यामुळे वाहनांच्या रांगा टाळण्यात यश आले होते. मात्र सध्या पर्यटन हंगामाच्या ऐन काळातच सीएनजीचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. रत्नागिरी शहरासह समुद्रकिनारी असलेल्या तालुक्यांमध्ये ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सीएनजी पंपांबाहेर रिक्षा तसेच पर्यटकांच्या वाहनांची गर्दी होत आहे. वाहनांना गॅस भरण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने पर्यटकांचा वेळ वाया जात आहे. तसेच रिक्षा व्यावसायिकांच्या दैनंदिन उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुट्यांच्या कालावधीत सीएनजीचा अतिरिक्त साठा उपलब्ध करून देत वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.















