रत्नागिरी । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वी (SSC) चा निकाल ०८ मे २०२६ रोजी जाहीर केला असून, यामध्ये कोकण विभागीय मंडळाने पुन्हा एकदा राज्यात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ही माहिती कोकण बोर्डाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी दिली.
यावर्षी राज्याचा एकूण नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९२.०९ टक्के लागला असताना, कोकण विभागाचा निकाल ९७.६२ टक्के इतका लागून तो राज्यातील सर्व नऊ विभागीय मंडळांमध्ये सर्वाधिक ठरला आहे. कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९७.३७ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.१३ टक्के इतका नोंदवला गेला आहे. या परीक्षेत नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून, राज्यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.९६ आहे, जी मुलांच्या ८९.५६ टक्क्यांपेक्षा ५.४० टक्क्यांनी अधिक आहे. कोकण विभागाचा विचार करता मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.५५ टक्के असून मुलांचे प्रमाण ९६.७३ टक्के इतके आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी ‘कॉपीमुक्त अभियान’ अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आले, ज्याचा सकारात्मक परिणाम निकालावर दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कोकण विभागातील सर्व ११४ परीक्षा केंद्रांवर CCTV कॅमेरे अनिवार्य करण्यात आल्यामुळे परीक्षा कालावधीत एकही गैरप्रकार घडला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ४१२ माध्यमिक विद्यालये आणि ७३ परीक्षा केंद्रे होती, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२८ विद्यालये आणि ४१ परीक्षा केंद्रे होती. संपूर्ण राज्यातून सुमारे १५.५५ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी ६,६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच, ६४ विषयांपैकी २० विषयांचा निकाल १०० टक्के लागला असून ४.२२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी मिळवली आहे.
निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, त्यांच्यासाठी मंडळाने ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गुणपडताळणीसाठी ९ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. तसेच, उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जून-जुलै २०२६ मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाणार आहे, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी यावर्षी परीक्षेच्या वेळापत्रकात प्रमुख विषयांच्या पेपरमध्ये सुट्टी देण्यात आली होती आणि १० समुपदेशकांची नियुक्तीही करण्यात आली होती. कोकण विभागाने सन २०१२ पासून आपले प्रथम स्थान सातत्याने टिकवून ठेवल्याबद्दल मंडळाने सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.















