konkandhara.com

Editorial

पालघरच्या विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प अपूर्ण – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पालघरच्या विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प अपूर्ण : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पालघर, दि. १९ (जिमाका) : भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल करताना समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करणे अत्यावश्यक आहे. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी डहाणू येथे केले. राज्यपालपदाची सूत्रे मार्च 2026 मध्ये स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच पालघर जिल्हा दौरा होता. अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती या शुभ मुहूर्तावर डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे वनबंधू ट्रस्ट आणि भारत विकास संगम यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी फिरते दवाखाने व रुग्णवाहिका सेवांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडूलाल सोनी, डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘सर्वे भवन्तु निरामयः’ या मंत्राने भाषणाची सुरुवात करत राज्यपालांनी सांगितले की, आरोग्य सुविधा केवळ शहरांपुरत्याच मर्यादित न राहता दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पालघर सारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात रोजगार, आरोग्य व पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ‘आदर्श गाव’ संकल्पना राबविण्यासाठी लवकरच सर्वसमावेशक विकास आराखडा तयार केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या विचारांचा उल्लेख करत ‘अंत्योदय’ संकल्पनेवर भर देत त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगितले. वनबंधू ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या वेळी लाडूलाल सोनी यांनी प्रास्ताविकात ट्रस्टच्या आरोग्य प्रकल्पांची माहिती दिली. तर डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रशासकीय व सामाजिक संस्थांच्या समन्वयातून दुर्गम भागाचा विकास साधता येतो, असे मत व्यक्त केले. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील आरोग्य स्थिती व शासकीय योजनांची माहिती देत प्रशासन राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली अधिक वेगाने काम करेल, अशी ग्वाही दिली.

पालघरच्या विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प अपूर्ण : राज्यपाल जिष्णु देव वर्मा Read More »

सरंद येथे बुद्ध विहार भूमिपूजन सोहळा उत्साहात; आमदार शेखर निकम उपस्थित

सरंद येथे बुद्ध विहार भूमिपूजन सोहळा उत्साहात

संगमेश्वर : तालुक्यातील मौजे सरंद येथे बहुजन विकास मंडळ, मुंबई व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध विहाराच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडलेले भूमिपूजन होय. यावेळी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले, “बुद्ध विहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून समाजाला दिशा देणारे केंद्र आहे. येथे विचारांची देवाणघेवाण, शिक्षण आणि सामाजिक एकात्मता वाढीस लागेल. अशा उपक्रमांमुळे गावाचा सर्वांगीण विकास साध्य होईल. आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रगतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे.” कार्यक्रमाला दीपक जाधव, जि. प. सदस्य सुशील भायजे, प्रिया सुर्वे, संजय कदम, नाना कांगणे, शेखर उकर्डे, सोनाली जाधव, तुकाराम मेस्त्री, उमेश पवार, नंदन भागवत, अक्षय चव्हाण, गोपाळ जाधव, महेंद्र जाधव, राजेश जाधव, विवेक जाधव, महेंद्र अमर जाधव, तुकाराम जाधव, नवनाथ जाधव, अंजली जाधव, रश्मी जाधव, जगदीश जाधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वातावरणाला चालना मिळून विकासाची नवी दिशा निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

सरंद येथे बुद्ध विहार भूमिपूजन सोहळा उत्साहात Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; हातखंबा येथे चार वाहनांची धडक

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातहातखंबा येथे चार वाहनांची धडक, एक जण गंभीर जखमी

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग वर अपघातांची मालिका सुरूच असून, रविवारी पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टीलने भरलेला ट्रक, आयशर टेम्पो, आंबा वाहतूक करणारी बोलेरो आणि एक कार अशी चार वाहने एकमेकांवर आदळली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात ट्रकमधील क्लिनर गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू असून अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, या महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातहातखंबा येथे चार वाहनांची धडक, एक जण गंभीर जखमी Read More »

kuvarbav-slum-rehabilitation-verification-uday-samant

कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्रता पडताळणीला गती देण्याचे निर्देशपालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा आढावा बैठकीत भर

रत्नागिरी, दि. 18 (जिमाका): कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी पात्र लाभार्थ्यांची सखोल पडताळणी करून पुढील कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. कुवारबाव ग्रामपंचायत सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेवक बंड्या साळवी, पंचायत समिती उपसभापती गजानन धनावडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ तसेच ग्रामपंचायत प्रशासक श्रीमती तळेकर आदी उपस्थित होते. कुवारबाव येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या योजनेची माहिती नागरिकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे गरीब नागरिकांना सुरक्षित घरे उपलब्ध होऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, पात्रता निकषांबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासनाच्या निर्णयानुसारच प्रक्रिया राबवली जाईल. तसेच झोपडपट्टीतील मुलांसाठी शिक्षण, खेळ, अंगणवाडी व बालवाडी यांसारख्या सुविधा एकाच परिसरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा राज्यातील आदर्श प्रकल्प ठरेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्रता पडताळणीला गती देण्याचे निर्देशपालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा आढावा बैठकीत भर Read More »

महिला आरक्षणाचा बनाव उघडा, 'डीलिमिटेशन' हा देश तोडण्याचा कट; खासदार संजय सिंह यांचा घणाघात!

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह

नवी दिल्ली: “देशातील जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि गोदी मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणे बंद करा,” अशा शब्दांत आम आदमी पक्षाचे फायरब्रँड नेते खासदार संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. महिला आरक्षण विधेयक विरोधकांनी पाडल्याचा जो कांगावा भाजप करत आहे, तो पूर्णपणे पायाहीन असून भाजपचा खरा चेहरा आता देशासमोर उघडा पडला आहे, असा घणाघात त्यांनी केला. संजय सिंह यांनी कागदपत्रे दाखवत ठणकावून सांगितले की, २०२३ मध्ये सर्वसंमतीने मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक १६ एप्रिल २०२६ रोजीच अधिसूचित झाले असून ते आज देशात लागू आहे. मग काल नेमका कोणता खेळ खेळला गेला, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारची पोलखोल केली. संजय सिंह यांनी भाजपला घेरताना म्हटले की, महिला आरक्षणाच्या नावाखाली ‘डीलिमिटेशन’ म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेचे जे पाप सरकार करू पाहत होते, ते केवळ देशाच्या तुकडे-तुकडे गँगचा अजेंडा होता. या विधेयकाच्या आडून उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यात वादाची ठिणगी टाकण्याचे कारस्थान रचले गेले होते. तामिळनाडू आणि बंगालसारख्या राज्यांच्या संसदेतील जागा कमी करून त्या राज्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत होते, ज्याला आम्ही आणि संपूर्ण इंडिया आघाडीने खंबीरपणे विरोध करून धूळ चारली आहे. “आम्ही देश तुटू देणार नाही आणि राज्या-राज्यांमध्ये भांडणे लावण्याचा भाजपचा मनसुबा कधीही पूर्ण होऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी या वेळी दिला. भाजपच्या मातृसंस्थेवर निशाणा साधताना संजय सिंह म्हणाले की, ज्या आरएसएसने १०० वर्षांच्या इतिहासात कधीही एका महिलेला प्रमुख पद दिले नाही आणि ज्या भाजपमध्ये महिलांना केवळ निवडणुकीचे साधन मानले जाते, त्यांनी आम्हाला महिला हित शिकवू नये. मणिपूरमध्ये महिलांची विटंबना झाली तेव्हा मोदीजी गप्प होते, हाथरस आणि अंकिता भंडारी प्रकरणात भाजपचे नेते बलात्काऱ्यांना संरक्षण देत होते, तेव्हा त्यांचे महिला प्रेम कुठे गेले होते, असा बोचरा सवाल त्यांनी विचारला. बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सहानुभूती मिळवण्यासाठी हा सारा प्रपंचा रचला गेला होता, पण आता हा डाव भाजपवरच उलटला असून दक्षिण भारतातून त्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. संजय सिंह यांनी एका स्टिंग ऑपरेशनचा दाखला देत भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. बाबरी मशीद बांधण्याचा दावा करणाऱ्या हुमायून कबीरला भाजपने १००० कोटी रुपये दिले असून केंद्र सरकारने त्याला झेड श्रेणीची सुरक्षा का पुरवली आहे, याचे उत्तर मोदींनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. भाजप एका बाजूला धर्माचे राजकारण करते आणि दुसरीकडे पडद्यामागून काय खेळ खेळते, हे आता जनतेला समजले आहे. शेवटी, महिला आरक्षण सुरक्षित आहे आणि राहील, पण भाजपचे ‘डीलिमिटेशन’चे राजकारण आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा वज्रनिर्धार त्यांनी व्यक्त केला.

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह Read More »

महिलांच्या नावाखाली 'सीटांचा' जुगाड करणाऱ्यांचा मुखवटा फाटला!

महिलांच्या नावाखाली ‘सीटांचा’ जुगाड करणाऱ्यांचा मुखवटा फाटला!

भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात १७ एप्रिल २०२६ ची संध्याकाळ ही केवळ एका विधेयकाच्या पराभवाची रात्र नव्हती, तर ती एका अहंकारी सत्तेच्या ‘नॅरेटिव्ह’ आणि ‘टॅक्टिक्स’च्या सपशेल अपयशाची साक्ष होती. ज्या महिला आरक्षणाच्या नावाखाली गेल्या अडीच वर्षांपासून इव्हेंटबाजीचा महापूर वाहिला गेला, त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणलेल्या घटनादुरुस्ती विधेयकाचा लोकसभा पटलावर झालेला मानहानीकारक पराभव हा सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी राजकारणावर ओढलेला आसूड आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, ज्या विधेयकाला २०२३ मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जवळजवळ १०० टक्के बहुमताने पाठिंबा दिला होता, त्याच विषयावर अडीच वर्षांनंतर सरकारला पराभव का पत्करावा लागला? याचे उत्तर सत्ताधाऱ्यांच्या नियत आणि नीतीमध्ये दडलेले आहे. महिलांना आरक्षण देण्याच्या पवित्र हेतूचा आडोसा घेऊन प्रत्यक्षात संसदीय जागांच्या पुनर्रचनेचा (डीलिमिटेशन) जो डाव रचला गेला होता, तो आता उघडा पडला आहे. विरोधकांनी या ‘नॅरेटिव्ह’च्या भूताला न घाबरता ज्या प्रकारे एकजूट दाखवली, ती भारतीय लोकशाहीसाठी आशादायक आहे. या संपूर्ण नाट्यात गृहमंत्री ज्या प्रकारे सभागृहात एक तासाचा वेळ मागून ‘झेरॉक्स’ काढण्याचे आणि ‘अमेंडमेंट’ जोडण्याचे आश्वासन देत होते, ते एखाद्या डिजिटल युगात जगणाऱ्या सरकारसाठी अत्यंत हास्यास्पद होते. ज्या सभागृहात खासदारांच्या टेबलासमोर डिजिटल बोर्ड आहेत, जिथे अर्थसंकल्प डिजिटल स्वरूपात मांडला जातो, तिथे गृहमंत्री झेरॉक्सच्या नावाखाली वेळ का मारून नेऊ पाहत होते? हा केवळ वेळ काढूपणा नव्हता, तर समोर दिसत असलेला पराभव टाळण्यासाठी केलेली ती एक केविलवाणी धडपड होती. ट्रम्प यांच्याप्रमाणेच सत्ताधारी आपली हार स्वीकारायला तयार नाहीत, हेच यातून स्पष्ट झाले. ऐतिहासिक संदर्भांचा विचार केला तर, २००१ मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारने मतदारसंघांच्या फेररचनेवर २०२६ पर्यंत बंदी का घातली होती, याचे उत्तर तत्कालीन कायदा मंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले होते. जेटलींचा तर्क अत्यंत स्पष्ट आणि न्यायसंगत होता. ज्या राज्यांनी कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम यशस्वीपणे राबवले, त्यांची लोकसंख्या स्थिर झाली आहे. जर लोकसंख्येच्या आधारावर आता जागा वाढवल्या, तर ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केले नाही (प्रामुख्याने उत्तर भारतातील राज्ये), त्यांना बक्षीस म्हणून जास्त जागा मिळतील आणि ज्या दक्षिण भारतीय राज्यांनी राष्ट्रीय धोरण राबवले, त्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व कमी होऊन त्यांना एक प्रकारे शिक्षा मिळेल. हाच मुद्दा आज दक्षिणेतील राज्ये पोटतिडकीने मांडत आहेत. पण आजचे सरकार जेटलींच्या या तर्काला हरताळ फासून केवळ बहुसंख्याकवादाच्या जोरावर आपली राजकीय पोळी भाजून घेऊ पाहत आहे. जनगणना न करण्यामागे दिलेले कोविडचे कारण हे तर अजबच आहे. कोविड काळात निवडणुका थांबल्या नाहीत, पंतप्रधानांचे परदेश दौरे थांबले नाहीत, विरोधकांवरील छापे थांबले नाहीत की मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणे थांबले नाही; मग केवळ जनगणनेचेच काम का थांबले? याचे उत्तर स्पष्ट आहे – जोपर्यंत जनगणना होत नाही, तोपर्यंत जातीनिहाय आकडेवारी समोर येणार नाही आणि जोपर्यंत ती येत नाही, तोपर्यंत सत्ताधाऱ्यांना आपल्या मनमानी पद्धतीने फेररचना करण्याचा मार्ग मोकळा राहील.आज देशाची परराष्ट्र नीती अपयशी ठरत असताना, इराण-इस्रायल संघर्षासारख्या जागतिक आव्हानांमुळे आर्थिक संकट उभे ठाकलेले असताना, सरकार मात्र अडीच वर्षांपूर्वीच पास झालेल्या कायद्याच्या अंमलबजावणीचे खापर विरोधकांवर फोडण्यात धन्यता मानत आहे. रात्री ८:३० वाजता राष्ट्राला संबोधित करून केवळ इव्हेंटबाजी करणे, ही या सरकारची कार्यपद्धती बनली आहे. पण सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, लोकशाहीत कोणतीही हार किंवा जीत कायमस्वरूपी नसते. १७ एप्रिलच्या त्या संध्याकाळी सरकारने केवळ विधेयक गमावले नाही, तर आपला नैतिक अधिकारही गमावला आहे. शेवटी, महिला आरक्षणाचे श्रेय लाटण्यासाठी २०२३ मध्येच भाजप मुख्यालयात जल्लोष साजरा करणाऱ्या पंतप्रधानांनी आज देशाला सांगावे की, जर तो कायदा झाला होता, तर आज या नवीन प्रपंचाची गरज काय होती? ही शुद्ध फसवणूक आहे. लोकसंख्या स्थिरीकरणाचे लक्ष्य गाठण्याऐवजी सत्ताधारी पक्षाचे नेते आणि त्यांचे वैचारिक मार्गदर्शक जेव्हा जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन करतात, तेव्हा त्यांचा उद्देश लोकशाही नसून केवळ संख्याबळाच्या जोरावर सत्ता टिकवून ठेवणे हाच असतो. विरोधकांच्या या एकजुटीने सरकारला पहिल्यांदाच आपली जागा दाखवून दिली आहे. ही लढाई केवळ आरक्षणाची नाही, तर संघराज्य रचनेच्या अस्तित्वाची आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणाची आहे.

महिलांच्या नावाखाली ‘सीटांचा’ जुगाड करणाऱ्यांचा मुखवटा फाटला! Read More »

konkandhara 50

व्हॉइस ऑफ मीडिया सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची निवड

​दोडामार्ग : भूषण सावंत : ९८ देशांत कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या जागतिक पत्रकार संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर, संघटनेच्या कार्याला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तालुकास्तरावर कार्यकारिणी विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ​या सभेचा मुख्य उद्देश गावपातळीवरील पत्रकारांना संघटनेच्या व्यासपीठावर एकत्र आणणे हा होता. पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांच्या कामातील अडचणी समजून घेऊन त्या प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी तालुकास्तरावर सक्रिय टीम असणे आवश्यक आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यश माधव यांची तरुण, तडफदार आणि धडाकेबाज पत्रकार म्हणून असलेली ओळख संघटनेसाठी मोलाची ठरेल, या उद्देशाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माधव यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव संघटित होतील आणि संघटना अधिक बलशाली होईल, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ​या निवडीप्रसंगी जिल्हाध्यक्ष भूषण सावंत, शैलेश मयेकर, विष्णू धावडे, कार्याध्यक्ष संजय पिळणकर, मिलिंद धुरी व भूषण देसाई, सरचिटणीस अमित पालव, खजिनदार आनंद कांडरकर, उपाध्यक्ष जय भोसले, सुयोग पंडित व राजा दळवी, जनसंपर्क आणि प्रसिद्धीप्रमुख दीपक पटेकर, संघटक नयनेश गावडे, कार्यवाहक विजय सावंत आणि सदस्य रणजीत जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर यश माधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

व्हॉइस ऑफ मीडिया सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची निवड Read More »

khanoli-dashavatari-natya-mahotsav-vengurla

खानोलीत रंगणार पौराणिक नाट्य महोत्सव

दिनांक २१ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत संपन्न होणार वेंगुर्ला : प्रतिनिधीVengurla तालुक्यातील खानोली गावच्या वतीने श्री देव रवळनाथ रंगमंचावर दशावतार कलाक्षेत्रातील आघाडीच्या नाट्य मंडळांचा पौराणिक नाट्य महोत्सव २१ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. कोकणची पारंपरिक लोककला असलेल्या दशावताराचा वारसा जपत कलेला नवे व्यासपीठ देणारा हा महोत्सव २१ एप्रिल रोजी उद्घाटनाने सुरू होणार आहे. या महोत्सवात सागरेश्वर दशावतार नाट्य मंडळ आवेरे, दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग, आजगांवकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, मोचेमाडकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड, चेंदवणकर गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ आरवली आणि समारोपाच्या दिवशी खानोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ खानोली सादरीकरण करणार आहेत. या निमित्ताने भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या समारोपीय दिवशी भाग्यवान विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. उद्घाटन सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व विशाल प्रभाकर परब, रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिलजी (बंधू साहेब) मयेकर यांच्यासह सौ. वेदिका विशाल परब, राकेश धर्णे, प्रसन्ना (बाळू) देसाई, राजन गिरप, सुहास गवंडळकर, अवी (दत्ताराम) दुतोंडकर, विजय नाईक, भालचंद्र केळुसकर, जेष्ठ रंगकर्मी संतोष रेडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पौराणिक नाट्य महोत्सवासाठी नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानोली गावचे सरपंच सुभाष खानोलकर आणि ग्रामस्थांनी केले आहे.

खानोलीत रंगणार पौराणिक नाट्य महोत्सव Read More »

दापोलीत विनापरवाना दारू वाहतूक उघड; २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

देशी दारू व बिअरची वाहतूक; २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

दापोली: विनापरवाना देशी दारू व बिअरची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाविरोधात दापोली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला. या कारवाईत देशी दारू, बिअरचे बॉक्स तसेच वाहन असा एकूण २ लाख ३० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास दापोली बसस्थानकाजवळील चौकात वाहतूक कोंडी झाल्याने पोलिस पथक वाहतुकीचे नियमन करत होते. यावेळी मारुती इको (क्र. एमएच ०८ आर ८६३६) हे वाहन संशयास्पदरीत्या जाताना दिसले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारू व बिअरचे बॉक्स आढळून आले. चालक ऋतिक संतोष लांबे याच्याकडे मद्य बाळगण्याचा किंवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वाहन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तपासणीदरम्यान २६,८८० रुपये किमतीच्या जीएम संत्रा देशी दारूच्या १८० मिलीच्या ३३६ बाटल्या, ८,००० रुपये किमतीच्या ९० मिलीच्या २०० बाटल्या, ७,२०० रुपये किमतीचे टुबोर्ग बिअरचे ४८ टीन, ९,६०० रुपये किमतीच्या ६५० मिलीच्या टुबोर्ग बिअरच्या ४८ बाटल्या, ७,०२० रुपये किमतीच्या किंगफिशर बिअरच्या ३६ बाटल्या, ३,६०० रुपये किमतीचे किंगफिशर बिअरचे २४ टीन, ६,४८० रुपये किमतीचे लंडन पिल्सनर बिअरचे ४८ टीन, ११,८८० रुपये किमतीच्या लंडन पिल्सनर बिअरच्या ७२ बाटल्या तसेच सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण २ लाख ३० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दापोली पोलिस करत आहेत.

देशी दारू व बिअरची वाहतूक; २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त Read More »

गुहागर-चिपळूण मार्गावर भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

दुचाकी – व्हॅन अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

गुहागर : गुहागर-चिपळूण मार्गावरील चिखली येथील स्वामी समर्थ मठाजवळ टाटा मॅजिक मायक्रोव्हॅन आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १६) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ओम संतोष शितप (वय २०, रा. पवारसाखरी) आणि प्रतीक रमेश भुवड (वय २५) हे दोघे मित्र दुचाकीवरून (एमएच ०८ बीएच ८८३०) चिपळूणकडे जात होते. त्याचवेळी मळण येथील टाटा मॅजिक मायक्रोव्हॅन (एमएच १२ एचव्ही ५१९५) स्वामी समर्थ मठाजवळ प्रवाशाला सोडून श्रृंगारतळीच्या दिशेने परत जात असताना दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ओम शितप याचा जागीच मृत्यू झाला, तर प्रतीक भुवड गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत, पोलिस उपनिरीक्षक भोपाळे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दुचाकी – व्हॅन अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी Read More »