konkandhara.com

Editorial

संगमेश्वरमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कारवाई | हातभट्टीवर पोलिसांचा छापा

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांसह हातभट्टीवर पोलिसांची कारवाई

संगमेश्वर (प्रतिनिधी) : देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी अवैध दारू विक्री व सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया केल्या. पहाटे सुमारे १:३० वाजता कांजिवरा ते रत्नागिरी रोडवरील ओजी बिअरशॉपीसमोर सिमेंटच्या बाकावर बसून विनापरवाना बिअर पिणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अभिजीत अनंत जाधव (वय ३०) व नईम मुनवर पटेल (वय २४) अशी त्यांची नावे असून, त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७:०५ वाजता देवरुख खालची आळी येथील मच्छीमार्केटच्या पाठीमागे, गणेश घाटाजवळील नदीकिनारी पोलिसांनी हातभट्टीवर कारवाई केली. यावेळी निलेश बाळकृष्ण निवळकर (वय ३९) हा गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगून असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याच्याकडून ८ लिटर गावठी दारू व अन्य साहित्य असा एकूण ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ४९/२०२६ नोंदविण्यात आला आहे. या कारवायांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांसह हातभट्टीवर पोलिसांची कारवाई Read More »

हापूसचा आक्रसलेला हंगाम: निसर्गाची वक्रदृष्टी आणि बागायतदारांची सत्त्वपरीक्षा!

हापूसचा आक्रसलेला हंगाम आणि बागायतदारांची सत्त्वपरीक्षा

कोकणचा निसर्ग आणि तिथल्या लाल मातीचा गंध ज्या फळामध्ये एकवटला आहे, तो म्हणजे जगप्रसिद्ध हापूस आंबा. केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर भारताचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ‘फळांच्या राजा’वर यंदा निसर्गाची वक्रदृष्टी पडली आहे. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत बाजारपेठेत चैतन्य निर्माण करणारा हापूस यंदा मात्र अस्मानी संकटांच्या फेऱ्यात अडकला असून, त्याच्या चवीचा आनंद घेण्यापूर्वीच हा हंगाम आटपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामानातील लहरीपणा, अवकाळी पावसाचा तडाखा आणि वाढते तापमान यांमुळे यंदा कोकणातील हापूसच्या उत्पादनात ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. केवळ २५ टक्केच उत्पन्न हाती आल्याने बागायतदार हवालदिल झाला असून, यंदाचा हंगाम १० मेच्या सुमारास, म्हणजेच अपेक्षेपेक्षा खूपच लवकर संपण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही केवळ एका हंगामाची घट नसून, कोकणच्या आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या आंबा व्यवसायापुढील मोठे अस्तित्वाचे संकट आहे. यंदाच्या हंगामाचा मागोवा घेतला तर असे लक्षात येते की, सुरुवातीपासूनच हापूसच्या वाटेत अडचणींचे डोंगर उभे होते. कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे १ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड झाली आहे. या अफाट क्षेत्रातून दरवर्षी साधारणपणे ३ लाख ८ हजार ४८० टन इतके विक्रमी उत्पादन अपेक्षित असते. सर्वसाधारण परिस्थितीत मोहर येण्यापासून ते काढणीपर्यंत नैसर्गिक कारणांमुळे ३० ते ४० टक्के नुकसान गृहीत धरले जाते. मात्र, यंदा हे चित्र अत्यंत भयावह आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे चक्क ८० ते ८५ टक्के पीक नष्ट झाले असून, सरासरी उत्पादनाच्या केवळ १० ते १५ टक्केच उत्पन्न प्रत्यक्षात बाजारात पोहोचण्याची शक्यता आहे. हे नुकसान ऐतिहासिक आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर पीक हातचे जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकार सांगत आहेत. या संकटाचे मूळ कारण शोधले तर ‘हवामान बदल’ (क्लायमेट चेंज) हे वास्तव अंगावर काटा आणणारे आहे. थंडीचा अभाव आणि त्यानंतर पडलेले भीषण धुके यांनी आंब्याच्या मोहराचे अस्तित्वच संपवून टाकले. परागीकरणासाठी आवश्यक असलेल्या मधमाश्या आणि इतर कीटकांना धुक्यामुळे उडणे कठीण झाले, ज्यामुळे फळधारणेची नैसर्गिक प्रक्रियाच खंडित झाली. त्यातच तुडतुडे, फुलकिडे आणि फळमाशी यांच्या वाढत्या प्रादुर्भावाने उरल्यासुरल्या आशेवरही पाणी फेरले. विशेष म्हणजे, धुक्यामुळे करपणाऱ्या मोहराचे संरक्षण करण्यासाठी आजही बाजारात ठोस बुरशीनाशके उपलब्ध नाहीत, ही मोठी खेदाची बाब आहे. कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे निसर्गचक्रातील मधमाश्यांचे प्रमाण कमी झाले असून, त्याचे गंभीर परिणाम आता फळधारणेवर दिसू लागले आहेत. उत्पादनातील या तुटीचा थेट परिणाम मुंबईच्या एपीएमसी बाजारातील आवकवर दिसून येत आहे. दरवर्षी या दिवसांत साधारणपणे एक लाख हापूसच्या पेट्यांची दैनंदिन आवक होत असते, परंतु सध्या हे प्रमाण अवघ्या ४० हजारांवर स्थिरावले आहे. आगामी दिवसांत ते ५०-५५ हजारांपर्यंत जाईल असे वाटत असले, तरी दक्षिण भारतातून येणाऱ्या आंब्याच्या घुसखोरीने ही आकडेवारी फुगलेली दिसत आहे. कोकणातील देवगड आणि सिंधुदुर्गचा आंबा मे महिन्याच्या पहिल्या दशकातच निरोप घेणार असून, रत्नागिरीचा आंबा २५ मेपर्यंत कसाबसा तग धरेल, अशी चिन्हे आहेत. त्यानंतर गुजरात आणि जुन्नरच्या आंब्याची आवक सुरू होईल, पण कोकणच्या अस्सल हापूसची जागा कोणतीही दुसरी जात घेऊ शकणार नाही.एकीकडे उत्पादनाचा प्रश्न असतानाच दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीय हापूसला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आखाती देशांमध्ये सध्या असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी मार्गाने होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. सागरी वाहतूक विस्कळीत झाल्याने भारताचा हा सर्वात मोठा निर्यात बाजार यंदा हातून निसटला आहे. पर्यायी मार्ग म्हणून हवाई वाहतुकीचा विचार केला तर तिथे वाढलेल्या इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. अमेरिकेसाठी प्रति किलो ६०० रुपये आणि युरोपसाठी ४०० रुपये असा अव्वाच्या सव्वा वाहतूक खर्च असल्याने निर्यातदारांनी हात टेकले आहेत. परिणामी, दरवर्षी ६००० कोटी रुपयांची उलाढाल करणारा हापूसचा ब्रँड जागतिक बाजारपेठेत आपली चमक टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहे. या सर्व गोंधळात ग्राहकांची होणारी फसवणूक ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे. कोकणातील हापूसला ‘जीआय’ (Geographical Indication) मानांकन मिळाले आहे, ज्यामुळे त्याचे वेगळेपण सिद्ध होते. मात्र, बाजारात कर्नाटकी आंबा आणि इतर राज्यांतील आंबे सर्रासपणे ‘देवगड’ किंवा ‘रत्नागिरी’ हापूसच्या नावाने विकले जात आहेत. ही भेसळ इतकी शिस्तबद्ध आहे की, परराज्यातील आंब्यांच्या पेटीत मराठी वृत्तपत्रांची रद्दी आणि कोकणच्या नावाचे छापील बॉक्स वापरून ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. अस्सल हापूसची चव न ओळखणारा सामान्य ग्राहक यामुळे फसला जात असून, निकृष्ट दर्जाचा आंबा खाल्ल्यामुळे कोकणच्या हापूसच्या जागतिक प्रतिमेला तडे जात आहेत. क्युआर कोडची व्यवस्था असली, तरी ती अजून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली नाही, ही वस्तुस्थिती प्रशासनाचे अपयश अधोरेखित करते. आज कोकणातील आंबा बागायतदार मोठ्या विवंचनेत आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, वर्षभर बागेसाठी राबणाऱ्या कामगारांचा पगार कसा द्यायचा आणि पुढच्या हंगामासाठी भांडवल कुठून उभे करायचे, असे यक्षप्रश्न त्याच्यासमोर उभे आहेत. म्हणूनच, हेक्टरी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, ही मागणी आता तीव्र होत आहे. केवळ घोषणा न होता, जमिनीवर प्रत्यक्ष पंचनामे होऊन बागायतदाराला आधार देण्याची हीच खरी वेळ आहे. जर बागायतदार या संकटातून सावरला नाही, तर कोकणची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. शेवटी, हा केवळ एका पिकाचा प्रश्न नाही, तर तो एका संस्कृतीचा आणि अर्थकारणाचा भाग आहे. हवामान बदलाचे संकट रोखणे आपल्या हातात नसले, तरी त्यावर मात करण्यासाठी नवीन कृषी तंत्रज्ञान, बुरशीनाशकांचे संशोधन आणि भेसळ रोखण्यासाठी कडक सरकारी यंत्रणा उभारणे नक्कीच शक्य आहे. शासनस्तरावरून राज्याच्या सीमांवर कडक तपासणी होणे आणि स्थानिक पातळीवर भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. यंदाचा आंबा हंगाम कदाचित लवकर आटपेल, पण त्यातून निर्माण झालेली दाहकता भविष्यातील नियोजनासाठी डोळे उघडणारी ठरली पाहिजे. ग्राहकांनीही सजग होऊन क्यूआर कोड आणि अस्सल उत्पादकांकडूनच खरेदी करण्यावर भर दिला, तरच या ‘फळांच्या राजा’चा मान आणि बागायतदाराचा सन्मान टिकून राहील. अन्यथा, हापूसची गोडी फक्त आठवणीतच उरेल, अशी भीती वाटत आहे.

हापूसचा आक्रसलेला हंगाम आणि बागायतदारांची सत्त्वपरीक्षा Read More »

सावंतवाडी पंचायत समितीची केंद्र शाळा सातोसे येथे बैठक; शिक्षक भरती व पटसंख्या वाढीवर चर्चा

सावंतवाडी : प्रतिनिधी (संजय पिळणकर) सावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणे आणि शाळांची पटसंख्या वाढवणे या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी दी २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.ही सभा केंद्र शाळा सातोसे येथे पार पडणार आहे. पंचायत समिती सावंतवाडीच्या दिनांक २४ मार्च २०२६ रोजी झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये पंचायत समिती सदस्य उदय पारीपत्ये यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते.यामध्ये प्रामुख्याने सावंतवाडी गटातील जिल्हा परिषद शाळांमधील पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे भरणे आणि महाराष्ट्र-गोवा सीमाभागातील शाळांची कमी होत असलेली पटसंख्या वाढवण्यासाठी उपाययोजना करणे,या विषयांचा समावेश होता.​याच विषयांचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील कार्यवाही निश्चित करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती सावंतवाडी) यांनी ही बैठक बोलावली आहे. या सभेला पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.तसेच सातोसे केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सचिव,तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच यांना या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी सविता परब यांनी केले आहे. सीमाभागातील शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची संख्या टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने या सभेकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

सावंतवाडी पंचायत समितीची केंद्र शाळा सातोसे येथे बैठक; शिक्षक भरती व पटसंख्या वाढीवर चर्चा Read More »

EditorialWebdesk

निकृष्ट रस्ता कामाविरोधात उसप येथे ग्रामस्थांचे उपोषण

दोडामार्ग : भूषण सावंत: पिकुळे तिठा ते उसप या मुख्य रस्त्याच्या कामात झालेल्या दिरंगाईसोबतच अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात उसप येथील ग्रामस्थांनी आज, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी तीव्र आंदोलन छेडत उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. सदर रस्ता हा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, कामाचा दर्जा खालावलेला असल्याने तसेच काम वेळेत पूर्ण होत नसल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या उपोषणात खालील ग्रामस्थ सहभागी झाले आहेत श्री. देवू बाळू गवस, सुरेश विष्णू गवस, शंकर बाळाराम नाईक, रामा गोविंद धुरी, विठोबा नारायण नाईक, सखाराम नाईक, महादेव सुतार, विजय गवस, प्रकाश मोरजकर, वैभव विष्णू गवस, सुनील गवस, मनीष गवस, शैलेश गवस, अमोल मोरजकर, दिनेश नाईक, सुनील गवस सहभागी झाले आहेत.ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, रस्ता कामाची तात्काळ चौकशी करून दर्जेदार काम पूर्ण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. या उपोषणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

निकृष्ट रस्ता कामाविरोधात उसप येथे ग्रामस्थांचे उपोषण Read More »

पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली; धक्कादायक घटना

पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ पसरली होती. सुदैवाने, रेल्वे पोलिस आणि संबंधित यंत्रणेने तत्परता दाखवत तात्काळ मदतकार्य सुरू केले. त्यांच्या वेगवान कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लिफ्टच्या देखभालीबाबत आणि तांत्रिक तपासणीबाबत अधिक काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.  

पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली; धक्कादायक घटना Read More »

ईएमआयचा फास आणि कॉर्पोरेट गुलामगिरी: स्वप्नांची कत्तल थांबणार कधी?

ईएमआयचा फास आणि स्वप्नांची कत्तल: कॉर्पोरेट गुलामगिरीचा नवा चेहरा!

आजच्या तथाकथित आधुनिक भारतात गुलामी संपली आहे असे आपल्याला वाटते, पण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. १८ व्या शतकातील गुलामी शस्त्रांच्या धाकाने होती, तर २१ व्या शतकातील ही ‘कॉर्पोरेट गुलामी’ ईएमआयच्या साखळदंडांनी जखडलेली आहे. गॅलप नावाच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचे आकडे आपल्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. जगातील ७७ टक्के लोक आपल्या कामात आनंदी नाहीत आणि भारतात तर ही परिस्थिती अधिकच भयानक आहे. १० पैकी ८ ते ९ लोक दररोज सकाळी अशा ठिकाणी कामाला जातात जिथे त्यांचे मन लागत नाही. हे कसले जीवन आहे? हे तर जिवंतपणी शांत झालेला मुडदा होण्यासारखे आहे. सर्वात धोकादायक गोष्ट ही नाही की आपण गरीब आहोत, तर सर्वात धोकादायक गोष्ट ही आहे की आपल्या स्वप्नांचा मृत्यू झाला आहे. आपल्या देशात करिअरच्या नावाखाली एक मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. पालकांच्या डोक्यात फक्त दोनच शब्द फिरत असतात – इंजिनिअर किंवा डॉक्टर. १६ व्या वर्षापासूनच विद्यार्थ्यांच्या गळ्याला या स्पर्धेचा फास लावला जातो. कोटासारख्या शहरांमध्ये तीन-चार लाख रुपये भरून मुलांवर ७०-७० तास अभ्यासाचा दबाव टाकला जातो. हा दबाव फक्त शिक्षणाचा नसतो, तर तो भविष्यातील ‘गुंतवणुकीच्या परताव्याचा’ असतो. मुलगा २२ वर्षांचा होतो तोवर त्याच्या डोक्यावर १० लाखांचे शैक्षणिक कर्ज असते. हे कर्ज फेडण्यासाठी तो २५ हजारांच्या नोकरीत स्वतःला गाडून घेतो. एकदा का ही चक्राकार गती सुरू झाली की, मग नवी दुचाकी, महागडा फोन, कार आणि मग २० वर्षांचा होम लोनचा ईएमआय! हे आहेत ते ‘सोन्याचे पिंजरे’ ज्यात आपली तरुण पिढी कैद झाली आहे. आजचे ‘काम हेच जीवन आहे’ हे मानणारे कल्चर तर या त्रासदायक कामाचे उदात्तीकरण करत आहे. रात्री ११ वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसणे म्हणजे ‘डेडिकेशन’ आणि सुट्टीच्या दिवशीही काम करणे म्हणजे ‘ग्रोथ माइंडसेट’ अशी नवी व्याख्या तयार केली जात आहे. ७० तास काम करण्याचे सल्ले देणारे हे भांडवलदार विसरतात की, या दबावामुळे २६ वर्षांच्या तरुणांना हार्ट अटॅक येत नसून ‘पॅनिक अटॅक’ येत आहेत. ही केवळ नोकरी नाही, तर हे पद्धतशीरपणे चालवले जाणारे मानसिक शोषण आहे. शाळांपासून कॉलेजपर्यंत केवळ ‘आज्ञाधारक’ राहण्याचे शिक्षण दिले जाते, ‘संशोधक’ किंवा ‘कलाकार’ होण्याचे नाही. १२ हजार करिअरच्या संधी असताना एका सरासरी भारतीय विद्यार्थ्याला केवळ १०-१५ पर्यायांचीच माहिती असते. हे आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचे सर्वात मोठे अपयश आहे. पण या व्यवस्थेला दोष देऊन आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. ‘पॅशन शोधा’ असे सांगणारे व्हिडिओ आपल्याला अधिक गोंधळात टाकतात. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, पॅशन हा काही जमिनीखाली दडलेला खजिना नाही जो एकदा सापडला की आयुष्य सेट होईल. पॅशन हे एका रोपट्यासारखे आहे, जे अनुभवाच्या खताने आणि मेहनतीने फुलवावे लागते. कोणत्याही नवीन कामात प्रवीण होण्यासाठी फक्त २० तास लागतात. दररोज ४५ मिनिटे जर आपण एखाद्या नवीन गोष्टीसाठी दिली, तर एका महिन्यात आपल्याला समजते की ते काम आपल्यासाठी आहे की नाही. रॉजर फेडरर किंवा महेंद्रसिंह धोनी हे काही पहिल्या दिवसापासून चॅम्पियन नव्हते; त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक खेळ खेळून पाहिले आणि नंतर स्वतःचे क्षेत्र निवडले.यश मिळवण्यासाठी केवळ आयक्यू (IQ) किंवा टॅलेंटची गरज नसते, तर ‘ग्रिट’ (Grit) म्हणजे चिकाटीची गरज असते. जर आपण आपल्या कामात इतके मग्न होऊ शकलो की आपल्याला वेळेचे, भुकेचे आणि फोनचे भान राहणार नाही, तर त्याला ‘फ्लो स्टेट’ (Flow State) म्हणतात. ही अवस्था ज्याला प्राप्त झाली, तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. जपानमधील ‘इकिगाई’ (Ikigai) ही संकल्पना आपल्याला हेच शिकवते. जे तुम्हाला आवडते, ज्यात तुम्ही निष्णात आहात, ज्याची जगाला गरज आहे आणि ज्यातून तुम्हाला पैसे मिळतात – या चार गोष्टींचा संगम म्हणजे इकिगाई! अर्थात जगण्याचे प्रयोजन! पण हा संगम अर्थात प्रयोजन शोधण्यासाठी घरात बसून चालणार नाही, तर आपल्याला ‘एक्सप्लोर, एंगेज आणि एक्सेल’ या सूत्राचा वापर करावा लागेल. ज्या देशाला आपण ‘तरुणांचा देश’ म्हणतो, त्या देशातील तरुण जर केवळ भीतीपोटी आणि फोमोमुळे (FOMO) घाणेरड्या नोकऱ्यांमध्ये अडकून पडले, तर देश नावीन्यपूर्ण शोध कसा लावणार? करिअर बदलण्यासाठी कोणतेही वय उशिरा नसते. वय ३४ असो वा ४४, जर तुम्हाला तुमची ‘आतली हाक’ ऐकू येत असेल, तर ती दाबू नका. ती अस्वस्थता जिवंत ठेवा. ईएमआयचा पिंजरा तोडण्यासाठी लगेच नोकरी सोडण्याची गरज नाही, पण एक ‘एक्झिट प्लॅन’ तयार करण्याची आणि आपला ‘साईड पॅशन प्रोजेक्ट’ सुरू करण्याची हीच खरी वेळ आहे. लक्षात ठेवा, आपण केवळ आपल्या पोटासाठी जगत नाही आहोत, तर आपण या देशाचे भविष्य आहोत. उद्या जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा आपण ‘जिवंत मढे’ म्हणून ओळखले जाऊ नये, तर आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणारे ‘योद्धे’ म्हणून ओळखले जावे, हीच काळाची गरज आहे.

ईएमआयचा फास आणि स्वप्नांची कत्तल: कॉर्पोरेट गुलामगिरीचा नवा चेहरा! Read More »

आरोंदा येथील अमित निवजेकर ३ जिल्ह्यांतून तडीपार; दोन वर्षांसाठी आदेश

आरोंदा येथील अमित निवजेकरला ३ जिल्ह्यांतून केले तडीपार

सावंतवाडी : प्रतिनिधी (संजय पिळणकर)Sawantwadi उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या कारवाईनुसार सोनू उर्फ अमित दिवाकर निवजेकर (वय ३१ वर्षे, रा. आरोंदा) यास कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश मंजूर करण्यात आला आहे. सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी संबंधित इसमाला नोटीस बजावली. त्यानंतर दोन पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली त्यास गोवा राज्यातील त्याच्या नियोजित वास्तव्याच्या ठिकाणी सुरक्षितरित्या सोडण्यात आले. तसेच तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात हजर करून तडीपार आदेशाची औपचारिक बजावणी करण्यात आली. निवजेकर याच्यावर मारामारीचे एकूण सहा गुन्हे दाखल असून, त्याच्याविरुद्ध नॉन-कॉग्निजेबल (एनसी) स्वरूपाच्या नोंदीही आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आरोंदा येथील अमित निवजेकरला ३ जिल्ह्यांतून केले तडीपार Read More »

चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम चषक स्पर्धा; इलेव्हन फायटर एडी विजेता

चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम चषक स्पर्धेत रत्नागिरीच्या संघांचे वर्चस्व; इलेव्हन फायटर एडी विजेता

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित आमदार शेखर निकम चषक राज्यस्तरीय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीतील संघांनी वर्चस्व गाजवले. इलेव्हन फायटर एडी, रत्नागिरी संघाने विजेतेपद पटकावले, तर आरडीसीए संघ उपविजेता ठरला. साहिल मतदार याला ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्काराने गौरविण्यात आले. चिपळूण शहरातील पवन तलाव मैदानावर सलग सहा दिवस ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेचे उद्घाटन रणजीपटू सुनील मोरे यांच्या हस्ते आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झाले होते. एकूण आठ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात इलेव्हन फायटर एडी संघाने आरडीसीए संघासमोर 189 धावांचे आव्हान ठेवले. मात्र, हे आव्हान पेलण्यात अपयशी ठरत आरडीसीए संघ सर्वबाद झाला आणि एडी संघाने विजेतेपद मिळवले. एडी संघाचा विश्वास कुंभार याला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, तर चिपळूण स्टार क्लबच्या विराज कोलते याला उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार मिळाला. कोलतेने चार डावांत 53.25 च्या सरासरीने 213 धावा केल्या. आरडीसीए संघाचा पार्थ गांधी पाच डावांत 12 बळी घेत उत्कृष्ट गोलंदाज ठरला. विजेत्या व उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक पुरस्कार विजेत्यांना क्रिकेट विश्वातील नामवंत फिरकीपटू राजेश पवार, आमदार शेखर निकम आणि असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाला चिपळूण नगर परिषदेचे बांधकाम सभापती कपिल शिर्के, राष्ट्रवादीचे नेते जयंद्रथ खताते, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, नगरसेवक विकी नरळकर, माजी नगरसेविका अदिती देशपांडे, दिशा दाभोळकर, राणी महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंच गोट्या भोसले, रवींद्र कनगुटकर, समालोचक बाबल्या जाधव, इब्राहिम सरगुरोह, प्रशिक्षक उदय काणेकर, तसेच स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेणारे भाऊ देवरुखकर आणि गुणलेखक यांचा सन्मान करण्यात आला. चिपळूणमध्ये नव्याने स्थापन झालेल्या ‘जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण’चे अध्यक्ष सुनील साळवी व त्यांच्या सहकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे सचिव राजेश सुतार, दादा लकडे, सुयोग चव्हाण, योगेश बांडागळे, सचिन कुलकर्णी, सुनील रेडीज, साहिल कदम, विनीत देवधर, संदेश गोरीवले आदींनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, बक्षीस वितरणावेळी बोलताना क्रिकेटपटू राजेश पवार यांनी चिपळूणमध्ये मुंबई-पुण्याच्या धर्तीवर दर्जेदार स्पर्धा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. उत्तम सुविधा उपलब्ध होत असून भविष्यात येथील खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम चषक स्पर्धेत रत्नागिरीच्या संघांचे वर्चस्व; इलेव्हन फायटर एडी विजेता Read More »

तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती; राकेश बापट उपविजेता

संगमेश्वरच्या साखरपा गावची तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती; राकेश बापट उपविजेता

संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची तन्वी कोलते हिने ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6चे विजेतेपद पटकावले आहे. 19 एप्रिल रोजी उत्साहात पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये तिने दमदार कामगिरी करत महाट्रॉफीवर आपले नाव कोरले. अभिनेता राकेश बापट याने उपविजेतेपद मिळवले. जानेवारी 2026 मध्ये कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या या सिझनने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अभिनेता रितेश देशमुख यांच्या सूत्रसंचालनाखालील या पर्वाला मोठी लोकप्रियता लाभली. विशेषतः ‘भाऊचा धक्का’ या भागाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंतिम फेरीत पोहोचलेल्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि विशाल कोटियन यांचा समावेश होता. तन्वीला ‘तिकीट टू फिनाले’ मिळाल्यामुळे ती थेट अंतिम फेरीत पोहोचली होती. 100 दिवसांच्या या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी विविध टास्कमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. शेवटच्या टप्प्यात तन्वी कोलते आणि राकेश बापट यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या मतांच्या जोरावर आणि सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीमुळे तन्वीने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संगमेश्वरच्या साखरपा गावची तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती; राकेश बापट उपविजेता Read More »

एसटी-दुचाकी भीषण अपघात; सेवानीवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

एसटी-दुचाकी भीषण अपघात; सेवानीवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

बांदा दोडामार्ग मार्गावर हेदुस येथे दुर्दैवी घटना दोडामार्ग : प्रतिनिधीDodamarg तालुक्यातील हेदुस परिसरात एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका सेवानीवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप तुकाराम हळणकर (वय ६८, रा. कुडासे-वानोसरी) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते भारतीय नौदलातून सुमारे २० वर्षांपूर्वी सेवानीवृत्त झाले होते. अपघाताच्या वेळी ते आपल्या दुचाकीवरून जात असताना पणजीहून धाराशिवकडे जाणाऱ्या एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की हळणकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बस चालक राहुलसिंह पांडुरंग हालके (वय ३७) आणि वाहक सुधीर अशोक लोखंडे हे बसमध्ये होते. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, दोडामार्ग पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

एसटी-दुचाकी भीषण अपघात; सेवानीवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू Read More »