konkandhara.com

Editorial

गोवळकोट स्वयंभू श्री गणेश मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन उत्साहात

गोवळकोट येथील स्वयंभू श्री गणेश मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील गोवळकोट येथील स्वयंभू श्री गणेश मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. कै. विठोबा बाळा बुरटे यांच्या कृपाआशीर्वादाने आयोजित या सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते ९ या वेळेत श्रींवर अभिषेक होणार असून, सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा व सार्वजनिक आरती पार पडणार आहे. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत गणेश मित्र मंडळाकडून भजन, ६ ते ७ या वेळेत सार्वजनिक हरिपाठ, तर ७ ते ९ या वेळेत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९.३० ते १०.३० या वेळेत महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. याच दिवशी स्वयंभू श्री गणेश मंदिर व राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत मंदिर पटांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदानाद्वारे सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन सोहळ्याचा लाभ घ्यावा, अशी विनंती स्वयंभू श्री गणेश मंदिर कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष जीवन बांद्रे, विश्वस्थ मंडळ तसेच गोवळकोट ग्रामस्थांनी केली आहे.

गोवळकोट येथील स्वयंभू श्री गणेश मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार Read More »

खेडमध्ये अज्ञात वाहनाची धडक; पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे नवभारत हायस्कूलसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (१७ एप्रिल) रात्री घडली. अमित सूर्यकांत फावरे (वय ३७, रा. लोटे-माळवाडी, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अमित फावरे हे महामार्ग ओलांडत असताना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या काळ्या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी अवस्थेतील फावरे यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने कार भरधाव वेगाने चिपळूणच्या दिशेने पळवून नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही तरुणांनी तत्काळ आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. खेड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, अपघात करून पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध सुरू आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू Read More »

लांज्यात विनापरवाना बंदूक बनवणाऱ्यास अटक; तीन दिवसांची पोलिस कोठडी

विनापरवाना बंदूक बनवणाऱ्यास अटक; तीन दिवसांची पोलिस कोठडी

लांजा (प्रतिनिधी) : शहरातील देवराई परिसरात शिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेली बंदूक विनापरवाना असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ती तयार करून देणाऱ्या पाचल येथील व्यक्तीला लांजा पोलिसांनी अटक केली आहे. अनिल सीताराम गुरव (वय ४३) असे आरोपीचे नाव असून, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी (दि. १५) देवराई परिसरात शिकारीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या अरुण नारायण चौगुले व शैलेश दिलीप मेस्त्री या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. अरुण चौगुले याच्याकडे १२ बोअरची बंदूक व तीन जिवंत काडतुसे आढळून आली होती. तपासात या बंदुकीचे कोणतेही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता ही बंदूक राजापूर तालुक्यातील तळवडे पाचल येथील अनिल गुरव याच्याकडून बनवून घेतल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोद सरंगले यांनी पथकासह पाचल येथे धाड टाकून शुक्रवारी गुरव याला ताब्यात घेतले व अटक केली. यानंतर तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोद सरंगले करत आहेत.

विनापरवाना बंदूक बनवणाऱ्यास अटक; तीन दिवसांची पोलिस कोठडी Read More »

रत्नागिरीत बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला शिवसेना विरोध; जनसुनावणी रद्द करण्याची मागणी

बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध; जनसुनावणी रद्द करण्याची मागणी

रत्नागिरी (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील कुंभवडे, सागवे आणि नाणार परिसरात प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, शिवसेना (ठाकरे गट)ने या प्रकल्पाला ठाम विरोध दर्शवला आहे. कोकणच्या पर्यावरणाशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा पक्षाने दिला आहे. सुमारे १४४.९५ हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित या प्रकल्पातून दरवर्षी ०.९ दशलक्ष टन बॉक्साईट उत्खननाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र या उत्खननामुळे भूजल पातळी घटणे, जैवविविधतेचा ऱ्हास होणे तसेच धूळ प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंबा व काजू बागायतींचे मोठे नुकसान होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसेल, असा दावा शिवसेनेने केला आहे. उत्खननामुळे नैसर्गिक जलस्रोत बाधित होऊन पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, वनक्षेत्राचे नुकसान, मृदा धूप, धूळ प्रदूषण आणि जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे कोकणचा निसर्ग धोक्यात येईल, असेही पक्षाने म्हटले आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार, त्वचारोग आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. कोकणातील डोंगराळ भाग व मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे भूस्खलन व नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे. या प्रकल्पासंदर्भात २० मे २०२६ रोजी प्रस्तावित जनसुनावणी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने सुनावणी पुढे रेटल्यास स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या जोरावर ती उधळून लावली जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस आणि तालुका प्रमुख कमलाकर कदम यांनी दिला आहे. रिफायनरी प्रकल्पाविरोधातील लढ्याप्रमाणेच या बॉक्साईट प्रकल्पाविरोधातही व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला असून, “कोणत्याही परिस्थितीत कोकणच्या निसर्गाचा आणि जनतेच्या हक्कांचा बळी देणारा प्रकल्प होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे.

बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध; जनसुनावणी रद्द करण्याची मागणी Read More »

संगमेश्वरात पाणी पाइपलाईन वादातून मारहाण; सात जणांवर गुन्हा

पाणी पाइपलाईन वादातून मारहाण; सात जणांवर गुन्हा

संगमेश्वर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथे पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनवरून सुरू असलेल्या जुन्या वादातून एका ५५ वर्षीय व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी सात संशयितांविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर भागोजी येडगे (वय ५५, रा. कुटगिरी येडगेवाडी, सध्या रा. नवी मुंबई) आणि आरोपी हे एकाच वाडीतील रहिवासी असून, त्यांच्यात पाण्याच्या पाइपलाईन तोडण्याच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू होता. १७ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता या जुन्या वादाच्या रागातून संशयितांनी फिर्यादीला गाठले. यावेळी सुरेश बाबू येडगे व पांडुरंग बाबू येडगे यांनी लाकडी काठीने मानेवर व पाठीत मारहाण केली. तसेच सुरेश धोंडीबा येडगे, तुकाराम विठ्ठल येडगे, जनार्दन धोंडीबा येडगे व इतर दोन-तीन जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. मारहाणीच्या वेळी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर शंकर येडगे यांच्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलिसांनी संशयितांविरोधात बीएनएस कलम १८९ (२), १९०, १९१(२), ११८(१), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस. एस. कोलगे करत आहेत.

पाणी पाइपलाईन वादातून मारहाण; सात जणांवर गुन्हा Read More »

कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर; ५२ एकर जमीन लाटली, खंडणीची धमकी

कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर; ५२ एकर जमीन लाटून खंडणीची धमकी

मंडणगड (प्रतिनिधी) : जमीन मालकाने दिलेल्या कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करून जमिनी परस्पर आपल्या नावे करून घेत, मालकाकडे खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरोधात मंडणगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीप सुनील दरिपकर व सुनील दत्तात्रय दरिपकर (दोघेही रा. घनसोली, मुंबई) अशी आरोपींची नावे असून, १७ एप्रिल रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलेपार्ले येथील महेश चामरिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १४ जुलै २०१४ ते १० जानेवारी २०२५ या कालावधीत मंडणगड तालुक्यातील बामणघर येथे जमीन खरेदी व्यवहारादरम्यान हा प्रकार घडला. आरोपींपैकी एक जण फिर्यादीकडे सुमारे १५ वर्षे फॅक्टरी मॅनेजर म्हणून कार्यरत होता, तर दुसरा गेल्या चार वर्षांपासून दापोली परिसरात जमीन खरेदी व्यवहार पाहत होता. विश्वास संपादन केल्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीस कुलमुखत्यारपत्र दिले होते. मात्र या कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करत आरोपींनी फिर्यादी यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या जमिनी त्यांच्या नावावर न करता स्वतःच्या व इतर नातेवाईकांच्या नावे करून घेतल्याचा आरोप आहे. याबाबत विचारणा केल्यावर आरोपींनी फिर्यादीकडून २५ लाख रुपयांची खंडणी मागून न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी मंडणगड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुमारे ४१ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीच्या ५२ एकर जमिनीची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर; ५२ एकर जमीन लाटून खंडणीची धमकी Read More »

रत्नागिरीत ऑनलाईन बँकिंग फसवणूक; ₹4.82 लाख प्रकरणी दोघे मुंबईतील दहिसरमधून अटकेत

ऑनलाईन बँकिंग फसवणूक प्रकरणी दोघे मुंबईतून अटकेत

रत्नागिरी (प्रतिनिधी) : ऑनलाईन बँकिंगद्वारे ४ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना रत्नागिरी पोलिसांनी मुंबईतील दहीसर येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साखरी बौद्धवाडी येथील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून १७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२६ या कालावधीत भामट्यांनी ही रक्कम काढून घेतली होती. या प्रकरणी २१ मार्च रोजी जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुर्गेश चम्मण रॉय (वय ४८) आणि अर्जुन रामसुंदर चौहान (वय ३८) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्याकडे सोपवण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक अभय तेली व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत धागेदोरे मुंबईतील दहीसर परिसरात असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार सापळा रचून दहीसर (पूर्व) येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत दोघांनी फिर्यादीच्या खात्यातून रक्कम काढल्याची कबुली दिल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अभय तेली, अंमलदार संदेश मोंडे आणि सायबर पोलिस ठाण्याच्या दुर्वा शेटे यांनी केली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ऑनलाईन बँकिंग फसवणूक प्रकरणी दोघे मुंबईतून अटकेत Read More »

मंडणगडमध्ये दुचाकी अपघात; झोपेच्या डुलकीमुळे एकाचा मृत्यू, एक जखमी

झोपेची डुलकी ठरली जीवघेणी; दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी

मंडणगड (प्रतिनिधी) : पालघर ते कुंबळे दरम्यानच्या राज्यमार्गावर १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडे आठ वाजता झालेल्या भीषण अपघातात कल्पेश प्रकाश आदावडे (वय ३५, मूळ रा. चिखलगाव, ता. दापोली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर विलास पांडुरंग मोहिते (वय ४८, रा. मंडणगड) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी जखमी विलास मोहिते यांनी मंडणगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित दुचाकी (एमएच ०८ एबी ४४२२) चालक कल्पेश आदावडे याला झोपेची डुलकी लागल्याने त्याने वाहनावरचे नियंत्रण गमावले. रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता अतिवेगाने व बेदरकारपणे दुचाकी चालवल्यामुळे वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन खड्ड्यात कोसळले आणि अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार आदावडे यांचा मृत्यू झाला असून ते स्वतःच्या मृत्यूस तसेच फिर्यादीच्या जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर मंडणगड पोलीस स्थानकात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झोपेची डुलकी ठरली जीवघेणी; दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी Read More »

chiplun-market-encroachment-removal-drive-municipal-action

चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम; रस्ते मोकळे करण्यासाठी कारवाई

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातील मुख्य व अंतर्गत बाजारपेठेतील रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जोरदार कारवाई केली. रस्त्यालगतच्या गटारांवर दुकानातील माल रचणे तसेच फेरीवाल्यांनी तेथेच दुकाने थाटल्यामुळे ही मोहीम राबविण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर दुकानातील साहित्य व विविध माल रचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नगरपरिषद ते पानगल्ली या मार्गावर अतिक्रमणाचे प्रमाण वाढल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. गटारांवर फळे, कांदे, बटाटे, प्लास्टिक साहित्य, चप्पल आदी वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच ग्रामीण भागातील काही महिला रस्त्यावरच भाजी व फळ विक्री करत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते. काही ठिकाणी तर गटाराबाहेर थेट रस्त्यावरच माल मांडण्यात येत होता. याबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने मुख्याधिकारी संजय जाधव यांनी याची दखल घेत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार नगरपरिषदेच्या बांधकाम विभागासह अतिक्रमण हटाव पथकाने संयुक्त मोहीम हाती घेतली. या कारवाईदरम्यान गटारांवरील व रस्त्यालगतचा माल हटविण्यात आला. यापुढे अशा प्रकारे अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद ते पानगल्ली दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली असून, पुढील काळात संपूर्ण बाजारपेठेत दररोज अशी कारवाई सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख संदेश टोपरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.

चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम; रस्ते मोकळे करण्यासाठी कारवाई Read More »

गुहागरमध्ये बेकायदेशीर मच्छीविक्रीवर कारवाईची मागणी | ग्रामपंचायतीचे पोलिसांना पत्र

बेकायदेशीर मच्छीविक्रीविरोधात कारवाईची मागणी

गुहागर (प्रतिनिधी) : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतसमोर मच्छी विक्रीसाठी सुसज्ज मार्केट उभारण्यात आले असतानाही काही महिला विक्रेत्या नियम झुगारून शृंगारतळी मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर बसून बेकायदेशीरपणे मच्छीविक्री करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीने वेळोवेळी सूचना देऊन तसेच कारवाई करूनही संबंधित महिला वर्दळीच्या ठिकाणी उघड्यावरच मच्छी विक्री करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना पत्र दिले आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, या बेकायदेशीर मच्छीविक्रेत्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून पादचारी व व्यापाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलांना अधिकृत मच्छीमार्केटमध्ये बसण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्यांनी त्या मान्य करण्यास नकार देत सार्वजनिक ठिकाणीच विक्री सुरू ठेवली आहे. याशिवाय, मासे साफ करताना टाकलेली खवले आणि सांडलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या वारंवार सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित महिलांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

बेकायदेशीर मच्छीविक्रीविरोधात कारवाईची मागणी Read More »