रत्नागिरी (प्रतिनिधी) : ऑनलाईन बँकिंगद्वारे ४ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना रत्नागिरी पोलिसांनी मुंबईतील दहीसर येथून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साखरी बौद्धवाडी येथील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून १७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२६ या कालावधीत भामट्यांनी ही रक्कम काढून घेतली होती. या प्रकरणी २१ मार्च रोजी जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुर्गेश चम्मण रॉय (वय ४८) आणि अर्जुन रामसुंदर चौहान (वय ३८) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
पोलिस उपनिरीक्षक अभय तेली व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत धागेदोरे मुंबईतील दहीसर परिसरात असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार सापळा रचून दहीसर (पूर्व) येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसी चौकशीत दोघांनी फिर्यादीच्या खात्यातून रक्कम काढल्याची कबुली दिल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अभय तेली, अंमलदार संदेश मोंडे आणि सायबर पोलिस ठाण्याच्या दुर्वा शेटे यांनी केली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.















