रत्नागिरी (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील कुंभवडे, सागवे आणि नाणार परिसरात प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, शिवसेना (ठाकरे गट)ने या प्रकल्पाला ठाम विरोध दर्शवला आहे. कोकणच्या पर्यावरणाशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा पक्षाने दिला आहे.
सुमारे १४४.९५ हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित या प्रकल्पातून दरवर्षी ०.९ दशलक्ष टन बॉक्साईट उत्खननाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र या उत्खननामुळे भूजल पातळी घटणे, जैवविविधतेचा ऱ्हास होणे तसेच धूळ प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंबा व काजू बागायतींचे मोठे नुकसान होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसेल, असा दावा शिवसेनेने केला आहे.
उत्खननामुळे नैसर्गिक जलस्रोत बाधित होऊन पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, वनक्षेत्राचे नुकसान, मृदा धूप, धूळ प्रदूषण आणि जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे कोकणचा निसर्ग धोक्यात येईल, असेही पक्षाने म्हटले आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार, त्वचारोग आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
कोकणातील डोंगराळ भाग व मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे भूस्खलन व नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
या प्रकल्पासंदर्भात २० मे २०२६ रोजी प्रस्तावित जनसुनावणी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने सुनावणी पुढे रेटल्यास स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या जोरावर ती उधळून लावली जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस आणि तालुका प्रमुख कमलाकर कदम यांनी दिला आहे.
रिफायनरी प्रकल्पाविरोधातील लढ्याप्रमाणेच या बॉक्साईट प्रकल्पाविरोधातही व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला असून, “कोणत्याही परिस्थितीत कोकणच्या निसर्गाचा आणि जनतेच्या हक्कांचा बळी देणारा प्रकल्प होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे.















