konkandhara.com

Editorial

राजापूरात WhatsApp लिंकद्वारे ऑनलाईन फसवणूक; ₹3 लाख लंपास

राजापूरात ऑनलाईन फसवणूक झाल्याची पोलिसात तक्रार

व्हॉटअप लिंकद्वारे ३ लाखाची फसवणूक राजापूर : राजापूर शहरातील एका प्रतिष्ठित नागरिकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने सुमारे तीन लाख रुपये लंपास केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी राजापूर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिकाला मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीकडून वाट्सअप च्या माध्यमातून एक फसवी लिंक पाठविण्यात आली. ती लिंक त्यांनी ओपन केली आणि काही मिनिटात त्यांच्या खात्यातील तब्बल तीन लाख रुपये गायब झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या प्रतिष्ठित नागरिकाने तात्काळ राजापूर पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. दरम्यान ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रकार वाढत असून त्याबाबत जनतेने सावधानता बाळगावी असे आवाहन राजापूर पोलिसांनी केले आहे.

राजापूरात ऑनलाईन फसवणूक झाल्याची पोलिसात तक्रार Read More »

कळंबणीत भरधाव फॉर्च्युनरची हॉटेल व घराला धडक; मोठे नुकसान, जीवितहानी टळली

कळंबणी येथे भरधाव फॉर्च्युनरची हॉटेल व घराला जोरदार धडक

खेड (प्रतिनिधी): मुंबई–गोवा महामार्गावरील कळंबणी परिसरात आज एक भीषण अपघात घडला असून, भरधाव वेगात असलेल्या फॉर्च्युनर कारने थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल आणि घराला जोरदार धडक दिली. हा अपघात कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोरच घडल्याने परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, फॉर्च्युनर कार मुंबईच्या दिशेने जात होती. कळंबणी परिसरात आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल व घरात घुसली. ही धडक इतकी जोरदार होती की हॉटेलच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून आतील साहित्यही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. घरालाही धक्का बसल्याने मोठी हानी झाली आहे. ज्या वेळी हा अपघात घडला, त्या वेळी हॉटेल किंवा परिसरात कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे एक मोठी जीवितहानी टळली असून स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचा जोरदार आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती पाहून परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर खेड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अपघातग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामा सुरू केला आहे. या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, वेग आणि नियंत्रण सुटणे हे कारण असल्याचे बोलले जात आहे. मुंबई–गोवा महामार्गावर वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली तरी मोठ्या आर्थिक नुकसानीची नोंद झाली आहे.

कळंबणी येथे भरधाव फॉर्च्युनरची हॉटेल व घराला जोरदार धडक Read More »

मळगाव रेल्वे फाटकामुळे वाहतूक कोंडी; उड्डाणपुलाची मागणी

मळगाव रेल्वे फाटकाचा वाहनधारकांना मनस्ताप; उड्डाणपुलाची मागणी ऐरणीवर

​मळगाव / भूषण सावंत : कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड (मळगाव) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सावंतवाडी-शिरोडा या महत्त्वाच्या राज्यमार्गावर हे फाटक असल्याने दररोज शेकडो प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात असून, येथे तातडीने उड्डाणपूल उभारण्याची मागणी जोर धरत आहे.​वेळेचा प्रचंड अपव्यय​रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार, गाडी येण्यापूर्वी आणि गेल्यानंतर साधारणतः १५ ते २० मिनिटे हे फाटक बंद ठेवले जाते. सावंतवाडी रोड स्थानकावर गाड्यांची ये-जा मोठी असल्याने दिवसातून अनेकवेळा हे फाटक बंद असते. परिणामी, फाटकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. रुग्णवाहिका, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला या विलंबाचा मोठा फटका बसत आहे. ​पर्यायी मार्ग असूनही अडचण ​या फाटकाला रेल्वे स्थानकामार्फत एक पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. मात्र, हा रस्ता रेल्वे स्थानकाला सुमारे २ किलोमीटरचा वळसा घालून जातो. वाढते इंधन दर आणि अतिरिक्त अंतरामुळे वाहनधारक या वळसा मार्गापेक्षा फाटकावर थांबणे पसंत करतात. मात्र, यामुळे त्यांचा अमूल्य वेळ वाया जात आहे.​प्रशासकीय दुर्लक्षामुळे संताप​वाहनधारकांच्या मते, सावंतवाडी-शिरोडा हा मार्ग पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. फाटकामुळे होणारी ही कोंडी सोडवण्यासाठी येथे उड्डाणपूल (Flyover) बांधणे हाच एकमेव ठोस उपाय आहे.​”रेल्वे प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन समन्वयाने उड्डाणपुलाचे काम मार्गी लावावे, जेणेकरून प्रवाशांची इंधन आणि वेळेची बचत होईल,” अशी भावना स्थानिक वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.​आता या ज्वलंत प्रश्नावर रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मळगाव रेल्वे फाटकाचा वाहनधारकांना मनस्ताप; उड्डाणपुलाची मागणी ऐरणीवर Read More »

‘ऐका ना…’ फेम स्वानंदी सरदेसाई लग्नबंधनात; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साधा विवाह

‘ऐका ना…’ म्हणणारी स्वानंदी सरदेसाई लग्नबंधनात; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साध्या पद्धतीने विवाह

मुंबई : सोशल मीडियावर “ऐका ना…” अशी साद घालत आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारी लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आणि गायिका स्वानंदी सरदेसाई हिने लग्नगाठ बांधली आहे. रविवारी, 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तिचा विवाह पार पडला. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘दशावतार’ फेम असलेल्या स्वानंदीने कोणताही दिखाऊपणा न करता अतिशय साध्या आणि पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला. तिच्या पतीचे नाव विक्रांत रामदास असून तो लेखक व दिग्दर्शक आहे. ‘इंदिरा’ या लघुपटाचे दिग्दर्शन त्याने केले आहे. लग्नसोहळ्यात स्वानंदीने हिरव्या रंगाची नववारी साडी परिधान केली होती. पारंपरिक नथ, हिरवा चुडा, चंद्रकोर आणि गळ्यातील दागिन्यांमुळे तिच्या रूपात विशेष खुलून आले होते. तर विक्रांत रामदास याने पांढऱ्या रंगाचे धोतर, सदरा आणि शेला असा पारंपरिक वेश परिधान केला होता. दोघांचेही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. कोकणातील निसर्ग आणि साध्या जीवनशैलीशी घट्ट नातं जपणारी स्वानंदी तिच्या वेगळ्या शैलीमुळे ओळखली जाते. तिच्या लग्नाची बातमी समोर येताच चाहत्यांनी सोशल मीडियावरून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

‘ऐका ना…’ म्हणणारी स्वानंदी सरदेसाई लग्नबंधनात; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साध्या पद्धतीने विवाह Read More »

पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण; आरोपी आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळला

पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण: मुख्य आरोपी आंबेरकरचा ४ महिन्यांचा जामीन अर्ज फेटाळला

राजापूर : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला न्यायालयाने मोठा दणका देत वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेला चार महिन्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच त्याला पोलीस देखरेखीखाली आवश्यक वैद्यकीय उपचार घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी कशेळी येथे पत्रकार शशिकांत वारिशे यांना थार गाडीखाली चिरडून ठार मारल्याचा आरोप आंबेरकरवर आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल असून आंबेरकर सध्या कारागृहात आहे. दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये न्यायालयाने मानवतेच्या दृष्टिकोनातून आंबेरकरला सहा आठवड्यांचा अल्पकालीन जामीन मंजूर केला होता. ही मुदत संपल्यानंतर त्याने पुन्हा चार महिन्यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात मांडले की, आंबेरकरला उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी स्टोन आणि पित्ताशयात खडे असल्याचे आजार आहेत. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने शस्त्रक्रियेसाठी मुंबईत जाण्याची परवानगी व स्वखर्चाने उपचार करण्याची सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, सरकारी पक्षाने या अर्जाला जोरदार विरोध करत आंबेरकरवर गंभीर गुन्हा दाखल असून त्याचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो किंवा फरार होण्याची शक्यता असल्याचे नमूद केले. आवश्यक उपचार पोलीस बंदोबस्तातही देता येऊ शकतात, असा युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वैद्यकीय अहवालानुसार आरोपीला तातडीने जामिनावर सोडण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. आवश्यक असल्यास पोलीस देखरेखीखाली खासगी रुग्णालयात उपचार करता येतील, असे नमूद करत न्यायालयाने आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण: मुख्य आरोपी आंबेरकरचा ४ महिन्यांचा जामीन अर्ज फेटाळला Read More »

चिपळूण विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही – मंत्री नितेश राणे

चिपळूण विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही; भुयारी गटार योजनेला लवकर मंजुरी – मंत्री नितेश राणे

चिपळूण : मत्स्य व बंदर विकास मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी चिपळूण शहरातील विविध विकास कामांबाबत चर्चा केली. यावेळी शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, तसेच आवश्यक तेवढा भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीदरम्यान चिपळूण शहरातील बहुचर्चित भुयारी गटार योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना देत, या योजनेला तातडीने मंजुरी मिळवून दिली जाईल, असे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले. या प्रसंगी चिपळूण नगरपालिकेचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, माजी नगरसेवक विजय चितळे, अर्बन बँक संचालक दिपाशेठ देवकर आणि अमोल तटकरे उपस्थित होते.

चिपळूण विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही; भुयारी गटार योजनेला लवकर मंजुरी – मंत्री नितेश राणे Read More »

मुंढे येथे श्री केदारनाथ त्रैवार्षिक यात्रोत्सव २९ एप्रिलपासून; बैलगाडा शर्यत व पालखी सोहळा

श्री केदारनाथ त्रैवार्षिक यात्रोत्सव २९ एप्रिलपासून सुरू; मुंढे गावात भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम

चिपळूण (प्रतिनिधी) : मुंढे गावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ यांच्या त्रैवार्षिक यात्रोत्सव (समा) २०२६ निमित्त २९ एप्रिल ते १ मे या कालावधीत गावात भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा भव्य संगम अनुभवायला मिळणार आहे. या सोहळ्याबाबत ग्रामस्थ व भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, मंदिर परिसर सजविणे, स्वागताची तयारी आणि विविध कार्यक्रमांची आखणी जोरात सुरू आहे. श्री केदारनाथांवरील श्रद्धेपोटी दूरदूरवरून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. बुधवार, २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीने यात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे. “श्री केदारनाथ केसरी” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित बैलगाडा चालक सहभागी होणार असून, प्रथम क्रमांकासाठी १,०१,००१ रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. इतर क्रमांकांसाठीही आकर्षक रोख पारितोषिके व मानचिन्हे देण्यात येणार आहेत. गुरुवार, ३० एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत लाटेचे पूजन व भव्य मिरवणूक सोहळा पार पडणार आहे. मुंढे वरचीवाडी ते ग्रामदैवत मंदिर असा मार्गक्रमण करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात आणि जयघोषात मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवार, १ मे रोजी मुख्य यात्रोत्सव साजरा होणार आहे. सकाळी ११ वाजता ग्रामदैवत तळसर पालखीचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता पालखी भेट सोहळा होणार असून, हा कार्यक्रम भाविकांसाठी प्रमुख आकर्षण ठरणार आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता लाट फिरवणे व पालखी नाचविण्याचा पारंपरिक कार्यक्रम होणार आहे. रात्री १० ते ११ या वेळेत करमणूक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर “वैभव म्युझिकल नाईट, कोल्हापूर” या ऑर्केस्ट्राचे सादरीकरण होणार आहे. या तीन दिवसीय यात्रोत्सवातून धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

श्री केदारनाथ त्रैवार्षिक यात्रोत्सव २९ एप्रिलपासून सुरू; मुंढे गावात भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम Read More »

konkandhara 79

चिपळूणमध्ये भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे जय हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने संस्थेच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवार, २३ एप्रिल रोजी भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गोवळकोट येथे प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा होत असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही स्पर्धा रात्री ९ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण, शिंदेवाडी (गोवळकोट) येथे रंगणार आहे. जिल्ह्यातील विविध नामांकित नृत्यसंघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात सादर होणारे जोशपूर्ण पालखी नृत्य, आकर्षक वेशभूषा आणि सादरीकरणातील समन्वय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. पालखी नृत्य ही आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख जपणारी लोककला असून, या स्पर्धेद्वारे या कलेचा व्यापक प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि युवकांमध्ये पारंपरिक कलेविषयी आवड निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. जय हिंद क्रीडा मंडळ गेली अनेक वर्षे सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असून, या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचा सन्मान करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले जाणार आहे. या अनोख्या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी, कला रसिकांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गोवळकोटमध्ये प्रथमच होणारी ही पालखी नृत्य स्पर्धा उत्साह, परंपरा आणि कलात्मकतेचा संगम ठरणार आहे.

चिपळूणमध्ये भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन Read More »

माणगावातील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

माणगावमधील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित तरुणाचा शोध सुरू

​रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या लोणेरे भागात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजिंगमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासानुसार, एका तरुणाने या तरुणीला लॉजवर आणले होते आणि बंद खोलीत तिच्यावर जीवघेणा हल्ला करून तिची हत्या केली. ​घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने त्वरित पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमने घटनास्थळी पोहोचून सखोल तपास सुरू केला. पोलिसांनी कायदेशीर पंचनामा पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत तरुणीची ओळख पटली असून, ती लोणेरे परिसरातीलच स्थानिक रहिवासी असल्याचे उघड झाले आहे. ​तरुणीसोबत लॉजवर आलेला संशयित तरुण हा रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची महत्त्वपूर्ण माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. या घटनेनंतर तो तातडीने पसार झाला. त्याला बेड्या ठोकण्यासाठी रायगड पोलिसांकडून विशेष शोधपथकांची स्थापना करण्यात आली असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. आरोपीच्या मागावर राहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, तसेच लॉजवरील कर्मचारी व उपस्थित साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. ​हत्येमागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. प्रेमप्रकरणातून झालेला वाद, वैयक्तिक कारण की आणखी वेगळा उद्देश, या सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या प्रकरणामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, फरार आरोपीला लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा स्पष्ट विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

माणगावमधील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित तरुणाचा शोध सुरू Read More »

चिपळूणमध्ये गणेश मित्र मंडळाचा श्री गणेश अर्चा महोत्सव उत्साहात संपन्न

चिपळूणमध्ये गणेश मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेश अर्चा महोत्सव उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे गणेश मित्र मंडळ, पेठमाप गणेशवाडी (ता. चिपळूण) यांच्या वतीने सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी श्री गणेश अर्चा महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये श्री गणेशाची पूजा-अर्चा, भजन-कीर्तन तसेच सत्यनारायण महापूजेचा समावेश होता. या धार्मिक विधींमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने सहभाग नोंदवला. संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमानिमित्त आयोजित सत्यनारायण पूजेस नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ, बांधकाम सभापती कपिल शिर्के, नगरसेवक विकी लवेकर, नगरसेवक संजय गोताड तसेच शिवसैनिक यतीन कानडे यांनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि गणेश मित्र मंडळाच्या सुयोग्य नियोजनामुळे महोत्सव अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. शेवटी उपस्थितांनी प्रसादाचा लाभ घेतला.

चिपळूणमध्ये गणेश मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेश अर्चा महोत्सव उत्साहात Read More »