राजापूर : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला न्यायालयाने मोठा दणका देत वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेला चार महिन्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच त्याला पोलीस देखरेखीखाली आवश्यक वैद्यकीय उपचार घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
७ फेब्रुवारी २०२३ रोजी कशेळी येथे पत्रकार शशिकांत वारिशे यांना थार गाडीखाली चिरडून ठार मारल्याचा आरोप आंबेरकरवर आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल असून आंबेरकर सध्या कारागृहात आहे.
दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये न्यायालयाने मानवतेच्या दृष्टिकोनातून आंबेरकरला सहा आठवड्यांचा अल्पकालीन जामीन मंजूर केला होता. ही मुदत संपल्यानंतर त्याने पुन्हा चार महिन्यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला.
आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात मांडले की, आंबेरकरला उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी स्टोन आणि पित्ताशयात खडे असल्याचे आजार आहेत. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने शस्त्रक्रियेसाठी मुंबईत जाण्याची परवानगी व स्वखर्चाने उपचार करण्याची सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
मात्र, सरकारी पक्षाने या अर्जाला जोरदार विरोध करत आंबेरकरवर गंभीर गुन्हा दाखल असून त्याचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो किंवा फरार होण्याची शक्यता असल्याचे नमूद केले. आवश्यक उपचार पोलीस बंदोबस्तातही देता येऊ शकतात, असा युक्तिवाद करण्यात आला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वैद्यकीय अहवालानुसार आरोपीला तातडीने जामिनावर सोडण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. आवश्यक असल्यास पोलीस देखरेखीखाली खासगी रुग्णालयात उपचार करता येतील, असे नमूद करत न्यायालयाने आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

















