पालघर, दि. १९ (जिमाका) : भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल करताना समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करणे अत्यावश्यक आहे. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी डहाणू येथे केले.
राज्यपालपदाची सूत्रे मार्च 2026 मध्ये स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच पालघर जिल्हा दौरा होता. अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती या शुभ मुहूर्तावर डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे वनबंधू ट्रस्ट आणि भारत विकास संगम यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी फिरते दवाखाने व रुग्णवाहिका सेवांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडूलाल सोनी, डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘सर्वे भवन्तु निरामयः’ या मंत्राने भाषणाची सुरुवात करत राज्यपालांनी सांगितले की, आरोग्य सुविधा केवळ शहरांपुरत्याच मर्यादित न राहता दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पालघर सारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात रोजगार, आरोग्य व पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ‘आदर्श गाव’ संकल्पना राबविण्यासाठी लवकरच सर्वसमावेशक विकास आराखडा तयार केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या विचारांचा उल्लेख करत ‘अंत्योदय’ संकल्पनेवर भर देत त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगितले. वनबंधू ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
या वेळी लाडूलाल सोनी यांनी प्रास्ताविकात ट्रस्टच्या आरोग्य प्रकल्पांची माहिती दिली. तर डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रशासकीय व सामाजिक संस्थांच्या समन्वयातून दुर्गम भागाचा विकास साधता येतो, असे मत व्यक्त केले. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील आरोग्य स्थिती व शासकीय योजनांची माहिती देत प्रशासन राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली अधिक वेगाने काम करेल, अशी ग्वाही दिली.















