रत्नागिरी, दि. 18 (जिमाका): कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी पात्र लाभार्थ्यांची सखोल पडताळणी करून पुढील कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
कुवारबाव ग्रामपंचायत सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेवक बंड्या साळवी, पंचायत समिती उपसभापती गजानन धनावडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ तसेच ग्रामपंचायत प्रशासक श्रीमती तळेकर आदी उपस्थित होते.
कुवारबाव येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या योजनेची माहिती नागरिकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे गरीब नागरिकांना सुरक्षित घरे उपलब्ध होऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, पात्रता निकषांबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासनाच्या निर्णयानुसारच प्रक्रिया राबवली जाईल. तसेच झोपडपट्टीतील मुलांसाठी शिक्षण, खेळ, अंगणवाडी व बालवाडी यांसारख्या सुविधा एकाच परिसरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा राज्यातील आदर्श प्रकल्प ठरेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.















