मोरोशी गावात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
अवकाळी पावसाच्या संकटातही ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; १२३ रुग्णांची तपासणी राजापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय रत्नागिरी आणि श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यातील मोरोशी गावात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. अवकाळी पाऊस, जोरदार वारे आणि त्यामुळे गावातील वीज, पाणी तसेच दळणवळण व्यवस्था विस्कळीत झालेली असतानाही ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने शिबिरात सहभाग नोंदवला. गावातील अनेक ठिकाणी वीज खांब कोसळून नुकसान झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिबिर यशस्वीरीत्या पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. शिबिरामध्ये एकूण १२३ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. काही रुग्णांची पुढील शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून योगा शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले. या शिबिरासाठी श्री स्वामी समर्थ रुग्णालय, लांजा येथील डॉ. सुहास खानविलकर आणि त्यांची टीम तसेच श्री स्वामी समर्थ नेत्र रुग्णालयाचे डॉ. सुहास देसाई आणि त्यांच्या टीमने विशेष सहकार्य केले. ग्रामस्थांनी सर्व वैद्यकीय पथकांचे आभार मानले. शिबिराचे नियोजन शशिकांत चव्हाण यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी “रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा” असल्याचे सांगत मोरोशी गावात दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. या प्रसंगी श्री गुंडीबाई चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य विश्वस्त प्रकाश सुमती मोतीराम कानडे, विश्वस्त दिलीप कानडे, काशिनाथ केसरकर, रविंद्र कानडे, नामदेव कानडे, माजी सरपंच राजेश कानडे, अॅड. श्रीरंग कानडे, आत्माराम नारकर, पुंडलिक कानडे, गुणाजी कानडे, रमेश कानडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोरोशी गावात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न Read More »









