तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद
कोलाड (शरद जाधव )
जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील पहिल्या पाच क्रमांकात रोहा तालुकास्तरीय कृषी मेळावा आज शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात होत असल्याचे समाधान आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही कृषी विभागाचा आढावा घेतला, योजनांवर चर्चा केली. त्यात महिला व बाल विकास विभागाकडून ३ टक्के निधी महिला शेतकऱ्यांसाठी राखून ठेवत जिल्हा नियोजनाकडे वर्ग केला. निधीचा योग्य लाभ अहिल्यानगरमधील प्रगतशील महिला शेतकऱ्यांनी घेतला याचा मनस्वी आनंद आहे. असाच लाभ रायगड जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी घ्यावा. तसे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्यात असे सांगत आता रासायनिक खतांचा वापर कमी करणे गरजेचे आहे, शाश्वत, नैसर्गिक शेती करा, कृषी मेळावा उत्स्फूर्त प्रतिसादात झाले. हे खूपच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन ना अदिती तटकरे यांनी केले. त्या रोहा येथे आयोजित कृषी मेळाव्यात बोलत होत्या.
पंचायत समिती रोहा, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कृषी मेळावा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, कृषी सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा परिषदेच्या सभापती उर्वशी वाडकर, निधी जाधव, सुमित काते, सभापती विजया पाशिलकर, उपसभापती संजय मांडलूस्कर, अध्यक्ष विनोद पाशिलकर, गटनेते किसन मोरे, पंचायत समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी खरीप पिके व विविध योजनांचा आढावा घेत उपस्थित शेतकऱ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. उपसभापती संजय मांडलूस्कर यांनी आम्ही पंचायत समितीच्या प्रशासकीय माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक योजना कार्यान्वित करू, शेतकऱ्यांपर्यंत पोहचवू यासाठी कटीबद्ध आहोत असे अभिवचन मांडलूस्कर यांनी दिले. कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी यापुढे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी प्रभावी योजना राबविण्याचा आमचा संकल्प आहे, योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात हयगय होणार नाही, शेतकऱ्यांच्या जीवनात अधिक सुख समृद्धी येईल असे पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना आश्वासित केले.
कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी नितीन पिंपळे, भिकू सुटे, रोशन कापसे, अदिती थिटे, संज्योत पडवळ, किरण बारटक्के, अमित गायकवाड, मेघेश भगत, दगडू बामुगडे, दिपाली जाधव, शिवाजी मुटके, तुकाराम भगत यांसह बिजामृत शेतकरी उत्पादन कंपनी, ग्रोवेल शेतकरी उत्पादक, विवेकानंद रिसर्च, युवा कृषी उद्योग, संथाय प्रकल्प, दीपक फाऊंडेशन आदी शेतकरी उत्पादक संस्थांचा सन्मान ना अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. मनोगतात तटकरे पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील सफेद कांद्याला जीआय मानांकन मिळाले, आता रिठा सुपारी व वाल पिकालाही जीआय मानांकन मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहोत. शासन पूर्णतः राज्यात झाडे लावण्याची प्रभावी मोहीम आखत आहे, यासाठी लागणारी झाडे परराज्यातून न मागवता स्थानिक शेतकऱ्यांकडून घ्यावीत, त्यात फळ झाडांचा समावेश असावा, कृषी विभाग अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना अधिक सकस झाडे द्यावीत, त्यातून रोजगारही वाढेल असे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत ना तटकरे यांनी कृषी मिळावा नियोजनाचे कौतुक केले. सन्मानार्थी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन जयेश भोईर यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी अधिकारी रणजीत लवटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी महादेव करे, कृषी अधिकारी रणजीत लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. आयोजित कृषी मेळाव्याला तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.















