konkandhara.com

कोकणची बातमी

दीपक भागवत प्रकरण; स्वप्ना यादव मोबाईल तपासात, CDR अहवालाची प्रतीक्षा

दीपक भागवत मारहाण प्रकरण; स्वप्ना यादव यांचा मोबाईल तपासात; सीडीआर अहवालाकडे लक्ष

चिपळूण : पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणात पोलिसांच्या तपासाला आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, चार्जशीट दाखल झाल्यानंतरही तपासाची पूरक प्रक्रिया सुरूच आहे. पत्रकारांनी केलेल्या मागणीनुसार पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्याच्या दृष्टीने पोलिसांनी मंगळवारी त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी प्रकाश बेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आणि सर्व बाजूंनी तपास पूर्ण व्हावा, या उद्देशाने संबंधित मोबाईल क्रमांकाचा सीडीआर मिळवण्यासाठी दूरसंचार कंपनीकडे अधिकृत अर्ज करण्यात आला आहे. सीडीआर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाची दिशा अधिक स्पष्ट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात आधीच १० कर्मचाऱ्यांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज, ओळख परेड आणि साक्षीदारांचे जबाब यावर आधारित पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. प्रशांत यादव यांच्या बाबतीत सीडीआर तपासात ते घटनास्थळी नसल्याचे स्पष्ट झाले असताना, स्वप्ना यादव यांच्या संदर्भातील तपासामुळे या प्रकरणातील संभाव्य इतर पैलू समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्रकारांनी सुरुवातीपासूनच निष्पक्ष आणि सखोल तपासाची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांकडून प्रत्येक तांत्रिक पुराव्याची पडताळणी केली जात असल्याने तपासाबाबत विश्वास वाढत असल्याची प्रतिक्रिया काही पत्रकारांनी व्यक्त केली आहे. चार्जशीट दाखल झाल्यानंतर आता न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात होणार असली, तरी पूरक तपासातून समोर येणारी माहितीही खटल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सीडीआर अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे.

दीपक भागवत मारहाण प्रकरण; स्वप्ना यादव यांचा मोबाईल तपासात; सीडीआर अहवालाकडे लक्ष Read More »

आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

आंबडवे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात

मंडणगड : तालुक्यातील आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास तसेच अस्थिकलश स्थानी पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सामंत म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार जगभर पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारक उभारण्यासाठी आवश्यक निधी देण्यात कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. पुढील वर्षी जिल्ह्यातील पाच संविधान भवनांचे लोकार्पण करण्याचाही त्यांनी संकल्प व्यक्त केला. बाबासाहेबांचा विचार हा संपूर्ण देशाच्या एकात्मतेचा असल्याचे त्यांनी नमूद केले. महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनीही बाबासाहेबांचे मूळ गाव आंबडवे आपल्या मतदारसंघात असल्याचा अभिमान व्यक्त केला. मंडणगड तालुक्याची नवी ओळख विकासातून घडवण्याचा निर्धार व्यक्त करत, बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श या भागातून निर्माण करू, असे ते म्हणाले. तसेच, स्मारक प्रकल्पातील अडचणी दूर करून त्याला गती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण करण्यात आले. समाजकल्याण विभागातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंबडवे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात Read More »

मांडकीतील ग्रामस्थांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश चिपळूण : तालुक्यातील मांडकी गावातील असंख्य ग्रामस्थांनी सोमवारी (ता. १३) सायंकाळी मोठ्या उत्साहात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांनी स्थानिक विकासाच्या नव्या अपेक्षा व्यक्त करत, परिवर्तनाच्या दिशेने हे पाऊल टाकल्याचा विश्वास व्यक्त केला. “भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा पक्ष असून ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ या मूल्यांवर चालणाऱ्या या मोठ्या राजकीय कुटुंबाचा आपण भाग झाला आहात. गावाच्या विकासासाठी कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,” अशी ग्वाही प्रशांत यादव यांनी दिली. खेर्डी येथील स्वामिनी निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, विशेष निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव, तसेच सामाजिक कार्यकर्ते रमण डांगे, प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, महेश खेतले आदी उपस्थित होते. यावेळी मांडकी गावातील अनेक ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमादरम्यान “भारत माता की जय” आणि “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दरम्यान, प्रशांत यादव यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. ग्रामस्थांची एकजूट कायम ठेवावी, तसेच त्यांच्या पाठीशी भाजप आणि स्वतः पूर्ण ताकदीने उभे राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

मांडकीतील ग्रामस्थांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

चिपळूण : तालुक्यातील मांडकी गावातील असंख्य ग्रामस्थांनी सोमवारी (ता. १३) सायंकाळी मोठ्या उत्साहात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांनी स्थानिक विकासाच्या नव्या अपेक्षा व्यक्त करत, परिवर्तनाच्या दिशेने हे पाऊल टाकल्याचा विश्वास व्यक्त केला. “भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा पक्ष असून ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ या मूल्यांवर चालणाऱ्या या मोठ्या राजकीय कुटुंबाचा आपण भाग झाला आहात. गावाच्या विकासासाठी कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,” अशी ग्वाही प्रशांत यादव यांनी दिली. खेर्डी येथील स्वामिनी निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, विशेष निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव, तसेच सामाजिक कार्यकर्ते रमण डांगे, प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, महेश खेतले आदी उपस्थित होते. यावेळी मांडकी गावातील अनेक ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमादरम्यान “भारत माता की जय” आणि “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दरम्यान, प्रशांत यादव यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. ग्रामस्थांची एकजूट कायम ठेवावी, तसेच त्यांच्या पाठीशी भाजप आणि स्वतः पूर्ण ताकदीने उभे राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

मांडकीतील ग्रामस्थांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश Read More »

lovale-accident-truck-fell-into-valley-sangameshwar

लोवले येथे भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

संगमेश्वर : देवरुख-संगमेश्वर राज्यमार्गावरील लोवले येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. वळणावर निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १०.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान एमएच ४६ बीएफ ६२१० क्रमांकाचे एलपी वाहन देवरुखहून संगमेश्वरकडे येत होते. त्याचवेळी चिपळूणहून बॉक्साईट भरून आंबाघाटाच्या दिशेने जाणारा एमएच १० सीआर ३४५६ क्रमांकाचा ट्रक समोरून येत होता. लोवले येथील वळणावर एलपी चालकाने वाहन रस्त्याच्या मधोमध आणल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बॉक्साईटने भरलेला ट्रक सुमारे पाच ते सहा फूट खोल दरीत कोसळला. अपघाताची तीव्रता इतकी होती की एलपी वाहनाच्या केबिनचा पूर्ण चक्काचूर झाला. या अपघातात एलपी चालक बालाजी जलबा कोंडेवार (रा. नांदेड) हा केबिनमध्ये अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढण्यात आले. या धाडसी बचावकार्यामुळे त्याचे प्राण वाचले.या अपघातात बालाजी कोंडेवार आणि ट्रक चालक मोहम्मद युसूफ शफी शेख हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, एलपी चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

लोवले येथे भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी Read More »

kaluste-khurd-gram-panchayat-by-election-dawood-jable

कालुस्ते खुर्द ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दाऊद जबले यांचा एकमेव अर्ज

चिपळूण : प्रतिनिधीतालुक्यातील कालुस्ते खुर्द-मजरेकाशी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २ मधून दाऊद अन्वर जबले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचे समर्थक अन्वर जबले यांचे सुपुत्र दाऊद जबले यांनी शुक्रवारी (ता. १०) आपला अर्ज सादर केला. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत अन्य कोणताही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. अर्ज दाखल करताना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अन्वर जबले, माजी सरपंच डॉ. अब्बास जबले, डॉ. रहमत जबले, अमिन परकार, माजी उपसरपंच रिजवान परकार तसेच फौजान परकार, मुश्ताक सुर्वे, कौसर परकार, इरफान परकार, शेख अहमद परकार, फुरकान जबले, शबाना जबले, अलफिया जबले, शम्शुन्निस्सा परकार, शर्फुद्दीन जबले, अश्फाक मोमीन, शमुन भाई घारे, गुलजार कुरवले, हसन परकार आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, एकमेव अर्ज दाखल झाल्याने प्रभागातील निवडणूक प्रक्रिया औपचारिकतेपुरती मर्यादित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कालुस्ते खुर्द ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दाऊद जबले यांचा एकमेव अर्ज Read More »

मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; प्रशासन सतर्क राहण्याचे किरण सामंत यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; प्रशासन सतर्क राहण्याचे आमदार किरण सामंत यांचे निर्देश

राजापूर : तालुक्यात मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात आयोजित महत्त्वपूर्ण आढावा बैठक आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात उत्साहात पार पडली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींचा विचार करून योग्य वेळी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सामंत यांनी सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश देत नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबविण्याचे आदेश दिले. बैठकीत पावसाळ्यातील रस्त्यांची दुरुस्ती, नालेसफाई, पूरप्रवण भागातील उपाययोजना, वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, आरोग्य विभागाची तयारी तसेच आपत्कालीन सेवा तत्पर ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरवर्षी पाणी साचणाऱ्या व नुकसान होणाऱ्या भागांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आमदार किरण सामंत म्हणाले, “मान्सून काळात नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारीत राहणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागाने समन्वय साधून काम केल्यास आपत्ती टाळता येऊ शकते.” बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तयारीचा आढावा सादर केला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. आगामी पावसाळा लक्षात घेता प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी विश्वजित गाताडे, जिल्हा परिषद सदस्य रमेश सूद, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, नायब तहसीलदार सरफरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; प्रशासन सतर्क राहण्याचे आमदार किरण सामंत यांचे निर्देश Read More »

आंबा-काजू बागायतदार संकटात; औषधांच्या चुकीच्या वापरामुळे कोट्यवधींचे नुकसान

आंबा-काजू बागायतदार संकटात; औषधांच्या अयोग्य वापरामुळे मोठे नुकसान

रत्नागिरी : प्रतिनिधीरत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील आंबा व काजू बागायतदार शेतकरी चालू हंगामात गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. औषधांच्या अयोग्य वापरामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे ३०० कोटी रुपयांची खते, कीटकनाशके, पीजीआर आणि बुरशीनाशके खरेदी केली आहेत. मात्र, ही औषधे नेमकी कशी आणि किती प्रमाणात वापरायची याबाबत कंपन्यांकडून स्पष्ट मार्गदर्शन न दिल्याने उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बाजारात बोगस औषध कंपन्यांचा सुळसुळाट झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. आंबा पिकासाठी ७० हून अधिक कंपन्यांची औषधे उपलब्ध असून त्यांच्या किंमतीत मोठी तफावत दिसून येत आहे. विशेष म्हणजे, रोख खरेदीवर मूळ किंमतीच्या ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याने या व्यवहारांबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून बोगस कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच औषधांच्या योग्य वापराबाबत शेतकऱ्यांना शास्त्रीय मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे.

आंबा-काजू बागायतदार संकटात; औषधांच्या अयोग्य वापरामुळे मोठे नुकसान Read More »

वाळूपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आकर्षक चित्र; देवरुखच्या कलाकाराची अनोखी कलाकृती

वाळूपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आकर्षक चित्र साकार

संगमेश्वर : तालुक्यातील देवरुख येथील रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे. त्यांनी वाळूपासून डॉ. आंबेडकर यांचे सुंदर पोर्ट्रेट साकारले. ही आगळीवेगळी चित्रकृती तयार करण्यासाठी त्यांनी रत्नागिरीतील पांढऱ्या समुद्र किनाऱ्यावरील पांढरी वाळू तसेच भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर मिळणारी काळी वाळू वापरली. विशेष म्हणजे, केवळ दोन तासांत त्यांनी हे आकर्षक चित्र पूर्ण केले. विलास रहाटे यांची ही कलाकृती पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वीही त्यांनी आपल्या कौशल्याची छाप उमटवली असून, गतवर्षी पिंपळाच्या पानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जगातील सर्वात लहान रांगोळी साकारून त्यांनी सर्वांचे कौतुक मिळवले होते.त्यांच्या या सर्जनशील उपक्रमामुळे परिसरात त्यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे.

वाळूपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आकर्षक चित्र साकार Read More »

रत्नागिरीत समुद्रात बुडून ठाण्यातील तरुणाचा मृत्यू; आरे किनाऱ्यावर दुर्दैवी घटना

रत्नागिरीत दुर्दैवी घटना : ठाण्यातील तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू

रत्नागिरी: रत्नागिरीजवळील आरे समुद्रकिनारी शनिवारी (११ एप्रिल) सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील निशांत राजेश ठाकरे (वय २४) याचा समुद्रात पोहताना बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अंकितकुमार राकेशकुमार सिंह आणि त्यांचे मित्र शनिवारी सायंकाळी सुमारे ४ वाजता आरे येथे फिरण्यासाठी गेले होते. समुद्रकिनारी पोहत असताना निशांत ठाकरे पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडला नाही. यानंतर त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली असून बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली होती. रविवारी (१२ एप्रिल) सकाळी सुमारे ७:१५ वाजता काळबादेवी फडजीवाडी मारुती मंदिराजवळील समुद्रकिनारी एक मृतदेह आढळून आला. पोलिस पाटील व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निशांतच्या मित्रांनी, वडिलांनी आणि नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. समुद्रकिनारी फिरताना आणि पोहताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

रत्नागिरीत दुर्दैवी घटना : ठाण्यातील तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू Read More »

वेंगुर्लेतील आंतरराज्य व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; राज्यस्तरीय खेळाडू घडतील – प्रितेश राऊळ

वेंगुर्लेतील आंतरराज्य हॉलीबॉल स्पर्धेतून राज्यस्तरीय खेळाडू निर्माण होतील : प्रितेश राऊळ

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद संजय पिळणकर | वेंगुर्ले :भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस वेंगुर्लेसह संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. वेंगुर्ले तालुक्यात व्हॉलीबॉल स्पर्धेसह दशावतारी नाट्य महोत्सव, कबड्डी स्पर्धा, आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. या आंतरराज्य हॉलीबॉल स्पर्धेतून राज्यस्तरीय खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी व्यक्त केला. खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त “संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६” अंतर्गत भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा आणि जय मानसीश्वर संघ यांच्या वतीने भव्य खुली आंतरराज्य पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. स्पर्धेचे उद्घाटन भाजपा प्रदेश सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ बोलत होते. या कार्यक्रमाला प्रसन्ना (बाळू) देसाई, विष्णू उर्फ पप्पू परब, शरद चव्हाण, वसंत तांडेल, नगराध्यक्ष राजन गिरप, आकांक्षा परब, शितल आंगचेकर, रिया केरकर, गौरी माईणकर, यशवंत उर्फ दाजी परब, सचिन शेटये, प्राचार्य धनराज गोस्वामी, प्रा. जे.वाय. नाईक, प्रा. बी.जी. गायकवाड, अनंत केळूसकर, जयंत मोंडकर, प्रणव वायंगणकर, भूषण आंगचेकर, मनोहर तांडेल, कौस्तुभ वायंगणकर, सॅमसंग फर्नांडिस, तुषार साळगांवकर, भूषण सारंग, हेमंत तुळसकर, संदीप शेटये, नामदेव सरमळकर, पंच हेमंत गावडे, राधाकृष्ण उर्फ दादा पेडणेकर, अमित हर्डीकर, दाजी नाईक, महेंद्र मातोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोवा येथील अनेक संघ सहभागी झाले आहेत. नगराध्यक्ष राजन गिरप यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, वेंगुर्ले येथे अनेक वर्षांपासून हॉलीबॉल खेळला जात असून अशा स्पर्धांमुळे खेळाला नवी ऊर्जा मिळते. स्पर्धेचे नियोजन नेहमीप्रमाणे उत्कृष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत तांडेल यांनी केले, स्वागत प्रणव वायंगणकर यांनी केले तर आभार प्रसन्ना (बाळू) देसाई यांनी मानले. स्पर्धेचे नियोजन युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले असून, संपूर्ण वेंगुर्ले शहरात झेंडे आणि बॅनर्स लावून उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

वेंगुर्लेतील आंतरराज्य हॉलीबॉल स्पर्धेतून राज्यस्तरीय खेळाडू निर्माण होतील : प्रितेश राऊळ Read More »