मंडणगड : तालुक्यातील आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास तसेच अस्थिकलश स्थानी पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. सामंत म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार जगभर पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारक उभारण्यासाठी आवश्यक निधी देण्यात कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. पुढील वर्षी जिल्ह्यातील पाच संविधान भवनांचे लोकार्पण करण्याचाही त्यांनी संकल्प व्यक्त केला. बाबासाहेबांचा विचार हा संपूर्ण देशाच्या एकात्मतेचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनीही बाबासाहेबांचे मूळ गाव आंबडवे आपल्या मतदारसंघात असल्याचा अभिमान व्यक्त केला. मंडणगड तालुक्याची नवी ओळख विकासातून घडवण्याचा निर्धार व्यक्त करत, बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श या भागातून निर्माण करू, असे ते म्हणाले. तसेच, स्मारक प्रकल्पातील अडचणी दूर करून त्याला गती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण करण्यात आले. समाजकल्याण विभागातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.















