रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील आंबा व काजू बागायतदार शेतकरी चालू हंगामात गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. औषधांच्या अयोग्य वापरामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे ३०० कोटी रुपयांची खते, कीटकनाशके, पीजीआर आणि बुरशीनाशके खरेदी केली आहेत. मात्र, ही औषधे नेमकी कशी आणि किती प्रमाणात वापरायची याबाबत कंपन्यांकडून स्पष्ट मार्गदर्शन न दिल्याने उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर बाजारात बोगस औषध कंपन्यांचा सुळसुळाट झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. आंबा पिकासाठी ७० हून अधिक कंपन्यांची औषधे उपलब्ध असून त्यांच्या किंमतीत मोठी तफावत दिसून येत आहे. विशेष म्हणजे, रोख खरेदीवर मूळ किंमतीच्या ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याने या व्यवहारांबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून बोगस कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच औषधांच्या योग्य वापराबाबत शेतकऱ्यांना शास्त्रीय मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे.















