konkandhara.com

कोकणची बातमी

प्रवाशांच्या समस्या सुटल्याशिवाय दुपदरीकरणाला विरोध – शौकत मुकादम

प्रवाशांच्या समस्या सोडवल्याशिवाय कोकण रेल्वे दुपदरीकरण होऊ देणार नाही – शौकत मुकादम

चिपळूण : संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग दुपदरी करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू असून सुमारे २६३ किलोमीटर मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोकणातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय दुपदरीकरणाचे काम होऊ देणार नाही, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून चिपळूण-दादर पॅसेंजर सुरू करणे, चिपळूण-कराड रेल्वे मार्गाची मागणी तसेच स्थानिक प्रवाशांच्या विविध अडचणी प्रलंबित असल्याचे नमूद केले आहे. मुकादम पुढे म्हणाले की, कोकणातून धावणाऱ्या गाड्यांचा फायदा स्थानिकांपेक्षा परप्रांतीय प्रवाशांना अधिक होत आहे. काही स्थानिकांसाठी सुरू असलेल्या गाड्या बंद करण्यात येत असून सिग्नलच्या कारणांवरून दिशाभूल केली जात आहे. मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने कोकणातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नाही तसेच बसायलाही जागा मिळत नसल्याने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र गाड्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच चिपळूण जंक्शन येथे सर्व सुपरफास्ट गाड्यांना थांबा देणे आणि दादर-चिपळूण स्वातंत्र्य गाडी सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. कोकण रेल्वेसाठी स्थानिकांनी जमीन दिली असताना त्यांच्याच प्रवासाची गैरसोय होणे अन्यायकारक असल्याचे सांगत, स्थानिकांना रेल्वे भरतीतही न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय दुपदरीकरणाचे काम होऊ देणार नाही, असा ठाम इशारा मुकादम यांनी दिला असून यामुळे कोकण रेल्वेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

प्रवाशांच्या समस्या सोडवल्याशिवाय कोकण रेल्वे दुपदरीकरण होऊ देणार नाही – शौकत मुकादम Read More »

बांधकाम कामगार समितीच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव यांची नियुक्ती

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या स्थानिक सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव

गुहागर: गुहागर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत स्थानिक सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी आमदार भास्करराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार जाधव यांच्या शिफारशीने उमेश प्रभाकर महाडिक, नदीम युसुफ काकडे, मंगेश कृष्णा माटे, सौ. साक्षी शेखर चव्हाण व सौ. वर्षा राजेंद्र चव्हाण यांची सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. या समितीमार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ कामगारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कार्य केले जाणार आहे.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या स्थानिक सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव Read More »

कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ उत्साहात

विद्यार्थ्यांनी विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करावी – सुरेश प्रभू दापोली: दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश प्रभू यांनी सांगितले की, कृषी क्षेत्रात विविध आव्हाने असली तरी त्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे. विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याच्या माध्यमातून ही क्षमता विकसित केली आहे. पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा सुमारे १४ टक्के असून उर्वरित ८६ टक्के हिस्सा सेवा व उत्पादन क्षेत्राचा आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कृषी क्षेत्र अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. कृषी पदवीधरांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानामुळे शेतीसमोरील आव्हाने वाढत असली तरी त्यामध्येच संधी शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “शेतीमध्ये जितकी संकटे तितक्याच संधी” हा दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विद्यापीठात ६५ टक्के विद्यार्थिनी शिक्षण घेत असून सुवर्णपदक विजेत्यांमध्येही मुलींचा मोठा सहभाग आहे. तसेच विद्यापीठाला ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या समारंभात कृषी, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, वनशास्त्र, उद्यानविद्या आणि मत्स्यशास्त्र अशा विविध शाखांतील डॉक्टरेट, पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध वर्षांतील सुवर्णपदके व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमास विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मकरंद करमरकर यांनी केले.

कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ उत्साहात Read More »

कासारकोळवण पुलास ६.५० कोटींची मंजुरी; ४५ वर्षांची प्रतीक्षा संपली

कासारकोळवण गावासाठी साडेसहा कोटींच्या पुलास मंजुरी; ४०-४५ वर्षांची प्रतीक्षा संपली

सावर्डे : चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील कासारकोळवण गावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेत आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून सुमारे ६.५० कोटी रुपयांच्या पुलास मंजुरी मिळाली आहे. गेल्या चार ते पाच दशकांपासून प्रलंबित असलेली ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. कासारकोळवण गावाच्या दळणवळणासाठी पूल अत्यावश्यक होता. विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यामुळे गावाचा संपर्क तुटत असे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी विधिमंडळात प्रश्न मांडत तसेच CRF (Central Road Fund) अंतर्गत निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि अखेर पुलाच्या कामास मंजुरी मिळवली. या निर्णयाची माहिती मिळताच कासारकोळवण गावातील ग्रामस्थांनी सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन आमदार निकम यांचे अभिनंदन केले व आभार मानले. यावेळी सरपंच सौ. मानसी करंबेळे, उपसरपंच प्रकाश तोरस्कर, पोलीस पाटील महेंद्र करंबेळे, तंटामुक्ती अध्यक्ष नथुराम करंबेळे, राजाराम तोरस्कर (गुरुजी), सुहास मांगले (माजी ग्रामपंचायत सदस्य), उल्हास मांगले, सोन्या मांगले, बाळकृष्ण तोरस्कर, रोशन कदम, प्रशांत करंबेळे, सदानंद करंबेळे (ग्रामपंचायत सदस्य) तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. ग्रामस्थांनी भावना व्यक्त करत हा पूल गावाच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगितले. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे मनापासून आभार मानले.

कासारकोळवण गावासाठी साडेसहा कोटींच्या पुलास मंजुरी; ४०-४५ वर्षांची प्रतीक्षा संपली Read More »

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सहभागी व्हा – आमदार भास्कर जाधव

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सर्वांनी सहभागी व्हाआमदार भास्कर जाधव यांचे आवाहन

चिपळूण : ‘माझं गाव आरोग्य संपन्न असले पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी. आरोग्यविषयक तक्रारींवर योग्य उपाय जाणून घेऊन शेवटच्या घटकापर्यंत जनजागृती पोहोचली पाहिजे. गाव ते राज्य पातळीपर्यंत सर्वांनी या मोहिमेत मिशन म्हणून सहभागी व्हावे,’ असे आवाहन गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुक्रवारी सकाळी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, संजय कदम, दीप्ती महाडिक, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले, उपसभापती बापू आयरे, सदस्य शौकत माखजनकर, विनोद झगडे, तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. अजय सानप व डॉ. ज्योती यादव यांनी आरोग्यविषयक विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. आमदार जाधव यांनी सांगितले की, या मोहिमेत सहभागी होणाऱ्या व उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत, त्यामुळे सर्व गावांनी उत्साहाने सहभाग घ्यावा. तसेच मुलींमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या एचपीव्ही लसीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. ही लस अधिकाधिक मुलींनी घ्यावी, यासाठी लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवावी, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य पर्यवेक्षक आर. के. पवार, नारायण शिंगवा, मनोहर तायडे, विनायक हेगडे, काका चव्हाण, आरोग्य सहाय्यक एस. वाय. जानवलकर आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन इकबाल चौगुले यांनी केले.

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सर्वांनी सहभागी व्हाआमदार भास्कर जाधव यांचे आवाहन Read More »

लांज्यात टेम्पो-ट्रक भीषण अपघात; चालक ठार, दोघे गंभीर

जात टेम्पो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; एक ठार

प्रतिनिधी – कोकणधारा लांजा : तालुक्यातील वाटुळ-दाभोळे मार्गावर पालू तिठा येथे शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) पहाटे साडेपाचच्या सुमारास आयशर टेम्पो आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो आणि समोरून येणारा ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली.धडक इतकी भीषण होती की आयशर टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. या अपघातात टेम्पो चालक मुजाहिद गफूर मुजावर (वय २६, रा. राजापूर, रानतळे आंबेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका वेळेवर घटनास्थळी न पोहोचल्याने मदतकार्याला उशीर झाला आणि चालकाचा जीव वाचवता आला नाही, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली. या अपघातात आयशर टेम्पोमधील आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

जात टेम्पो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; एक ठार Read More »

डॉ. ज्योती मेटे यांची महिला आयोग अध्यक्षपदी नियुक्तीची शक्यता

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्योती मेटे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता

प्रतिनिधी – कोकणधारा मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका मोठ्या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू असून, डॉ. ज्योती मेटे यांची लवकरच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील महिलांच्या प्रश्नांना न्याय देणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या घटनात्मक पदावर डॉ. मेटे यांची वर्णी लागणार असल्याच्या बातम्या वेगाने पुढे येत आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून लाभलेला प्रदीर्घ अनुभव आणि महिलांच्या प्रश्नांची असलेली सखोल जाण यामुळे त्यांचे नाव या शर्यतीत सर्वात आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही काळापासून महिला आयोगाचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. डॉ. ज्योती मेटे यांनी यापूर्वीही प्रशासकीय चौकटीत राहून महिलांच्या हक्कांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्याकडे असलेली समाजातील तळागाळातील घटकांची ओळख आणि दांडगा जनसंपर्क या आगामी जबाबदारीसाठी भक्कम आधार ठरू शकतो. राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही संभाव्य नियुक्ती म्हणजे सत्ताधारी नेत्यांची एक महत्त्वाची राजकीय रणनीती असल्याचेही बोलले जात आहे. राज्य शासनाने त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केल्यास महिला धोरणांच्या अंमलबजावणीला नवी गती मिळण्याची शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तीची अधिकृत घोषणा केव्हा होणार, याकडे आता सर्वच राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संस्थांचे लक्ष वेधले गेले आहे.  

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्योती मेटे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता Read More »

ओव्हरलोड ट्रकचा कहर; सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर तिहेरी अपघातओव्हरलोड ट्रकचा कहर; सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर तिहेरी अपघात

ओव्हरलोड ट्रकचा कहर! सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर भीषण तिहेरी अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

सावंतवाडी : संजय पिळणकरसावंतवाडी–वेंगुर्ला मार्गावरील कोलगाव येथे आज ओव्हरलोड ट्रकने बस आणि डंपरला धडक दिल्याने भीषण तिहेरी अपघात घडला. या अपघातात एसटी बस व डंपरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव–सावंतवाडी ही एसटी बस सावंतवाडी बस स्थानकाच्या दिशेने जात होती. त्याचवेळी एक डंपर माडखोलच्या दिशेने मार्गक्रमण करत होता. दरम्यान, वेंगुर्ला बाजूकडून अंदाजे ७०० चिरा दगड भरून येणारा एक ट्रक समोरून आला. सदर ट्रक क्षमतेपेक्षा अधिक ओव्हरलोड असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि अनियंत्रित झालेल्या ट्रकने प्रथम एसटी बसला व त्यानंतर डंपरला जोरदार धडक दिली. या धडकेत बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून डंपरच्याही मागील बाजूस हानी पोहोचली आहे. अपघाताची माहिती मिळताच कोलगाव बीटचे हवालदार मनोज राऊत व सुरेश राऊळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सुदैवाने बसमधील प्रवासी, चालक व वाहक थोडक्यात बचावले. दरम्यान, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात होणारी ओव्हरलोड वाहतूक हा गंभीर प्रश्न बनला आहे. प्रशासनाकडून अशा वाहनांवर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तातडीने कडक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

ओव्हरलोड ट्रकचा कहर! सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर भीषण तिहेरी अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली Read More »

माडखोल ग्रामस्थांचे आत्मदहन आंदोलन; अवैध वाळू उपशाविरोधात तीव्र भूमिका

न्याय मिळेपर्यंत माघार नाही! अवैध वाळू उपशाविरोधात माडखोल ग्रामस्थांचे आत्मदहन आंदोलन

सावंतवाडी : संजय पिळणकरतालुक्यातील तेरेखोल नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात माडखोल येथील ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेत आत्मदहन आंदोलन सुरू केले आहे. “जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे. माडखोल येथील राजकुमार राऊळ आणि विशाल राऊळ या दोघांनी या आंदोलनाला सुरुवात केली. त्यांच्या मते, नदीपात्रात अनेक दिवसांपासून बेकायदेशीर उत्खनन सुरू असूनही संबंधित यंत्रणा निष्क्रिय आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलिस आणि इतर विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, मात्र महसूल विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला की, सामान्य नागरिक घरासाठी थोडी माती किंवा दगड आणल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते, पण मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वाळू उपशावर मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्याय मिळेपर्यंत माघार नाही! अवैध वाळू उपशाविरोधात माडखोल ग्रामस्थांचे आत्मदहन आंदोलन Read More »

‘एकदा पाहावं करून’ नाटक चिपळूण-रत्नागिरीत; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

पुन्हा पुन्हा पहावं असं ‘एकदा पाहावं करून’ नाटक आता चिपळूण-रत्नागिरीत

चिपळूण : मराठी रंगभूमीवर धुमाकूळ घालणारं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारं ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक आता कोकणात रंगणार आहे. १६ एप्रिल रोजी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात तर १७ एप्रिल रोजी चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात या गाजलेल्या नाटकाचे प्रयोग होणार असून, नाट्यरसिकांमध्ये याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठी रंगभूमीवर सध्या एक भन्नाट कॉमेडी नाटक प्रेक्षकांच्या चर्चेत आहे, ‘एकदा पाहावं करून’. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून साकारलेलं आणि विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली रंगमंचावर आलेलं हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच विचार करायलाही भाग पाडत आहे. ६ डिसेंबरपासून या नाटकाचा शुभारंभ झाला असून पुणे आणि मुंबईमध्ये त्याचे प्रयोग तुफान गाजत आहेत. सोशल मीडियावरही या नाटकातील प्रसंगांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहेत. आता हे नाटक कोकणातही रंगणार असून १६ एप्रिल रोजी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आणि १७ एप्रिल रोजी चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात त्याचे प्रयोग होणार आहेत. त्यामुळे कोकणवासीयांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या नाटकातील प्रमुख कलाकार वैभव मांगले हे देवरूखचे सुपुत्र असून गौरी फणसे महाजन या चिपळूणच्या आहेत, त्यामुळे स्थानिक प्रेक्षकांचा उत्साह अधिक वाढला आहे. हे नाटक नातेसंबंधांमधील गोडवा आणि वास्तवातील बोचरेपणा हलक्याफुलक्या विनोदातून मांडतं. कथानकाच्या केंद्रस्थानी दोन पूर्णपणे भिन्न स्वभावाचे मध्यमवयीन पुरुष आहेत. बाप्पाजी धारसोड, बिनधास्त, पैशातून सत्ता मिळवणारा; आणि बाबनराव बक्रे, भित्रा पण स्वतःला नैतिकतेचा कट्टर पुरस्कर्ता समजणारा वकील. या दोघांच्या जगांची टक्कर होते, तेव्हा निर्माण होतो गैरसमज, गोंधळ आणि हास्याचा धमाल प्रवास.या सगळ्यात ट्विस्ट येतो तो त्यांच्या मुलांच्या प्रेमप्रकरणामुळे. बाबनरावची मुलगी आणि बाप्पाजींचा मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्नाचा निर्णय घेतात. या पार्श्वभूमीवर घडणारे प्रसंग प्रेक्षकांना खळखळून हसवतात, पण शेवटी एक गंभीर प्रश्नही उभा करतात. माणूस नैतिकतेमुळे ‘चांगला’ असतो की संधी नसल्यामुळे?अभिनयाच्या बाबतीतही हे नाटक तितकंच दमदार आहे. भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, नेहा कुलकर्णी, गौरी महाजन, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, धनश्री दळवी, भूषण पाटील, आनंद इंगळे आणि वैभव मांगले यांसारख्या अनुभवी आणि तरुण कलाकारांचा प्रभावी सहभाग नाटकाला अधिक रंगतदार बनवतो. हास्य, नातेसंबंध आणि वास्तव यांचा सुरेख मिलाफ असलेलं ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक खरंच एकदा पाहायलाच हवं, असं प्रेक्षकांचं मत होताना दिसत आहे.

पुन्हा पुन्हा पहावं असं ‘एकदा पाहावं करून’ नाटक आता चिपळूण-रत्नागिरीत Read More »