सावंतवाडी : संजय पिळणकर
तालुक्यातील तेरेखोल नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात माडखोल येथील ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेत आत्मदहन आंदोलन सुरू केले आहे. “जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
माडखोल येथील राजकुमार राऊळ आणि विशाल राऊळ या दोघांनी या आंदोलनाला सुरुवात केली. त्यांच्या मते, नदीपात्रात अनेक दिवसांपासून बेकायदेशीर उत्खनन सुरू असूनही संबंधित यंत्रणा निष्क्रिय आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलिस आणि इतर विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, मात्र महसूल विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला की, सामान्य नागरिक घरासाठी थोडी माती किंवा दगड आणल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते, पण मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वाळू उपशावर मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.















