konkandhara.com

27 अप्रैल 2026

Copy of Copy of Web Banner 9

भोंदूगिरीला मान, इतिहासाला अपमान” — शिवरायांच्या नावावरची राजकीय खेळी

Date: २८ एप्रिल २०२६ छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे—पण तो अधिकार जबाबदारी आणि समज यांच्या चौकटीतच असतो. आज काही तथाकथित “बाबा” किंवा प्रवचनकार आपल्या प्रसिद्धीसाठी इतिहासाचा वापर करताना दिसतात. प्रश्न असा आहे की, ज्यांना इतिहासाचं भान नाही, त्यांना शिवरायांवर भाष्य करण्याचा नैतिक अधिकार आहे का? आणि त्याहून मोठा प्रश्न—अशांना उचलून धरून कोण फायदा घेतंय? बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्रात संताप उसळला आहे. शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या कथित टिप्पणीमुळे सामाजिक माध्यमांपासून राजकीय व्यासपीठांपर्यंत प्रतिक्रिया उमटत आहेत. ही पहिली वेळ नाही. गेल्या काही वर्षांत अशा अनेक प्रवचनकारांनी, स्वयंघोषित गुरूंनी, किंवा सोशल मीडिया प्रभावकांनी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवर वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे.माध्यमांचं अतिप्रसारण, राजकीय पाठबळ आणि धार्मिक भावनांचा वापर—या तिन्ही गोष्टींमुळे अशा व्यक्तींना अनावश्यक महत्त्व मिळतं. महाराष्ट्रात शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील राजा नाहीत, तर सामाजिक स्वाभिमानाचं प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांच्या संदर्भातली कोणतीही गैरजबाबदार टिप्पणी ही केवळ शब्दांची चूक नसते—ती संस्कृतीवरचा आघात मानली जाते. या प्रकरणाकडे फक्त “वाद” म्हणून पाहणं ही मोठी चूक ठरेल. ही घटना दाखवते की, आज काही भोंदू प्रवचनकारांना राजकीय आणि माध्यमिक पाठबळ मिळतंय, आणि त्यातून त्यांना अप्रमाणित अधिकार मिळतोय. ज्यांची स्वतःची कोणतीही ऐतिहासिक समज नाही, संशोधनाचा आधार नाही, ते लोक लाखोंच्या समोर बसून इतिहासाचं भाष्य करतात—हेच मुळात धोकादायक आहे. शिवाजी महाराजांवर बोलणं म्हणजे केवळ कथा सांगणं नाही; ते अभ्यास, संवेदनशीलता आणि आदर यांची मागणी करतं. पण आज “लोकप्रियता” हीच पात्रतेची मोजमाप बनली आहे. टीव्हीवर दिसतो, लाखो फॉलोअर्स आहेत, म्हणून तो कोणत्याही विषयावर बोलू शकतो—हा गैरसमज वाढवण्यात काही राजकीय शक्तींचा हात असल्याचं स्पष्ट दिसतं.धर्म, अध्यात्म आणि इतिहास यांचं मिश्रण करून भावनांना हात घालणं हा एक राजकीय डाव आहे. आणि त्यात अशा व्यक्ती प्यादी बनतात—किंवा कधी कधी स्वतःच खेळाडू होतात. या सगळ्यात सर्वात मोठं नुकसान होतंय ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्वाभिमानाचं.शिवाजी महाराज हे कोणत्याही एका पक्षाचे, एका विचारसरणीचे नाहीत—ते सर्वांचे आहेत.त्यांच्या नावाचा वापर करून स्वस्त प्रसिद्धी मिळवणं आणि त्याला राजकीय आश्रय मिळणं, हा थेट अपमान आहे. काहींचं मत आहे की, कोणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीत अशा वक्तव्यांना बंदी घालणं योग्य नाही. हा मुद्दा तत्त्वतः योग्य असला, तरी स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांचा समतोल आवश्यक आहे.जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणतीही ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक विकृती चालू दिली, तर समाजात चुकीचे संदेश जातील. तसेच, प्रत्येक वेळी अशा व्यक्तींना अतिप्रसिद्धी देणंही चुकीचं आहे. कधी कधी प्रतिक्रिया देतानाच आपण त्यांना अधिक महत्त्व देतो, आणि तेच त्यांच्या प्रसिद्धीचं साधन बनतं. या वादाचा परिणाम केवळ राजकीय नाही, तर सामाजिक पातळीवरही दिसतो. समाजात ध्रुवीकरण वाढतं, आणि इतिहासाच्या नावावर वाद निर्माण होतात. जर अशा घटनांवर ठोस आणि विचारपूर्वक प्रतिक्रिया दिली नाही, तर भविष्यात आणखी अनेक “भोंदू” व्यक्ती पुढे येतील. माध्यमं, सोशल मीडिया आणि राजकीय शक्ती यांच्या संगनमतातून “नवे आयकॉन” तयार होतील—ज्यांची पात्रता केवळ लोकप्रियता असेल. Konkandhara च्या वाचकांसाठी हा स्पष्ट संदेश आहे—शिवाजी महाराजांचा सन्मान म्हणजे केवळ भावना व्यक्त करणं नाही, तर त्यांच्या विचारांना योग्य संदर्भात समजून घेणं आहे.आणि ज्यांना त्या विचारांची जाण नाही, त्यांना उचलून धरणं थांबवणं हीच खरी प्रतिक्रिया आहे. शिवाजी महाराजांवर बोलण्याची पात्रता ही प्रसिद्धीने नाही, तर अभ्यासाने ठरते.आज गरज आहे ती भोंदूगिरी ओळखण्याची आणि तिला नाकारण्याची.राजकारण, माध्यमं आणि समाज—तिघांनीही जर विवेक वापरला, तरच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख टिकेल.अन्यथा “शिवरायांच्या नावावरचा गोंधळ” हा भविष्यात आणखी वाढत जाईल—आणि त्यात सत्य हरवेल.

भोंदूगिरीला मान, इतिहासाला अपमान” — शिवरायांच्या नावावरची राजकीय खेळी Read More »

konkandhara 2026 04 28T010116.378

महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत ध्वजवंदन; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रमुख सोहळा

रत्नागिरी, दि. 27 (जिमाका) : महाराष्ट्र दिन निमित्त शुक्रवार, 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार असून, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) विश्वजीत गाताडे, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली. नगरपालिकेकडून पाण्याची व्यवस्था, जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून रुग्णवाहिका, क्रीडा विभागाकडून साऊंड सिस्टीम तसेच महावितरण (MSEB) कडून अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी सांगितले की, मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 8 वाजता असल्याने इतर कोणत्याही शासकीय किंवा अर्धशासकीय संस्थांनी सकाळी 7.15 ते 9 या वेळेत ध्वजवंदन अथवा कार्यक्रम आयोजित करू नयेत. जर स्वतंत्र कार्यक्रम घ्यायचा असेल, तर तो सकाळी 7.15 पूर्वी किंवा 9 नंतरच आयोजित करावा. कार्यक्रमादरम्यान सावधान स्थितीत ‘वंदे मातरम्’ गीत सादर करणे, त्यानंतर राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत म्हणणे आणि लगेच राज्यगीत सादर करणे आवश्यक असल्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या सर्व सूचनांची माहिती ग्रामीण स्तरावरील संस्था, शाळा व महाविद्यालयांपर्यंत पोहोचवावी व त्यांचे काटेकोर पालन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत ध्वजवंदन; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रमुख सोहळा Read More »

konkandhara 2026 04 28T005434.964

रत्नागिरी जिल्ह्यात 13 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी उद्या मतदान; संबंधित गावांमध्ये सुट्टी जाहीर

रत्नागिरी, दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवार, दि. 28 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी निश्चित करण्यात आली आहे. मतदानाचा दिवस कामाचा असल्यामुळे संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून त्या-त्या गावांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी राज्य निवडणूक आयोग यांच्या निवडणूक कार्यक्रमानुसार फक्त निवडणूक लागू असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रापुरतीच लागू राहणार आहे. या पोटनिवडणुका गुहागर तालुक्यातील खोडदे, संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, कोंडगाव, तुरळ, राजिवली आणि ओझरखोल, लांजा तालुक्यातील भडे तसेच राजापूर तालुक्यातील केळवली माडबन, भालावली, कळसावली, कोंड्ये तर्फे सौंदळ आणि धाऊलवल्ली या गावांमध्ये होणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 13 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी उद्या मतदान; संबंधित गावांमध्ये सुट्टी जाहीर Read More »

konkandhara 2026 04 28T004045.107

देवस्थान जमिनींचा प्रश्न सुटणार; साडेचार लाख हेक्टर जमिनींवर शेतकऱ्यांना मालकी हक्क

मुंबई, दि. २७ एप्रिल २०२६ : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा मोठा निर्णय राज्य सरकार घेण्याच्या तयारीत आहे. पिढ्यानपिढ्या देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या वहिवाटदार शेतकऱ्यांना आता त्या जमिनींचे मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे साडेचार लाख हेक्टर जमिनीवरील हस्तांतरण आणि विकासाचे निर्बंध हटणार असून, लवकरच यासंदर्भातील नवीन धोरण जाहीर होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात राजे-महाराजांच्या काळात मंदिर, मठ आणि देवस्थानांच्या व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी इनाम म्हणून देण्यात आल्या होत्या. या जमिनींवर अनेक वर्षांपासून कुळ किंवा शेतकरी शेती करत असले तरी कागदोपत्री मालकी हक्क नसल्याने त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. जमिनींचे कायदेशीर हस्तांतरण होत नसल्याने शेतकरी वर्ग अनिश्चिततेत होता; मात्र आता ही कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. सरकारच्या प्रस्तावानुसार, या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करताना ठराविक अधिमूल्य आकारले जाणार आहे. हे अधिमूल्य संबंधित देवस्थानांना देण्यात येईल, ज्यामुळे मंदिरांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध होईल. तसेच ज्या ठिकाणी जमिनी पुजाऱ्यांच्या ताब्यात असून त्या प्रत्यक्षात वहिवाटदार कसत आहेत, त्या प्रकरणांतही ठराविक अधिमूल्य भरून शेतकऱ्यांच्या नावे मालकी हक्क देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. या जमिनींच्या हस्तांतरणावरील निर्बंध हटवल्यामुळे शेती, बांधकाम व इतर विकासकामांना गती मिळणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक चक्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवस्थान, कुळ आणि वहिवाटदार यांच्यातील हक्क स्पष्ट करण्यासाठी सरकार सर्वसमावेशक कायदा तयार करत आहे. या कायद्याचा मसुदा लवकरच जाहीर करून त्यावर जनतेच्या हरकती व सूचना मागवल्या जातील. त्यानंतर जुलै महिन्यात होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात या कायद्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.

देवस्थान जमिनींचा प्रश्न सुटणार; साडेचार लाख हेक्टर जमिनींवर शेतकऱ्यांना मालकी हक्क Read More »

konkandhara 2026 04 28T003457.250

चिपळूणमध्ये बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; नोंदणीसाठी दोन दिवस शिल्लक

चिपळूण : अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने बालकांसाठी विशेष बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बालकांमधील अभिनय, संवादकौशल्य, रंगमंचावरील आत्मविश्वास, शारीरिक अभिव्यक्ती आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे. हे शिबिर दि. १ ते १० मे २०२६ या कालावधीत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणार असून ७ ते १७ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना यात सहभागी होता येणार आहे. शिबिरात प्रा. रश्मी नंदकुमार देव (पुणे) या नाट्य प्रशिक्षक, अभिनेत्री, दिग्दर्शिका व माहितीपट निर्माती मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरादरम्यान अभिनय, संवादफेक, शरीरभाषा, रंगमंचावरील हालचाली, टीमवर्क आणि बालनाट्य सादरीकरणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, शिबिराच्या अखेरीस बालनाट्य सादरीकरणही होणार आहे. नोंदणीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून मोजक्या जागा उपलब्ध असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी ॲड. विभावरी रजपूत (७७९६७२९५८७) आणि दिलीप आंब्रे (८२९१०८९३०२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी रंगभूमीची ओळख करून देणारा आणि मुलांमध्ये कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम लवकरच रंगणार असून, पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

चिपळूणमध्ये बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; नोंदणीसाठी दोन दिवस शिल्लक Read More »

konkandhara 2026 04 28T002947.356

देवरुखमध्ये पार्किंगमधून कार चोरी; काही तासांत लोवले येथे बेवारस अवस्थेत सापडली

संगमेश्वर : तालुक्यातील देवरुख येथील कृष्णा रेसिडन्सीच्या पार्किंगमधून मारुती झेन कार अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. मात्र, हीच गाडी काही तासांत संगमेश्वर-देवरुख मुख्य मार्गावरील लोवले येथे बेवारस स्थितीत आढळून आल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. अमित वासुदेव साने (वय ५२, रा. कृष्णा रेसिडन्सी, देवरुख) यांनी आपली सिल्व्हर रंगाची मारुती झेन (एमएच १२ सी के ०४८३) नेहमीप्रमाणे इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. २६ एप्रिल रोजी रात्री १०:३० ते २७ एप्रिल रोजी सकाळी ७:३० या कालावधीत अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरून नेली. सकाळी गाडी जागेवर नसल्याचे लक्षात येताच साने यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. देवरुख पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, संगमेश्वर-देवरुख मार्गावरील लोवले येथे शिव शंभो वडापाव दुकानासमोर एक सिल्व्हर रंगाची झेन गाडी बेवारस उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचून खात्री केली असता, हीच चोरीला गेलेली गाडी असल्याचे स्पष्ट झाले. चोरट्याने गाडी तिथेच सोडून पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच सुरेश कदम आणि नामदेव जाधव यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एन. एन. कामेरकर करत आहेत. भरवस्तीतील इमारतीच्या पार्किंगमधून गाडी चोरीला गेल्याने परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण होते. मात्र गाडी तातडीने मिळून आल्याने नागरिकांसह पोलिसांनीही दिलासा व्यक्त केला असून, अज्ञात चोरट्याचा शोध

देवरुखमध्ये पार्किंगमधून कार चोरी; काही तासांत लोवले येथे बेवारस अवस्थेत सापडली Read More »

konkandhara 100

संगमेश्वरला ५ गाड्यांच्या थांब्याची शक्यता; कोकण रेल्वे बैठकीत सकारात्मक आश्वासन

संगमेश्वर (प्रतिनिधी): कोकण रेल्वे संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक घडामोडी समोर आल्या आहेत. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी स्थानिक मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.ही बैठक पद्मश्री गजानन माने यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती. ‘निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर’ या फेसबुक समूहाचे प्रमुख संदेश जिमन यांनी यावेळी CMD यांचे आभार मानले.बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकावर एकूण ९ साप्ताहिक गाड्यांच्या थांब्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५ गाड्यांच्या थांब्यासंदर्भात सकारात्मक प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाणार असून, त्यावर अनुकूल निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.तसेच मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम स्पेशल या विशेष गाडीला संगमेश्वर येथे थांबा देण्याबाबत सादर करण्यात आलेल्या निवेदनावरही लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावरील फलाट क्रमांक १ व २ वर डिजिटल कोच पोजिशन इंडिकेटर बसवण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. यामुळे गाड्यांतील डब्यांची अचूक माहिती प्रवाशांना मिळणार आहे. याशिवाय, स्थानकावर तिकीट तपासनीस (TC) यांची दररोज तपासणी सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध होणार आहे.या बैठकीस गंगाराम टोपरे, मुकुंद सनगरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, या बैठकीत पद्मश्री गजानन माने यांनी कोकण रेल्वेचे चेअरमन संतोष झा यांच्याकडे दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. कोकण रेल्वेच्या शिल्पकारांच्या नावाचा फलक स्थानकावर लावण्याची मागणी करण्यात आली, तर मांडवी एक्सप्रेस या गाडीला दिवा स्थानकावर थांबा देण्याची मागणीही करण्यात आली. यापैकी शिल्पकारांच्या नावाचा फलक लावण्यास तात्काळ मान्यता देण्यात आली आहे.या निर्णयांमुळे संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील सुविधा आणि सेवा मोठ्या प्रमाणात सुधारतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

संगमेश्वरला ५ गाड्यांच्या थांब्याची शक्यता; कोकण रेल्वे बैठकीत सकारात्मक आश्वासन Read More »

konkandhara 99

कोल्हापूरहून रत्नागिरीत येणारा गुटखा पकडला; ६ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : शहर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एका इसमावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ७७ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथून एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला घेऊन रत्नागिरीत येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी सापळा रचला. पोलिसांनी पहाटेच्या सुमारास रत्नागिरी शहरात धडक कारवाई करत संशयित इको गाडी अडवली. या वाहनाची झडती घेतली असता त्यात ३ लाख २७ हजार ९०४ रुपयांचा गुटखा आणि पान मसाला आढळून आला. पोलिसांनी या मालासह ३ लाख ५० हजार रुपये किमतीची इको गाडी, असा एकूण ६ लाख ७७ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी शरद गणपती भंडारे (रा. सरुड, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलीस कर्मचारी राहुल जाधव, रणजित जाधव आणि शरद जाधव यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.

कोल्हापूरहून रत्नागिरीत येणारा गुटखा पकडला; ६ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त Read More »

ChatGPT Image Apr 28 2026 12 08 39 AM

पैसे दिले नाही म्हणून मारहाण करत वडिलांना दुसर्या मजल्यावरून पाडले खाली

कुवारबाव येथील घटना; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल रत्नागिरी : प्रतिनिधीशहरातील कुवारबाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना घडली. खर्चासाठी मागितलेले पैसे दिले नाहीत या रागातून मुलाने आपल्या वडिलांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या झटापटीत वडील पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रणय मनोज सणस (2१, रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे धक्काबुक्की करणाऱ्या मुलाचे नाव आहे. ही घटना शनिवार २५ एप्रिल रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास कुवारबाव येथील संगम हॉटेलच्या मागील पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घडली. फिर्यादी मनोज प्रभाकर सणस (५३, रा. वाई, सातारा, सध्या रा. कुवारबांव) हे कुकिंगचा व्यवसाय करतात. शनिवारी सायंकाळी ते व मुलगा प्रणय सणस हे कुवारबांव येथील संगम हॉटेलच्या मागील एका पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बसले होते. त्यावेळी मुलगा प्रणय याने वडिलांकडे खर्चासाठी २००० रुपयांची मागणी केली. वडिलांनी “माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, मी फक्त २०० रुपये देऊ शकतो” असे सांगितले. आपल्या मागणीपेक्षा कमी पैसे मिळत असल्याचा राग आल्याने प्रणयचा संयम सुटला. पैसे देण्यास नकार दिल्याने प्रणयने वडिलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि तो त्यांच्या अंगावर धावून गेला. त्याने केलेल्या धक्काबुक्कीमुळे मनोज सणस यांचा तोल गेला आणि ते पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट जमिनीवर पडले. या भीषण अपघातात त्यांच्या शरिराला गंभीर दुखापत झाली. दुसऱ्या मजल्यावरून पडल्यानंतर जखमी मनोज सणस रात्रभर तिथेच पडून होते. दुसऱ्या दिवशी रविवार २६ एप्रिल रोजी यांनी आपले मित्र दीपक घाटगे यांना बोलावून घेतले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांनी मनोज सणस यांचा जबाब नोंदवून घेतला. अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार पी. के. पाटील करत आहेत.

पैसे दिले नाही म्हणून मारहाण करत वडिलांना दुसर्या मजल्यावरून पाडले खाली Read More »

konkandhara 97

श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.समाजात मानवतेची भावना जपणारे असे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री दत्त मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास प्रचंड उष्मा असूनही रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ४० हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन तोरसे (पेडणे) गावच्या माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रार्थना मोटे,उद्योजक प्रभाकर मोटे,बांदा सरपंच प्रियांका नाईक,उपसरपंच रत्नाकर आगलावे,तोरसे जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य रमेश सावळ,दत्तप्रसाद कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुशांत पांगम,उपाध्यक्ष रामचंद्र उर्फ भाऊ वाळके,बांबोळी रक्तपेढीचे डॉ.पास्कल तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने संपन्न झाले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो,असे सांगितले.तरुणांनी रक्तदानास पुढाकार घ्यावा,महिलांनीही निर्भयपणे सहभाग घ्यावा,असे आवाहनही करण्यात आले.शिबिर यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राकेश केसरकर,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे निलेश मोरजकर,अक्षय मयेकर,राजेश विरनोडकर,दर्पण आळवे,शुभम साळगावकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.रक्तदात्यांची नोंदणी,मार्गदर्शन,व्यवस्था आणि नियोजन यासाठी स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका बजावली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पिळणकर यांनी केले,तर आभार रामचंद्र उर्फ भाऊ वाळके यांनी मानले.विशेष म्हणजे या शिबिरात महिलांनी देखील उत्स्फूर्त रक्तदान करून सामाजिक जाणीवेचा आदर्श घालून दिला.

श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »