konkandhara.com

27 अप्रैल 2026

konkandhara 96

जय भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, भुवनेश्वर (रोहा)चा ३१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

कोलाड दिनांक २७ एप्रिल (शरद जाधव) रोहा तालुक्यातील जय भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, भुवनेश्वर (रोहा) यांचा ३१ वा वर्धापनदिन पतसंस्थेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन पांडुरंग सरफळे (रावसाहेब) होते. यावेळी उपाध्यक्ष शंकरराव भगत, सचिव सुहास खरीवले तसेच संचालक मनोहर मेहेतर, संदीप सरफळे, दीपक जाधव, जगदीश दामाणी, हेमंत राणे, महेश बामुगडे, सौ. सुलभा पवार, विनायक पवार, व्यवस्थापिका बंदिनी धनावडे, निता शिंगृत, विश्वास खेरटकर, किरण शिंगृत, रुपेश लोखंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष पांडुरंग सरफळे यांच्या हस्ते भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सचिव सुहास खरीवले यांनी उपस्थित पदाधिकारी व संचालकांचे स्वागत केले. यावेळी दीपक जाधव, महेश बामुगडे, उपाध्यक्ष शंकरराव भगत व सचिव सुहास खरीवले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संस्था गेली ३१ वर्षे पारदर्शक व कुटुंबवत्सल पद्धतीने कार्यरत असून सभासदांच्या आर्थिक गरजांसाठी सातत्याने कर्जपुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेक सभासद कुटुंबांची आर्थिक उन्नती होऊन त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे. या यशामागे सर्व संचालक, सभासद, कर्जदार व ठेविदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.अध्यक्ष पांडुरंग सरफळे यांच्या कार्यकर्तृत्व, कल्पकता, संकल्पना व दूरदृष्टीमुळे रोहा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी संस्थेचे स्वतःच्या जागेत भव्य कार्यालय उभे राहिले असून संस्थेचा कारभार दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे. सहकाराची भावना व सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर अशक्य वाटणारी गोष्टही साध्य होऊ शकते, असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. सहकारी पतसंस्थेच्या म.स.अधिनियम १९६० व नियम १९६१ व नियामक मंडळाच्या सुचना यानुसार कामकाज केले जाते.नियामक मंडळाच्या नियमावलीचे पालन करूनच संस्थेचा कारभार चालविला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचारी बंदिनी धनावडे व निता शिंगृत यांचे योगदान विशेष उल्लेखनीय असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याच कार्यक्रमात निता शिंगृत यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.भविष्यातही पतसंस्थेचा कारभार पारदर्शक ठेवत ग्राहकांचे हित जपणे व आर्थिक प्रगती साधण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार संचालक मंडळाने व्यक्त केला.कार्यक्रमाच्या शेवटी सचिवांनी उपस्थितांचे आभार मानले.

जय भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, भुवनेश्वर (रोहा)चा ३१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा Read More »

konkandhara 95

भातसई येथे श्री महादाई देवी व धावीर महाराज मूर्तींच्या वर्धापन   दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनरोहा

(वार्ताहर):रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र भातसई येथे श्री महादाई देवी व धावीर महाराज मूर्तींच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन   श्री महादाई देवी व धावीर महाराज देवस्थान, मंदिराजवळ करण्यात आले आहे.या निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा, अभिषेक, हरिपाठ, कीर्तन व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.०० ते ९.०० वाजता काकडा याने होणार असून, त्यानंतर ९.०० ते १०.०० अभिषेक, तसेच सकाळी ११.०० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होणार आहे.सायंकाळी ६.०० ते ७.०० हरिपाठ आयोजित करण्यात आला असून, विविध पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर रात्री ७.०० ते ८.०० महाप्रसाद व रात्री ९.०० ते ११.०० कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.या कीर्तनासाठी ह.भ.प. विक्रांत महाराज पोंडकर यांची उपस्थिती लाभणार असून, जोग महाराज वारकरी संस्था, देवाची आळंदी यांचा सहभाग असणार आहे. तसेच अनेक मान्यवर कीर्तनकार व गायक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.हा सोहळा ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व युवक मंडळ भातसई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

भातसई येथे श्री महादाई देवी व धावीर महाराज मूर्तींच्या वर्धापन   दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनरोहा Read More »

konkandhara 94

कोलाड पोलिसांकडून भंगार माफीयांना कायदेशीर सूचना,सुरक्षिततेचे पालन करा अन्यथा कारवाई अटळ

(भंगार व्यावसायिकांचा विषय गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात गेल्याची चर्चा) कोलाड २७एप्रिल (शरद जाधव) रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात भंगार माफीयांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे.या विरोधात स्थानिक नागरिकांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठवताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.प्रशासनाने भंगार माफीयांना बोलावून नोटीसा बजावल्या आहेत.कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षिततेचे पालन करा,अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारने यांनी नोटिसांद्वारे दिला आहे.मुंबई गोवा महामार्गावर तळवली गाव ते भिरा फाटा,वरसगाव,पुगाव,पुई,कोलाड,येथे भंगार व्यवसायिकांनी जागा भाड्याने घेऊन भंगार व्यवसायाची मोठमोठी दुकाने थाटली आहेत.या भंगार व्यवसायामुळे परिसराला अक्षरश: बकालपणा प्राप्त झाला आहे. या परिसरात चोऱ्या देखील खूप वाढल्या आहेत. स्थानीनिकांनी आवाज उठवताच पोलिसांनी तातडीचे पावले उचलीत भंगार व्यावसायिकांना कायदेशीर नोटिसा दिल्या आहेत.प्रत्येक भंगार अड्ड्यावर माणसे किती असतात त्यांचा आधार कार्ड सर्व माहिती पोलिसांना कळवा असा इशारा दिला आहे.भंगार विक्रेते परप्रांतीय आहेत.ते कुणाच्या मर्जीत राहत नाहीत.काही महिन्यापूर्वी खांब येथील स्थानिक व्यापाऱ्यांचा माल भंगार विक्रेत्याच्या गाडीतून चोरीला गेला.त्याचा जाब विचारला असता व्यापाऱ्यास मारहाण झाली.यावरून प्रचंड मस्तावलेले भंगार व्यावसायिक दिसून आले आहेत.त्यामुळे पोलिसांनी नोटीस देण्याचे काम जरी केले असले,तरी हे भंगार धंदे कायमस्वरूपी बंद व्हावे याकरता ज्या हद्दीत हे धंदे आहेत.ती ग्रामपंचायत काय कारवाई करते? याकडे लक्ष लागले आहे.सदर विषय हा रोहा गटविकास अधिकारी त्यांच्या दालनात इथल्या लोकप्रतिनिधींनी नेल्याचे समजते.त्यामुळे कायमस्वरूपी हे धंदे बंद होतात का ?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोलाड पोलिसांकडून भंगार माफीयांना कायदेशीर सूचना,सुरक्षिततेचे पालन करा अन्यथा कारवाई अटळ Read More »

konkandhara 93 1

सावंतवाडीत २९ एप्रिलला जिल्हास्तरीय जनता आरोग्य दरबाराचे रणशिंग ; “आरोग्य व्यवस्थेचा हिशोब द्या!”

दोडामार्ग : भूषण सावंत : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील त्रुटींना थेट भिडण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आता निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालय कृती समिती, सावंतवाडी, अभिमन्यू फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जिल्हास्तरीय जनता आरोग्य दरबार आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे प्रशासनाच्या कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित होणार असून, आरोग्य व्यवस्थेची खरी स्थिती जनतेसमोर उघड होणार आहे. 📅 बुधवार, २९ एप्रिल २०२६⏰ सकाळी १०.०० ते दुपारी १.००📍 स्थळ : बॅरिस्टर नाथ पै सभागृह, सावंतवाडी नगरपरिषद “सिटीजन चार्टर कुठे हरवले?” — थेट सवाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवांमध्ये असलेली ढिसाळ व्यवस्था, तांत्रिक अडचणी आणि रुग्णांची होणारी परवड याविरोधात हा दरबार म्हणजे एक प्रकारचा जनतेचा आक्रोश ठरणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा सर्व स्तरांवरील सेवांबाबत नागरिकांना आपले प्रश्न, तक्रारी आणि सूचना थेट मांडण्याची संधी मिळणार आहे. ⚠️ प्रशासनाला थेट इशारा !आरोग्य विभागाने सिटीजन चार्टरप्रमाणे सेवा देण्यात अपयश आले, तर जनतेचा संताप उफाळून येईल, असा इशारा आयोजकांकडून देण्यात आला आहे. हा दरबार केवळ चर्चा न राहता, ठोस निर्णय आणि जबाबदारी निश्चित करणारा मंच ठरेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 🗣️ “पीडितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा” जिल्ह्यातील पीडित, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या तक्रारींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा घडवून आणण्यासाठी हा दरबार महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 📞 तालुकानिहाय संपर्क व्यवस्था सज्ज या उपक्रमासाठी तालुकानिहाय प्रतिनिधी आणि संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले असून, नागरिकांनी आपल्या समस्या आधीच नोंदवण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे. 💥 “जनतेचा दरबार, प्रशासनाचा हिशोब !” सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर थेट बोट ठेवणारा हा दरबार आता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार की सुधारण्याची संधी, हे येणारा काळच ठरवेल. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे — आता जनतेचा आवाज दाबला जाणार नाही !

सावंतवाडीत २९ एप्रिलला जिल्हास्तरीय जनता आरोग्य दरबाराचे रणशिंग ; “आरोग्य व्यवस्थेचा हिशोब द्या!” Read More »

konkandhara 92 1

दोडामार्गात ‘गो-सन्मान’ चा प्रचंड उठाव ! तहसीलदारांना निवेदन देत गोप्रेमींचा एल्गार

दोडामार्ग : भूषण सावंत: “चला दोडामार्ग…”च्या घोषणांनी तालुका दणाणून गेला आणि आज सोमवारी गो-सन्मान आह्वान अभियानांतर्गत भव्य मोर्चा उत्साहात पार पडला. पिंपळेश्वर बाजारपेठेतून निघालेला हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला, जिथे प्रतिनिधीमंडळाने तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने गोप्रेमी, नागरिक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. गो-सन्मानासाठी ठाम भूमिका या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारपर्यंत ठोस संदेश पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. देशभर एकाच वेळी तालुकास्तरावर निवेदने देण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून दोडामार्गातही ही लढाई उभी राहिली. “गोमातेचा सन्मान हा केवळ भावनेचा विषय नसून राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे,” असा जोरदार सूर आंदोलनकर्त्यांनी लावला. मुख्य मागण्या स्पष्ट आणि आक्रमक सादर करण्यात आलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या ठळकपणे मांडण्यात आल्या— गोमातेला “राष्ट्रमाता” म्हणून घोषित करणे गोसेवेसाठी संपूर्ण देशात एकसमान केंद्रीय कायदा लागू करणे भारतात गोहत्येवर पूर्णतः बंदी घालणे 📜 शासनासमोर १० ठोस उपाययोजना फक्त घोषणांवर न थांबता, शासनाने तातडीने अंमलबजावणी कराव्यात अशा विविध उपाययोजनाही मांडण्यात आल्या— गोशाळांना नियमित अनुदान व व्यवस्थापनासाठी धोरण आखणे गोमूत्र, शेण यावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य व गोआधारित शेतीला चालना रासायनिक शेतीवर नियंत्रण आणून सेंद्रिय पर्यायांना प्राधान्य गोवंश संवर्धनासाठी संशोधन केंद्रे स्थापन करणे दुग्धव्यवसाय व गोपालनाला बाजारपेठीय पाठबळ देणे सार्वजनिक कार्यक्रमांत गोदुग्ध व संबंधित उत्पादनांचा वापर वाढवणे चारागाह जमीन व गोचर भूमीचे संरक्षण गोवंशाशी संबंधित उद्योगांना विशेष सवलती बैलाधारित शेतीसाठी विशेष आर्थिक मदत 👥 मोठ्या संख्येने गोप्रेमींची उपस्थिती मोर्चात तरुण, शेतकरी, महिला व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. दोडामार्गातील हा मोर्चा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम न ठरता, गो-सन्मानासाठी सुरू झालेल्या व्यापक जनआंदोलनाची ठोस नांदी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता या मागण्यांवर शासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोडामार्गात ‘गो-सन्मान’ चा प्रचंड उठाव ! तहसीलदारांना निवेदन देत गोप्रेमींचा एल्गार Read More »

konkandhara 91 1

दोडामार्गात पाणीटंचाईग्रस्त नागरिकांनी थेट संपर्क साधा – बाबुराव धुरींचे आवाहन

दोडामार्ग : भूषण सावंत : तालुक्यात नळपाणी योजना बंद पडलेल्या, विहिरी-आड कोरड्या पडलेल्या आणि नैसर्गिक स्रोत आटल्यामुळे महिला-भगिनींचे हाल होत असतील तर या गंभीर परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आक्रमक भूमिका घेत नागरिकांना थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. धुरी यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, “ज्या गावांत, वाड्यांत पाणीटंचाई आहे, टँकर येत नाहीत किंवा नळांना पाणी येत नाही, त्या नागरिकांनी तात्काळ संपर्क साधावा. तुमचे प्रश्न शासन दरबारी ठामपणे मांडून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” धुरी यांनी पुढे सांगितले की, “गेल्या ३५ वर्षांपासून मी जनतेची सेवा करत आहे. पद असो वा नसो, लोकांचे प्रश्न सोडवणे हीच माझी प्राथमिकता आहे. तालुक्यातील एकही नागरिक पाण्यावाचून त्रस्त राहणार नाही, यासाठी प्रशासनावर दबाव आणणार.” तसेच, ज्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर आहे, त्या ठिकाणची सविस्तर माहिती—गावाचे नाव, किती दिवसांपासून टंचाई आहे, किती कुटुंबांना फटका बसतोय—ही माहिती नागरिकांनी त्वरित कळवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुरी यांचे शिवसैनिक पथक तहसीलदार व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तातडीने टँकर सुरू करणे व कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची जोरदार मागणी करणार आहे. पाणीटंचाईचा प्रश्न आता तापला असून, प्रशासनाने तात्काळ जागे न झाल्यास जनतेचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही !

दोडामार्गात पाणीटंचाईग्रस्त नागरिकांनी थेट संपर्क साधा – बाबुराव धुरींचे आवाहन Read More »

Copy of Copy of Web Banner 8

शवांच्या ढिगाऱ्यावर विकासाचे इमले: उष्णतेच्या लाटेला ‘आपत्ती’ मानायला भीती का?

१८७७ सालचा तो काळ आठवा, जेव्हा मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये रस्त्यारस्त्यावर मृतदेहांचा खच पडला होता. तब्बल दोन कोटी भारतीयांनी अन्नावाचून तडफडून प्राण सोडले होते. त्याच काळात चीनमध्ये तीन कोटी, तर ब्राझील आणि आफ्रिकेतही लाखो लोक अकालमृत्यूचे बळी ठरले होते. तो कोणताही युद्धप्रसंग नव्हता, की कोणतीही महामारी नव्हती; तो होता निसर्गाचा एक असा भयानक प्रकोप, ज्याला पेरूच्या मच्छिमारांनी गमतीने ‘एल निनो’ अर्थात लहान बाळ असे नाव दिले होते. पण ते ‘लहान बाळ’ २० कोटी लोकांच्या मृत्यूचे कारण ठरले. आज, तब्बल १४० वर्षांनंतर, तोच इतिहास पुन्हा एकदा अधिक भीषण स्वरूपात उंबरठ्यावर उभा आहे. २०२६ हे वर्ष मानवी इतिहासातील सर्वात उष्ण आणि विनाशकारी वर्ष ठरेल, असा इशारा जागतिक हवामान संस्थांनी दिला आहे. हा केवळ इशारा नाही, तर येणाऱ्या ‘मेगा एल निनो’चा हाहाकार आहे, जो भारताच्या उरात धडकी भरवणारा आहे. पॅसिफिक महासागराच्या पूर्व आणि मध्य भागातील पाणी जेव्हा असामान्यपणे तापते, तेव्हा जगाचे हवामानचक्र कोलमडून पडते. यालाच ‘एल निनो’ म्हणतात. वाऱ्यांची दिशा बदलते, पावसाचे गणित चुकते आणि नद्या कोरड्या पडतात. पण यंदाचा एल निनो हा साधासुधा नाही, तर तो ‘सुपर एल निनो’ आहे. ईसीएमडब्ल्यूएफ (ECMWF) सारख्या संस्थांचे अंदाज सांगतात की, गेल्या दीडशे वर्षांतील हे सर्वात मोठे संकट असेल. आपली अवस्था आज अशा खोलीसारखी झाली आहे, जिथे आधीच ४० अंश तापमान आहे आणि कोणीतरी येऊन मोठा हिटर सुरू केला आहे. एकीकडे जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वी आधीच १.४ अंशाने तापलेली आहे आणि त्यात या सुपर एल निनोची १.५ अंशाची भर पडली, तर होणारा विनाश कल्पनेच्या पलीकडचा असेल. जवळजवळ २.९ अंशांची ही तापमानवाढ मानवी शरीराला आणि पर्यावरणाला सहन होण्यासारखी नाही. भारतासाठी हे संकट दुहेरी आहे. मे ते जुलै २०२६ दरम्यान जेव्हा हा एल निनो आपल्या शिखरावर असेल, नेमक्या त्याच वेळी भारतीय शेतीचा कणा असलेला मान्सूनही आपल्या शिखरावर असायला हवा. मात्र, जेव्हा पावसाची सर्वाधिक गरज असेल, तेव्हाच एल निनो या पावसाला पळवून नेणार आहे. भारतीय हवामान विभागाने आधीच वर्तवलेले ९२ टक्के पावसाचे भाकीत ही धोक्याची घंटा आहे. आपली ५१ टक्के शेती आजही पावसावर अवलंबून आहे. जर पाऊस हुलकावणी देणार असेल, तर अन्नाचा दुष्काळ आणि महागाईचा भस्मासुर घराघरात पोहोचायला वेळ लागणार नाही. अन्नाचे दर ९ टक्क्यांनी वाढतील आणि त्याचा सर्वाधिक फटका समाजातील त्या घटकाला बसेल, ज्याच्याकडे ना वातानुकूलित यंत्रणा आहे, ना धान्याचा साठा. २०२४ मध्ये आपण पाहिले की राजस्थानच्या चूरूमध्ये तापमान ५० अंशांच्या पार गेले होते. दिल्लीत रात्रीचे तापमान ३० अंशांच्या खाली येत नव्हते. जेव्हा रात्री शरीर थंड होत नाही, तेव्हा ‘हीट स्ट्रोक’चा धोका अनेक पटींनी वाढतो. हा ‘अर्बन हीट आयलंड’ इफेक्ट आपल्याच चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे. आपण जंगले तोडून सिमेंटची जंगले उभी केली. ही सिमेंटची घरे दिवसा उष्णता शोषतात आणि रात्री ती बाहेर फेकतात. श्रीमंत लोक एसी लावून स्वतःची घरे थंड करतील, पण त्या एसीमधून बाहेर पडणारी उष्णता रस्त्यावरच्या कष्टकऱ्याचा जीव घेईल. भारतात ३८ कोटी कामगार अशा क्षेत्रात आहेत, जिथे त्यांना रणरणत्या उन्हात काम करावे लागते. दिल्लीत झालेल्या एका अभ्यासानुसार, केवळ १ अंश तापमान वाढले तरी या गरिबांची कमाई १४ टक्क्यांनी घटते. या देशात उष्णतेच्या लाटेमुळे दरवर्षी दीड लाख लोक मरतात, तरीही सरकार याला ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून मान्य करायला तयार नाही. उष्णतेने होणाऱ्या मृत्यूंना मृत्यू प्रमाणपत्रामध्ये हृदयविकार किंवा इतर कारणांचे नाव दिले जाते, कारण उष्णतेच्या लाटेला ‘नोटिफाइड डिझास्टर’ जाहीर केले तर सरकारला प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी लागेल. मानवी जीवापेक्षा तिजोरीतील पैसा सरकारला अधिक प्रिय वाटतो, हेच यातून सिद्ध होते. विनाशाच्या या उंबरठ्यावर उभे असताना आपली धोरणे काय आहेत? एकीकडे तापमान वाढत आहे आणि दुसरीकडे आपण उरलीसुरली झाडेही कापून टाकत आहोत. २०२४ मध्येच १८ हजार हेक्टरपेक्षा जास्त जंगल कापले गेले. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी शंभर-शंभर वर्षे जुनी झाडे तोडली जात आहेत, तर छत्तीसगडच्या हसदेव जंगलात कोळशाच्या खाणीसाठी आदिवासींच्या भावना पायदळी तुडवून निसर्गाचा गळा घोटला जात आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा हा जो बळी दिला जात आहे, तो आपल्याला सामूहिक आत्महत्येकडे नेणारा आहे. दहा नवीन झाडे लावल्याचा दावा करून जुनी जंगले साफ करणे हा शुद्ध फसवणुकीचा प्रकार आहे. आयआयटी बॉम्बेच्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की, नवीन लावलेल्या झाडांपैकी ५० टक्के झाडे टिकतच नाहीत आणि त्यांची जागा जुन्या वृक्षांच्या परिसंस्थेशी कधीच बरोबरी करू शकत नाही. आता वेळ केवळ हळहळ व्यक्त करण्याची नाही, तर आक्रमक होऊन कृती करण्याची आहे. आपण प्रत्येक झाड वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. जुनी झाडे हेच आपले खरे रक्षणकर्ते आहेत. जर झाडांचे प्रमाण वाढले, तर परिसरातील तापमान १२ अंशांनी कमी होऊ शकते. हे विज्ञान आहे, कल्पना नाही. तसेच, आपण कोळशावर चालणाऱ्या वीज निर्मितीवर अवलंबून राहणे सोडून दिले पाहिजे. देशातील ७० टक्के वीज कोळशापासून येते, जी हवामान बदलाचे मुख्य कारण आहे. घराघरात सौर ऊर्जेचा वापर करणे ही आता गरज बनली आहे. २०२६ मध्ये जन्माला येणाऱ्या मुलांसाठी ‘सामान्य उन्हाळा’ ही संकल्पनाच बदललेली असेल. त्यांच्यासाठी ४५ अंश तापमान हेच सामान्य असेल. हा वारसा आपण त्यांना देणार आहोत का? जर आपण आजही जंगले वाचवली नाहीत, कार्बन उत्सर्जन कमी केले नाही आणि पर्यावरणाशी खेळणे थांबवले नाही, तर दरवर्षी ‘एल निनो’ सारखी परिस्थिती अनुभवण्याची वेळ येईल. निसर्ग बदला घेत नाही, तो केवळ आपण केलेल्या पापांची परतफेड करतो. अजूनही वेळ गेलेली नाही, पण जर आपण आताही सुधारलो नाही, तर येणारा काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही. आपल्याला निवडावे लागेल – विकास की विनाश?

शवांच्या ढिगाऱ्यावर विकासाचे इमले: उष्णतेच्या लाटेला ‘आपत्ती’ मानायला भीती का? Read More »