रत्नागिरी, दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवार, दि. 28 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी निश्चित करण्यात आली आहे.
मतदानाचा दिवस कामाचा असल्यामुळे संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून त्या-त्या गावांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी राज्य निवडणूक आयोग यांच्या निवडणूक कार्यक्रमानुसार फक्त निवडणूक लागू असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रापुरतीच लागू राहणार आहे.
या पोटनिवडणुका गुहागर तालुक्यातील खोडदे, संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, कोंडगाव, तुरळ, राजिवली आणि ओझरखोल, लांजा तालुक्यातील भडे तसेच राजापूर तालुक्यातील केळवली माडबन, भालावली, कळसावली, कोंड्ये तर्फे सौंदळ आणि धाऊलवल्ली या गावांमध्ये होणार आहेत.
मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.















