रत्नागिरी, दि. 27 (जिमाका) : महाराष्ट्र दिन निमित्त शुक्रवार, 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार असून, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) विश्वजीत गाताडे, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली. नगरपालिकेकडून पाण्याची व्यवस्था, जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून रुग्णवाहिका, क्रीडा विभागाकडून साऊंड सिस्टीम तसेच महावितरण (MSEB) कडून अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी सांगितले की, मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 8 वाजता असल्याने इतर कोणत्याही शासकीय किंवा अर्धशासकीय संस्थांनी सकाळी 7.15 ते 9 या वेळेत ध्वजवंदन अथवा कार्यक्रम आयोजित करू नयेत. जर स्वतंत्र कार्यक्रम घ्यायचा असेल, तर तो सकाळी 7.15 पूर्वी किंवा 9 नंतरच आयोजित करावा.
कार्यक्रमादरम्यान सावधान स्थितीत ‘वंदे मातरम्’ गीत सादर करणे, त्यानंतर राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत म्हणणे आणि लगेच राज्यगीत सादर करणे आवश्यक असल्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या सर्व सूचनांची माहिती ग्रामीण स्तरावरील संस्था, शाळा व महाविद्यालयांपर्यंत पोहोचवावी व त्यांचे काटेकोर पालन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.















