konkandhara.com

कोकणची बातमी

गुहागरमध्ये बेकायदेशीर मच्छीविक्रीवर कारवाईची मागणी | ग्रामपंचायतीचे पोलिसांना पत्र

बेकायदेशीर मच्छीविक्रीविरोधात कारवाईची मागणी

गुहागर (प्रतिनिधी) : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतसमोर मच्छी विक्रीसाठी सुसज्ज मार्केट उभारण्यात आले असतानाही काही महिला विक्रेत्या नियम झुगारून शृंगारतळी मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर बसून बेकायदेशीरपणे मच्छीविक्री करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीने वेळोवेळी सूचना देऊन तसेच कारवाई करूनही संबंधित महिला वर्दळीच्या ठिकाणी उघड्यावरच मच्छी विक्री करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना पत्र दिले आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, या बेकायदेशीर मच्छीविक्रेत्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून पादचारी व व्यापाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलांना अधिकृत मच्छीमार्केटमध्ये बसण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्यांनी त्या मान्य करण्यास नकार देत सार्वजनिक ठिकाणीच विक्री सुरू ठेवली आहे. याशिवाय, मासे साफ करताना टाकलेली खवले आणि सांडलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या वारंवार सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित महिलांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

बेकायदेशीर मच्छीविक्रीविरोधात कारवाईची मागणी Read More »

सावंतवाडी पंचायत समितीची केंद्र शाळा सातोसे येथे बैठक; शिक्षक भरती व पटसंख्या वाढीवर चर्चा

सावंतवाडी : प्रतिनिधी (संजय पिळणकर) सावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणे आणि शाळांची पटसंख्या वाढवणे या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी दी २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.ही सभा केंद्र शाळा सातोसे येथे पार पडणार आहे. पंचायत समिती सावंतवाडीच्या दिनांक २४ मार्च २०२६ रोजी झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये पंचायत समिती सदस्य उदय पारीपत्ये यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते.यामध्ये प्रामुख्याने सावंतवाडी गटातील जिल्हा परिषद शाळांमधील पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे भरणे आणि महाराष्ट्र-गोवा सीमाभागातील शाळांची कमी होत असलेली पटसंख्या वाढवण्यासाठी उपाययोजना करणे,या विषयांचा समावेश होता.​याच विषयांचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील कार्यवाही निश्चित करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती सावंतवाडी) यांनी ही बैठक बोलावली आहे. या सभेला पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.तसेच सातोसे केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सचिव,तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच यांना या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी सविता परब यांनी केले आहे. सीमाभागातील शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची संख्या टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने या सभेकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

सावंतवाडी पंचायत समितीची केंद्र शाळा सातोसे येथे बैठक; शिक्षक भरती व पटसंख्या वाढीवर चर्चा Read More »

EditorialWebdesk

निकृष्ट रस्ता कामाविरोधात उसप येथे ग्रामस्थांचे उपोषण

दोडामार्ग : भूषण सावंत: पिकुळे तिठा ते उसप या मुख्य रस्त्याच्या कामात झालेल्या दिरंगाईसोबतच अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात उसप येथील ग्रामस्थांनी आज, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी तीव्र आंदोलन छेडत उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. सदर रस्ता हा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, कामाचा दर्जा खालावलेला असल्याने तसेच काम वेळेत पूर्ण होत नसल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या उपोषणात खालील ग्रामस्थ सहभागी झाले आहेत श्री. देवू बाळू गवस, सुरेश विष्णू गवस, शंकर बाळाराम नाईक, रामा गोविंद धुरी, विठोबा नारायण नाईक, सखाराम नाईक, महादेव सुतार, विजय गवस, प्रकाश मोरजकर, वैभव विष्णू गवस, सुनील गवस, मनीष गवस, शैलेश गवस, अमोल मोरजकर, दिनेश नाईक, सुनील गवस सहभागी झाले आहेत.ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, रस्ता कामाची तात्काळ चौकशी करून दर्जेदार काम पूर्ण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. या उपोषणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

निकृष्ट रस्ता कामाविरोधात उसप येथे ग्रामस्थांचे उपोषण Read More »

पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली; धक्कादायक घटना

पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ पसरली होती. सुदैवाने, रेल्वे पोलिस आणि संबंधित यंत्रणेने तत्परता दाखवत तात्काळ मदतकार्य सुरू केले. त्यांच्या वेगवान कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लिफ्टच्या देखभालीबाबत आणि तांत्रिक तपासणीबाबत अधिक काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.  

पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली; धक्कादायक घटना Read More »

आरोंदा येथील अमित निवजेकर ३ जिल्ह्यांतून तडीपार; दोन वर्षांसाठी आदेश

आरोंदा येथील अमित निवजेकरला ३ जिल्ह्यांतून केले तडीपार

सावंतवाडी : प्रतिनिधी (संजय पिळणकर)Sawantwadi उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या कारवाईनुसार सोनू उर्फ अमित दिवाकर निवजेकर (वय ३१ वर्षे, रा. आरोंदा) यास कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश मंजूर करण्यात आला आहे. सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी संबंधित इसमाला नोटीस बजावली. त्यानंतर दोन पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली त्यास गोवा राज्यातील त्याच्या नियोजित वास्तव्याच्या ठिकाणी सुरक्षितरित्या सोडण्यात आले. तसेच तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात हजर करून तडीपार आदेशाची औपचारिक बजावणी करण्यात आली. निवजेकर याच्यावर मारामारीचे एकूण सहा गुन्हे दाखल असून, त्याच्याविरुद्ध नॉन-कॉग्निजेबल (एनसी) स्वरूपाच्या नोंदीही आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आरोंदा येथील अमित निवजेकरला ३ जिल्ह्यांतून केले तडीपार Read More »

चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम चषक स्पर्धा; इलेव्हन फायटर एडी विजेता

चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम चषक स्पर्धेत रत्नागिरीच्या संघांचे वर्चस्व; इलेव्हन फायटर एडी विजेता

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित आमदार शेखर निकम चषक राज्यस्तरीय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीतील संघांनी वर्चस्व गाजवले. इलेव्हन फायटर एडी, रत्नागिरी संघाने विजेतेपद पटकावले, तर आरडीसीए संघ उपविजेता ठरला. साहिल मतदार याला ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्काराने गौरविण्यात आले. चिपळूण शहरातील पवन तलाव मैदानावर सलग सहा दिवस ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेचे उद्घाटन रणजीपटू सुनील मोरे यांच्या हस्ते आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झाले होते. एकूण आठ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात इलेव्हन फायटर एडी संघाने आरडीसीए संघासमोर 189 धावांचे आव्हान ठेवले. मात्र, हे आव्हान पेलण्यात अपयशी ठरत आरडीसीए संघ सर्वबाद झाला आणि एडी संघाने विजेतेपद मिळवले. एडी संघाचा विश्वास कुंभार याला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, तर चिपळूण स्टार क्लबच्या विराज कोलते याला उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार मिळाला. कोलतेने चार डावांत 53.25 च्या सरासरीने 213 धावा केल्या. आरडीसीए संघाचा पार्थ गांधी पाच डावांत 12 बळी घेत उत्कृष्ट गोलंदाज ठरला. विजेत्या व उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक पुरस्कार विजेत्यांना क्रिकेट विश्वातील नामवंत फिरकीपटू राजेश पवार, आमदार शेखर निकम आणि असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाला चिपळूण नगर परिषदेचे बांधकाम सभापती कपिल शिर्के, राष्ट्रवादीचे नेते जयंद्रथ खताते, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, नगरसेवक विकी नरळकर, माजी नगरसेविका अदिती देशपांडे, दिशा दाभोळकर, राणी महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंच गोट्या भोसले, रवींद्र कनगुटकर, समालोचक बाबल्या जाधव, इब्राहिम सरगुरोह, प्रशिक्षक उदय काणेकर, तसेच स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेणारे भाऊ देवरुखकर आणि गुणलेखक यांचा सन्मान करण्यात आला. चिपळूणमध्ये नव्याने स्थापन झालेल्या ‘जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण’चे अध्यक्ष सुनील साळवी व त्यांच्या सहकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे सचिव राजेश सुतार, दादा लकडे, सुयोग चव्हाण, योगेश बांडागळे, सचिन कुलकर्णी, सुनील रेडीज, साहिल कदम, विनीत देवधर, संदेश गोरीवले आदींनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, बक्षीस वितरणावेळी बोलताना क्रिकेटपटू राजेश पवार यांनी चिपळूणमध्ये मुंबई-पुण्याच्या धर्तीवर दर्जेदार स्पर्धा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. उत्तम सुविधा उपलब्ध होत असून भविष्यात येथील खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम चषक स्पर्धेत रत्नागिरीच्या संघांचे वर्चस्व; इलेव्हन फायटर एडी विजेता Read More »

एसटी-दुचाकी भीषण अपघात; सेवानीवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

एसटी-दुचाकी भीषण अपघात; सेवानीवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

बांदा दोडामार्ग मार्गावर हेदुस येथे दुर्दैवी घटना दोडामार्ग : प्रतिनिधीDodamarg तालुक्यातील हेदुस परिसरात एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका सेवानीवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप तुकाराम हळणकर (वय ६८, रा. कुडासे-वानोसरी) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते भारतीय नौदलातून सुमारे २० वर्षांपूर्वी सेवानीवृत्त झाले होते. अपघाताच्या वेळी ते आपल्या दुचाकीवरून जात असताना पणजीहून धाराशिवकडे जाणाऱ्या एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की हळणकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बस चालक राहुलसिंह पांडुरंग हालके (वय ३७) आणि वाहक सुधीर अशोक लोखंडे हे बसमध्ये होते. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, दोडामार्ग पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

एसटी-दुचाकी भीषण अपघात; सेवानीवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू Read More »

पालघरच्या विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प अपूर्ण – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पालघरच्या विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प अपूर्ण : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पालघर, दि. १९ (जिमाका) : भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल करताना समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करणे अत्यावश्यक आहे. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी डहाणू येथे केले. राज्यपालपदाची सूत्रे मार्च 2026 मध्ये स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच पालघर जिल्हा दौरा होता. अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती या शुभ मुहूर्तावर डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे वनबंधू ट्रस्ट आणि भारत विकास संगम यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी फिरते दवाखाने व रुग्णवाहिका सेवांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडूलाल सोनी, डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘सर्वे भवन्तु निरामयः’ या मंत्राने भाषणाची सुरुवात करत राज्यपालांनी सांगितले की, आरोग्य सुविधा केवळ शहरांपुरत्याच मर्यादित न राहता दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पालघर सारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात रोजगार, आरोग्य व पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ‘आदर्श गाव’ संकल्पना राबविण्यासाठी लवकरच सर्वसमावेशक विकास आराखडा तयार केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या विचारांचा उल्लेख करत ‘अंत्योदय’ संकल्पनेवर भर देत त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगितले. वनबंधू ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या वेळी लाडूलाल सोनी यांनी प्रास्ताविकात ट्रस्टच्या आरोग्य प्रकल्पांची माहिती दिली. तर डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रशासकीय व सामाजिक संस्थांच्या समन्वयातून दुर्गम भागाचा विकास साधता येतो, असे मत व्यक्त केले. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील आरोग्य स्थिती व शासकीय योजनांची माहिती देत प्रशासन राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली अधिक वेगाने काम करेल, अशी ग्वाही दिली.

पालघरच्या विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प अपूर्ण : राज्यपाल जिष्णु देव वर्मा Read More »

सरंद येथे बुद्ध विहार भूमिपूजन सोहळा उत्साहात; आमदार शेखर निकम उपस्थित

सरंद येथे बुद्ध विहार भूमिपूजन सोहळा उत्साहात

संगमेश्वर : तालुक्यातील मौजे सरंद येथे बहुजन विकास मंडळ, मुंबई व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध विहाराच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडलेले भूमिपूजन होय. यावेळी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले, “बुद्ध विहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून समाजाला दिशा देणारे केंद्र आहे. येथे विचारांची देवाणघेवाण, शिक्षण आणि सामाजिक एकात्मता वाढीस लागेल. अशा उपक्रमांमुळे गावाचा सर्वांगीण विकास साध्य होईल. आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रगतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे.” कार्यक्रमाला दीपक जाधव, जि. प. सदस्य सुशील भायजे, प्रिया सुर्वे, संजय कदम, नाना कांगणे, शेखर उकर्डे, सोनाली जाधव, तुकाराम मेस्त्री, उमेश पवार, नंदन भागवत, अक्षय चव्हाण, गोपाळ जाधव, महेंद्र जाधव, राजेश जाधव, विवेक जाधव, महेंद्र अमर जाधव, तुकाराम जाधव, नवनाथ जाधव, अंजली जाधव, रश्मी जाधव, जगदीश जाधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वातावरणाला चालना मिळून विकासाची नवी दिशा निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

सरंद येथे बुद्ध विहार भूमिपूजन सोहळा उत्साहात Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; हातखंबा येथे चार वाहनांची धडक

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातहातखंबा येथे चार वाहनांची धडक, एक जण गंभीर जखमी

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग वर अपघातांची मालिका सुरूच असून, रविवारी पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टीलने भरलेला ट्रक, आयशर टेम्पो, आंबा वाहतूक करणारी बोलेरो आणि एक कार अशी चार वाहने एकमेकांवर आदळली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात ट्रकमधील क्लिनर गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू असून अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, या महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातहातखंबा येथे चार वाहनांची धडक, एक जण गंभीर जखमी Read More »