konkandhara.com

Editorial

देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत अटकेत

देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत जेरबंद

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट परिसरात गाडी अडवून चाकूचा धाक दाखवत चालकाकडून २५ हजार रुपये लुटणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना देवरुख पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली. या प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) हे बोलेरो गाडीतून वेतोशी (ता. रत्नागिरी) येथून शिराळा (जि. सांगली) येथे म्हैस घेऊन जात असताना आंबा घाटातील दख्खन परिसरात दोन गाड्यांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी त्यांना खाली उतरवून मारहाण, शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवले. त्यानंतर साखरपा येथील गंद्रे पेट्रोलपंपाजवळ नेऊन फिर्यादीला अर्ध्या वाटेत सोडून आरोपींनी पळ काढला. यावेळी आरोपींनी ५० हजार रुपयांची मागणी करत गाडीतील २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले तसेच पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी साखरपा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच देवरुख पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून पाच आरोपींना अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.या गुन्ह्यात फरहान रशीद मुल्ला (४२), प्रथमेश सचिन भाटकर (२४), सर्वेश सुभाष किर (२२), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (२६) व भूषण बिपेंद्र सावंत (२६, सर्व रा. रत्नागिरी) यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत जेरबंद Read More »

चिपळूणमध्ये RPL 2026 दिमाखात; केदारनाथ खरवते विजेता, विशू इलेव्हन उपविजेता

चिपळूणमध्ये पहिलीच ‘रत्नागिरी प्रीमियर लीग २०२६’ दिमाखात संपन्न, केदारनाथ स्पोर्ट्स क्लब खरवते विजेता; विशू इलेव्हन चिपळूण उपविजेता

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : येथील ऐतिहासिक पावन तलाव मैदानावर प्रथमच आयोजित करण्यात आलेली रत्नागिरी प्रीमियर लीग (आरपीएल) २०२६ ही भव्य डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दोन दिवस रंगतदार वातावरणात पार पडली. हजारो क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने झालेल्या या स्पर्धेत केदारनाथ क्रिकेट क्लब, खरवते संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर विसू इलेव्हन, चिपळूण संघाने उपविजेतेपद मिळवले. अंतिम सामना एकतर्फी ठरला असून केदारनाथ खरवते संघाने आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला भावेश पवार, ज्याने अंतिम सामन्यात ६ गडी बाद करत आणि फलंदाजीतही चमकदार कामगिरी करत सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. या स्पर्धेचे उद्घाटन ६ एप्रिल रोजी आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरसेवक योगेश पवार, विकी नरळकर, कपिल शिर्के, गणेश अग्रे, राष्ट्रवादीचे नेते जयंद्रथ खताते, केतन पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. प्रथमेश पवार, रितेश घाग आणि युवराज कुरूप या तीन मित्रांनी एकत्र येऊन रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच अशी भव्य रत्नागिरी प्रीमियर लीग यशस्वीपणे साकारली. स्पर्धेदरम्यान लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, नगरसेवक अंकुश आवले, राणी महाडिक, उमेश काटकर, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध निकम, परिमल भोसले, पिंट्या पाकळे, विकी लवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील उपांत्य सामनेही तितकेच रंगतदार ठरले. पहिल्या उपांत्य फेरीत अब्दुल कादिर कोकणी बॉईज विरुद्ध विशू इलेव्हन सामना झाला असून त्यात विशू इलेव्हन विजयी झाला, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत सुधीर स्पोर्ट्स, चिपळूण आणि केदारनाथ खरवते यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. हा सामना सुपर ओव्हरपर्यंत रंगला आणि त्यात केदारनाथ खरवते संघाने बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेतील विविध वैयक्तिक पुरस्कारही मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अब्दुल कादिर कोकणी बॉईज संघाचा नाझीम फकी याचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार विशू इलेव्हन, चिपळूण संघाच्या सौरभ पवार याला मिळाला, तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून मकरंद पवार याचा सन्मान करण्यात आला. इमर्जिंग प्लेयर पुरस्कार विशू इलेव्हनच्या मुकुंद पेजले याला मिळाला. अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार भावेश पवार याने पटकावला. ऑल इंडिया आयकॉन सिरीजमध्येही भावेश पवार याने बाजी मारत ४२ इंची टीव्ही जिंकला. याशिवाय सर्व विशेष पुरस्कार विजेत्यांना आकर्षक चषकासह ३२ इंची कलर टीव्ही देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठेचा मालिकावीर पुरस्कार केदारनाथ खरवते संघाच्या सुदर्शन मयेकर याला प्रदान करण्यात आला. त्याला टीव्हीएस रेडर मोटारसायकल आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्या केदारनाथ क्रिकेट क्लब, खरवते संघाला रु. २,२२,२२२ रोख पारितोषिक आणि आरपीएल २०२६ चषक, तर उपविजेत्या विशू इलेव्हन, चिपळूण संघाला रु. १,११,१११ आणि आरपीएल २०२६ उपविजेता चषक प्रदान करण्यात आला. भव्य फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी अनिरुद्ध निकम, संदेश आयरे, ऋग्वेद पवार, मुन्ना देसाई (हातखंबा), गणेश सावर्डेकर, सतीश सावर्डेकर, अजित शिगवण (रणजी, गोवा), उमेश राजशिर्के, देवराज गरगटे, समीर काजी, अमोल सुर्वे, मनोहर घाग, अरुण घाग आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेला समालोचनाचीही विशेष रंगत लाभली. आयपीएलचा आवाज म्हणून ओळखले जाणारे, कुणाल दाते, विविध राज्यांमध्ये समालोचन करणारे प्रशांत आदवडेकर, बाबल्या जाधव, तसेच सिद्दिक मेमन आणि जयेश पोटफोडे यांनी स्पर्धेचे थरारक समालोचन करत वातावरण भारावून टाकले. एकूणच, प्रथमेश पवार, रितेश घाग आणि युवराज कुरूप यांनी केलेल्या या भव्य आयोजनाचे रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो क्रीडा रसिकांनी आणि क्रिकेटप्रेमींनी मनापासून कौतुक केले. रत्नागिरी प्रीमियर लीग २०२६ ही स्पर्धा जिल्ह्यातील क्रिकेटविश्वात एक नवा मानदंड निर्माण करणारी ठरली आहे.

चिपळूणमध्ये पहिलीच ‘रत्नागिरी प्रीमियर लीग २०२६’ दिमाखात संपन्न, केदारनाथ स्पोर्ट्स क्लब खरवते विजेता; विशू इलेव्हन चिपळूण उपविजेता Read More »

संगमेश्वरला समर स्पेशल गाड्यांचा थांबा नाही; प्रवाशांची नाराजी

संगमेश्वरला समर स्पेशल गाड्यांचा थांबा नाही; प्रवाशांत नाराजी, रिकाम्या सीट्स असूनही दुर्लक्ष, कोकण रेल्वेकडे तातडीची मागणी

प्रतिनिधी : कोकणधारा संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या संगमेश्वर रेल्वे स्टेशनला समर स्पेशल गाड्यांचा थांबा न दिल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः 06013 / 06014 (थिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन – थिरुवनंतपुरम सेंट्रल) या गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा नसल्याने स्थानिक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गाड्यांना माणगाव, रोहा, मडगाव तसेच इतर अनेक स्थानकांवर थांबे देण्यात आलेले असताना संगमेश्वरकडे दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. संगमेश्वर हे कोकणातील एक महत्त्वाचे प्रवासी केंद्र असून येथून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. विशेष म्हणजे, हे स्थानक वार्षिक सुमारे सहा कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न देणारे असूनही येथे थांबा न देणे आश्चर्यकारक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.दरम्यान, या समर स्पेशल गाड्यांमध्ये अनेक वेळा शेकडो सीट्स रिक्त राहत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे संगमेश्वर येथे थांबा दिल्यास प्रवाशांची सोय होण्याबरोबरच रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर “निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर” या फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला अधिकृत पत्र देत तात्काळ थांबा देण्याची मागणी केली आहे. तसेच, स्थानिक नागरिकांकडूनही या मागणीला मोठा पाठिंबा मिळत असून, संगमेश्वरला लवकरात लवकर समर स्पेशल गाड्यांचा थांबा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

संगमेश्वरला समर स्पेशल गाड्यांचा थांबा नाही; प्रवाशांत नाराजी, रिकाम्या सीट्स असूनही दुर्लक्ष, कोकण रेल्वेकडे तातडीची मागणी Read More »

उमेश खताते शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात; चिपळूणात ठाकरे गटाला धक्का

शेकडो कार्यकर्त्यांसह उमेश खताते यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश, चिपळुणात ठाकरे गटाला मोठा धक्का

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : तालुक्यातील खेर्डी परिसरात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले उमेश खताते यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.मंगळवारी मुंबईतील ‘नंदनवन’ या निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात ठाकरे गटाचे चिपळूण युवासेना प्रमुख उमेश खताते यांनी आपल्या सुमारे साडेतीनशेहून अधिक कार्यकर्त्यांसह शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,“उमेश खताते हे तळागाळात काम करणारे आणि लोकांच्या अडचणीच्या काळात पुढे येणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे चिपळूण व रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होईल. पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहील. त्यांचा पुढील राजकीय प्रवास उज्वल राहील.” या पक्षप्रवेशावेळी उमेश खताते यांच्यासह विजय शिर्के, ओंकार पंडित, दीप्ती सावंत-देसाई, इकबाल बेबाल, विराज खताते, समीर कदम, मुराद चौगुले, वहाब बेबाल, सुमित भुरण, संदेश शिगवण, संतोष मिरगल, प्रफुल चाळके, अमित कांबळी, अमन कडवेकर, मुबारक सकवारे, अनिल पाटील, सचिन धांडे, लक्ष्मण शेळके, सुमेध भुरण, दीप्ती भुरण, साहिल भुरण, अखिलेश खेडेकर, रुपेश खताते, मयूर भालेकर, मंगेश भुरण, शुभम महाडिक, विशाल खताते, स्वप्नील जंगम, सुशील संगम, मंगेश गायकवाड, शुभम मिरगळ, योगेश खताते, सुमित खेडेकर, शौकत चौगुले, ओंकार जंगम, निनाद नाचरे, वेदांत कदम, सारिका कदम, शिल्पा खताते, स्वाती खताते, मनिष खताते, अनिल शिगवण, अमये शिगवण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांचे पक्षात स्वागत केले. या सोहळ्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार तथा शिवसेना उपनेते राजन साळवी, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

शेकडो कार्यकर्त्यांसह उमेश खताते यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश, चिपळुणात ठाकरे गटाला मोठा धक्का Read More »

रईस अलवी यांची अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अल्पसंख्याक विभागाची संघटनात्मक आढावा बैठक सोमवार, दि. ७ एप्रिल २०२५ रोजी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पार पडली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. बैठकीदरम्यान पक्ष संघटन बळकट करण्यासोबतच धार्मिक तणावाला बळी न पडता सामाजिक ऐक्य अबाधित राखणे, तसेच अन्यायाविरुद्ध संघटितपणे लढा उभारणे यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.यावेळी अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच पक्ष संघटनेतील विविध पदांवर नियुक्त्याही करण्यात आल्या. या बैठकीत रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. त्यांच्या फेरनिवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील कार्यकाळाकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या महत्वपूर्ण बैठकीस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी सहअध्यक्ष सोहेल सुभेदार, अल्पसंख्याक विभागाचे राज्यप्रमुख अफजल फारूक, प्रदेश कार्याध्यक्ष मुजाहिद खान, वारीस पठाण, प्रदेश उपाध्यक्ष रहेमान खान पठाण, सय्यद अन्सारअली, शमीम अहमद, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, तसेच सुहास उभे, मुबिन भाई परकर, मोहसीन मुल्ला यांच्यासह राज्यभरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड Read More »

डॉ. अनिल पटेल यांचा फिरता दवाखाना चिपळूणमध्ये; मोफत आरोग्य सेवा

यवतमाळचे समाजरत्न डॉ. अनिल पटेल यांचा फिरता दवाखाना सोमवारी चिपळूणकरांच्या सेवेसाठी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : आजच्या बाजारू व्यवस्थेमध्येही सेवाभाव जपणारे काही अवलिया डॉक्टर समाजात कार्यरत आहेत. स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून ग्रामीण, गरीब आणि दुर्लक्षित रुग्णांपर्यंत पोहोचून मोफत आरोग्यसेवा देणारे असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे यवतमाळचे समाजरत्न डॉ. अनिल पटेल. नाक, कान व घसा तज्ज्ञ असलेले डॉ. पटेल येत्या १३ एप्रिल २०२६ रोजी आपल्या फिरत्या आरोग्य रथासह प्रथमच चिपळूणमध्ये येत असून, चिपळूणकरांना त्यांच्या सेवाभावी कार्याचा लाभ घेण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे. डॉ. अनिल पटेल हे गेली ५० वर्षे नाक, कान व घसा तज्ज्ञ म्हणून कार्यरत असून, गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून ते विविध भागांत मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून ग्रामीण रुग्णांची सेवा करत आहेत. स्वतःचा व्यवसाय आणि वैद्यकीय सेवा सांभाळत त्यांनी समाजसेवेचा एक वेगळाच आदर्श उभा केला आहे. त्यांच्या या सेवाकार्याचा वारसा त्यांना त्यांच्या आजोबांकडून लाभला. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचे आजोबा घोड्यावरून गावोगाव फिरून रुग्णांपर्यंत सेवा पोहोचवत असत. त्याच सेवाभावाची परंपरा पुढे नेत डॉ. पटेल यांनीही आपले संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेला वाहिले आहे. सोलापूर येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर परदेशात किंवा मोठ्या शहरात स्थायिक होण्याऐवजी छोट्या गावांमध्ये व ग्रामीण भागात सेवा देण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. काही वर्षांनंतर आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी पद्मश्री डॉ. कोल्हे यांच्या कार्यातून प्रेरणा घेत मोफत आरोग्य शिबिरे सुरू केली. याच काळात डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. अभय बंग यांच्यासारख्या समाजाभिमुख वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसोबत त्यांनी कार्याची सुरुवात केली आणि पुढे हे सेवाकार्य देशभर विस्तारले.डॉ. पटेल यांनी सुरुवातीच्या काळात एसटी बसने प्रवास करून, नंतर स्वतःच्या स्कूटरने, आणि पुढे स्वतःच्या वाहनातून रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेतला. आज त्यांच्या या सेवाकार्याने मोठे रूप धारण केले असून, त्यांनी काश्मीरपासून आसामपर्यंत तसेच भारतातील सुमारे १२ ते १३ राज्यांमध्ये अशा स्वरूपाची आरोग्य शिबिरे घेतली आहेत. ग्रामीण व कष्टकरी जनतेला सोयीस्कर व्हावे म्हणून अनेक ठिकाणी त्यांनी रात्रीची शिबिरेही आयोजित केली आहेत. त्यांच्या फिरत्या दवाखान्यात नाक, कान व घसा संबंधित तपासण्या, औषधोपचार तसेच काही शस्त्रक्रियाही केल्या जातात. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक रुग्णांना शहरात न जाता त्यांच्या गावाजवळच उपचार मिळतात. विशेष म्हणजे, वयाच्या ७४ व्या वर्षीदेखील डॉ. पटेल हे अविरतपणे हे कार्य करत असून, त्यांची ही जिद्द आणि सेवाभाव समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या सेवाकार्यात त्यांचे सुपुत्रही सहभागी असून, ते स्वतःही नाक, कान व घसा तज्ज्ञ आहेत. वडिलांच्या सामाजिक कार्याला ते सक्रियपणे हातभार लावत आहेत. त्यामुळे ही सेवा केवळ वैद्यकीय कार्य न राहता एक सामाजिक चळवळ बनली आहे.डॉ. अनिल पटेल यांचा आरोग्य रथ ८ एप्रिल रोजी यवतमाळहून प्रस्थान करून लातूर, मिरज, कोल्हापूर येथे आरोग्य सेवा देत १३ एप्रिल रोजी चिपळूणमध्ये पोहोचणार आहे. चिपळूणमध्ये सकाळी वडनाका येथील सरकारी दवाखान्यात, तर दुपारी लाईफ केअर रुग्णालयात ते रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. त्यानंतर १४ एप्रिल रोजी सातारा येथे त्यांचे पुढील शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अशा सेवाभावी, अनुभवी आणि समाजाभिमुख डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांच्या सेवांचा लाभ घेण्याची ही दुर्मिळ संधी असून, चिपळूणकरांनी या उपक्रमाचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन सजग स्वास्थ्य क्लिनिकच्या डॉ. श्रुतिका कोतकुंडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण येथे किंवा ०२३५५-२६०२०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

यवतमाळचे समाजरत्न डॉ. अनिल पटेल यांचा फिरता दवाखाना सोमवारी चिपळूणकरांच्या सेवेसाठी Read More »

रणजीपटू सुनील मोरे चिपळूणमध्ये; राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

रणजीपटू सुनील मोरे चिपळूणमधील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी रविवारी उपस्थित राहणार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : येथे दि. १२ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास मुंबईचे माजी रणजीपटू आणि निवड समिती सदस्य श्री. सुनील मोरे प्रमुख उपस्थिती लावणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला विशेष प्रतिष्ठा लाभणार आहे. क्रिकेट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, दमदार फलंदाजी आणि मुंबई क्रिकेटमधील भक्कम कारकीर्द यामुळे सुनील मोरे हे नाव राज्यातील क्रिकेटप्रेमींसाठी विशेष आकर्षणाचे ठरणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटक म्हणून त्यांची उपस्थिती ही आयोजकांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. १९९२ ते १९९६ या कालावधीत सुनील मोरे यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे सलामीवीर म्हणून प्रभावी कामगिरी बजावली. त्या काळात मुंबई संघात सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर, अमोल मुझुमदार यांसारखे दिग्गज फलंदाज होते. अशा बलाढ्य फलंदाजी फळीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणे हीच त्यांच्या गुणवत्तेची साक्ष मानली जाते.मोरे यांनी २५ प्रथम श्रेणी सामन्यांत ४४ च्या सरासरीने तब्बल १५०३ धावा केल्या होत्या. सलामीवीर म्हणून त्यांनी संघाला अनेकदा भक्कम सुरुवात करून दिली. त्यांची तंत्रशुद्ध फलंदाजी, संयमी खेळ आणि दीर्घ डाव उभारण्याची क्षमता यामुळे ते मुंबई क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळखले जात होते. मुंबईतील स्थानिक क्रिकेटमध्येही सुनील मोरे यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. त्यांनी नॅशनल क्रिकेट क्लब आणि दादर युनियन स्पोर्टिंग क्लब या प्रतिष्ठित संघांकडून टाइम्स शिल्ड आणि कांगा लीग सारख्या नामांकित स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. मुंबईतील स्पर्धात्मक क्रिकेट संस्कृतीत सातत्याने चांगली कामगिरी करत त्यांनी आपली फलंदाजी सिद्ध केली. देशांतर्गत क्रिकेटबरोबरच सुनील मोरे यांनी इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये सॉमरसेट संघाकडूनही सहभाग घेतला होता. परदेशातील क्रिकेट संस्कृती, खेळपट्ट्या आणि स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीला अधिक समृद्ध करणारा ठरला. विशेष म्हणजे, १९९० च्या दशकात चिपळूणमध्ये झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतही सुनील मोरे यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे चिपळूणशी त्यांचा जुना क्रिकेटीय संबंध असून, अनेक वर्षांनंतर ते पुन्हा एकदा या क्रिकेटभूमीवर येत असल्याने स्थानिक क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.तरुण खेळाडूंना प्रेरणादायी संधीराज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या तरुण खेळाडूंना सुनील मोरे यांच्यासारख्या अनुभवी आणि उच्चस्तरीय क्रिकेट खेळाडूला प्रत्यक्ष पाहण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घेण्याची मोठी संधी मिळणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेचा दर्जा उंचावण्यास नक्कीच मदत होणार आहे. आयोजकांनी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आणली असून, या स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील संघ सहभागी होणार आहेत. उद्घाटन सोहळा आणि त्यानंतरचे सामने क्रिकेटप्रेमींसाठी मोठे आकर्षण ठरणार आहेत.

रणजीपटू सुनील मोरे चिपळूणमधील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी रविवारी उपस्थित राहणार Read More »

chiplun-census-2027-training-digital-census-india

चिपळूणमध्ये ‘जनगणना २०२७’ फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षणास प्रारंभ, देशातील पहिली डिजिटल जनगणना; मोबाईल ॲप व पोर्टलद्वारे होणार माहिती संकलन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : देशातील सोळावी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असलेल्या ‘जनगणना २०२७’च्या पूर्वतयारीला वेग आला असून, त्याअंतर्गत चिपळूण पंचायत समितीमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात फील्ड ट्रेनर्ससाठी आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास सोमवारी प्रारंभ झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे आणि राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे हे मास्टर ट्रेनर म्हणून उपस्थित होते. तसेच जनगणना समन्वय अधिकारी संजीव गावकर, सहाय्यक महसूल अधिकारी संभाजी ढेंबरे आणि तांत्रिक सहाय्यक अमोल करंडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यंदाच्या जनगणनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान फील्ड ट्रेनर्सना मोबाईल ॲपचा वापर, माहिती नोंदणी प्रक्रिया, नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या ३३ प्रश्नांची अचूक हाताळणी, तसेच CMMS पोर्टलद्वारे माहिती संकलन आणि नियंत्रण याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले जात आहे. ‘जनगणना २०२७’ ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा ‘घरयादी व घरगणना’ तर दुसरा टप्पा ‘लोकसंख्या गणना’ असा असेल. यासाठी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना ‘स्वगणनेची’ (Self-Enumeration) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षकांची प्रगणक (Enumerators) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या तयार करण्यात येत असलेले फील्ड ट्रेनर्स पुढे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. त्यामुळे आगामी जनगणना अधिक अचूक, जलद आणि प्रभावीपणे पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. यंदाच्या जनगणनेत प्रथमच जातनिहाय माहिती संकलित केली जाणार असून, डिजिटल माध्यमामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक विश्वासार्ह, वेगवान आणि पारदर्शक होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चिपळूणमध्ये ‘जनगणना २०२७’ फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षणास प्रारंभ, देशातील पहिली डिजिटल जनगणना; मोबाईल ॲप व पोर्टलद्वारे होणार माहिती संकलन Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

दारूवरून झालेल्या भांडणात मित्राचा मृत्यू; एकाला अटक

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख पोलिसांचा जलद तपास, आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडीदेवरुख | प्रतिनिधी: दारू पिण्यावरून झालेल्या वादातून मित्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी देवरुख पोलिसांनी जलद तपास करून एका संशयिताला अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी आशिष शांताराम भावके (वय २७, रा. घोगाव, ता. कराड, जि. सातारा) असून, मृत व्यक्ती सुधीर अर्जुन यादव (वय ३०, रा. साईकडे, ता. पाटण, जि. सातारा) आहे. दोघेही एकमेकांचे मित्र तसेच नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष भावके आणि सुधीर यादव हे दोघे ३१ मार्च २०२६ रोजी आशिषच्या एमएच ५० / एन ४६४२ क्रमांकाच्या इर्टिगा कारने रत्नागिरीकडे गेले होते. रत्नागिरीतील आरेवारे परिसरात त्यांनी मद्यपान करून जेवण केले. त्यानंतर रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास ते परत घरी निघाले. यावेळी सुधीर यादव याने पुन्हा दारू पिण्याची मागणी केली. मात्र, त्या ठिकाणी दारू मिळणार नसल्याचे आशिष भावके याने सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या सुधीर यादव याने आरोपीच्या कारच्या बॉनेटवर चढून बसत पुढील काच फोडली आणि वाहनाचे नुकसान केले. याचा राग आल्याने आरोपी आशिष भावके याने, सुधीर यादव हा गाडीच्या बॉनेटवर असतानाच कार सुरू केली. त्यामुळे सुधीर यादव खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून बरगडी, कंबर, पोट आणि शरीराच्या डाव्या बाजूस दुखापती झाल्या. मात्र, जखमी अवस्थेत असतानाही आरोपीने त्याला घटनास्थळीच सोडून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी जखमी सुधीर यादव याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरपा येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात प्रथम अकस्मात मृत्यू नोंद (अ.मृ.) क्र. १२/२०२६ अंतर्गत नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सखोल चौकशीनंतर आरोपीविरुद्ध देवरुख पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्र. ४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणातील फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद अनंत वाघाटे (वय ५७), देवरुख पोलीस ठाणे हे आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय झावरे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

दारूवरून झालेल्या भांडणात मित्राचा मृत्यू; एकाला अटक Read More »

महेश काळे यांची मैफल ऐनवेळी रद्द; रत्नागिरीत प्रेक्षकांचा संताप

महेश काळे यांची मैफल ऐनवेळी रद्द; रत्नागिरीतील प्रेक्षकांमध्ये संताप

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : लोकप्रिय गायक महेश काळे यांच्या गायन मैफिलीचा रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडांगणावर होणारा कार्यक्रम ऐनवेळी रद्द झाल्याने प्रेक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कार्यक्रम रद्द झाल्याची पूर्वसूचना न दिल्यामुळे बाहेरून आलेल्या रसिकांचा मोठा हिरमोड झाला. रविवारी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार होता. मात्र, कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती अनेक प्रेक्षकांना रत्नागिरीत आल्यानंतरच मिळाली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी आपली फसवणूक झाल्याची भावना व्यक्त केली आहे. या कार्यक्रमासाठी तिकीट विक्री स्थानिक पातळीवर तसेच ‘बुक माय शो’द्वारे करण्यात आली होती. कोल्हापूरसह विविध ठिकाणांहून रसिक प्रेक्षक कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी तिकीटे खरेदी केली होती; परंतु कार्यक्रम रद्द झाल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. पुण्याचे गंधार जोग आणि दिवेश बापट यांच्या ‘एकदंत थिएटर’ व ‘ताल इंटरटेनमेंट’तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती पाच दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. तसेच ‘बुक माय शो’लाही याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, तरीही आदल्या दिवशीपर्यंत तिकीट विक्री सुरू असल्याने गोंधळ उडाला. या कार्यक्रमासाठी ५०० ते ३५०० रुपये दरम्यान तिकीट दर ठेवण्यात आले होते. तिकीटांचे पैसे जमा झाल्यानंतरही कार्यक्रम रद्द झाल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी वाढली आहे. दरम्यान, कार्यक्रम रद्द करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.कार्यक्रमासाठी आवश्यक तयारी, परवानग्या किंवा व्यवस्था करण्यात आल्याचेही दिसून आले नाही. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फसवणूक व मनस्तापाबाबत अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

महेश काळे यांची मैफल ऐनवेळी रद्द; रत्नागिरीतील प्रेक्षकांमध्ये संताप Read More »