konkandhara.com

Editorial

व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी भूषण सावंत, विष्णू धावडे, शैलेश मयेकर यांची निवड

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी भूषण सावंत, विष्णू धावडे, शैलेश मयेकर यांची निवड

कार्याध्यक्ष पदी संजय पिळणकर, सचिव पदी अमित पालव तर जनसंपर्क पदी दीपक पटेकर यांची निवड दोडामार्ग / भूषण सावंत : पत्रकारांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा तिसरी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्काचे संरक्षण करण्याचा निर्धार नव्या टीमने व्यक्त केला आहे. अवघ्या पाच वर्षांत जगातील तब्बल ९८ देशांमध्ये विस्तारलेल्या या संघटनेने सिंधुदुर्गमध्ये अधिक मजबूत पाय रोवले आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) प्रदेश कार्याध्यक्ष तसेच कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. पत्रकारितेच्या बदलत्या आव्हानांमध्ये पत्रकारांच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून ही नवी टीम कार्य करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.नव्या कार्यकारिणीत भूषण सावंत, विष्णू धावडे, शैलेश मयेकर यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सिंधुदुर्गच्या विस्तीर्ण भौगोलिक रचनेचा विचार करून संघटनेने जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागांत प्रभावी संघटनात्मक विभागणी केली आहे. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या ४ तालुक्याच्या जिल्हाध्यक्ष पदी भूषण सावंत तर वैभववाडी, देवगड, कणकवली आणि मालवण या ४ तालुक्यासाठी विष्णू धावडे यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच जिल्हा मुख्यालय साठी शैलेश मयेकर यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.संघटनेच्या बळकटीकरणासाठी संजय पिळणकर, मिलिंद धुरी, भूषण देसाई यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच सुयोग पंडित, राजा दळवी, तुळशीदास कुडतरकर आणि जय भोसले हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. अमित पालव यांच्याकडे सरचिटणीसपद, तर संजय भाईप यांच्याकडे सह सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.आर्थिक नियोजन आणि संघटनात्मक स्थैर्यासाठी आनंद कांडरकर यांची खजिनदार म्हणून नियुक्ती झाली आहे. संघटनेच्या विस्तारासाठी वासुदेव (नयनेश) गावडे, शंकर जाधव, चिन्मय घोगळे आणि विवेक परब यांची संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे. विजय सावंत, नागेश दुखंडे आणि मकरंद मेस्त्री हे कार्यवाह म्हणून काम पाहणार असून दिपक पटेकर यांच्याकडे जनसंपर्क व प्रसिद्धी प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे.याशिवाय सदस्य म्हणून गणेश कोळेकर, रणजीत जाधव आणि समीर चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे. महिला विंगमध्ये सहयोगी सदस्य म्हणून रुपाली खपाले, प्रिया मिश्रा,रेवती वालावलकर, सानिका वायंगणकर आणि सौ.जान्हवी सावंत यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे संघटनेत महिला पत्रकार आणि सहयोगी सदस्यांचाही सक्रिय सहभाग वाढणार असल्याचे चित्र आहे.‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही केवळ पदांची संघटना नसून पत्रकारांचे जागतिक कुटुंब आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पत्रकारितेच्या क्षेत्रातील आर्थिक असुरक्षितता, सामाजिक दबाव, मानसिक ताण आणि व्यावसायिक संरक्षण या प्रमुख मुद्द्यांवर संघटना ‘पंचसूत्री’च्या माध्यमातून काम करत आहे. पत्रकार बांधवांना न्याय, संरक्षण, प्रशिक्षण, नेटवर्किंग आणि सन्मान मिळवून देणे हा संघटनेचा प्रमुख उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना, मान-सन्मानाच्या पलीकडे जाऊन पत्रकार बांधवांच्या चौफेर विकासासाठी काम करा,राज्यात चांदा ते बांदा असा विस्तार असलेल्या या संघटनेच्या प्रत्येक पत्रकारापर्यंत संघटनेचा आधार पोहोचवा, असे आवाहन करण्यात आले. या नव्या कार्यकारिणी मुळे सिंधुदुर्गातील पत्रकारांना एक मजबूत व्यासपीठ मिळाले आहे. जिल्ह्यात पत्रकारांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावी आवाज निर्माण झाला आहे. सध्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) च्या पदाधिकारी पत्रकारांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी दत्तक घेणे, मोफत प्रवेश देणे सुरु आहे. जुन्या सर्व पदाधिकारी यांना विभाग आणि राज्य टीममध्ये घेतले जाणार आहे असे कडलग यांनी सांगितले.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी भूषण सावंत, विष्णू धावडे, शैलेश मयेकर यांची निवड Read More »

State-level cricket tournament opening ceremony in India, cricket ground with stage setup, crowd of spectators, banners and decorations, chief guest former cricketer giving speech, players in cricket uniforms standing in line, evening lighting, stadium atmosphere, Maharashtra small city setting, festive sports event

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्या चिपळुणात उद्घाटन; सुनील मोरे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

चिपळूण : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला रविवार, दि. १२ एप्रिलपासून चिपळूण येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास मुंबईचे माजी रणजीपटू व निवड समिती सदस्य सुनील मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी दिली. शहरातील पवन तलाव मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. उद्घाटन समारंभाला आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सभापती सूर्यकांत खेतले, उपसभापती संदेश आयरे यांच्यासह सर्व नगरसेवक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. क्रिकेट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, तंत्रशुद्ध फलंदाजी आणि मुंबई क्रिकेटमधील भक्कम कारकीर्द यामुळे सुनील मोरे हे नाव क्रिकेटप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला अधिक प्रतिष्ठा प्राप्त होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सुनील मोरे यांनी १९९२ ते १९९६ या कालावधीत मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. त्या काळात सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर आणि अमोल मुझुमदार यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांनी २५ प्रथम श्रेणी सामन्यांत ४४ च्या सरासरीने १५०३ धावा केल्या असून, संघाला अनेकदा भक्कम सुरुवात करून दिली. मुंबईतील स्थानिक क्रिकेटमध्येही त्यांनी नॅशनल क्रिकेट क्लब आणि दादर युनियन स्पोर्टिंग क्लबकडून टाइम्स शिल्ड व कांगा लीगसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच त्यांनी इंग्लंडमधील सॉमरसेट संघाकडून काउंटी क्रिकेटचा अनुभवही घेतला आहे. विशेष म्हणजे, १९९० च्या दशकात चिपळूण येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे अनेक वर्षांनंतर त्यांचे पुन्हा चिपळूणमध्ये आगमन होत असल्याने स्थानिक क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या तरुण खेळाडूंना सुनील मोरे यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूला प्रत्यक्ष पाहण्याची व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेचा दर्जा उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे.

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्या चिपळुणात उद्घाटन; सुनील मोरे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती Read More »

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; ‘सुंदर शाळा’ अभियानात अव्वल कामगिरी

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा

सावर्डे : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान (टप्पा-3) अंतर्गत खाजगी शाळा विभागाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सलग तिसऱ्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत विभागस्तरावरही अव्वल स्थान मिळवले आहे. रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील प्रथम क्रमांकाच्या शाळांमधून सावर्डे विद्यालयाने बाजी मारत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यभर हे अभियान राबविण्यात आले. विद्यालयाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शालेय व सहशालेय उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले. पायाभूत सुविधा, शासन धोरणांची अंमलबजावणी आणि शैक्षणिक गुणवत्ता या निकषांवर पीपीटी, पीडीएफ व प्रत्यक्ष पाहणीद्वारे मूल्यांकन करण्यात आले. या यशात पंचायत समिती चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.विद्यालयाने पहिल्या वर्षी विभागात द्वितीय क्रमांक मिळवत 15 लाखांचे पारितोषिक पटकावले होते. दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम आणि तिसऱ्या वर्षी विभागात प्रथम येत 21 लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. या यशाबद्दल प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम, उपाध्यक्षा युगंधराताई राजेशिर्के, उपाध्यक्ष प्रशांत निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, तसेच सर्व पदाधिकारी, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.सुव्यवस्थित पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण व नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर सावर्डे विद्यालयाने ‘आदर्श शाळा’ म्हणून प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा Read More »

konkandhara 9

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी : शासनाच्या वाळू/रेती निर्गती धोरण २०२५ अंतर्गत घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, पात्र लाभार्थ्यांना स्थानिक वापरासाठी कमाल 5 ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण टप्पा 1 व 2), पी.एम. जनमन आवास, रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत तसेच मोदी आवास योजना या योजनांतील लाभार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. महसूल व वन विभागाच्या 30 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार, लिलावात न गेलेल्या वाळू गटांमधून तसेच अवैध उत्खनन प्रकरणांमध्ये जप्त केलेली वाळू रॉयल्टी न आकारता उपलब्ध करून दिली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी गट विकास अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर तहसिलदारांकडून ऑनलाईन वाळू पासेस जारी करण्यात येणार असून, लाभार्थ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.हे पास ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी यांच्या मार्फत 15 दिवसांच्या आत लाभार्थ्यांना घरपोच देण्यात येतील. पास मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत वाळू उचलणे बंधनकारक असून, अन्यथा पास रद्द होईल. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास ऑफलाईन पासेस देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे घरकुल बांधकामाचा खर्च कमी होऊन ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत Read More »

रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन लंपास; दुचाकीवरून चोरट्यांचा पळ

रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची सोन्याची चेन लांबवली

रत्नागिरी : प्रतिनिधी शहरातील हिंदू कॉलनी परिसरातून गुरुवारी सकाळी 8.15 वा.सुमारास एका युवकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरुन पोबारा केला. सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात याबाबत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. सकाळच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हिंदू कॉलनी येथील रहिवासी कांचन जैन हे गुरुवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास परिसरात असताना दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण त्यांच्याजवळ आले. यावेळी चोरट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. जैन यांना काही समजण्यापूर्वीच दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनवर झडप घातली आणि ती हिसकावून घेतली. चेन हातात लागताच चोरट्यांनी आपल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून वेगाने पलायन केले.चोरीसाठी वापरलेली दुचाकी काळ्या रंगाची असून दोन्ही आरोपी सडपातळ बांध्याचे होते. यातील एकाने तोंडाला रुमाल बांधला होता, तर एक जण उंचीने जास्त होता. हे दोन्ही चोरटे तरुण असून ते एकमेकांशी मराठी भाषेत संवाद साधत होते, असे वर्णन समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी या वर्णनाचे तरुण कुठेही संशयास्पदरीत्या दिसून आल्यास किंवा या घटनेबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची सोन्याची चेन लांबवली Read More »

आंबा घाटात चालकाची लूट; देवरूख पोलिसांनी ५ आरोपींना अटक

आंबा घाटात म्हैस वाहतूक करणाऱ्या चालकाची लूट; देवरूख पोलिसांकडून पाच जणांना बेड्या

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात दख्खननजीक बुधवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली. बांबावडेकडे बोलेरोमधून म्हैस घेऊन जाणाऱ्या चालकाला आठ जणांच्या टोळीने अडवून त्याच्याकडील २५ हजार रुपये लुटून पोबारा केला. मात्र, देवरूख पोलिसांनी या घटनेचा अत्यंत वेगाने तपास करत ५ आरोपींना तातडीने ताब्यात घेतले असून, उर्वरित ३ जणांचा कसून शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री बोलेरो चालक आंबा घाटमार्गे बांबावडेच्या दिशेने म्हैस घेऊन जात होता. गाडी दख्खन परिसराजवळ आली असता, दबा धरून बसलेल्या ८ जणांच्या टोळीने वाहन अडवले. चालकाला धमकावत या टोळीने त्याच्याकडील २५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. घाटातील या धाडसी लुटीच्या बातमीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच लांजा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी तपासाची चक्रे फिरवली. साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे, देवरूखचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर व प्रशांत साळुंखे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत ५ संशयितांना ताब्यात घेऊन या लुटीचा पर्दाफाश केला. या गुन्ह्यात सहभागी असलेले अन्य ३ आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. “फरार आरोपींची ओळख पटली असून लवकरच त्यांनाही गजाआड केले जाईल,” असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. पोलिसांच्या या जलद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आंबा घाटात म्हैस वाहतूक करणाऱ्या चालकाची लूट; देवरूख पोलिसांकडून पाच जणांना बेड्या Read More »

रत्नागिरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दोन घरांतून ३८ हजारांची रोकड लंपास

रत्नागिरीत दिवसाढवळ्या दोन घरे फोडली; ३८ हजारांची रोकड लंपास

रत्नागिरी : प्रतिनिधीतालुक्यातील तरवळ मायंगडेवाडी येथ्ाील दोन घरे फोडून रोख 38 हजार रुपये लांबवले. घरफोडीची ही घटना रविवार 5 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास घडली आहे.आदित्य देवचंद कांबळे (26,रा.बालाजी अपार्टमेंट कारवांचीवाडी फाटा,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात विरेश प्रकाश मायंगडे (29),प्रज्योत रविंद्र मायंगडे (23,दोन्ही रा.तरवळ मायंगडेवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, संशयिताने विरेश मायंगडे यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाच्या ड्रॉव्हरमधील रोख 33 हजार रुपये चोरुन नेले. तर प्रज्योत मायंगडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयिताने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून घरातील भिंतीमध्ये असलेल्या उघड्या कपाटातील छोट्या पाकिटात ठेवलेले रोख 5 हजार रुपये लांबवले. दरम्यान, या घरफोड्या करुन पळून जात असताना संशयित आदित्य कांबळेला विरेश मायंगडे आणि सर्वेश मायंगडे यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना धक्काबुक्की करुन पळ काढला.

रत्नागिरीत दिवसाढवळ्या दोन घरे फोडली; ३८ हजारांची रोकड लंपास Read More »

रत्नागिरीत क्रेडिट कार्ड इन्शुरन्सच्या नावाखाली ८८ हजारांची फसवणूक

रत्नागिरीत ‘क्रेडिट कार्ड इन्शुरन्स’च्या नावाखाली तरुणाला ८८ हजारांचा गंडा

रत्नागिरी : प्रतिनिधीएसबीआय क्रेडिट कार्डचे इन्शूरन्स डिॲक्टिवेट करण्याची प्रोसेस सांगण्याच्या नावाखाली अज्ञाताने तरुणाचे तब्बल 88 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 12 फेब्रुवारी 2026 रोज्ाी दुपारी 12.30 ते 1.11 वा.कालावधीत टिआरपी येथील यामाहा शोरुममध्ये घडली आहे. प्रसाद रघूनाथ यादव (31,रा.सौम्या रेसिडेन्सी श्रीरामनगर नाचणे,रत्नागिरी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात सोमवार 6 एप्रिल रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 12 फेब्रुवारी रोजी प्रसाद यादव हे टिआरपी येथील यामाहा शोरुममध्ये नोकरी निमित्त असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने एसबीआय क्रेडिट कार्ड नावाने फोन केला. त्यानंतर त्याने फिर्यादीला एसबीआय क्रेडिट कार्डवर इन्शूरन्सबाबत विचारणा करुन त्याचा इन्शूरन्स डिॲक्टिवेट करण्याची फोसेस सांगण्यास सुरुवात केली. हे संभाषण होत असताना त्या अज्ञाताने फिर्यादीच्या व्हॉटसॲपवर लिंक पाठवून त्याव्दारे फिर्यादीची वैयक्तिक माहिती भरुन घेतली. त्यानंतर फिर्यादीच्या क्रेडिट कार्डवरुन 87 हजार 642 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

रत्नागिरीत ‘क्रेडिट कार्ड इन्शुरन्स’च्या नावाखाली तरुणाला ८८ हजारांचा गंडा Read More »

रत्नागिरीत महिला विक्रेत्याची ४० हजारांची रोकड लंपास; पोलिस तपास सुरू

विक्रेत्याची 40 हजारांची रोकड लंपास ; पोलिसांकडून तपासाला वेग

रत्नागिरी : प्रतिनिधीशहरातील विठ्ठल मंदिर परिसरात मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी सायंकाळी चोरीची घटना घडली. ग्राहकाचा वेश धारण करून आलेल्या महिला चोरट्यांच्या टोळीने एका महिला विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून तिची 40 हजार रुपयांची रोकड असलेली पर्स अत्यंत चलाखीने लंपास केली. या प्रकारामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना शुक्रवार 3 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वा. सुमारास विठ्ठल मंदिर परिसरात घडली. काही संशयित महिला बाजारपेठेत खरेदीचा बहाणा करत फिरत होत्या.त्यांनी केळी विकणाऱ्या एका महिलेकडे जात केळीचा दर विचारला. विक्रेत्याने 80 रुपये डझन असा दर सांगताच, या महिलांनी जाणीवपूर्वक भावतोल करत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यातील एक महिला विक्रेत्याचे लक्ष विचलित करत असतानाच, इतर महिलांनी आजूबाजूला गर्दीचा बनाव केला. याच संधीचा फायदा घेत टोळीतील एका मुलीने विक्रेत्याच्या शेजारी ठेवलेली पर्स लंपास केली.पर्स गायब झाल्याचे लक्षात येताच विक्रेत्याने आरडाओरड केली, मात्र गर्दीचा फायदा घेत ही टोळी तेथून पसार झाली होती. चोरी गेलेल्या पर्समध्ये विक्रेत्याने पिग्मी खात्यातून काढलेली 40 हजार रुपयांची रोकड होती. धक्कादायक बाब म्हणजे याच सुमारास परिसरातील दुसऱ्या एका फळ विक्रेत्या महिलेकडूनही एका महिलेने एक किलो काजूगर लंपास केल्याचे समोर आले आहे. या सलग घटनांमुळे ही टोळी बाजारपेठेत वेगवेगळ्या ठिकाणी सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास यंत्रणा राबवली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. बाजारपेठेत पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी आता जोर धरत असून अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विक्रेत्याची 40 हजारांची रोकड लंपास ; पोलिसांकडून तपासाला वेग Read More »

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे १० एप्रिल रोजी आपल्या वयाच्या ७५ व्या वर्षात, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या विशेष दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि चाहत्यांनी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यास उत्साहात सुरुवात केली आहे. या औचित्याने आज सकाळी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी चरणी खा. राणे यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उदंड आयुष्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. श्री सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ आणि आमदार श्री. निलेश राणे मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत श्री देव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी आणि ७५ विडे यांची आकर्षक आरास मांडून श्रद्धापूर्वक अर्पण केली.या धार्मिक कार्यक्रमाला भाजपचे आणि राणे समर्थक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अशोक वाडेकर, नित्यानंद दळवी, शिवाजी कारेकर, अमोल देसाई, निखिल शेट्ये, अभिलाश पिलणकर, सोहम पिलणकर, विशाल कांबळे, राजू झगडे, नरेश बनसोडे आणि अमृत गोरे यांचा समावेश होता.खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात पुढील काही दिवस विविध विधायक उपक्रम राबवले जाणार आहेत.

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास Read More »