konkandhara.com

26 अप्रैल 2026

konkandhara 81 1

विद्यार्थ्यांनी आत्मशोधातूनच यशाचा मार्ग शोधावा : अविनाश धर्माधिकारी

चतुरंग प्रतिष्ठानच्या कोकण अभ्यास वर्ग विद्यार्थी संमेलनाचा उत्साहात शुभारंभ चिपळूण : ‘तुला काय येतं यावर जीवनाची इमारत उभी कर; तुला काय येत नाही, याचा विचार करण्यात आयुष्य वाया घालवू नकोस. प्रत्येक व्यक्तीची बुद्धी, क्षमता आणि आवड वेगळी असते. त्या क्षमतेचा शोध घेऊन त्याचे प्रकटीकरण करणे, हीच खरी शिक्षणाची व्याख्या आहे,’असे विचार माजी सनदी अधिकारी व ‘चाणक्य मंडळ परिवार’चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. चतुरंग प्रतिष्ठानच्या कोकण अभ्यास वर्गाच्या दोन दिवसीय विद्यार्थी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन उपस्थित होते. तसेच पुण्यातील मांडके हिअरिंग सर्व्हिसेसच्या नामांकित श्रवणतज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके, वक्ते मंदार ओक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली. वामन कुलकर्णी यांनी सादर केलेल्या सरस्वती स्तवनाने वातावरण भारावून गेले. गोडबोले गुरुजी यांच्या प्रतिमेचे व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. युनायटेड इंग्लिश स्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी मान्यवरांचे अत्तरकुपी देऊन स्वागत केले. प्रास्ताविक इंद्रायणी दीक्षित यांनी केले. त्यांनी चतुरंग प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी संस्थेने केलेल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला. तसेच या दोन दिवसीय विद्यार्थी संमेलनात विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चासत्रे आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. यानंतर मंदार ओक यांनी चतुरंगच्या स्मरणिकेविषयी माहिती देताना सांगितले की, या स्मरणिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला वाव देण्यात आला असून विविध विषयांवर दर्जेदार लेखांचा समावेश आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात अविनाश धर्माधिकारी यांनी शिक्षण या विषयावर सखोल विचार मांडले. ते म्हणाले, ‘शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती आत्मसात करणे नव्हे, तर स्वतःच्या अंतरंगात डोकावून स्वतःला ओळखणे होय. आपण कोण आहोत, आपल्यात कोणत्या क्षमता आहेत, आपण समाजासाठी काय करू शकतो, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण.’ ते पुढे म्हणाले की, ‘भारतीय संस्कृतीने संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची भावना दिली आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना केवळ विचार नाही, तर जीवनपद्धती आहे. प्रत्येकाने अंत:करणातून भारताच्या आणि जगाच्या कल्याणाचा विचार करून जगणे, हीच खरी भारतीय संस्कृती आहे.’ त्यांच्या या विचारांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमाला चिपळूण नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी विशाल भोसले, दैनिक ‘सागर’च्या संपादिका शुभदा जोशी, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर , विचारवंत डॉ. सागर देशपांडे, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या संमेलनाला उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निबंध कानिटकर यांनी प्रभावीपणे केले.

विद्यार्थ्यांनी आत्मशोधातूनच यशाचा मार्ग शोधावा : अविनाश धर्माधिकारी Read More »

konkandhara 80 1

साखरपा-देवरुख मार्गावर भीषण अपघात;चौदा चाकी ट्रक डोंगराला धडकला, चालक जखमी

संगमेश्वर : तालुक्यातील साखरपा-देवरुख मार्गावर आज शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. चालकाचा ताबा सुटल्याने चौदा चाकी ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराच्या कपारीत जाऊन जोरात धडकला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून ग्रामस्थ व पोलिसांच्या तत्पर मदतीमुळे त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत विठ्ठल शिंगटे (वय ४६) हे रिकाम्या ट्रकने (क्र. यूपी ३५ एटी १२९२) देवरुखकडून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. साखरपा-देवरुख रस्त्यावर कोंडगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आले असता अचानक ट्रकवरील त्यांचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावर आदळला. धडक इतकी जोरदार होती की, ट्रक चालक केबिनमध्येच अडकून पडला. अपघाताची माहिती मिळताच देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहायक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, स्थानिक पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे तसेच पारस साखरे, अंकुश सुर्वे, साहिल चव्हाण व मुरलीधर पांचाळ या ग्रामस्थांनी बचाव कार्यात मोलाची मदत केली. रवी इन्फ्रा कंपनीच्या हायड्रा मशीनच्या साहाय्याने ट्रकचे पत्रे बाजूला करून चालकाला बाहेर काढण्यात आले. जखमी चालक हनुमंत शिंगटे यांना तातडीने साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

साखरपा-देवरुख मार्गावर भीषण अपघात;चौदा चाकी ट्रक डोंगराला धडकला, चालक जखमी Read More »

konkandhara 79 1

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय

मुंबई : सुधारीत निवृत्ती वेतन योजनेसह विविध १८ मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांचे इतिवृत्त प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या संपामध्ये शासकीय, निमशासकीय तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सलग चार दिवस सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राज्यातील विविध शासकीय कामकाजावर परिणाम झाला होता. विशेषतः महसूल विभागाच्या कार्यालयांवर त्याचा सर्वाधिक परिणाम जाणवला. मुद्रांक नोंदणी, जमीन व घर खरेदी-विक्री व्यवहार तसेच विवाह नोंदणीची कामे ठप्प झाली होती. दरम्यान, संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये चर्चेचे सत्र सुरू होते. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनांचे अधिकृत इतिवृत्त मिळावे, ही समन्वय समितीची प्रमुख मागणी होती. शुक्रवारी हे इतिवृत्त प्राप्त झाल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने सुधारित निवृत्ती वेतन योजनेसह इतर मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून त्यावर लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील जनतेची कामे ठप्प होऊ नयेत आणि शासकीय सेवांवर परिणाम होऊ नये, या दृष्टीने संप मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आभासी पद्धतीने पार पडलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत सर्व संबंधित संघटनांनी या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यानंतर एकमताने संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला, अशी माहिती समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली.

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय Read More »

konkandhara 78 1

युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रत्नागिरीमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आज रत्नागिरी शहराच्या दौऱ्यावर आले. त्यांनी रत्नागिरी शहरात राष्ट्रीय स्मारके, मंदिरांना भेट दिली. या दौऱ्यामध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दौऱ्याची सुरवात केली. त्यानंतर पतीतपावन मंदिर, लोकमान्य टिळक स्मारकास भेट देऊन भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. भारतीय जनता पार्टी कार्यालयात महाडिक यांचे आगमन ढोल ताशांच्या गजरामध्ये झाले. महिला मोर्चातर्फे महिलांनी औक्षण करून स्वागत केले. भाजपा शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांनी कृष्णाराज महाडिक यांची औपचारिक ओळख करून देत कृष्णराज या नावाप्रमाणे आपण आमचे मित्र म्हणून सखा- सोबती म्हणून काम कराल, असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी युवा मोर्चा अधिक सक्षम कसा होईल याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने राजू भाटलेकर यांनी त्यांचे स्वागत केले. युवा मोर्चा वतीने विक्रम जैन यांनी स्वागत केले. रत्नागिरी शहर मंडल म्हणून शहर सरचिटणीस बाबू सुर्वे, सरचिटणीस निलेश आखाडे, उपाध्यक्ष संतोष सावंत, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी देखील आपले मत व्यक्त करताना युवा मोर्चा सक्षम होण्यासाठी कार्यक्रमाच्या माध्यमातून व शासकीय योजनांच्या माध्यमातून काम करणार असल्याने सांगितले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आपले मत व्यक्त करताना मी तुमचा मित्र-सखा असून त्या पद्धतीनेच काम करणार आहे. तुम्ही कधीही मला संपर्क करू शकता. युवा मोर्चा जागर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरत असून भविष्यात मी संपूर्ण महाराष्ट्रभर युवा मोर्चा सक्षम करणार असल्याचे सांगितले. आपल्या मनोगतातून महाडिक यांनी युवा नेतृत्वाला चांगला संदेश दिला. रत्नागिरीतील युवा उद्योजक, युट्युबर यांच्याशी सकारात्मक चर्चा करत महाडिक यांनी सर्वांचे मन जिंकले. युवा मोर्चा सक्षमीकरणासाठी कृष्णाराज महाडिक यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. कोल्हापूर जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा लगतचा जिल्हा असल्याने मी विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी विक्रम जैन, युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, बाबा नाचणकर, निलेश आखाडे, भक्ती दळी, बाबू सुर्वे, नगरसेवक राजू तोडणकर, मानसी करमरकर, नितीन जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक, युवा मोर्चा, महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रत्नागिरीमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत Read More »

konkandhara 77 2

“झोळंबे शाळेचा जिल्ह्यात डंका! परसबाग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत मानाचा सन्मान”

दोडामार्ग : भूषण सावंत : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात झोळंबे शाळेने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत उल्लेखनीय यश मिळवले आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आयोजित परसबाग स्पर्धेत झोळंबे शाळेने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या दिमाखदार यशाबद्दल शाळेचा शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शाळा व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान स्वीकारताना अध्यक्ष दिपक गवस उपस्थित होते. तसेच गटशिक्षणाधिकारी श्री. नदाफ यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. या यशामागे विद्यार्थ्यांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. झोळंबे शाळेच्या या कामगिरीमुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशाच यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

“झोळंबे शाळेचा जिल्ह्यात डंका! परसबाग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत मानाचा सन्मान” Read More »

konkandhara 76 2

अपघात ग्रस्त आदिवासी कुटुंबाच्या मदती करता प्रमोद शेठ म्हसकर देवदूता सारखे धावून आले. दानशूर व्यक्तिमत्त्वाचे कौतुक.

कोलाड २५ एप्रिल(शरद जाधव) समाजात अनेक माणसे जन्माला येतात. श्रीमंत होतात .परंतु ती माणसे समाजातील गोरगरीब कष्टकरी गरजूंना किती मदतीला धावून जातात .हे महत्त्वाचे आहे. पुगाव येथील प्रमोद शेठ म्हसकर यांची सामाजिक दातृत्व नेतृत्व परोपकारवृत्ती ही गोरगरिबांसाठी तारणहार ठरली आहे. पुगाव येथील एक आदिवासी कुटुंब सुभाष वाघमारे व पत्नी सुजाता वाघमारे यांचा भीषण अपघात झाला सदर घटना प्रमोद शेठ म्हसकर यांना समजताच ते तातडीने त्यांच्या मदती करता करता धावून गेले. मदतीचा हात दिला प्रमोद शेठ यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांना खूप मोठा आधार मिळाल्याची भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केली. आजचा युग हे कलियुग आहे या ठिकाणी सत्ता संपत्तीची स्पर्धा आहे. कुणाला काही पडले नाही .अशा परिस्थितीत आपल्या व्यवसायातून उद्योगातून आपल्या जन्मभूमीतील बांधवांकरिता काहीतरी करता यावे हा उदात्त हेतू ठेवून प्रमोद शेठ अनंत म्हसकर प्रतिष्ठान ची स्थापना करण्यात आली असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदतीचा हात दिला गेला आहे. अपघात ग्रस्त कुटुंब त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे त्यांना पुढेही उपचाराची गरज आहे यावेळी प्रमोद शेठ म्हस्कर म्हणाले की सदर कुटुंब सुखरूप बरे होऊन घरी जाईल याकरता मी सर्व मदत करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले . रायगड जिल्ह्यामध्ये प्रमोद शेठ म्हसकर नावाचं एक सामाजिक वादळ तयार झाल आहे. त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब गरजूंना मदतीचा हात मिळत आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्रीडा क्षेत्राला . वारकरी संप्रदायाला. भरीव अशी मदत करत आहेत या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे खूप मोठे स्वप्न आहेत. नुकताच झालेला कोलाड येथील मैत्री चषक हे प्रमोद शेठ यांच्या सामाजिक नेतृत्वाची साक्ष देऊन गेला. प्रमोद शेठ आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी तरुणाईने रान पेटवलं होतं. प्रमोद शेठ म्हसकर सारखे नेतृत्व कोलाड सारख्या भागातून रायगडचे नेतृत्व करतील असा विश्वास यावेळी अनेकांनी व्यक्त केला. या भागातील नेते क्रिकेटच्या आवडीतूनच पुढे मोठे झाले. प्रमोद शेठ यांना सुद्धा क्रिकेट खेळाची प्रचंड आवड असल्याने त्यांचा हा क्रिकेटचा प्रवास पुढे रायगडचा राजकीय प्रवास ठरेल अशा शुभेच्छा यावेळी प्रमोद शेठ म्हसकर यांना दिल्या. प्रमोद शेठ म्हसकर यांनी सामाजिक उपक्रमातून आपल्या आई-वडिलांचे व गावचे नाव रोशन केल्याचे प्रचंड जमलेल्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांवरून दिसून आले आहे.

अपघात ग्रस्त आदिवासी कुटुंबाच्या मदती करता प्रमोद शेठ म्हसकर देवदूता सारखे धावून आले. दानशूर व्यक्तिमत्त्वाचे कौतुक. Read More »

Copy of Copy of Web Banner 7 1

तुरुंगाची भीती की सत्तेची ओढ? आम आदमीपासून भाजपपर्यंतचा प्रवास

आजच्या भारतीय राजकारणात ‘दलबदल’ हा शब्द आता कालबाह्य झाला असून, त्याऐवजी ‘धरपकड’ हा शब्द अधिक समर्पक वाटू लागला आहे. ज्या पद्धतीने एका विशिष्ट दिशेने नेत्यांचे ताफेच्या ताफे कूच करत आहेत, त्यामागे राजकीय वैचारिक परिवर्तन नसून तपास यंत्रणांची लाठी आणि भीती स्पष्टपणे दिसून येते. कालपर्यंत ज्यांच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले जात होते, ज्यांना ‘गुंड आणि अडाण्यांची टोळी’ म्हणून हिणवले जात होते, त्यांच्याच गळ्यात आज भगवे उपरणे घालून स्वागत केले जात आहे. हे दलबदल नाही, तर हा तपास यंत्रणांनी केलेली राजकीय ‘शिकार’ आहे. लोकशाहीच्या या नग्न नाचामध्ये तत्त्वांची होळी केली जात असून, सत्तेच्या हव्यासापोटी स्वतःचे अस्तित्व गहाण ठेवणाऱ्या नेत्यांची रांग लागली आहे. काही दिवसांपूर्वीच आम आदमी पार्टीच्या एका बड्या नेत्याने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशापूर्वीचा घटनाक्रम पाहिला तर लोकशाहीची ही शोकांतिका अधिक स्पष्ट होते. ज्या नेत्याच्या घरी दहा दिवसांपूर्वी ईडीने छापे टाकले, ज्यांच्यावर परकीय चलन गैरव्यवहाराचे (FEMA) गंभीर आरोप लावले गेले, ते अचानक भाजपच्या व्यासपीठावर ‘राष्ट्रवादी’ म्हणून अवतरतात. हे आश्चर्यकारक नाही का? ज्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीवर छापे पडले, ज्या शैक्षणिक संस्थांच्या नावाखाली आर्थिक अफरातफरीचे आरोप झाले, त्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळताच जणू काही ‘गंगास्नान’ घडले. हे नेते भाजपमध्ये जाऊन पक्षाचे नुकसान करत नाहीत, तर ते ईडीच्या अधिकाऱ्यांचे कष्ट वाचवत आहेत. अन्यथा मे-जूनच्या रणरणत्या उन्हात बिचाऱ्या तपास यंत्रणांना त्यांच्या फाईल्स चाळाव्या लागल्या असत्या. आता भाजप ही अशी ‘वॉशिंग मशीन’ बनली आहे, जिथे डिटर्जंट पावडरशिवाय गुन्हेगारांचे डाग धुतले जातात. या संपूर्ण प्रक्रियेत तपास यंत्रणांची प्रतिमा काय उरली आहे? ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग हे आता स्वायत्त संस्था नसून सत्ताधारी पक्षाचे राजकीय शस्त्र बनले आहेत. जर सर्वच ‘भ्रष्टाचारी’ भाजपमध्ये जाणार असतील, तर उद्या या यंत्रणांनी छापे कोणावर टाकायचे? असा प्रश्न पडतो की, या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश करून घ्यावा किंवा पक्षाच्या आतच छापे टाकायला सुरुवात करावी. कारण भ्रष्टाचाराचे सर्व साठे आता एकाच छताखाली जमा होत आहेत. गमतीची गोष्ट अशी की, जे लोक भाजपला अनपढ आणि गुंड म्हणत होते, त्यांचेच स्वागत करताना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना किंवा नेत्यांना ईडीच्या प्रतिमेची पुसटशीही चिंता वाटली नाही. यामुळे समाजात असा संदेश जात आहे की, जर तुम्ही कोणताही गुन्हा केला असेल, तर वकिलाकडे जाण्यापेक्षा भाजपच्या कार्यालयाचा रस्ता धरावा, तिथेच तुम्हाला खऱ्या अर्थाने ‘न्याय’ मिळेल. राजकारणातील हा नैतिक ऱ्हास केवळ एका पक्षापुरता मर्यादित नाही. आम आदमी पार्टीनेही आपल्या स्थापनेच्या सिद्धांतांशी तडजोड केली, हे नाकारता येणार नाही. ज्या आंदोलनातून हा पक्ष जन्माला आला, तिथे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यासारख्या विचारवंतांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला आणि त्यांच्या जागी ‘धनकुबेर’ राज्यसभेत पाठवले गेले. ज्यांचे पक्षाशी किंवा आंदोलनाशी कोणतेही देणेघेणे नव्हते, अशा संधीसाधू लोकांना जेव्हा तुम्ही पदे देता, तेव्हा ते संकट येताच पळून जाणारच. प्रशांत भूषण यांनी म्हटल्याप्रमाणे, ज्यांनी आधी पक्ष सोडला त्यांनी सिद्धांतांसाठी सोडला, पण आता जे जात आहेत त्यांनी केवळ सत्तेचे सुख उपभोगून झाल्यावर ईडीच्या भीतीने पळ काढला आहे. ही निव्वळ संधीसाधूपणाची पराकाष्ठा आहे. महाराष्ट्राचे उदाहरण तर डोळ्यासमोर आहेच. ‘मी तुरुंगात जाऊ शकत नाही’ म्हणून रडत रडत भाजपमध्ये जाणारे नेते असोत किंवा ‘भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते’ अशी कबुली देणारे नेते असोत, या सर्वांनी भारतीय लोकशाहीच्या चेहऱ्यावर काळे फासले आहे. राहुल गांधींनी दिलेल्या ‘डरो मत’ या नाऱ्याचा अर्थ या नेत्यांना समजलाच नाही. यंत्रणांचा धाक एवढा आहे की, लोकांची गचांडी धरून त्यांना सत्ताधारी पक्षात ओढले जात आहे. याला ‘ऑपरेशन लोटस’ म्हणणे ही सुद्धा लोकशाहीची थट्टा आहे. हे लोकशाहीचे ऑपरेशन नसून लोकशाहीची हत्या आहे. सर्वात भयानक बाब म्हणजे, हे सर्व जनतेच्या डोळ्यासमोर घडत आहे. जेव्हा २७ लाख मतदारांची नावे कट केली जातात, जेव्हा परदेशात भारताचा अपमान होतो आणि त्यावर सत्ताधारी गप्प राहतात, तेव्हा जनतेनेही विचार करण्याची गरज आहे. आपण ‘वन नेशन, वन इलेक्शन’कडून ‘वन नेशन, वन पार्टी’कडे चाललो आहोत का? चीनच्या मॉडेलवर आपल्याला नेले जात आहे का? जर विरोधी पक्षच उरणार नसेल, तर निवडणुकांचा हा फार्स कशासाठी? गोदी मीडिया या विषयांवर चर्चा करण्याऐवजी उलट अशा ‘धरपकड’ मोहिमेचे गुणगान गात आहे. ज्या देशाचा मीडिया प्रश्न विचारण्याऐवजी सत्ताधाऱ्यांचे चोपदरी काम करतो, तिथे लोकशाही वाचवणे हे केवळ विरोधकांचे नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सध्याचे राजकारण हे केवळ सत्तेचे गणित नसून ते नैतिकतेचे युद्ध आहे. जे नेते आजही ईडी-सीबीआयच्या फेऱ्यात अडकूनही आपल्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत, ते खरं तर कौतुकास पात्र आहेत. कारण आजच्या काळात विरोधक म्हणून उभे राहणे हे सर्वात कठीण काम बनले आहे. कॉर्पोरेट चंदा नाही, मीडियाचा पाठिंबा नाही आणि वरून तपास यंत्रणांची टांगती तलवार. अशा परिस्थितीत लोकशाहीची ही मोडतोड थांबवायची असेल, तर जनतेला या ‘धरपकड’ मोहिमेमागचे सत्य समजून घ्यावे लागेल. अन्यथा, उद्या फक्त एकच पक्ष उरेल आणि लोकशाही केवळ पुस्तकात शिल्लक राहील. ही वेळ सावध होण्याची आहे, कारण लोकशाही संपवण्यासाठी तुमची संमती गरजेची नसते, तुमचे मौन पुरेसे असते.

तुरुंगाची भीती की सत्तेची ओढ? आम आदमीपासून भाजपपर्यंतचा प्रवास Read More »

konkandhara 75 2

कोलाड येथे सुदर्शन कंपनीच्या झाडांना वनवा .दोष वनव्याचा की कंपनीचा.

कोलाड २४ एप्रिल (शरद जाधव) उद्योग जगतात मोठा गाजावाजा असलेल्या दर्शन कंपनीने सामाजिक बांधिलकीतून कोलाड येथील चिंचवली येथे टेकडीवर वृक्षारोपण केले होते. मात्र सदर झाडे वनव्यामध्ये जळून खाक झाली आहेत. त्यामुळे या झाडांचे संवर्धन करण्यात सुदर्शन व्यवस्थापन या ठिकाणी फोल ठरली असून यामध्ये दोष वनव्याचा की कंपनीचा असा सवाल नागरिक करीत आहेत. सुदर्शन कंपनीकडून सुधा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात .महिलांना रोजगार म्हणून शिवण क्लास ,शैक्षणिक उपक्रम ,स्वच्छता उपक्रम, वृक्षारोपण असे ग्रामीण भागातील लोकांचे जीवन व सुधारण्याकरता विविध उपक्रम हाती घेतले जातात.चिंचवली येथील टेकडी झाडा फुलांनी फुलवण्याचा संकल्प कंपनीने हाती घेतला होता. वृक्षारोपणाचा मोठा गाजावाजा झाला आम्ही ही टेकडी हिरवीगार करून या परिसराला हरितक्रांतीकडे नेऊ असे सांगण्यात आले .मात्र सदर झाडे दुर्लक्ष केल्याने वनव्यात जळून खाक झाली आहेत . आजूबाजूला डोंगर आहे .गवत आहे. परिसर हा वनव्याचा असताना सुदर्शन कंपनी झाडांची काळजी घेतली पाहिजे होती. त्या ठिकाणी कायमस्वरूपी कामगार एखादी चौकी हवी होती परंतु कंपनीने दुर्लक्ष केले यावरून सुदर्शन कंपनीला सुद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून केवळ सामाजिक उपक्रमाच्या देखाव्याच्या घाट घालायचा होता का असे बोलले जाते१९ ७२ च्या दशकात सुदर्शन सारखा कारखाना रोह्यात आला. लोकांना रोजगार मिळाला मात्र एक सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे जीवनमान किती गतिमान झाले हा चर्चेचा विषय ठरत आहे .सुदर्शन कंपनीचा उत्पादन बाबतीत बाहेरील देशात कारभार पोहचला आहे. हे कौतुकास्पद आहे. मात्र खरी सुरुवात सुदर्शन ची रोह्यातूनच सुरू झाली मात्र ते सामाजिक कामात रोहेकरांना विसरलेराठी समूहाने गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून राठी स्कूल ची स्थापना केली परंतु दर वर्षी वाढणारी फी पाहता या ठिकाणी गरीब मुलांनी शिक्षण घेऊ नये. असे राठी प्रशासनाने ठरवले की काय असे वाटू लागले आहे . सुदर्शन कंपनीचे पक्के व्यापारी धोरण आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत व राष्ट्र उभारणीत ज्यांचा मोलाचा सहभाग आहे. अशा रतन टाटा बिर्ला यांचा आदर्श घेत सुदर्शन कंपनीने स्थानिकांसाठी त्यांच्या उन्नती करता दर्जेदार काम केले पाहिजे. वनव्यात झाडे जळाली असली तरी कंपनीने ठरवले तर सदर टेकडी परत हिरवीगार होईल परंतु ती मानसिकता कंपनी दाखवणे आवश्यक आहे असे बोलले जात आहे.

कोलाड येथे सुदर्शन कंपनीच्या झाडांना वनवा .दोष वनव्याचा की कंपनीचा. Read More »

konkandhara 74 2

प्रख्यात उद्योजक रमेशशेठ रेपाळ यांचे निधन; निवळी-पालवण परिसरावर शोककळा

सावर्डे : शिवसेना नेते व माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांचे कट्टर समर्थक, निवळी-पालवण येथील प्रख्यात उद्योजक रमेशशेठ शिवाजी रेपाळ यांचे दि. २४ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६० वर्षे होते. रमेशशेठ रेपाळ हे माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचायत समितीच्या माजी सदस्या संध्याताई रेपाळ यांचे पती होते. निवळी-पालवण परिसरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्यात ते नेहमीच अग्रेसर होते. शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणारे, दूरदृष्टी असलेले आणि समाजासाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. उद्योजक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. श्री हनुमान सेवा मंडळ, निवळी कोष्टेवाडीचे सल्लागार, खाजगी नळ पाणी योजनेचे माजी अध्यक्ष तसेच देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ, रत्नागिरीचे सल्लागार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या निधनाने परिसराने एक कर्तृत्ववान, दिलदार आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या आठवणी समाजाच्या मनात कायम जिवंत राहतील, अशा भावना व्यक्त करत विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवार, दि. २५ एप्रिल रोजी सकाळी पालवण येथील वैकुंठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे — सुजित व सनी उर्फ मंदार, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रख्यात उद्योजक रमेशशेठ रेपाळ यांचे निधन; निवळी-पालवण परिसरावर शोककळा Read More »

konkandhara 73 2

कोळकेवाडीत भरदिवसा घरफोडी; २.३४ लाखांचा ऐवज लंपास

चिपळूण : तालुक्यातील कोळकेवाडी येथील कुंभारवाडी परिसरात भरदिवसा बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत एकूण २ लाख ३४ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास झाला असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अश्विनी एकनाथ साळवी (वय ४९, रा. कोळकेवाडी, कुंभारवाडी) यांच्या घरात ही घटना दि. २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १.३० ते २.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. त्यांनी आपले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे एका चॉकलेटी रंगाच्या पर्समध्ये ठेवून कपाटात ठेवली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उघडून आत प्रवेश केला आणि पर्समधील ३९ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत सुमारे २,१८,९०० रुपये), २७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (किंमत ५,५०० रुपये) तसेच १०,००० रुपये रोख असा एकूण २,३४,४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याशिवाय पर्समध्ये ठेवलेली पॅनकार्ड, बँक ऑफ इंडिया पासबुक, मतदान ओळखपत्र, आयुष्यमान कार्ड आणि आधारकार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रेही चोरट्याने लंपास केली. घटना लक्षात येताच अश्विनी साळवी यांनी तातडीने चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३१ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ अन्वये गुन्हा (रजिस्टर क्रमांक १७/२०२६) दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. नागरिकांनी आपल्या घरांची व मौल्यवान वस्तूंची योग्य ती सुरक्षा करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोळकेवाडीत भरदिवसा घरफोडी; २.३४ लाखांचा ऐवज लंपास Read More »