konkandhara.com

Editorial

konkandhara 2026 05 02T171949.520

हवामान बदलाचा महासमुद्र आणि कोकणच्या अर्थकारणांची धगधगती चिंता

योगेश बांगरडे कोकणाच्या मातीतील नैसर्गिक मुबलकतेने जे वरदान दिले आहे, ते केवळ डोळ्यांना सुखावणारे सौंदर्य नाही, तर तेथल्या लाखो कुटुंबांच्या जगण्याचे साधन आहे. पण गेल्या काही वर्षांत वातावरणात झालेल्या बदलांचा थेट परिणाम कोकणातील पारंपरिक अर्थकारणावर होताना दिसतो आहे. हापूस आंबा, काजू आणि नारळ यांसारख्या पिकांवर कोकणाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. परंतु बदलत्या हवामानामुळे या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत असून शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही वर्षांत तापमानात झालेली वाढ, पावसाच्या पॅटर्नमधील बदल, तसेच अवकाळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. विशेषतः आंबा आणि काजूच्या फुलोऱ्यावर तापमानातील चढ-उतारांचा मोठा परिणाम होत असून उत्पादन घटण्याची शक्यता वाढली आहे. कोकणातील कृषी अर्थव्यवस्थेचे केंद्रबिंदू असलेला हापूस आंबा हा केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणावर मागणी असलेला उत्पादन आहे. मात्र, हवामान बदलामुळे त्याच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर परिणाम होत आहे. याशिवाय, किनारपट्टीवरील मत्स्य व्यवसायावरही हवामान बदलाचा परिणाम दिसून येत आहे. समुद्राचे तापमान वाढल्यामुळे माशांच्या स्थलांतराच्या पॅटर्नमध्ये बदल होत आहेत. त्यामुळे मच्छीमारांना अपेक्षित प्रमाणात मासेमारी मिळत नाही. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढत आहे, ज्यामुळे जलसाठ्यांवर परिणाम होत आहे. याचा थेट परिणाम शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेवर होत आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील अर्थकारणावर गंभीर परिणाम होत असून यासाठी योग्य नियोजन आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बदलत्या परिस्थितीला सामोरे जाणे गरजेचे आहे. तसेच शासनानेही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा आणि मदत पुरवणे गरजेचे आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील संकट टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा, कोकणच्या अर्थव्यवस्थेवर याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.

हवामान बदलाचा महासमुद्र आणि कोकणच्या अर्थकारणांची धगधगती चिंता Read More »

konkandhara 2026 05 02T170002.044

रोहा नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांच्याकडून भर उन्हात नालेसफाईची पाहणी.

कोलाड २मे (शरद जाधव) मे महिना बघता बघता संपेल आणि मान्सूनला सुरुवात होईल त्याआधीच रोहा नगरपालिकेने नालेसफाई ची मोहीम हाती घेतली असून स्वतः नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी भर उन्हात नाले सफाईची पाहणी केली. केवल थातुर माथूर कामे चालणार नाहीत. असा इशारा ठेकेदारांना वनश्री शेडगे यांनी दिला असल्याचे बोलले जाते. रोहा शहराच्या एका बाजूला डोंगर असल्याने अचानक पावसाळ्यात कधीतरी डोंगराचे पाणी रोहे शहरात घुसते. रोहे शहराला पुराच्या पाण्याचा तडाका बसतो. जर पावसाळ्यापूर्वी उघडे गटारे नाले यांची साफसफाई झाली. तर पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. याकरता वनश्री शेडगे यांनी कार्यतत्परता दाखवत. पावसाळ्यात रोहेकरांना पाण्याचा त्रास होऊ नये याकरता लवकरच नाले सफाईची मोहीम हाती घेतली आहे.केवल नालेसफाई थातूरमातूर न होता चांगली झाली पाहिजे याकरता भर उन्हात त्या स्वतः नालेसफाईची कामाची पाहणी करत होत्या यावेळी नगरसेवक महेश दादा कोलटकर समाधान शिंदे अन्य नगरसेवक सभापती उपस्थित होते. वनश्री शेडगे या उच्चशिक्षित आहेत आर्किटेक इंजिनियर आहेत अभ्यासू आहेत .कमी वयात प्रभावी बोलतात. त्यामुळे शहराचा कायापालट त्या निश्चित करतील. रोहे शहराला निधी आणण्याकरता खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे. अनिकेत तटकरे यांचे सहकार्य त्यांना मिळत आहे. स्वतः वनश्री शेडगे त्यांचे सर्व नगरसेवक व त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे हे सर्व रोहे शहरातील नागरिकांनाभेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्न सोडवण्या करता सज्ज झाले आहेत.

रोहा नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांच्याकडून भर उन्हात नालेसफाईची पाहणी. Read More »

Copy of Copy of Web Banner 10

लोकशाहीचा लष्करी चेहरा — मतदान उत्सव की दहशतीचा प्रयोग?

भारताच्या लोकशाही इतिहासात निवडणुका हा नेहमीच एक उत्सव राहिला आहे, पण पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनी या उत्सवाचे स्वरूप एका भयावह प्रयोगात बदलल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्या देशात नेहमीच कोणाचे स्वातंत्र्य हिरावले जात नाही, पण केवळ काही ठिकाणी आणि बळजबरीने चालू मतदान केंद्रांवर गेलेल्या मतदारांच्या 800 मीटर मागे पोचून पोलिसांनी चालू ठेवण्यात भाग पाडले जात आहे, हे धक्कादायक आहे? काय आता निवडणूक आयोग मतदारांसाठी असमान्य रूट चालू ठेवण्याचा ट्रेंड कंड लागणार आहे? दुर्गम ठिकाणी मतदान करण्यास मनाई करण्याच्या या सुद्धा कल्पनेने लोकशाहीला ठेच पोहोचते. आतापर्यंत केवळ दोन व्यक्तींना अपमान होतो नाही, तर हे त्या व्यक्तीचे द्विपक्ष आहे जो सामान्य नागरिकांच्या अधिकारावर थेट परिणाम आहे. बंगालच्या निवडणुकांमध्ये ज्या प्रकारे केंद्रीय दलांची तैनाती करण्यात आली, त्याकडे पाहिल्यावर असे वाटते की ही निवडणूक नसून एखादे युद्ध क्षेत्र आहे. प्रत्येक गल्ली, प्रत्येक मतदान केंद्रावर ठिकठिकाणी तैनात केलेल्या दलांमुळे मतदानाचा निर्णय करणारा एक प्रकार लोकशाहीच्या नावाखाली चालवलेला एक प्रयोग वाटतो आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे सामान्य जीवनाचे आणि निवडणूक प्रक्रियेचे होत असलेले लष्करीकरण. बंगाल ही एक प्रयोगशाळा बनली आहे, जिथे लोकांच्या मनात बंदुकीच्या सावलीत मतदान करण्याची सवय रुजवली जात आहे. निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरही आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बंगालमध्ये 92 टक्क्यांहून अधिक विक्रमी मतदान झाल्याचे सांगितले जाते, पण या आकड्यांमागील वास्तव मात्र स्पष्टपणे सांगितले जात नाही. जवळपास 27 लाख मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे सांगितले जाते, तर काही ठिकाणी मतदारांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, केंद्रीय यंत्रणांचा अतिरेक वापर आणि नागरिकांच्या स्वातंत्र्यावर होत असलेले आक्रमण — या सर्व गोष्टी लोकशाहीसाठी धोक्याच्या घंटा आहेत. आज गरज आहे ती निवडणूक प्रक्रियेत विश्वास पुनर्स्थापित करण्याची आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याची. अन्यथा, मतदान हा उत्सव न राहता दहशतीचा एक प्रयोग ठरेल.

लोकशाहीचा लष्करी चेहरा — मतदान उत्सव की दहशतीचा प्रयोग? Read More »

konkandhara 2026 05 01T225517.056

कोकणातील परीट (धोबी)मडवळ समाजाचा राज्यस्तरीय मेळावा ३ मे रोजी रोह्यात

कोलाड दिनांक १ एप्रिल ( शरद जाधव) महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट (धोबी) मंडळ समाज संघ यांच्या वतीने कोकणाचा १ ला भव्य मेळावा (राज्यस्तरीय) आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता रोहा येथील डॉ. सि. डि. देशमुख शहर सभागृह, रोहा नगरपरिषद समोर, मु. पो. रोहा, जि. रायगड येथे पार पडणार आहे. समाज संघटनेच्या बळकटीसाठी, विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तसेच कोकणातील परीट समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. शांताराम (भाऊ) सहदेव कदम भूषविणार असून ते महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट (धोबी) मंडळ समाज संघाचे अध्यक्ष आहेत. तसेच कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या मेळाव्याद्वारे समाजातील शिक्षण, रोजगार, सामाजिक ऐक्य, युवकांचे सक्षमीकरण आणि महिलांच्या सहभागाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच विविध तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष तयारी केली आहे. मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कोकण खजिनदार नंदकिशोर राक्षे, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र कान्हेकर, रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक कदम व संघटक संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणातील परीट (धोबी)मडवळ समाजाचा राज्यस्तरीय मेळावा ३ मे रोजी रोह्यात Read More »

konkandhara 2026 05 01T223925.706

गोवा दारुच्या तस्करी विरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण :

१ मे महाराष्ट्र दिनी रत्नागिरी जिल्ह्यातील परमिट रूम परवानाधारक आणि सरकारमान्य देशी मद्य विक्री परवानाधारक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जयस्तंभ येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.५४ वर्षे व्यवसाय करून शासनाला महसूल मिळवून देत असताना गेली ५ वर्षे गोवा बनावटीच्या बोगस दारू तस्करी मुळे शासकीय महसूल पूर्णपणे बुडाला आहे. लायसन्स फी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सरकारी परवानाधारक अडचणीत सापडले आहेत. पूर्वी महाराष्ट्र सरकारचा रोड टॅक्स गोव्याच्या रोड टॅक्स पेक्षा कितीतरी पट अधिक असल्यामुळे महाराष्ट्रातील लोकं गोव्यातून गाड्या खरेदी करत होते हे महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आल्यावर महाराष्ट्र शासनाने गोव्याच्या धर्तीवर रोड टॅक्स केल्यावर गोव्यातून गाडी खरेदी बंद झाली आणि महाराष्ट्रातून गाड्या खरेदी वाढली. पर्यायाने महाराष्ट्राचा महसूल वाढला. तोच निकष अबकारी करावर लावल्यास महाराष्ट्रlचा राज्य उत्पादन शुल्क कर पाच पटीने वाढेल. ४० हजार कोटी मिळणारा उत्पादन शुल्क व व्हॅट महसूल दिड लाख कोटी वर जाईल. शासनाच्या विविध रखडलेल्या लाडकी बहीण सारख्या योजना, रखडलेली पेन्शन, ठेकेदारांची रखडलेली बिले गोवा दारू बंदी मुळे सुरळीत होऊ शकतात.महाराष्ट्रात २१०/- रु मध्ये मिळणारी व्हिस्कीची क्वार्टर गोव्यात ३०/- रु मध्ये मिळते. अनेक शाळांमधील विद्यार्थी खाऊला दिलेले पैसे एकत्र करून गोव्याची दारू पीत आहेत आणि आपले जीवन अंधःकारमय करत आहे. शाळांच्या जवळ मिळणाऱ्या गोव्याच्या दारू विरोधात मुख्याध्यापक तक्रार देत आहेत. तरीही प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. परवानाधारकांनी आपल्या मागण्या मांडताना अवैध गोवा दारू विक्रीवर पोलीस खाते, एक्सlईज, पोलीस पाटील, महिला बचत गट, होमगार्ड यांची संयुक्त कारवाई करून ज्या जागेत गोवा दारूचा साठा मिळेल त्या जागेच्या मालकावर गुन्हा दाखल करावा. ज्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात अवैध गोवा दारू विक्री आढलेल त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं. अवैध गोवा दारू विक्रीत्यांचे आयकर विवरण पत्रावरील माहिती वरुन उत्पन्न बाह्य संप्पतीची चौकशी करून मलमत्ता जप्त करण्यात यावी तसेच अवैध गोवा दारू विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक, रा उ शु अधीक्षक, जिल्हापरिषद सीईओ आणि सरकारमान्य मद्य विक्री संघटना प्रतिनिधी यांची कमिटी स्थापन करून दर महिना बैठक आयोजीत करून आढावा घेण्यात यावा. राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन गोवा अवैध दारुवर कडक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले यावेळी उपोषणकर्त्यांमध्ये जयेंद्र कोठारकर, अनिश भाटकर राजापूर संतोष जंगम चिपळूण, स्वप्नील आंबोलकर साटवली, राजीव कीर रत्नागिरी, सुहास भोसले चिपळूण, विजय कदम चिपळूण, समीर तिवरेकर रत्नागिरी, सुदीप चव्हाण गुहागर, सचिन वाघधरे लांजा, प्रशांत पवार राजापूर, प्रशांत रमेश शिंदे राजापूर, विनय गुरव राजापूर, सचिन आखाडे जैतापूर, सतीश घाडी जैतापूर, सनी करंगुटकर जैतापूर, रविंद्र गुरव आडीवरे, संजय ओगले राजापूर, संजय काणेकर राजापूर आदी उपस्थित होते

गोवा दारुच्या तस्करी विरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण : Read More »

konkandhara 2026 05 01T223344.745

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 चा समारोपजन चळवळ म्हणून 365 दिवस राबवा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. 1 (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन हे केवळ कृती पंधरवडा पुरते मर्यादित राहू नये. जनचळवळ म्हणून 365 दिवस राबवा. यातून पाणी टंचाईवर विचार करुन योग्य नियोजन व्हायला हवे, असे मार्गदर्शन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.कोकण पाटबंधारे विकास महामंडळ रत्नागिरी पाटबंधारे मंडळ यांच्यामार्फत जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्याचा समारोप पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या उपस्थित आज झाला. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, अर्थ व शिक्षण सभापती नंदकुमार बोरकर, रत्नागिरी पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, उपसभापती गजानन महाडिक, शशिकांत चव्हाण, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, अतिशय प्रामाणिकपणे जिल्ह्यामध्ये हा पंधरवडा राबवला आहे. त्याबद्दल मनापासून कौतुक करतो. राज्यामध्ये तीनशे कोटी झाडं लावायची आहेत. जलसंपदा विभागाने यामध्ये वनविभागाबरोबर पुढाकार घ्यावा. ती जगली पाहिजेत. त्याच्यासाठी उपाय योजना देखील आपण सगळ्यांनी मिळून करण्याची गरज आहे. जल व्यवस्थापनाची जन चळवळ सुरू करावी. सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करावे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ साफ करण्याचा निर्णय डीपीसीमधून घेतला. नाम फाउंडेशनमार्फत दहा ते पंधरा काम सुरू आहेत. त्यामुळे चिपळूण सारख्या शहरात गेल्या दोन तीन वर्षात पाणी आलेले नाही. गावांची पाण्याची पातळी वाढण्यासही मदत झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जलयुक्त शिवार ही योजना राज्यात आणली होती. या योजनेमुळे महाराष्ट्रातल्या अनेक गावांची पाण्याची पातळी वाढली. सध्याच्या तापमानाचा आकडा बघितला, जलसाठ्यांचे बाष्पीभवन टाळायचं असेल तर फ्लोटींग सौर प्रकल्प बसविण्याबाबत विचार करायला हवा. असा प्रयोग शीळ धरणावर पथदर्शी प्रकल्प म्हणून करु. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्र पावन झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालाय. शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र ! छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरीचे धरण बांधून जलसंपदा विभागाला प्रेरणा दिली आहे. आजच्या सारखे प्रगत तंत्रज्ञान नसताना, छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीने आणि संकल्पनेने या धरणाची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, देशपातळवरील राजे होते. ज्यावेळी मी तंजावरला गेलो, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय आणि कशा पद्धतीने केले, याची जाणीव मला झाली. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून एक प्रकारे मंत्रालयाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 व्या शतकामध्ये केली होती. समुद्रामध्ये किल्ला बांधून त्यावर गोड्या पाण्याचा तलाव असावा, ही संकल्पना त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची होती. खऱ्या अर्थाने जलसंपदा विभाग 16 व्या शतकात उदयाला आणला. याचा अभ्यास आपण करायला हवा. पिण्याच्या पाण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पाणी टंचाईवर विचार केला पाहिजे. पाणी टंचाईवर या जिल्ह्याला मात करावीच लागेल. त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.जलसंपदा विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. पंधरवड्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर विभागाच्या अधिकाऱ्यांना टॅब आणि आधारकेंद्र चालकांना आधार संचाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सर विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन दीपप्रज्ज्वलाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुर्वे यांनी केले. तर कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी पंधरवड्यातील उपक्रमांची माहिती दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 चा समारोपजन चळवळ म्हणून 365 दिवस राबवा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत Read More »

konkandhara 2026 05 01T222655.929

महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्‍थापना दिन ; पालकमंत्र्यांची राष्ट्रध्वजाला मानवंदनामहाराष्ट्र राज्याला, राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये-पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. 1 (जिमाका) : विमानतळ उड्डाणासाठी तयार आहे. रेल्वे स्टेशनदेखील नव्याने कात टाकतयं. प्रशासनाची इमारत देखील 100 कोटी रुपये खर्च करुन पुर्णत्वास येत आहे. नगरपालिकेचे इमारत देखील पूर्ण झालेली आहे. जिल्हा परिषदेची इमारत देखील पूर्ण झालेली आहे. 169 कोटी रुपयांमधून पोलीस इमारतीचे बांधकाम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र देखील येत्या 2 ते 3 महिन्यात लोकार्पण करणार आहोत. आरेवारे किनाऱ्याजवळील वन खात्याच्या जमिनीवर 5 कोटी रुपयांचे इको ट्युरिझम डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाईल. महाराष्ट्र राज्याला, महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा असा विकास या रत्नागिरीमध्ये करतोय. या विकासाला जिल्ह्यातील जनतेने साथ द्यावी, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. उदय सामंतयांनी आज व्यक्त केली. महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त येथील पोलीस परेड ग्राऊंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकावून त्याला मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक बी.बी. महामुनी मंचावर उपस्थित होते. या सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह लोकप्रतिनिधी, इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री डॉ. सामंत यांनी परेड निरीक्षण केले. तसेच परेड संचालनाकडून मानवंदना स्वीकारली.शुभेच्छा संदेश देताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम नागरिक बंधू भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्यादेखील मन:पूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या दिवशी 1960 सालामध्ये मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. अनेक स्वातंत्र्य सेनानी असतील, समाजसेवक असतील त्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र निर्माण झाला आहे. ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे. ही भूमी छत्रपती संभाजी महाराजांची आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. म्हणूनच अभिमानाने जय महाराष्ट्र कायमस्वरुपी संबोधत असतो. त्याच महाराष्ट्राला वंदन करण्याचा आज दिवस आहे.रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबत नाविन्यपूर्ण उपक्रम सांगायचे झाले तर आपल्या उपक्रमांची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांसाठी नासा आणि इस्त्रो येथील अभ्यास दौरा ही योजना आपण 4 वर्षापासून रत्नागिरीत सुरु केली. आज ती योजना अख्या महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. याचा अर्थ रत्नागिरीचे जिल्हा प्रशासन नाविन्यपूर्ण योजना राबवितो. हे महाराष्ट्राच्या पातळीवर सिध्द झाले आहे. रत्नागिरीचे पोलीस दल हे सक्षम असावे, यासाठी नियोजन मंडळातून मागच्याच 15 दिवसांपूर्वी नवीन 25 गाड्यांचा लोकार्पण सोहळा झाला आहे. आज देखील काही नवीन गाड्यांचा लोकार्पण होत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस दल हे सक्षम असावं, हा त्यामागचा भाव आणि त्यामागची भावना आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा आराखडा 29 कोटींनी वाढवून दिला आहे. यामधून कृषी, मत्स्य, शिक्षण, पर्यटन अशा सगळ्याच बाबींवर आपण खर्च करत आहोत. गेल्या अर्थिक वर्षात नियोजन समितीच्या माध्यमातून 406 कोटींचा निधी खर्च झाला आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून रत्नागिरी केंद्रीय विद्यालय मंजूर झाले आहे. त्याला 1 रुपये नाममात्र दराने नाचणे मधील अडीच हेक्टर जागा देण्याचा निर्णय कालच महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या शैक्षणिक वैभवामध्ये फार मोठी भर पडणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 100 टक्के पूर्ण केली. पीएम किसान योजनेच्या 22 हप्त्यांचे वितरण झाले आहे. नमो किसान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 59 हजार 589 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. फळपीक विम्यामधून देखील 107 कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, मंडणगड, रत्नागिरी, राजापूर या पाच मतदार संघामध्ये प्रत्येकी 3 कोटी रुपयांचे संविधान भवन उभारण्यात येत आहेत. हा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम आहे. या संविधान भवनमध्ये युपीएससी, एमपीएससी याचे प्रशिक्षण आपण सुरु करणार आहोत. बार्टीचे कार्यालय तालुका ठिकाणी असावे, हा प्रयत्न देखील संविधान भवनच्या माध्यमातून करणार आहोत. रत्नागिरी जिल्हा आणि जिल्ह्याचे प्रशासन महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे पहिले प्रशासन आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून 31 रुग्णांलयाची नोंद झाली आहे. यामधून शेकडो रुग्णांना फायदा दिलेला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातून देखील 4 कोटी 78 रुपयांचे अनुदाने लाभार्थ्यांना दिले आहे. आरेवारे किनारा येथील वन खात्याच्या जमिनीवर 5 कोटी रुपये खर्च करुन इको ट्युरिझम उभारण्याचा निर्णय जिल्हा नियोजन मंडळाने घेतला आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाईल. रत्नागिरी विमानतळ देखील उड्डाणासाठी तयार झालेले आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनदेखील नव्याने कात टाकतयं. रत्नागिरी प्रशासनाची इमारत देखील 100 कोटी रुपये खर्च करुन पूर्णत्वास येत आहे. नगरपालिकेचे इमारत देखील पूर्ण झालेली आहे. जिल्हा परिषदेची इमारत देखील पूर्ण झालेली आहे. पोलीसांसाठी दिलेल्या 169 कोटी रुपयांमधून इमारतीचे बांधकाम सुरु आहे. महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा हा प्रशासकीय इमारती परिपूर्ण असलेला आणि नवा असलेला हा पहिला जिल्हा आहे, याचा मला अभिमान आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. रत्नागिरीमध्ये उभारलेल्या शिवसृष्टीला लाखो पर्यटकांनी आजपर्यंत भेट दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र देखील येत्या 2 ते 3 महिन्यात लोकार्पण करणार आहोत. महाराष्ट्र राज्याला, महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा असा विकास या रत्नागिरीमध्ये करतोय आणि या विकासाला रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने साथ द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध सन्मानसागर कवच अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक बी.बी. महामुनी यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक विवेक पाटील, अंमलदार सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड, संदेश चव्हाण, मोरेश्वर मयेकर, दिपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गव्हाणे, शीतल पिंजरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्ररशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्टुडन्ट पोलीस कॅडेट कार्यक्रमांतर्गत जवाहर नवोदय विद्यालय राजापूर यांचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल मुख्याध्यापक एस.बसवराज, वैष्णवी पाटोळे, देवयानी महात्मे, प्रशब्ध कांबळे, दुर्वा शिंदे, दिपाल भंडारी, मंजिरी तांबे, गंधार संसारे, सार्थक दुर्गावळे, आर्यन मेन, कार्तिक हदमबर यांचा सन्मान करण्यात आला.पुण्यश्लोक अहिल्याबाई पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते अश्विनी मोरे, निकिता जाधव, साक्षी गावणांग, धनश्री मोरे यांना वितरीत करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलास देण्यात येणाऱ्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्‍थापना दिन ; पालकमंत्र्यांची राष्ट्रध्वजाला मानवंदनामहाराष्ट्र राज्याला, राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये-पालकमंत्री डॉ. उदय सामंत Read More »

konkandhara 2026 05 01T221701.607

कोलाडात मुंबई गोवा महामार्ग ट्रॅफिक जाम .

शाळेला सुट्या, गावाकडची ओढ ,चाकरमानी कोकणात. सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्ने टीम कडून वाहतूक सुरलित कोलाड १ एप्रिल (शरद जाधव) कोकण म्हटलं की निसर्ग याची भुरळ सर्वांनाच असते. कोकणात खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्र वाढत आहे. बहुतांशी कोकणातले चाकरमानी मुंबई कामाला असतात. मुलांना शालेय सुट्टया पडल्याने गावाकडची ओढ त्यामुळे संपूर्ण चाकरमाने कोकणात दाखल झाला. मुंबई गोवा महामार्गावर कोलाड ते खांब दरम्यान अचानक वाहतूक ट्राफिक वाढली. लांबच्या लांब वाहनांच्या रांगा रस्त्यावर दिसू लागल्या हे दृश्य पाहून पोलीसही काही वेळ गडबडले अचानक एवढी वाहतूक कशी वाढली. तातडीने पोलीस तैनात करून वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली. मुंबई गोवा महामार्गावर खांब ते पुढे वरसगाव पर्यंत आजही रस्त्याचे काम रखडले आहे.पुलाचे काम बाकी आहे त्यामुळे नाही म्हटलं तरी या परिसरात ट्रॅफिक जाम होते. मुलांना सुट्टी पडल्याने कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या खूप वाढली आहे. आज १ मे रोजी कोलाड येथे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली. थोड्या वेळा करता पोलिसांना सुद्धा सुचेनासे झाले एवढी मोठी वाहनांची गर्दी कशी काय. परिसरातील नागरिकांना वाटले की एखादा अपघात झाला असेल म्हणून इतर रस्त्याला गाड्या फिरवले असतील. परंतु पोलिसांशी संपर्क साधला असता मे महिन्याचा मुलांना सुट्टी पडल्या आहेत व एक मे महाराष्ट्र दिन सुट्टीचा दिवस आहे पुढे शनिवार रविवार सुट्ट्या पडल्याने चाकरमान्यांबरोबर पर्यटक सुद्धा कोकणात आले आहेत. त्यामुळे केवल कोलाड येथेच नव्हे तर कोकणातील पूर्ण महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक दिसत आहे. कोलाड पोलिसांची वाहतूक कोंडी सोडवण्यात दम छाक झाली. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून . वाहतूक कोंडी सुरळीत केली. पोलीस आपले काम प्रामाणिक करीत असतात. परंतु वाहन चालक हे शिस्तीचे पालन करत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होते .अशी माहिती कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्ने यांनी दिली

कोलाडात मुंबई गोवा महामार्ग ट्रॅफिक जाम . Read More »

konkandhara 2026 04 30T163754.020

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत हाणामारी झाली. अंगणात कचरा टाकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका वृद्ध दांपत्याला लाकडी काठी व दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मैमुना इस्माईल बोंदले (वय ५२) व आरोपी हे शेजारी असून त्यांच्यात गेल्या काही काळापासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. मात्र, यापूर्वी कोणतीही पोलिस तक्रार करण्यात आली नव्हती. २८ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी अर्बिना खान हिने फिर्यादीच्या अंगणात कचरा टाकला. याबाबत जाब विचारल्याने संतप्त होऊन तिने शिवीगाळ करत हातातील दगडाने मैमुना बोंदले यांच्या ओठावर प्रहार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, हा वाद सोडवण्यासाठी मैमुना यांचे पती इस्माईल बोंदले घटनास्थळी आले असता, इतर सहा आरोपींनी त्यांना घेरले. त्यावेळी मन्सूर अली खान याने लाकडी काठीने इस्माईल यांच्या पाठीवर व डोक्यावर वार केले. तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी दांपत्याला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर जखमी मैमुना बोंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अर्बिना खान, मन्सूर अली खान, महिल अझीम खान, जमीर खान, राहिल अझीम खान, शरीफा अली खान आणि शबाना मन्सूर खान या सात जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ३५१(२), ११५(२), १८९(२), १९१(२), १९० आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा Read More »

konkandhara 2026 04 30T161216.368

चिपळूण तालुका आरोग्य निरीक्षक अभिजित यादव यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव

चिपळूण : जिल्हा हिवताप कार्यालय, चिपळूण अंतर्गत कार्यरत असलेले चिपळूण तालुका आरोग्य निरीक्षक तथा प्राथमिक आरोग्य केंद्र दादर येथील श्री. अभिजित कमलाकर यादव यांची रत्नागिरी जिल्ह्यातून उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली. याप्रसंगी रत्नागिरी येथील मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर विष्णू जगताप यांच्या हस्ते श्री. यादव यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. तसेच भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कार्य करत राहावे, असे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आटले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, चिपळूण तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री. सुनील जानवलकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. श्री. अभिजित यादव हे सामाजिक, आरोग्य व सहकार क्षेत्रातही सक्रिय असून महाराष्ट्र राज्य जिल्हा हिवताप कर्मचारी संघटना शाखा रत्नागिरी उपाध्यक्ष, जिल्हा हिवताप कर्मचारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी व्हाईस चेअरमन, तालुका आरोग्य समन्वय समिती चिपळूण उपाध्यक्ष, निरंतर वैद्यकीय सेवा संस्था मर्यादित रत्नागिरी (सहकार मेडिकल) उपाध्यक्ष तसेच सूर्यमुखी मारुती मंदिर एमआयडीसी खेर्डी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चिपळूण तालुका आरोग्य निरीक्षक अभिजित यादव यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव Read More »