konkandhara.com

17 अप्रैल 2026

RAIDS Appमुळे ४ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद; रत्नागिरी पोलिसांची कारवाई

‘RAIDS App’च्या मदतीने ४ वर्षांपासून फरार आरोपीला अटक

रत्नागिरी : प्रतिनिधीरत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित “RAIDS App”च्या सहाय्याने तब्बल चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने १५ डिसेंबर २०२५ रोजी “RAIDS App” विकसित केले असून या अॅपच्या माध्यमातून गुन्हे तपासात आधुनिक तांत्रिक मदत मिळत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या सहाय्याने फरार आरोपी तसेच हरवलेल्या व्यक्तींचे फोटो अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीने (रेकन्स्ट्रक्ट) पुनर्निर्मित करण्यात येतात. त्यामुळे संबंधित व्यक्तींची ओळख पटवणे आणि मागोवा घेणे अधिक सोपे व जलद झाले आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १९६/२०२२ अन्वये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल असलेला बुधाराम रामलाल राठोड (वय ४२, मूळ रा. हिम्मत नगर, ग्रामपंचायत चंदनगुडा, ता. लोहार, जि. जोधपूर, राजस्थान) हा आरोपी चार वर्षांपासून फरार होता. तो गुजरात राज्यातील सुरत येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी “RAIDS App”च्या मदतीने त्याचा शोध घेतला. त्यानंतर आरोपी मुंबई येथे आल्याची खात्री पटताच १५ एप्रिल २०२६ रोजी पनवेल येथील कळंबोली परिसरातून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. टी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने केली. पथकात पोलीस अंमलदार वासुदेव जाधव, विनायक राठोड, बाबू पाळकर व रामजी शेख यांचा समावेश होता.

‘RAIDS App’च्या मदतीने ४ वर्षांपासून फरार आरोपीला अटक Read More »

प्रवाशांच्या समस्या सुटल्याशिवाय दुपदरीकरणाला विरोध – शौकत मुकादम

प्रवाशांच्या समस्या सोडवल्याशिवाय कोकण रेल्वे दुपदरीकरण होऊ देणार नाही – शौकत मुकादम

चिपळूण : संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग दुपदरी करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू असून सुमारे २६३ किलोमीटर मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोकणातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय दुपदरीकरणाचे काम होऊ देणार नाही, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून चिपळूण-दादर पॅसेंजर सुरू करणे, चिपळूण-कराड रेल्वे मार्गाची मागणी तसेच स्थानिक प्रवाशांच्या विविध अडचणी प्रलंबित असल्याचे नमूद केले आहे. मुकादम पुढे म्हणाले की, कोकणातून धावणाऱ्या गाड्यांचा फायदा स्थानिकांपेक्षा परप्रांतीय प्रवाशांना अधिक होत आहे. काही स्थानिकांसाठी सुरू असलेल्या गाड्या बंद करण्यात येत असून सिग्नलच्या कारणांवरून दिशाभूल केली जात आहे. मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने कोकणातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नाही तसेच बसायलाही जागा मिळत नसल्याने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र गाड्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच चिपळूण जंक्शन येथे सर्व सुपरफास्ट गाड्यांना थांबा देणे आणि दादर-चिपळूण स्वातंत्र्य गाडी सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. कोकण रेल्वेसाठी स्थानिकांनी जमीन दिली असताना त्यांच्याच प्रवासाची गैरसोय होणे अन्यायकारक असल्याचे सांगत, स्थानिकांना रेल्वे भरतीतही न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय दुपदरीकरणाचे काम होऊ देणार नाही, असा ठाम इशारा मुकादम यांनी दिला असून यामुळे कोकण रेल्वेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

प्रवाशांच्या समस्या सोडवल्याशिवाय कोकण रेल्वे दुपदरीकरण होऊ देणार नाही – शौकत मुकादम Read More »

बांधकाम कामगार समितीच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव यांची नियुक्ती

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या स्थानिक सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव

गुहागर: गुहागर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत स्थानिक सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी आमदार भास्करराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार जाधव यांच्या शिफारशीने उमेश प्रभाकर महाडिक, नदीम युसुफ काकडे, मंगेश कृष्णा माटे, सौ. साक्षी शेखर चव्हाण व सौ. वर्षा राजेंद्र चव्हाण यांची सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. या समितीमार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ कामगारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कार्य केले जाणार आहे.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या स्थानिक सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव Read More »

कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ उत्साहात

विद्यार्थ्यांनी विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करावी – सुरेश प्रभू दापोली: दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश प्रभू यांनी सांगितले की, कृषी क्षेत्रात विविध आव्हाने असली तरी त्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे. विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याच्या माध्यमातून ही क्षमता विकसित केली आहे. पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा सुमारे १४ टक्के असून उर्वरित ८६ टक्के हिस्सा सेवा व उत्पादन क्षेत्राचा आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कृषी क्षेत्र अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. कृषी पदवीधरांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानामुळे शेतीसमोरील आव्हाने वाढत असली तरी त्यामध्येच संधी शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “शेतीमध्ये जितकी संकटे तितक्याच संधी” हा दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विद्यापीठात ६५ टक्के विद्यार्थिनी शिक्षण घेत असून सुवर्णपदक विजेत्यांमध्येही मुलींचा मोठा सहभाग आहे. तसेच विद्यापीठाला ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या समारंभात कृषी, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, वनशास्त्र, उद्यानविद्या आणि मत्स्यशास्त्र अशा विविध शाखांतील डॉक्टरेट, पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध वर्षांतील सुवर्णपदके व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमास विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मकरंद करमरकर यांनी केले.

कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ उत्साहात Read More »

कासारकोळवण पुलास ६.५० कोटींची मंजुरी; ४५ वर्षांची प्रतीक्षा संपली

कासारकोळवण गावासाठी साडेसहा कोटींच्या पुलास मंजुरी; ४०-४५ वर्षांची प्रतीक्षा संपली

सावर्डे : चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील कासारकोळवण गावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेत आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून सुमारे ६.५० कोटी रुपयांच्या पुलास मंजुरी मिळाली आहे. गेल्या चार ते पाच दशकांपासून प्रलंबित असलेली ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. कासारकोळवण गावाच्या दळणवळणासाठी पूल अत्यावश्यक होता. विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यामुळे गावाचा संपर्क तुटत असे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी विधिमंडळात प्रश्न मांडत तसेच CRF (Central Road Fund) अंतर्गत निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि अखेर पुलाच्या कामास मंजुरी मिळवली. या निर्णयाची माहिती मिळताच कासारकोळवण गावातील ग्रामस्थांनी सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन आमदार निकम यांचे अभिनंदन केले व आभार मानले. यावेळी सरपंच सौ. मानसी करंबेळे, उपसरपंच प्रकाश तोरस्कर, पोलीस पाटील महेंद्र करंबेळे, तंटामुक्ती अध्यक्ष नथुराम करंबेळे, राजाराम तोरस्कर (गुरुजी), सुहास मांगले (माजी ग्रामपंचायत सदस्य), उल्हास मांगले, सोन्या मांगले, बाळकृष्ण तोरस्कर, रोशन कदम, प्रशांत करंबेळे, सदानंद करंबेळे (ग्रामपंचायत सदस्य) तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. ग्रामस्थांनी भावना व्यक्त करत हा पूल गावाच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगितले. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे मनापासून आभार मानले.

कासारकोळवण गावासाठी साडेसहा कोटींच्या पुलास मंजुरी; ४०-४५ वर्षांची प्रतीक्षा संपली Read More »

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सहभागी व्हा – आमदार भास्कर जाधव

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सर्वांनी सहभागी व्हाआमदार भास्कर जाधव यांचे आवाहन

चिपळूण : ‘माझं गाव आरोग्य संपन्न असले पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी. आरोग्यविषयक तक्रारींवर योग्य उपाय जाणून घेऊन शेवटच्या घटकापर्यंत जनजागृती पोहोचली पाहिजे. गाव ते राज्य पातळीपर्यंत सर्वांनी या मोहिमेत मिशन म्हणून सहभागी व्हावे,’ असे आवाहन गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुक्रवारी सकाळी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, संजय कदम, दीप्ती महाडिक, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले, उपसभापती बापू आयरे, सदस्य शौकत माखजनकर, विनोद झगडे, तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. अजय सानप व डॉ. ज्योती यादव यांनी आरोग्यविषयक विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. आमदार जाधव यांनी सांगितले की, या मोहिमेत सहभागी होणाऱ्या व उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत, त्यामुळे सर्व गावांनी उत्साहाने सहभाग घ्यावा. तसेच मुलींमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या एचपीव्ही लसीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. ही लस अधिकाधिक मुलींनी घ्यावी, यासाठी लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवावी, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य पर्यवेक्षक आर. के. पवार, नारायण शिंगवा, मनोहर तायडे, विनायक हेगडे, काका चव्हाण, आरोग्य सहाय्यक एस. वाय. जानवलकर आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन इकबाल चौगुले यांनी केले.

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सर्वांनी सहभागी व्हाआमदार भास्कर जाधव यांचे आवाहन Read More »

लांज्यात टेम्पो-ट्रक भीषण अपघात; चालक ठार, दोघे गंभीर

जात टेम्पो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; एक ठार

प्रतिनिधी – कोकणधारा लांजा : तालुक्यातील वाटुळ-दाभोळे मार्गावर पालू तिठा येथे शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) पहाटे साडेपाचच्या सुमारास आयशर टेम्पो आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो आणि समोरून येणारा ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली.धडक इतकी भीषण होती की आयशर टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. या अपघातात टेम्पो चालक मुजाहिद गफूर मुजावर (वय २६, रा. राजापूर, रानतळे आंबेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका वेळेवर घटनास्थळी न पोहोचल्याने मदतकार्याला उशीर झाला आणि चालकाचा जीव वाचवता आला नाही, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली. या अपघातात आयशर टेम्पोमधील आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

जात टेम्पो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; एक ठार Read More »

मुंबई-गोवा महामार्ग कामावर प्रश्नचिन्ह; गडकरींच्या डेडलाईनवर शंका

मुंबई-गोवा महामार्ग: गडकरी साहेब, घोषणांची ‘टोलवाटोलवी’ थांबवा; जमिनीवरची ‘वास्तुस्तीती’ पहा!

मुंबई-गोवा महामार्गाचे काम म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कधीही न संपणारे दुस्वप्न बनले आहे. गेली दीड दशके कोकणवासीय ज्या मार्गाची चातकासारखी वाट पाहत आहेत, त्या मार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सिंधुदुर्गातील कार्यक्रमात ‘महिन्याभरात काम पूर्ण होईल’ अशी घोषणा केली. मंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा म्हटलं, तर कोकणी माणसाच्या पदरात आजवर केवळ आश्वासनांचे तुकडेच पडले आहेत. गडकरींच्या या नव्या डेडलाईनमध्ये आणि जमिनीवरील वास्तवात इतकी मोठी दरी आहे की, आता ही घोषणा म्हणजे निव्वळ काहीतरी आश्वासन द्यायचे म्हणून मारलेली ‘फेक’ तर नाही ना, अशी शंका येते. कागदावरचा वेग आणि वास्तवातला कामातील संथपणा पाहता, हा महामार्ग पूर्ण व्हायला अजून किमान चार ते सहा महिने लागतील, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. जर पावसाळ्यापूर्वी ही कामे आटोपली नाहीत, तर कोकणी माणसाचा प्रवास पुन्हा एकदा चिखलातून, खड्ड्यातून आणि मृत्यूच्या सावटातूनच होणार, यात तीळमात्र शंका उरलेली नाही. सरकारला कोकणच्या जनतेच्या संयमाची परीक्षा घ्यायची सवयच लागली आहे, पण आता हा संयम सुटत चालला आहे. संगमेश्वरपासून पळस्पेपर्यंतचा प्रवास म्हणजे आजही अडथळ्यांची शर्यतच आहे. चिपळूण, खेड, नागोठणे, कोलाड आणि संगमेश्वर येथील उड्डाणपुलांची अवस्था पाहिल्यावर सरकारला जाब विचारायची इच्छा होते की, नेमकी कसली डेडलाईन तुम्ही जाहीर करताय? चिपळूणमधील उड्डाणपुलाची मुदत ३१ मे २०२६ पर्यंत आहे, तर मग महिनाभरात मार्ग पूर्ण होण्याच्या गमजा कशासाठी? संगमेश्वरच्या पुलाची एक बाजू उघडी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. कोलाड आणि नागोठणे येथील पुलांची कामे अजूनही रखडलेलीच आहेत. नागोठणे येथील पुलाची मुदत एप्रिल २०२६ असताना मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या आधारावर महिनाभराचा दावा केला? हा केवळ तांत्रिक विसंगतीचा मुद्दा नाही, तर हा जनतेच्या विश्वासाशी केलेला खेळ आहे. खेडच्या उड्डाणपुलाचे काम तर इतक्या संथगतीने सुरू आहे की, त्याला नेमकी डेडलाईन काय, हे सांगायलाही प्रशासनाकडे शब्द उरलेले नाहीत. परशुराम घाटातील परिस्थिती तर अजूनही भीषण आहे. तेथे एका बाजूने वाहतूक सुरू करून आपण काय साध्य केले? संरक्षक भिंतीचे काम अद्याप अनिश्चित काळासाठी लटकलेले आहे. यालाच काय ‘गतिमान विकास’ म्हणायचे? महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत बोलायचे तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. राष्ट्रीय महामार्ग म्हटल्यावर ज्या सुविधा अभिप्रेत असतात, त्यांचा मागमूसही येथे नाही. पूर्ण झालेल्या पट्ट्यांमध्येही अद्याप वीजपुरवठा नाही. रात्रीच्या वेळी काळोखात चाचपडत प्रवास करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणेच आहे. दिशादर्शक फलकांचा पत्ता नाही, त्यामुळे नवीन चालकांसाठी हा रस्ता म्हणजे एक भूलभुलैया ठरत आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे महामार्गावर बेकायदेशीरपणे ठेवलेली ‘मिडल ओपनिंग्ज’. स्थानिक राजकीय दबावातून किंवा चुकीच्या नियोजनामुळे ठेवलेली ही ओपनिंग्स म्हणजे मृत्यूचे सापळे बनले आहेत. नियमानुसार स्पीड ब्रेकरची उंची १०० मिमी आणि रुंदी ३.७ मीटर असणे आवश्यक आहे, पण येथे तर ओबडधोबड आणि मनमानी पद्धतीने गतीरोधक उभारले आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग आहे की एखाद्या ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ता, असा प्रश्न पडावा इतका निकृष्ट दर्जा येथे दिसून येतो. कंत्राटदारांवर कोणाचेही नियंत्रण नाही आणि सरकारी यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारने आता एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे की, कोकणातील जनता आता या ‘डेडलाईन’च्या खेळाला कंटाळली आहे. काम शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुलीचा विचारही सरकारने करू नये. अर्धवट रस्त्यावर टोल आकारणे म्हणजे जनतेची दिवसाढवळ्या लूट करणे होय. आधी सुरक्षा द्या, आधी रस्ता पूर्ण करा आणि मगच कराच्या गोष्टी करा. या महामार्गासाठी किती वेळा नारळ फोडले गेले, किती वेळा नवीन तारखा दिल्या गेल्या, याची गणती करणे आता कठीण झाले आहे. मागील तीन महिन्यांचा कामाचा वेग पाहिला तर २०२७ उजाडल्याशिवाय हा मार्ग पूर्णत्वास जाईल असे वाटत नाही. मग जनतेची फसवणूक कशासाठी? पावसाळा डोळ्यासमोर असताना जर कामाची गती हीच राहिली, तर पावसाच्या पाण्यात ही कामे पुन्हा वाहून जातील आणि पुढचे वर्षभर पुन्हा ‘नव्याने निविदा’ आणि ‘नव्याने डेडलाईन’चा खेळ सुरू होईल. कोकणचा विकास म्हणजे केवळ पर्यटनाच्या गप्पा मारणे नव्हे, तर कोकणला मुंबईशी जोडणारी ही जीवनवाहिनी सुरक्षित करणे आहे. पण दुर्दैवाने या जीवनवाहिनीचे रूपांतर आता ‘मृत्यूवाहिनी’त झाले आहे. सरकारला जर खरोखरच कोकणची काळजी असेल, तर त्यांनी केवळ घोषणांचा पाऊस न पाडता प्रत्यक्ष कामाची गती वाढवावी. सुरक्षेच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई का होत नाही? बेकायदेशीर गतिरोधकांमुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का? हे प्रश्न आज प्रत्येक कोकणी माणसाच्या मनात आहेत. हा प्रश्न केवळ सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्याचा नाही, तर तो विश्वासाचा आहे. ज्या कोकणाने राज्याला आणि देशाला अनेक दिग्गज दिले, त्याच कोकणाच्या हक्काच्या रस्त्याबाबत इतकी उदासीनता का? आता कोकणच्या जनतेने केवळ प्रेक्षक म्हणून राहून चालणार नाही. हा रस्ता आपल्या हक्काचा आहे आणि तो सुरक्षित प्रवास करण्यालायक मिळवणे हा आपला अधिकार आहे. सरकारला आता ठोस जाब विचारण्याची वेळ आली आहे. मंत्र्यांनी जाहीर केलेली डेडलाईन जर पाळली गेली नाही, तर प्रशासनाला रस्त्यावर उतरून जाब विचारला पाहिजे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा सावळा गोंधळ आता थांबलाच पाहिजे. हा केवळ तांत्रिक विलंब नाही, तर हे प्रशासकीय अपयश आहे. जो मार्ग तासाभरात पूर्ण व्हायला हवा, तिथे तासनतास अडकून पडणे ही कोकणची नियती असू शकत नाही. सरकारने आपल्या भाषेत ‘अमृत काळ’ आणण्याच्या गप्पा माराव्यात, पण प्रत्यक्षात कोकणच्या नशिबी हा ‘अडथळ्यांचा काळ’ कधी संपणार, याचे उत्तर द्यावे. केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून कोकणचा माणूस आता शांत बसणार नाही. हा रस्ता पूर्ण होईपर्यंत आणि प्रत्येक प्रवाशाची सुरक्षा सुनिश्चित होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील. सरकारला आता शेवटचा इशारा देण्याची वेळ आली आहे—एकतर रस्ता पूर्ण करा, नाहीतर तुमच्या फोल आश्वासनांची गाठ कोकणच्या स्वाभिमानी जनतेशी आहे, हे विसरू नका!

मुंबई-गोवा महामार्ग: गडकरी साहेब, घोषणांची ‘टोलवाटोलवी’ थांबवा; जमिनीवरची ‘वास्तुस्तीती’ पहा! Read More »