रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित “RAIDS App”च्या सहाय्याने तब्बल चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने १५ डिसेंबर २०२५ रोजी “RAIDS App” विकसित केले असून या अॅपच्या माध्यमातून गुन्हे तपासात आधुनिक तांत्रिक मदत मिळत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
या अॅपच्या सहाय्याने फरार आरोपी तसेच हरवलेल्या व्यक्तींचे फोटो अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीने (रेकन्स्ट्रक्ट) पुनर्निर्मित करण्यात येतात. त्यामुळे संबंधित व्यक्तींची ओळख पटवणे आणि मागोवा घेणे अधिक सोपे व जलद झाले आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १९६/२०२२ अन्वये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल असलेला बुधाराम रामलाल राठोड (वय ४२, मूळ रा. हिम्मत नगर, ग्रामपंचायत चंदनगुडा, ता. लोहार, जि. जोधपूर, राजस्थान) हा आरोपी चार वर्षांपासून फरार होता.
तो गुजरात राज्यातील सुरत येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी “RAIDS App”च्या मदतीने त्याचा शोध घेतला. त्यानंतर आरोपी मुंबई येथे आल्याची खात्री पटताच १५ एप्रिल २०२६ रोजी पनवेल येथील कळंबोली परिसरातून त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. टी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने केली. पथकात पोलीस अंमलदार वासुदेव जाधव, विनायक राठोड, बाबू पाळकर व रामजी शेख यांचा समावेश होता.



















