konkandhara.com

Editorial

देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडला; खळबळ

देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ

प्रतिनिधी : कोंकणधारा चिपळूण : तालुक्यातील देवखेरकी परिसरात एका हापूस आंब्याच्या बागेजवळ जळालेला मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एका निळ्या रंगाच्या बॅगेत मृतदेह ठेवून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी जळालेल्या बॅगेचे अवशेष तसेच दोन लोखंडी रॉड आढळून आले असून, ते या प्रकरणाशी संबंधित असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपूर्वी बागेत काम करणाऱ्या एका मजुराला हा मृतदेह दिसला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण असल्याने तो घाबरून गेला आणि भीतीपोटी त्याने याबाबत कोणालाही काही सांगितले नाही. अखेर, मनावरील ताण वाढल्यानंतर त्याने ही माहिती बागमालकाला दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बराच कालावधी उलटल्याने मृतदेह पूर्णपणे जळून त्याचा सांगाडा उरला असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी रत्नागिरी येथून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरील अवशेष आणि हाडांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेत सापडलेले अवशेष अल्पवयीन मुलाचे किंवा मुलीचे असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. हा प्रकार पूर्वनियोजित खून असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात किंवा आसपासच्या भागात कोणते बालक बेपत्ता आहे का, याचीही माहिती पोलिसांकडून पडताळून पाहिली जात आहे. या घटनेमुळे देवखेरकी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्हेगाराचा तातडीने शोध घेण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ Read More »

चिपळूण बाजारपेठेत छेडप्रकरण; भावाकडून मारहाण, परस्पर तक्रारी

चिपळूण बाजारपेठेत महिला कर्मचाऱ्याची छेड; भावाकडून तरुणाला मारहाण, परस्परविरोधी तक्रारी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील बाजारपेठ परिसरात एका दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची कथित छेड काढणाऱ्या तरुणाला संबंधित महिलेच्या भावाने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे बाजारपेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत चिपळूण पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि संबंधित तरुण हे दोघेही शहरातील बाजारपेठेतील एका दुकानात कामाला आहेत. कामाच्या ठिकाणी संबंधित तरुणाकडून महिलेला वारंवार त्रास दिला जात असल्याची चर्चा असून, याबाबत त्याला यापूर्वीही समज देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, समज देऊनही त्याच्या वर्तनात कोणताही बदल न झाल्याने संबंधित महिला मानसिक त्रासात होती, अशी माहिती पुढे आली आहे. शुक्रवारी दुपारी हा प्रकार पुन्हा घडल्याने महिलेच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली. याची माहिती मिळताच महिलेचा भाऊ थेट दुकानाजवळ पोहोचला.त्यानंतर संबंधित तरुणाला जाब विचारण्यात आला. या वेळी दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात महिलेच्या भावाने तरुणाला मारहाण केल्याचे समोर आले आहे.घटनेदरम्यान परिसरातील काही नागरिक आणि व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बाजारपेठेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारच्या वेळी बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने या घटनेकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. दरम्यान, या प्रकरणात संबंधित महिलेच्या बाजूने छेडछाडीबाबत तक्रार देण्यात आली असून, दुसरीकडे मारहाण झालेल्या तरुणानेही स्वतःवर हल्ला झाल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे पोलीस दोन्ही बाजूंच्या तक्रारींची पडताळणी करत असून, दुकानातील सहकारी, परिसरातील साक्षीदार तसेच उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.चिपळूण पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे समजते. महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अशा प्रकारांविषयी व्यापारी वर्तुळातही चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेमुळे बाजारपेठ परिसरात चर्चेला उधाण आले असून, नेमका प्रकार काय घडला, याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. पोलीस तपासानंतर या प्रकरणाचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

चिपळूण बाजारपेठेत महिला कर्मचाऱ्याची छेड; भावाकडून तरुणाला मारहाण, परस्परविरोधी तक्रारी Read More »

चिपळूण पाग परिसरात उड्डाणपूल; १०७.७८ कोटींच्या प्रकल्पासाठी नारायण राणे पुढाकार

चिपळूणमधील ‘पाग’ परिसरातील अपघातांना बसणार लगाम, १०७.७८ कोटींच्या उड्डाणपुलासाठी खासदार नारायण राणे यांचा पुढाकार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील ‘पाग’ व पॉवरहाऊस परिसर सध्या अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. वाढती लोकसंख्या, अवजड वाहनांची वर्दळ आणि शहरांतर्गत वाहतुकीचा ताण लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १०७ कोटी ७८ लाख रुपयांच्या वाढीव उड्डाणपुलाचा (Elevated Structure) प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. तहसील कार्यालय ते ‘पाग’ या दरम्यान उड्डाणपुलाची लांबी वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. या भागात एसटी बसेस व अवजड वाहनांमुळे अनेक गंभीर अपघात घडले असून, वाहतूक कोंडीचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी १८ जून २०२५ रोजी १०७.७८ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार केला. त्यानंतर २२ जुलै २०२५ रोजी कार्यकारी अभियंत्यांकडून हा प्रस्ताव अधीक्षक अभियंत्यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून, वार्षिक आराखड्यात या कामाचा समावेश करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. या प्रकल्पाची निकड लक्षात घेऊन खासदार नारायण राणे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. चिपळूणमधील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांची गंभीरता त्यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे शहरातील स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वेगवान वाहतूक यांचे विभाजन होऊन अपघातांमध्ये मोठी घट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या कामासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनीही पाठपुरावा केला आहे. खासदार राणे यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. साखळी क्रमांक ५१+५५० ते ५२+६२० दरम्यान प्रस्तावित असलेल्या या उड्डाणपुलामुळे चिपळूणच्या वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे.सध्या या प्रस्तावावर पुढील प्रशासकीय कार्यवाही अपेक्षित असून, केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे हा प्रकल्प लवकर मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चिपळूणमधील ‘पाग’ परिसरातील अपघातांना बसणार लगाम, १०७.७८ कोटींच्या उड्डाणपुलासाठी खासदार नारायण राणे यांचा पुढाकार Read More »

ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा गौरव रत्नागिरी, दि. २८ : दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या मूल्यमापनात २०० पैकी १४४.२५ गुण मिळवत रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यात पाचवे स्थान मिळविले. बगाटे यांनी ‘मिशन जीवन’, ‘रेड्स ॲप’, ‘मिशन गती’, ‘रत्नसेतू चॅटबॉट’सह २४ नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पोलीस यंत्रणा अधिक तंत्रस्नेही व लोकाभिमुख केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने हा सन्मान केला.

ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस अधीक्षकनितीन बगाटे यांचा गौरव

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी, दि. २८ : दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या मूल्यमापनात २०० पैकी १४४.२५ गुण मिळवत रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यात पाचवे स्थान मिळविले. बगाटे यांनी ‘मिशन जीवन’, ‘रेड्स ॲप’, ‘मिशन गती’, ‘रत्नसेतू चॅटबॉट’सह २४ नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पोलीस यंत्रणा अधिक तंत्रस्नेही व लोकाभिमुख केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने हा सन्मान केला.

ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस अधीक्षकनितीन बगाटे यांचा गौरव Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूणमध्ये बंद फ्लॅट आणि दुकानांवर चोरट्यांचा डल्ला; सीसीटीव्हीत दोघे कैद

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील पागमळा परिसरातील दोन बंद फ्लॅट तसेच मार्कंडी भागातील तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी चिपळूण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याचा बारकाईने अभ्यास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पागमळा येथील एकाच अपार्टमेंटमधील दोन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लांबविली. तर मार्कंडी परिसरात तीन दुकानांच्या शटरची पट्टी वाकवून चोरी करण्यात आली.दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित चोरटे चोरीचा प्रयत्न करताना दिसून आले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. या घटनेचा तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

चिपळूणमध्ये बंद फ्लॅट आणि दुकानांवर चोरट्यांचा डल्ला; सीसीटीव्हीत दोघे कैद Read More »

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी

प्रतिनिधी : कोकणधारा सावर्डे, दि. २७ मार्च : भारत सरकारच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांचा जवाहर नवोदय विद्यालय, पडवे येथे प्रवेशासाठी मार्ग मोकळा झाला आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातील इयत्ता पाचवीचे एकूण ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी स्वराज कर्डिले, समर्थ सोनवणे, ओम सावर्डेकर, शार्दुल गोरे, अथर्व बंडगर, दर्शन कदम, श्रीपाद धुरी आणि वसुंधरा पाटील या विद्यार्थ्यांनी यश मिळवून विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ अंतर्गत नवोदय विद्यालयांची स्थापना करण्यात आली असून, नवोदय विद्यालय समिती (NVS) या स्वायत्त संस्थेमार्फत या शाळांचे संचालन केले जाते. येथे विद्यार्थ्यांना पूर्णतः निवासी व मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.विद्यार्थ्यांच्या या यशामागे विभागप्रमुख साजिद चिकटे यांच्यासह प्रशांत सपकाळ, सुधीर कदम, अमित साळवी, मंगेश दाते, दीपक भुवड, सौ. सिद्धी सावंत, सौ. शिल्पा राजेशिर्के आणि सौ. श्रुती जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखरजी निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, उपाध्यक्ष युगंधराताई राजेशिर्के, प्रशांतजी निकम, डॉ. इसाक खतीब, सर्व संचालक, सेक्रेटरी महेश महाडिक, स्कूल कमिटी चेअरमन शांताराम खानविलकर, प्राचार्य राजेंद्र वारे आणि उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी Read More »

खेर्डीत रंगणार भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार

खेर्डीत रंगणार भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खेर्डी यांच्या वतीने खेर्डीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मा. श्री. अनिलशेठ दाभोळकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. ३० मार्च २०२६ ते बुधवार दि. १ एप्रिल २०२६ या कालावधीत खेर्डी बाजारपेठेतील “कै. अजित दादा पवार क्रीडानगरी” येथे भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खेर्डी यांच्या माध्यमातून गेल्या सलग तीन वर्षांपासून या स्पर्धेचे उत्कृष्ट व नियोजनबद्ध आयोजन केले जात असून, यंदाचे हे चौथे पर्व ठरणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे खेर्डी परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सोमवार, दि. ३० मार्च २०२६ रोजी रात्री ९ वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, जयंद्रथशेठ खताते, अनिलशेठ खताते, सौ. दिशाताई दाभोळकर, नितीन (अबुशेठ) ठसाळे, दशरथ शेठ दाभोळकर, प्रकाश शेठ साळवी यांच्यासह खेर्डीतील प्रमुख राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी खेळविण्यात येणार असून, याच दिवशी प्रमुख पाहुणे, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांच्या उपस्थितीत अनिलशेठ दाभोळकर यांचा ७० वा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील १६ नामांकित संघ सहभागी होणार असून, स्पर्धा रंगतदार आणि चुरशीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेर्डी तसेच संपूर्ण चिपळूण तालुक्यातील कबड्डी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा थरार अनुभवावा, असे आवाहन दिशा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खेर्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

खेर्डीत रंगणार भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार Read More »

उद्योजक श्रीधर (अण्णा) जाधव यांचे निधन

उद्योजक श्रीधर (अण्णा) जाधव यांचे निधन

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख, दि. २७ मार्च : संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे गावचे सुपुत्र व मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक श्रीधर मुकुंद (अण्णा) जाधव यांचे प्रदीर्घ आजाराने काल रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.श्रीधर जाधव हे मुंबई महानगर पालिकेच्या शिवसेनेच्या माजी महापौर तथा माजी नगरसेविका श्रद्धा जाधव यांचे पती होत. तसेच ते युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव यांचे वडील आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रचना महाडीक यांचे बंधू होत. त्यांचे पार्थिव आज दुपारी १ ते ३ या वेळेत अंत्यदर्शनासाठी ओमकार वेदा, ग. द. आंबेकर मार्ग, राष्ट्रीय मिल मजदूर संघ कार्यालयाजवळ, भोईवाडा, मुंबई येथे ठेवण्यात येणार आहे. श्रीधर (अण्णा) जाधव यांच्या निधनाबद्दल संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी तसेच तालुक्यातील विविध स्तरांतील नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उद्योजक श्रीधर (अण्णा) जाधव यांचे निधन Read More »

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी - मंत्री नितेश राणे मुंबई, दि. २७ मार्च : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केट उभारण्यासाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मत्स्यबाजार (फिश मार्केट) विकसित करण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत भोसले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते. मंत्री राणे यांनी सांगितले की, फिश मार्केटचे नियोजन करताना स्थानिक नागरिक आणि मच्छी विक्रेत्यांच्या सोयीचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी आधुनिक बाजारपेठ उभारल्यानंतरही पारंपरिक ठिकाणे सोडून विक्रेते नव्या ठिकाणी स्थलांतरित होत नाहीत. त्यामुळे नवीन बाजारपेठेची जागा निवडताना लोकांची ये-जा, व्यवहाराची सोय आणि स्थानिक सवयी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी प्रशासनाला जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगरपंचायत पातळीवर समन्वय साधून योग्य जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच इस्टिमेट, प्रस्ताव आणि तांत्रिक मान्यता यांसारख्या प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. मत्स्यव्यवसाय विभागाकडून आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असे आश्वासनही मंत्री राणे यांनी दिले. देवरुखमध्ये आधुनिक आणि सोयीस्कर फिश मार्केट उभारल्यास मच्छी विक्रेत्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच नागरिकांनाही स्वच्छ, नियोजित आणि सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे स्थानिक पातळीवर उत्सुकतेने पाहिले जात आहे.

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी – मंत्री नितेश राणे

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई, दि. २७ मार्च : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केट उभारण्यासाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मत्स्यबाजार (फिश मार्केट) विकसित करण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत भोसले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते. मंत्री राणे यांनी सांगितले की, फिश मार्केटचे नियोजन करताना स्थानिक नागरिक आणि मच्छी विक्रेत्यांच्या सोयीचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी आधुनिक बाजारपेठ उभारल्यानंतरही पारंपरिक ठिकाणे सोडून विक्रेते नव्या ठिकाणी स्थलांतरित होत नाहीत. त्यामुळे नवीन बाजारपेठेची जागा निवडताना लोकांची ये-जा, व्यवहाराची सोय आणि स्थानिक सवयी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी त्यांनी प्रशासनाला जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगरपंचायत पातळीवर समन्वय साधून योग्य जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच इस्टिमेट, प्रस्ताव आणि तांत्रिक मान्यता यांसारख्या प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. मत्स्यव्यवसाय विभागाकडून आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असे आश्वासनही मंत्री राणे यांनी दिले. देवरुखमध्ये आधुनिक आणि सोयीस्कर फिश मार्केट उभारल्यास मच्छी विक्रेत्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच नागरिकांनाही स्वच्छ, नियोजित आणि सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे स्थानिक पातळीवर उत्सुकतेने पाहिले जात आहे.

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी – मंत्री नितेश राणे Read More »

पत्रकार मारहाणीचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

पत्रकार मारहाणीचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाका येथे पत्रकारांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी, चिपळूण यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे सदर प्रकरणातील सर्व दोषींवर सखोल, निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दि. २५ मार्च २०२५ रोजी घडलेल्या या प्रकारामुळे चिपळूणसारख्या सुसंस्कृत शहरात अशा घटना घडणे अत्यंत अशोभनीय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पत्रकारांवरील मारहाणीच्या घटनेबाबत गुन्हा दाखल झाल्याचेही यात नमूद करण्यात आले असून, या प्रकरणातील दोषींना योग्य ती शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन (आबू) चंद्रकांत ठसाळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. भविष्यात चिपळूणमध्ये अशा प्रकारच्या घटना घडण्याचे धाडस कोणालाही होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर आणि कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. या वेळी शौकतभाई मुकादम, जयद्रथ खताते, दशरथ दाभोळकर, योगेश पवार, मनोज जाधव, सचिन साडविलकर आदी उपस्थित होते. पत्रकारांवरील या घटनेनंतर विविध सामाजिक, राजकीय आणि पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

पत्रकार मारहाणीचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी Read More »