konkandhara.com

11 मई 2026

konkandhara 2026 05 11T165530.472

वृक्ष संवर्धन व जतन ही काळाची गरज : आ. दीपक केसरकर

कुडाळमध्ये ५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन उत्साहात सिंधुदुर्ग : वृक्ष लागवड करून थांबून चालणार नाही, तर वृक्ष संवर्धन आणि जतन ही काळाची गरज आहे. केवळ फोटोसाठी वृक्षारोपण न करता प्रत्येकाने लावलेले झाड जगवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले. कुडाळ येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने आयोजित ‘५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडले. ‘जय वासुदेवानंद हॉल’ येथे झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, देवगड सभापती तन्वी चांदोस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आदर्श महाराष्ट्र भूषण सन्मानित सुयोग धस होते. यावेळी बोलताना आ. केसरकर म्हणाले की, हवामान बदलाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून निसर्गाचे चक्र विस्कळीत होत आहे. यावर मात करण्यासाठी शाश्वत विकास आणि पर्यावरण रक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड दत्तक घेऊन ते मोठे होईपर्यंत त्याचे संगोपन करावे, तरच भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरण निर्माण होईल. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनीही वाढते प्रदूषण आणि हवामान बदल यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असल्याची खंत व्यक्त केली. निसर्ग टिकला तरच मानव टिकेल, त्यामुळे वृक्ष लागवड, पाण्याचा काटकसरीने वापर आणि प्रदूषण रोखणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाची सुरुवात सकाळी ‘वृक्षदिंडी’ने झाली. कुडाळ पोलीस स्टेशन ते संमेलन स्थळ अशी ही दिंडी काढण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन व वृक्षपूजन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अंतरीय गड किल्ले संवर्धन समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांच्या शिवकालीन साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मालवण येथील पिटर शेरॉन यांच्या गडकिल्ले तैलचित्र प्रदर्शनासह प्रकाश कदम यांच्या निसर्ग फोटो गॅलरीचेही उद्घाटन झाले. ऋतुजा गवस यांनी तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनात सर्पमित्र प्रसन्ना गंगावणे, कार्मिस अल्मेडा, ज्ञानेश्वर रेडकर तसेच रक्तचळवळीत योगदान दिल्याबद्दल श्यामल मांजरेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या संमेलनात पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास आणि हवामान बदल या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळ : कुडाळ येथे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलनात आ. दीपक केसरकर यांचा संस्थेचे अध्यक्ष सुयोग धस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आशिया रिजवी, बादल बेले, जोवेल डिसिल्व्हा, बापू परब, संजय पिळणकर आदी उपस्थित होते.

वृक्ष संवर्धन व जतन ही काळाची गरज : आ. दीपक केसरकर Read More »

konkandhara 2026 05 11T113048.953

सह्याद्रि शिक्षण संस्थेचा दहावी परीक्षेत ९७ टक्के निकाल

१४७० पैकी १४२७ विद्यार्थी उत्तीर्ण; २९८ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य सावर्डे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (एसएससी) मार्च २०२६ च्या निकालात सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डे संचलित मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेच्या ३६ शाळांचा एकूण निकाल ९७ टक्के लागला असून गुणवत्तेची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे. संस्थेच्या मराठी माध्यमाच्या ३३ व इंग्रजी माध्यमाच्या ३ शाळांमधून एकूण १४७० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. स्वरा महेश खातू हिने ९८.२० टक्के गुण मिळवत संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच विद्यालयातील कु. शौर्य सुनील टाकसाळे याने ९७ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच कु. तेजस अमित राऊत आणि धोंडीराम शेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूल, खेर्डी-चिंचघरी (सती) येथील कु. हर्षवर्धन सोमनाथ भिंगे यांनी प्रत्येकी ९६ टक्के गुण मिळवत संयुक्त तृतीय क्रमांक प्राप्त केला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी २९८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली असून ५५० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४४८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १३१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. केवळ ४३ विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिले आहेत. ग्रामीण भागात कार्यरत असतानाही संस्थेच्या शाळांनी सातत्याने दर्जेदार शिक्षण देत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि संस्थेचे नियोजन यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच उपाध्यक्ष प्रशांत निकम, सौ. युगंधरा प्रकाश राजेशिर्के, डॉ. इसाक खतीब, कार्याध्यक्ष अनिरुद्ध शेखर निकम, सेक्रेटरी महेश मनोहर महाडिक, सर्व विश्वस्त, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सह्याद्रि शिक्षण संस्थेचा दहावी परीक्षेत ९७ टक्के निकाल Read More »

konkandhara 2026 05 11T110743.893

आपलं चिपळूण संस्थेची नवी कार्यकारिणी जाहीर

चिपळूण, ता. ११ : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी ओळखली जाणारी आपलं चिपळूण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेंड येथील स्प्रिंग क्लिनिकमधील संस्थेच्या कार्यालयात पार पडली. यावेळी पुढील पाच वर्षांसाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. २०१२ पासून कार्यरत असलेल्या या संस्थेने प्रसिद्धीपासून दूर राहून निःस्वार्थ भावनेने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शिक्षण, कला, क्रीडा, आरोग्य शिबिरे, निराधारांना मदत, निसर्ग संवर्धन, प्राणी-पक्षी संरक्षण, शहर सुशोभीकरण तसेच दुर्गम भागातील विद्यार्थी आणि निराधार वृद्धांना सहाय्य अशा अनेक क्षेत्रांत संस्थेचे योगदान राहिले आहे. सभेत आगामी वर्षासाठी विविध उपक्रमांचा सविस्तर आराखडा निश्चित करण्यात आला. चिपळूण शहराच्या विकासासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि नदी-नाले संवर्धन कार्यकर्त्यांसोबत चर्चासत्र आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोकणातील परंपरा आणि संस्कृतीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, पुस्तक रोटेशन योजना, गुणवंत विद्यार्थ्यांमार्फत मार्गदर्शन शिबिरे, गड-किल्ले भ्रमंती, पशु-पक्षी निरीक्षण, वृक्षलागवड, कार्बन क्रेडिट योजनेबाबत जनजागृती तसेच आरोग्य, ध्यान, मनःशांती आणि निसर्गोपचार विषयक उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या शेवटी गेल्या १४ वर्षांपासून कार्यभार सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. मावळते अध्यक्ष उदय ओतारी यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी डॉ. यतिन जाधव, कार्याध्यक्षपदी संतोष देशमुख, उपाध्यक्षपदी प्रशांत पाटेकर व मनोज जाधव, सचिवपदी उदय ओतारी, सहसचिवपदी प्रशांत देवळेकर, खजिनदारपदी फैय्याज देसाई, सहखजिनदारपदी राजू दरेकर यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून जितेंद्र सुर्वे, निहार जोशी, मंगेश गोंधळेकर, प्रसन्न आवले आणि विशाल जानवलकर यांचा समावेश करण्यात आला. ही संस्था महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असून लवकरच महिला व पुरुष सर्वसाधारण सभासदांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती विद्यमान सचिव उदय ओतारी यांनी दिली.

आपलं चिपळूण संस्थेची नवी कार्यकारिणी जाहीर Read More »