konkandhara.com

9 अप्रैल 2026

रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन लंपास; दुचाकीवरून चोरट्यांचा पळ

रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची सोन्याची चेन लांबवली

रत्नागिरी : प्रतिनिधी शहरातील हिंदू कॉलनी परिसरातून गुरुवारी सकाळी 8.15 वा.सुमारास एका युवकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरुन पोबारा केला. सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात याबाबत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. सकाळच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हिंदू कॉलनी येथील रहिवासी कांचन जैन हे गुरुवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास परिसरात असताना दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण त्यांच्याजवळ आले. यावेळी चोरट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. जैन यांना काही समजण्यापूर्वीच दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनवर झडप घातली आणि ती हिसकावून घेतली. चेन हातात लागताच चोरट्यांनी आपल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून वेगाने पलायन केले.चोरीसाठी वापरलेली दुचाकी काळ्या रंगाची असून दोन्ही आरोपी सडपातळ बांध्याचे होते. यातील एकाने तोंडाला रुमाल बांधला होता, तर एक जण उंचीने जास्त होता. हे दोन्ही चोरटे तरुण असून ते एकमेकांशी मराठी भाषेत संवाद साधत होते, असे वर्णन समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी या वर्णनाचे तरुण कुठेही संशयास्पदरीत्या दिसून आल्यास किंवा या घटनेबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची सोन्याची चेन लांबवली Read More »

आंबा घाटात चालकाची लूट; देवरूख पोलिसांनी ५ आरोपींना अटक

आंबा घाटात म्हैस वाहतूक करणाऱ्या चालकाची लूट; देवरूख पोलिसांकडून पाच जणांना बेड्या

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात दख्खननजीक बुधवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली. बांबावडेकडे बोलेरोमधून म्हैस घेऊन जाणाऱ्या चालकाला आठ जणांच्या टोळीने अडवून त्याच्याकडील २५ हजार रुपये लुटून पोबारा केला. मात्र, देवरूख पोलिसांनी या घटनेचा अत्यंत वेगाने तपास करत ५ आरोपींना तातडीने ताब्यात घेतले असून, उर्वरित ३ जणांचा कसून शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री बोलेरो चालक आंबा घाटमार्गे बांबावडेच्या दिशेने म्हैस घेऊन जात होता. गाडी दख्खन परिसराजवळ आली असता, दबा धरून बसलेल्या ८ जणांच्या टोळीने वाहन अडवले. चालकाला धमकावत या टोळीने त्याच्याकडील २५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. घाटातील या धाडसी लुटीच्या बातमीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच लांजा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी तपासाची चक्रे फिरवली. साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे, देवरूखचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर व प्रशांत साळुंखे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत ५ संशयितांना ताब्यात घेऊन या लुटीचा पर्दाफाश केला. या गुन्ह्यात सहभागी असलेले अन्य ३ आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. “फरार आरोपींची ओळख पटली असून लवकरच त्यांनाही गजाआड केले जाईल,” असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. पोलिसांच्या या जलद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आंबा घाटात म्हैस वाहतूक करणाऱ्या चालकाची लूट; देवरूख पोलिसांकडून पाच जणांना बेड्या Read More »

रत्नागिरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दोन घरांतून ३८ हजारांची रोकड लंपास

रत्नागिरीत दिवसाढवळ्या दोन घरे फोडली; ३८ हजारांची रोकड लंपास

रत्नागिरी : प्रतिनिधीतालुक्यातील तरवळ मायंगडेवाडी येथ्ाील दोन घरे फोडून रोख 38 हजार रुपये लांबवले. घरफोडीची ही घटना रविवार 5 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास घडली आहे.आदित्य देवचंद कांबळे (26,रा.बालाजी अपार्टमेंट कारवांचीवाडी फाटा,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात विरेश प्रकाश मायंगडे (29),प्रज्योत रविंद्र मायंगडे (23,दोन्ही रा.तरवळ मायंगडेवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, संशयिताने विरेश मायंगडे यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाच्या ड्रॉव्हरमधील रोख 33 हजार रुपये चोरुन नेले. तर प्रज्योत मायंगडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयिताने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून घरातील भिंतीमध्ये असलेल्या उघड्या कपाटातील छोट्या पाकिटात ठेवलेले रोख 5 हजार रुपये लांबवले. दरम्यान, या घरफोड्या करुन पळून जात असताना संशयित आदित्य कांबळेला विरेश मायंगडे आणि सर्वेश मायंगडे यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना धक्काबुक्की करुन पळ काढला.

रत्नागिरीत दिवसाढवळ्या दोन घरे फोडली; ३८ हजारांची रोकड लंपास Read More »

रत्नागिरीत क्रेडिट कार्ड इन्शुरन्सच्या नावाखाली ८८ हजारांची फसवणूक

रत्नागिरीत ‘क्रेडिट कार्ड इन्शुरन्स’च्या नावाखाली तरुणाला ८८ हजारांचा गंडा

रत्नागिरी : प्रतिनिधीएसबीआय क्रेडिट कार्डचे इन्शूरन्स डिॲक्टिवेट करण्याची प्रोसेस सांगण्याच्या नावाखाली अज्ञाताने तरुणाचे तब्बल 88 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 12 फेब्रुवारी 2026 रोज्ाी दुपारी 12.30 ते 1.11 वा.कालावधीत टिआरपी येथील यामाहा शोरुममध्ये घडली आहे. प्रसाद रघूनाथ यादव (31,रा.सौम्या रेसिडेन्सी श्रीरामनगर नाचणे,रत्नागिरी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात सोमवार 6 एप्रिल रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 12 फेब्रुवारी रोजी प्रसाद यादव हे टिआरपी येथील यामाहा शोरुममध्ये नोकरी निमित्त असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने एसबीआय क्रेडिट कार्ड नावाने फोन केला. त्यानंतर त्याने फिर्यादीला एसबीआय क्रेडिट कार्डवर इन्शूरन्सबाबत विचारणा करुन त्याचा इन्शूरन्स डिॲक्टिवेट करण्याची फोसेस सांगण्यास सुरुवात केली. हे संभाषण होत असताना त्या अज्ञाताने फिर्यादीच्या व्हॉटसॲपवर लिंक पाठवून त्याव्दारे फिर्यादीची वैयक्तिक माहिती भरुन घेतली. त्यानंतर फिर्यादीच्या क्रेडिट कार्डवरुन 87 हजार 642 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

रत्नागिरीत ‘क्रेडिट कार्ड इन्शुरन्स’च्या नावाखाली तरुणाला ८८ हजारांचा गंडा Read More »

रत्नागिरीत महिला विक्रेत्याची ४० हजारांची रोकड लंपास; पोलिस तपास सुरू

विक्रेत्याची 40 हजारांची रोकड लंपास ; पोलिसांकडून तपासाला वेग

रत्नागिरी : प्रतिनिधीशहरातील विठ्ठल मंदिर परिसरात मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी सायंकाळी चोरीची घटना घडली. ग्राहकाचा वेश धारण करून आलेल्या महिला चोरट्यांच्या टोळीने एका महिला विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून तिची 40 हजार रुपयांची रोकड असलेली पर्स अत्यंत चलाखीने लंपास केली. या प्रकारामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना शुक्रवार 3 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वा. सुमारास विठ्ठल मंदिर परिसरात घडली. काही संशयित महिला बाजारपेठेत खरेदीचा बहाणा करत फिरत होत्या.त्यांनी केळी विकणाऱ्या एका महिलेकडे जात केळीचा दर विचारला. विक्रेत्याने 80 रुपये डझन असा दर सांगताच, या महिलांनी जाणीवपूर्वक भावतोल करत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यातील एक महिला विक्रेत्याचे लक्ष विचलित करत असतानाच, इतर महिलांनी आजूबाजूला गर्दीचा बनाव केला. याच संधीचा फायदा घेत टोळीतील एका मुलीने विक्रेत्याच्या शेजारी ठेवलेली पर्स लंपास केली.पर्स गायब झाल्याचे लक्षात येताच विक्रेत्याने आरडाओरड केली, मात्र गर्दीचा फायदा घेत ही टोळी तेथून पसार झाली होती. चोरी गेलेल्या पर्समध्ये विक्रेत्याने पिग्मी खात्यातून काढलेली 40 हजार रुपयांची रोकड होती. धक्कादायक बाब म्हणजे याच सुमारास परिसरातील दुसऱ्या एका फळ विक्रेत्या महिलेकडूनही एका महिलेने एक किलो काजूगर लंपास केल्याचे समोर आले आहे. या सलग घटनांमुळे ही टोळी बाजारपेठेत वेगवेगळ्या ठिकाणी सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास यंत्रणा राबवली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. बाजारपेठेत पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी आता जोर धरत असून अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विक्रेत्याची 40 हजारांची रोकड लंपास ; पोलिसांकडून तपासाला वेग Read More »

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे १० एप्रिल रोजी आपल्या वयाच्या ७५ व्या वर्षात, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या विशेष दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि चाहत्यांनी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यास उत्साहात सुरुवात केली आहे. या औचित्याने आज सकाळी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी चरणी खा. राणे यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उदंड आयुष्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. श्री सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ आणि आमदार श्री. निलेश राणे मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत श्री देव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी आणि ७५ विडे यांची आकर्षक आरास मांडून श्रद्धापूर्वक अर्पण केली.या धार्मिक कार्यक्रमाला भाजपचे आणि राणे समर्थक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अशोक वाडेकर, नित्यानंद दळवी, शिवाजी कारेकर, अमोल देसाई, निखिल शेट्ये, अभिलाश पिलणकर, सोहम पिलणकर, विशाल कांबळे, राजू झगडे, नरेश बनसोडे आणि अमृत गोरे यांचा समावेश होता.खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात पुढील काही दिवस विविध विधायक उपक्रम राबवले जाणार आहेत.

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास Read More »

देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत अटकेत

देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत जेरबंद

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट परिसरात गाडी अडवून चाकूचा धाक दाखवत चालकाकडून २५ हजार रुपये लुटणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना देवरुख पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली. या प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) हे बोलेरो गाडीतून वेतोशी (ता. रत्नागिरी) येथून शिराळा (जि. सांगली) येथे म्हैस घेऊन जात असताना आंबा घाटातील दख्खन परिसरात दोन गाड्यांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी त्यांना खाली उतरवून मारहाण, शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवले. त्यानंतर साखरपा येथील गंद्रे पेट्रोलपंपाजवळ नेऊन फिर्यादीला अर्ध्या वाटेत सोडून आरोपींनी पळ काढला. यावेळी आरोपींनी ५० हजार रुपयांची मागणी करत गाडीतील २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले तसेच पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी साखरपा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच देवरुख पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून पाच आरोपींना अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.या गुन्ह्यात फरहान रशीद मुल्ला (४२), प्रथमेश सचिन भाटकर (२४), सर्वेश सुभाष किर (२२), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (२६) व भूषण बिपेंद्र सावंत (२६, सर्व रा. रत्नागिरी) यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत जेरबंद Read More »

चिपळूणमध्ये RPL 2026 दिमाखात; केदारनाथ खरवते विजेता, विशू इलेव्हन उपविजेता

चिपळूणमध्ये पहिलीच ‘रत्नागिरी प्रीमियर लीग २०२६’ दिमाखात संपन्न, केदारनाथ स्पोर्ट्स क्लब खरवते विजेता; विशू इलेव्हन चिपळूण उपविजेता

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : येथील ऐतिहासिक पावन तलाव मैदानावर प्रथमच आयोजित करण्यात आलेली रत्नागिरी प्रीमियर लीग (आरपीएल) २०२६ ही भव्य डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दोन दिवस रंगतदार वातावरणात पार पडली. हजारो क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने झालेल्या या स्पर्धेत केदारनाथ क्रिकेट क्लब, खरवते संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर विसू इलेव्हन, चिपळूण संघाने उपविजेतेपद मिळवले. अंतिम सामना एकतर्फी ठरला असून केदारनाथ खरवते संघाने आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला भावेश पवार, ज्याने अंतिम सामन्यात ६ गडी बाद करत आणि फलंदाजीतही चमकदार कामगिरी करत सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. या स्पर्धेचे उद्घाटन ६ एप्रिल रोजी आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरसेवक योगेश पवार, विकी नरळकर, कपिल शिर्के, गणेश अग्रे, राष्ट्रवादीचे नेते जयंद्रथ खताते, केतन पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. प्रथमेश पवार, रितेश घाग आणि युवराज कुरूप या तीन मित्रांनी एकत्र येऊन रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच अशी भव्य रत्नागिरी प्रीमियर लीग यशस्वीपणे साकारली. स्पर्धेदरम्यान लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, नगरसेवक अंकुश आवले, राणी महाडिक, उमेश काटकर, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध निकम, परिमल भोसले, पिंट्या पाकळे, विकी लवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील उपांत्य सामनेही तितकेच रंगतदार ठरले. पहिल्या उपांत्य फेरीत अब्दुल कादिर कोकणी बॉईज विरुद्ध विशू इलेव्हन सामना झाला असून त्यात विशू इलेव्हन विजयी झाला, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत सुधीर स्पोर्ट्स, चिपळूण आणि केदारनाथ खरवते यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. हा सामना सुपर ओव्हरपर्यंत रंगला आणि त्यात केदारनाथ खरवते संघाने बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेतील विविध वैयक्तिक पुरस्कारही मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अब्दुल कादिर कोकणी बॉईज संघाचा नाझीम फकी याचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार विशू इलेव्हन, चिपळूण संघाच्या सौरभ पवार याला मिळाला, तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून मकरंद पवार याचा सन्मान करण्यात आला. इमर्जिंग प्लेयर पुरस्कार विशू इलेव्हनच्या मुकुंद पेजले याला मिळाला. अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार भावेश पवार याने पटकावला. ऑल इंडिया आयकॉन सिरीजमध्येही भावेश पवार याने बाजी मारत ४२ इंची टीव्ही जिंकला. याशिवाय सर्व विशेष पुरस्कार विजेत्यांना आकर्षक चषकासह ३२ इंची कलर टीव्ही देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठेचा मालिकावीर पुरस्कार केदारनाथ खरवते संघाच्या सुदर्शन मयेकर याला प्रदान करण्यात आला. त्याला टीव्हीएस रेडर मोटारसायकल आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्या केदारनाथ क्रिकेट क्लब, खरवते संघाला रु. २,२२,२२२ रोख पारितोषिक आणि आरपीएल २०२६ चषक, तर उपविजेत्या विशू इलेव्हन, चिपळूण संघाला रु. १,११,१११ आणि आरपीएल २०२६ उपविजेता चषक प्रदान करण्यात आला. भव्य फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी अनिरुद्ध निकम, संदेश आयरे, ऋग्वेद पवार, मुन्ना देसाई (हातखंबा), गणेश सावर्डेकर, सतीश सावर्डेकर, अजित शिगवण (रणजी, गोवा), उमेश राजशिर्के, देवराज गरगटे, समीर काजी, अमोल सुर्वे, मनोहर घाग, अरुण घाग आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेला समालोचनाचीही विशेष रंगत लाभली. आयपीएलचा आवाज म्हणून ओळखले जाणारे, कुणाल दाते, विविध राज्यांमध्ये समालोचन करणारे प्रशांत आदवडेकर, बाबल्या जाधव, तसेच सिद्दिक मेमन आणि जयेश पोटफोडे यांनी स्पर्धेचे थरारक समालोचन करत वातावरण भारावून टाकले. एकूणच, प्रथमेश पवार, रितेश घाग आणि युवराज कुरूप यांनी केलेल्या या भव्य आयोजनाचे रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो क्रीडा रसिकांनी आणि क्रिकेटप्रेमींनी मनापासून कौतुक केले. रत्नागिरी प्रीमियर लीग २०२६ ही स्पर्धा जिल्ह्यातील क्रिकेटविश्वात एक नवा मानदंड निर्माण करणारी ठरली आहे.

चिपळूणमध्ये पहिलीच ‘रत्नागिरी प्रीमियर लीग २०२६’ दिमाखात संपन्न, केदारनाथ स्पोर्ट्स क्लब खरवते विजेता; विशू इलेव्हन चिपळूण उपविजेता Read More »