konkandhara.com

कोकणची बातमी

मुचरी गवळीवाडी–कलबस्ते फाटा रस्ता मंजूर; आमदार शेखर निकम यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन

मुचरी गवळीवाडी–कलबस्ते फाटा रस्ता मंजूर;आमदार शेखर निकम यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन

प्रतिनिधी : कोंकणधारा चिपळूण/संगमेश्वर : गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून रखडलेला आणि अत्यंत खराब अवस्थेत असलेला मुचरी गवळीवाडी ते कलबस्ते फाटा हा रस्ता अखेर मंजूर झाला आहे. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्यासाठी चालू अर्थसंकल्पात तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून आमदार निकम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी मुचरी गवळीवाडी येथील थोर समाजसेवक टोपरे साहेब (तालुकाप्रमुख), राजेंद्र पोमेंडकर (वाडी अध्यक्ष), पांडुरंग तटकरे, शांताराम टोपरे, अनंत भोजने, सुजन तटकरे, रघुनाथ भालेकर, संकेत खामकर, अनंत घवाली आदींसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आमदारांचे आभार मानले. तसेच, आमदार शेखर निकम यांनी गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही लवकरच करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमदार निकम यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.

मुचरी गवळीवाडी–कलबस्ते फाटा रस्ता मंजूर;आमदार शेखर निकम यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन Read More »

पत्रकारांवर हल्ला; चिपळूणमध्ये आंदोलनाचा इशारा

पत्रकारांवर हल्ला प्रकरण; चिपळूणमध्ये पत्रकार आंदोलनाच्या तयारीत

प्रतिनिधी : कोंकणधारा चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथे दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने चिपळूणमधील पत्रकारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आंदोलनाची जोरदार तयारी सुरू केली असून, लवकरच रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. बुधवार (दि. २५) रोजी चिपळूण नागरी पतसंस्थेविरोधात बहादूरशेख नाका येथे काहीजण उपोषणास बसणार होते. या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावर काही गुंडांनी अचानक हल्ला करत बेदम मारहाण केली. या वेळी त्यांचा मोबाईल आणि अन्य साहित्यही चोरून नेण्यात आले. या घटनेचे व्हिडिओ उपस्थित नागरिकांनी मोबाईलवर चित्रीत केले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत असूनही पोलिसांकडून अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही, याबाबत पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी ‘महाराष्ट्र पत्रकार व प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी प्रतिबंध) कायदा, २०१७’ अंतर्गत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. तरीदेखील अपेक्षित ती तत्पर कारवाई होत नसल्याची भावना पत्रकारांमध्ये आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत पत्रकारांनी स्पष्ट इशारा दिला की, पुढील चार दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास प्रथम शहरातून मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून, गरज पडल्यास जिल्हास्तरावरही आंदोलन छेडले जाईल. पत्रकारांवरील हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून तो लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला मानला जातो. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी तातडीने, निष्पक्ष आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांकडून होत आहे. तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

पत्रकारांवर हल्ला प्रकरण; चिपळूणमध्ये पत्रकार आंदोलनाच्या तयारीत Read More »

गुहागरमध्ये एप्रिलमध्ये कासव महोत्सव; पर्यटकांना अनोखा निसर्गानुभव देण्याची तयारी

गुहागरमध्ये एप्रिलमध्ये कासव महोत्सव; पर्यटकांना अनोखा निसर्गानुभव देण्याची तयारी

प्रतिनिधी : कोंकणधारा गुहागर : एप्रिल महिन्यात गुहागर येथे कासव महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय नगर पंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यावसायिक, पर्यटनप्रेमी आणि नागरिकांना महोत्सवाचे प्रात्यक्षिक कांदळवन प्रतिष्ठानतर्फे दाखविण्यात येणार आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या ६ कासव संवर्धन केंद्रे उभारण्यात आली असून, येथून दररोज कासवांची पिल्ले समुद्रात सोडली जातात. हा निसर्गरम्य आणि दुर्मीळ अनुभव पर्यटकांना प्रत्यक्ष पाहता यावा, तसेच वनविभागाच्या शेड्युल ‘अ’ श्रेणीतील ऑलिव्ह रिडले कासवांच्या जीवनचक्राची माहिती मिळावी, यासाठी कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे गुहागरच्या समुद्र पर्यटनालाही चालना मिळणार आहे. या संदर्भात नगराध्यक्ष नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, नगरसेवक, मुख्याधिकारी, पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय वनाधिकारी किरण ठाकूर, वेळास कासव महोत्सवाचे प्रणेते भाऊ काटदरे आणि कांदळवन प्रतिष्ठानचे मोहन उपाध्ये उपस्थित होते. भाऊ काटदरे यांनी कासव महोत्सवाच्या यशासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कासव संवर्धनाशी संबंधित सर्व कामे वनविभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानकडूनच केली जातील, नागरिकांनी त्यात हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पर्यटकांना योग्य मार्गदर्शन, नियमांचे पालन आणि गुहागरचा इतिहास, निसर्गसौंदर्य, पक्षीनिरीक्षण व धार्मिक पर्यटन यांची जोड देऊन पर्यटकांचा मुक्काम वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. मोहन उपाध्ये यांनी कासव संवर्धनातील नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित केली. कासवांच्या पिल्लांना हाताळणे किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांचा वापर करून जाहिरात करणे टाळावे, तसेच मोठ्या पर्यटन संस्थांकडून होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांना सुरुवातीपासूनच आळा घालावा, असे त्यांनी सांगितले.

गुहागरमध्ये एप्रिलमध्ये कासव महोत्सव; पर्यटकांना अनोखा निसर्गानुभव देण्याची तयारी Read More »

आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटकाचा बुडून मृत्यू; एकाचा जीव वाचला

आरे-वारे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; पर्यटकाचा बुडून मृत्यू, एकाचा जीव वाचला

प्रतिनिधी : कोंकणधारा रत्नागिरी : निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील दोन सदस्य समुद्रात बुडाले असून, त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाला स्थानिकांच्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर आणि विरार परिसरातील एक कुटुंब रविवारी सकाळी आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास समुद्रात उतरलेल्या संतोष शशिकांत भानुशाली आणि सुयोग राजेश भानुशाली यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ओहोटीच्या प्रवाहाने आत ओढले. त्यामुळे दोघेही बुडू लागले. यावेळी किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी तसेच पोलीस पाटील आदेश कदम यांनी तात्काळ समुद्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुयोग राजेश भानुशाली (वय २१, रा. विरार) याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र, संतोष शशिकांत भानुशाली (रा. पालघर) यांचा या घटनेत मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे भानुशाली कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

आरे-वारे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; पर्यटकाचा बुडून मृत्यू, एकाचा जीव वाचला Read More »

गॅस टंचाईचा फटका; गणपतीपुळेतील हॉटेल्स बंद,

गॅस टंचाईचा फटका; गणपतीपुळेतील हॉटेल्स बंद,देवस्थानकडून महाप्रसादाची वेळ वाढवली

प्रतिनिधी : कोंकणधारा रत्नागिरी : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्याने गणपतीपुळे परिसरातील अनेक हॉटेल्स बंद पडली आहेत. यामुळे भाविकांची गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे देवस्थान समितीने स्वयंभू श्री गणपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या मोफत महाप्रसादाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळेनुसार, दुपारच्या सत्रातील महाप्रसाद दुपारी १२.१५ ते ३ वाजेपर्यंत, तर सायंकाळच्या सत्रात सायंकाळी ७.१५ ते ८.४५ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. यापूर्वी ही वेळ अनुक्रमे दुपारी १२.१५ ते २ आणि सायंकाळी ७.१५ ते रात्री ८.१५ अशी होती. दरम्यान, गॅस टंचाईमुळे लाडू प्रसाद सध्या बंद ठेवण्यात आला आहे. लाडू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅस लागतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे.

गॅस टंचाईचा फटका; गणपतीपुळेतील हॉटेल्स बंद,देवस्थानकडून महाप्रसादाची वेळ वाढवली Read More »

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; गणपतीपुळे–चाफे मार्गावरील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; गणपतीपुळे–चाफे मार्गावरील घटना

प्रतिनिधी : कोंकणधारा रत्नागिरी : तालुक्यातील जयगड सागरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत गणपतीपुळे–चाफे मुख्य मार्गावर शनिवारी (दि. २८ मार्च) सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश मधुकर साळवी (वय ५६, मूळ रा. फणसोप, रत्नागिरी, सध्या रा. रामरोड, गणपतीपुळे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सकाळी ७ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास चाफे ते गणपतीपुळे मार्गावर नेहमीप्रमाणे चालण्यासाठी गेले होते. याचदरम्यान, त्या मार्गावरून वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते रस्त्यावरच कोसळले. आसपासच्या ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड–गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी करत आहेत.

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; गणपतीपुळे–चाफे मार्गावरील घटना Read More »

देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडला; खळबळ

देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ

प्रतिनिधी : कोंकणधारा चिपळूण : तालुक्यातील देवखेरकी परिसरात एका हापूस आंब्याच्या बागेजवळ जळालेला मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एका निळ्या रंगाच्या बॅगेत मृतदेह ठेवून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी जळालेल्या बॅगेचे अवशेष तसेच दोन लोखंडी रॉड आढळून आले असून, ते या प्रकरणाशी संबंधित असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपूर्वी बागेत काम करणाऱ्या एका मजुराला हा मृतदेह दिसला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण असल्याने तो घाबरून गेला आणि भीतीपोटी त्याने याबाबत कोणालाही काही सांगितले नाही. अखेर, मनावरील ताण वाढल्यानंतर त्याने ही माहिती बागमालकाला दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बराच कालावधी उलटल्याने मृतदेह पूर्णपणे जळून त्याचा सांगाडा उरला असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी रत्नागिरी येथून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरील अवशेष आणि हाडांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेत सापडलेले अवशेष अल्पवयीन मुलाचे किंवा मुलीचे असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. हा प्रकार पूर्वनियोजित खून असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात किंवा आसपासच्या भागात कोणते बालक बेपत्ता आहे का, याचीही माहिती पोलिसांकडून पडताळून पाहिली जात आहे. या घटनेमुळे देवखेरकी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्हेगाराचा तातडीने शोध घेण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ Read More »

चिपळूण पाग परिसरात उड्डाणपूल; १०७.७८ कोटींच्या प्रकल्पासाठी नारायण राणे पुढाकार

चिपळूणमधील ‘पाग’ परिसरातील अपघातांना बसणार लगाम, १०७.७८ कोटींच्या उड्डाणपुलासाठी खासदार नारायण राणे यांचा पुढाकार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील ‘पाग’ व पॉवरहाऊस परिसर सध्या अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. वाढती लोकसंख्या, अवजड वाहनांची वर्दळ आणि शहरांतर्गत वाहतुकीचा ताण लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १०७ कोटी ७८ लाख रुपयांच्या वाढीव उड्डाणपुलाचा (Elevated Structure) प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. तहसील कार्यालय ते ‘पाग’ या दरम्यान उड्डाणपुलाची लांबी वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. या भागात एसटी बसेस व अवजड वाहनांमुळे अनेक गंभीर अपघात घडले असून, वाहतूक कोंडीचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी १८ जून २०२५ रोजी १०७.७८ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार केला. त्यानंतर २२ जुलै २०२५ रोजी कार्यकारी अभियंत्यांकडून हा प्रस्ताव अधीक्षक अभियंत्यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून, वार्षिक आराखड्यात या कामाचा समावेश करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. या प्रकल्पाची निकड लक्षात घेऊन खासदार नारायण राणे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. चिपळूणमधील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांची गंभीरता त्यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे शहरातील स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वेगवान वाहतूक यांचे विभाजन होऊन अपघातांमध्ये मोठी घट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या कामासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनीही पाठपुरावा केला आहे. खासदार राणे यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. साखळी क्रमांक ५१+५५० ते ५२+६२० दरम्यान प्रस्तावित असलेल्या या उड्डाणपुलामुळे चिपळूणच्या वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे.सध्या या प्रस्तावावर पुढील प्रशासकीय कार्यवाही अपेक्षित असून, केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे हा प्रकल्प लवकर मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चिपळूणमधील ‘पाग’ परिसरातील अपघातांना बसणार लगाम, १०७.७८ कोटींच्या उड्डाणपुलासाठी खासदार नारायण राणे यांचा पुढाकार Read More »

ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा गौरव रत्नागिरी, दि. २८ : दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या मूल्यमापनात २०० पैकी १४४.२५ गुण मिळवत रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यात पाचवे स्थान मिळविले. बगाटे यांनी ‘मिशन जीवन’, ‘रेड्स ॲप’, ‘मिशन गती’, ‘रत्नसेतू चॅटबॉट’सह २४ नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पोलीस यंत्रणा अधिक तंत्रस्नेही व लोकाभिमुख केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने हा सन्मान केला.

ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस अधीक्षकनितीन बगाटे यांचा गौरव

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी, दि. २८ : दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या मूल्यमापनात २०० पैकी १४४.२५ गुण मिळवत रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यात पाचवे स्थान मिळविले. बगाटे यांनी ‘मिशन जीवन’, ‘रेड्स ॲप’, ‘मिशन गती’, ‘रत्नसेतू चॅटबॉट’सह २४ नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पोलीस यंत्रणा अधिक तंत्रस्नेही व लोकाभिमुख केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने हा सन्मान केला.

ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस अधीक्षकनितीन बगाटे यांचा गौरव Read More »

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी

प्रतिनिधी : कोकणधारा सावर्डे, दि. २७ मार्च : भारत सरकारच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांचा जवाहर नवोदय विद्यालय, पडवे येथे प्रवेशासाठी मार्ग मोकळा झाला आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातील इयत्ता पाचवीचे एकूण ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी स्वराज कर्डिले, समर्थ सोनवणे, ओम सावर्डेकर, शार्दुल गोरे, अथर्व बंडगर, दर्शन कदम, श्रीपाद धुरी आणि वसुंधरा पाटील या विद्यार्थ्यांनी यश मिळवून विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ अंतर्गत नवोदय विद्यालयांची स्थापना करण्यात आली असून, नवोदय विद्यालय समिती (NVS) या स्वायत्त संस्थेमार्फत या शाळांचे संचालन केले जाते. येथे विद्यार्थ्यांना पूर्णतः निवासी व मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.विद्यार्थ्यांच्या या यशामागे विभागप्रमुख साजिद चिकटे यांच्यासह प्रशांत सपकाळ, सुधीर कदम, अमित साळवी, मंगेश दाते, दीपक भुवड, सौ. सिद्धी सावंत, सौ. शिल्पा राजेशिर्के आणि सौ. श्रुती जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखरजी निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, उपाध्यक्ष युगंधराताई राजेशिर्के, प्रशांतजी निकम, डॉ. इसाक खतीब, सर्व संचालक, सेक्रेटरी महेश महाडिक, स्कूल कमिटी चेअरमन शांताराम खानविलकर, प्राचार्य राजेंद्र वारे आणि उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी Read More »