रत्नागिरी नगर परिषदेची थकबाकीदारांवर कारवाई; ११० मालमत्ता सील, ७० नळजोडण्या खंडित
प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेअंतर्गत असलेल्या ३१ हजार मालमत्तांपैकी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी प्रशासनाने मोहीम तीव्र केली असून, आर्थिक वर्षअखेरीस थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. नगर परिषदेने ११० मालमत्तांना सील ठोकले, तर ७० नळपाणी जोडण्या तोडल्या आहेत. नगर परिषद प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षासाठी १५ कोटी ८७ लाख ५० हजार ६४८ रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३१ मार्चअखेर ११ कोटी ६२ लाख ७ हजार ८३९ रुपये वसूल करण्यात आले असून, ही ७३.२० टक्के वसुली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष समाप्तीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडून घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर करांची वसुली अधिक तीव्र करण्यात आली होती. शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांना वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारला. या मोहिमेत थकबाकीदार नागरिकांवर कारवाई करताना ७० नळपाणी वाहिन्यांच्या जोडण्या खंडित करण्यात आल्या, तर ११० मालमत्तांवर सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.ही विशेष वसुली मोहीम मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेत कर अधिकारी नरेश आखाडे, उत्तम पाटील, सागर सुर्वे, हेमंत वायंगणकर, प्रशांत वरक, प्रथमेश शिवलकर, राजेंद्र पवार, निरंजन जाधव तसेच वसुली पथकाने सक्रिय सहभाग घेतला.
रत्नागिरी नगर परिषदेची थकबाकीदारांवर कारवाई; ११० मालमत्ता सील, ७० नळजोडण्या खंडित Read More »









