konkandhara.com

29 मार्च 2026

मुचरी गवळीवाडी–कलबस्ते फाटा रस्ता मंजूर; आमदार शेखर निकम यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन

मुचरी गवळीवाडी–कलबस्ते फाटा रस्ता मंजूर;आमदार शेखर निकम यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन

प्रतिनिधी : कोंकणधारा चिपळूण/संगमेश्वर : गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून रखडलेला आणि अत्यंत खराब अवस्थेत असलेला मुचरी गवळीवाडी ते कलबस्ते फाटा हा रस्ता अखेर मंजूर झाला आहे. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्यासाठी चालू अर्थसंकल्पात तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून आमदार निकम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी मुचरी गवळीवाडी येथील थोर समाजसेवक टोपरे साहेब (तालुकाप्रमुख), राजेंद्र पोमेंडकर (वाडी अध्यक्ष), पांडुरंग तटकरे, शांताराम टोपरे, अनंत भोजने, सुजन तटकरे, रघुनाथ भालेकर, संकेत खामकर, अनंत घवाली आदींसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आमदारांचे आभार मानले. तसेच, आमदार शेखर निकम यांनी गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही लवकरच करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमदार निकम यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.

मुचरी गवळीवाडी–कलबस्ते फाटा रस्ता मंजूर;आमदार शेखर निकम यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन Read More »

पत्रकारांवर हल्ला; चिपळूणमध्ये आंदोलनाचा इशारा

पत्रकारांवर हल्ला प्रकरण; चिपळूणमध्ये पत्रकार आंदोलनाच्या तयारीत

प्रतिनिधी : कोंकणधारा चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथे दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने चिपळूणमधील पत्रकारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आंदोलनाची जोरदार तयारी सुरू केली असून, लवकरच रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. बुधवार (दि. २५) रोजी चिपळूण नागरी पतसंस्थेविरोधात बहादूरशेख नाका येथे काहीजण उपोषणास बसणार होते. या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावर काही गुंडांनी अचानक हल्ला करत बेदम मारहाण केली. या वेळी त्यांचा मोबाईल आणि अन्य साहित्यही चोरून नेण्यात आले. या घटनेचे व्हिडिओ उपस्थित नागरिकांनी मोबाईलवर चित्रीत केले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत असूनही पोलिसांकडून अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही, याबाबत पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी ‘महाराष्ट्र पत्रकार व प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी प्रतिबंध) कायदा, २०१७’ अंतर्गत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. तरीदेखील अपेक्षित ती तत्पर कारवाई होत नसल्याची भावना पत्रकारांमध्ये आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत पत्रकारांनी स्पष्ट इशारा दिला की, पुढील चार दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास प्रथम शहरातून मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून, गरज पडल्यास जिल्हास्तरावरही आंदोलन छेडले जाईल. पत्रकारांवरील हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून तो लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला मानला जातो. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी तातडीने, निष्पक्ष आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांकडून होत आहे. तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

पत्रकारांवर हल्ला प्रकरण; चिपळूणमध्ये पत्रकार आंदोलनाच्या तयारीत Read More »

मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल

मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी : कोंकणधारा मंडणगड : तालुक्यातील शिरगाव येथे पाण्याचे इलेक्ट्रिक पंप चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून या प्रकरणी चार संशयितांविरोधात मंडणगड पोलीस स्थानकात २६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर कनोजिया (३०), मोहित कनोजिया (२१) दोघेही रा. महाड, तसेच आकाश पवार (२५) व अविनाश जाधव (२१) दोघेही रा. आकले या चौघांचा यात समावेश आहे. पहिली घटना २५ मार्च रोजी शिरगाव गोमुख येथे घडली. याबाबत सुनील पाटील (४६, व्यवसाय पंपचालक, रा. शिरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी पंपहाऊसच्या दरवाजाच्या खालच्या बाजूच्या फळ्या उचकटून आत प्रवेश केला आणि सुमारे दहा हजार रुपये किंमतीचा पाच एच.पी. क्षमतेचा बंद स्थितीतील पाण्याचा इलेक्ट्रिक पंप चोरून नेला. दुसरी घटना याच दिवशी शिरगाव धर्मा येथे घडली. याबाबत आत्माराम जोंधळे (६२, व्यवसाय शेती, रा. तेरडी सुतारवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी पंपहाऊसचा सिमेंटचा दरवाजा उचकटून आत प्रवेश करत सुमारे वीस हजार रुपये किंमतीचा बारा एच.पी. क्षमतेचा दुरुस्तीसाठी ठेवलेला जुना पाण्याचा इलेक्ट्रिक पंप चोरून नेला. दोन्ही प्रकरणांमध्ये एकाच आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल Read More »

गुहागरमध्ये एप्रिलमध्ये कासव महोत्सव; पर्यटकांना अनोखा निसर्गानुभव देण्याची तयारी

गुहागरमध्ये एप्रिलमध्ये कासव महोत्सव; पर्यटकांना अनोखा निसर्गानुभव देण्याची तयारी

प्रतिनिधी : कोंकणधारा गुहागर : एप्रिल महिन्यात गुहागर येथे कासव महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय नगर पंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यावसायिक, पर्यटनप्रेमी आणि नागरिकांना महोत्सवाचे प्रात्यक्षिक कांदळवन प्रतिष्ठानतर्फे दाखविण्यात येणार आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या ६ कासव संवर्धन केंद्रे उभारण्यात आली असून, येथून दररोज कासवांची पिल्ले समुद्रात सोडली जातात. हा निसर्गरम्य आणि दुर्मीळ अनुभव पर्यटकांना प्रत्यक्ष पाहता यावा, तसेच वनविभागाच्या शेड्युल ‘अ’ श्रेणीतील ऑलिव्ह रिडले कासवांच्या जीवनचक्राची माहिती मिळावी, यासाठी कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे गुहागरच्या समुद्र पर्यटनालाही चालना मिळणार आहे. या संदर्भात नगराध्यक्ष नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, नगरसेवक, मुख्याधिकारी, पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय वनाधिकारी किरण ठाकूर, वेळास कासव महोत्सवाचे प्रणेते भाऊ काटदरे आणि कांदळवन प्रतिष्ठानचे मोहन उपाध्ये उपस्थित होते. भाऊ काटदरे यांनी कासव महोत्सवाच्या यशासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कासव संवर्धनाशी संबंधित सर्व कामे वनविभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानकडूनच केली जातील, नागरिकांनी त्यात हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पर्यटकांना योग्य मार्गदर्शन, नियमांचे पालन आणि गुहागरचा इतिहास, निसर्गसौंदर्य, पक्षीनिरीक्षण व धार्मिक पर्यटन यांची जोड देऊन पर्यटकांचा मुक्काम वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. मोहन उपाध्ये यांनी कासव संवर्धनातील नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित केली. कासवांच्या पिल्लांना हाताळणे किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांचा वापर करून जाहिरात करणे टाळावे, तसेच मोठ्या पर्यटन संस्थांकडून होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांना सुरुवातीपासूनच आळा घालावा, असे त्यांनी सांगितले.

गुहागरमध्ये एप्रिलमध्ये कासव महोत्सव; पर्यटकांना अनोखा निसर्गानुभव देण्याची तयारी Read More »

आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटकाचा बुडून मृत्यू; एकाचा जीव वाचला

आरे-वारे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; पर्यटकाचा बुडून मृत्यू, एकाचा जीव वाचला

प्रतिनिधी : कोंकणधारा रत्नागिरी : निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील दोन सदस्य समुद्रात बुडाले असून, त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाला स्थानिकांच्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर आणि विरार परिसरातील एक कुटुंब रविवारी सकाळी आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास समुद्रात उतरलेल्या संतोष शशिकांत भानुशाली आणि सुयोग राजेश भानुशाली यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ओहोटीच्या प्रवाहाने आत ओढले. त्यामुळे दोघेही बुडू लागले. यावेळी किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी तसेच पोलीस पाटील आदेश कदम यांनी तात्काळ समुद्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुयोग राजेश भानुशाली (वय २१, रा. विरार) याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र, संतोष शशिकांत भानुशाली (रा. पालघर) यांचा या घटनेत मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे भानुशाली कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

आरे-वारे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; पर्यटकाचा बुडून मृत्यू, एकाचा जीव वाचला Read More »

गॅस टंचाईचा फटका; गणपतीपुळेतील हॉटेल्स बंद,

गॅस टंचाईचा फटका; गणपतीपुळेतील हॉटेल्स बंद,देवस्थानकडून महाप्रसादाची वेळ वाढवली

प्रतिनिधी : कोंकणधारा रत्नागिरी : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्याने गणपतीपुळे परिसरातील अनेक हॉटेल्स बंद पडली आहेत. यामुळे भाविकांची गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे देवस्थान समितीने स्वयंभू श्री गणपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या मोफत महाप्रसादाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळेनुसार, दुपारच्या सत्रातील महाप्रसाद दुपारी १२.१५ ते ३ वाजेपर्यंत, तर सायंकाळच्या सत्रात सायंकाळी ७.१५ ते ८.४५ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. यापूर्वी ही वेळ अनुक्रमे दुपारी १२.१५ ते २ आणि सायंकाळी ७.१५ ते रात्री ८.१५ अशी होती. दरम्यान, गॅस टंचाईमुळे लाडू प्रसाद सध्या बंद ठेवण्यात आला आहे. लाडू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅस लागतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे.

गॅस टंचाईचा फटका; गणपतीपुळेतील हॉटेल्स बंद,देवस्थानकडून महाप्रसादाची वेळ वाढवली Read More »

रत्नागिरीत तरुणाला रॉडने मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

जुन्या वादातून तरुणाला रॉडने बेदम मारहाण; रत्नागिरीतील राजीवडा येथे घटना

प्रतिनिधी : कोंकणधारा रत्नागिरी : जुन्या वादातून तसेच एका तरुणीशी बोलतोय या संशयातून २९ वर्षीय तरुणाला चौघांनी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील राजीवडा येथील पुलाखाली गुरुवारी रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरमान नझीर होडेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रमजान नवाज मिरकर, साजिद बावा मिरकर, अझरुद्दीन अलीमिया मुजावर आणि महम्मद बावा मिरकर (सर्व रा. राजीवडा पुलाखाली, रत्नागिरी) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरमान होडेकर आणि आरोपी हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून परस्पर परिचित आहेत. जैतापूर (ता. राजापूर) येथील एका सामायिक मैत्रिणीने रमजान मिरकर याचे काही सामान अरमान यांच्याकडे दिले होते. ते सामान पोहोचवण्यासाठी जात असताना, फिर्यादी त्या तरुणीला का भेटतो आणि तिच्याशी का बोलतो, असा संशय रमजान मिरकर याने घेतला. याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. पुढे या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी रमजान मिरकर याला इतर तिघांनी साथ देत चौघांनी मिळून अरमान याला रॉडने मारहाण केली.

जुन्या वादातून तरुणाला रॉडने बेदम मारहाण; रत्नागिरीतील राजीवडा येथे घटना Read More »

कुलूप न तोडता कपाटातील चावीनेच दागिने लंपास; संगमेश्वरात चोरीचा प्रकार

कुलूप न तोडता कपाटातील चावीनेच दागिने लंपास; संगमेश्वरात चोरीचा प्रकार

प्रतिनिधी : कोंकणधारा संगमेश्वर : तालुक्यातील निवे बुद्रुक-शिंदेवाडी येथे घराचे किंवा कपाटाचे कोणतेही कुलूप न तोडता कपाटातच ठेवलेल्या चावीचा वापर करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २४ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत घडली असून ५ मार्च रोजी ती उघड झाली. याबाबत सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर २७ मार्च रोजी देवरूख पोलिस स्थानकात फिर्याद नोंदवण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष दौलत पाल्ये (वय ५६) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांचे निवे बुद्रुक येथे सामायिक घर असून, घटनेच्या वेळी कपाटाच्या लॉकरची चावी घरातच ठेवलेली होती. चोरट्याने याचाच फायदा घेत कपाट उघडून दोन तोळे सोन्याचा हार आणि दोन तोळे सोन्याची चेन, असे एकूण चार तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. घरामध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा जबरदस्तीच्या खुणा आढळून न आल्यामुळे, घरातील व्यवस्था आणि चाव्यांची माहिती असलेल्या एखाद्या जवळच्या किंवा परिचित व्यक्तीनेच ही चोरी केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दखल घेत परिसरातील संशयितांची चौकशी सुरू केली असून पुढील तपास देवरूख पोलिसांकडून सुरू आहे.

कुलूप न तोडता कपाटातील चावीनेच दागिने लंपास; संगमेश्वरात चोरीचा प्रकार Read More »

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; गणपतीपुळे–चाफे मार्गावरील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; गणपतीपुळे–चाफे मार्गावरील घटना

प्रतिनिधी : कोंकणधारा रत्नागिरी : तालुक्यातील जयगड सागरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत गणपतीपुळे–चाफे मुख्य मार्गावर शनिवारी (दि. २८ मार्च) सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश मधुकर साळवी (वय ५६, मूळ रा. फणसोप, रत्नागिरी, सध्या रा. रामरोड, गणपतीपुळे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सकाळी ७ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास चाफे ते गणपतीपुळे मार्गावर नेहमीप्रमाणे चालण्यासाठी गेले होते. याचदरम्यान, त्या मार्गावरून वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते रस्त्यावरच कोसळले. आसपासच्या ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड–गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी करत आहेत.

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; गणपतीपुळे–चाफे मार्गावरील घटना Read More »