konkandhara.com

Editorial

मुंबईचा महापौर फेब्रुवारीतच; जिल्हा परिषद निवडणुकीनंतर निर्णय

मुंबई | प्रतिनिधी :मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी मुंबईचा महापौर तत्काळ ठरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आगामी काही दिवस पूर्णतः त्या रणधुमाळीत व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेतील महापौर व उपमहापौरपदाची निवड जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच, म्हणजे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला मतदारांनी कौल दिला असला, तरी भाजप किंवा शिंदे गटाची शिवसेना या दोघांपैकी कोणालाही स्वतंत्रपणे बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. गटनोंदणीवर चर्चा सुरू मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची एकत्रित गटनोंदणी करावी की स्वतंत्र, यावर अजूनही चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक एकच गट म्हणून नोंदणी करण्यावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता अधिक आहे. या माध्यमातून महापालिकेतील तसेच विविध समित्यांमधील संख्याबळ अधिक मजबूत करण्यावर भाजपचा भर असल्याचे समजते. महायुतीच्या सूत्रांनुसार, भाजपकडे गटनेतेपद तर शिवसेनेकडे प्रतोदपद देण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान, यापूर्वी शिंदे गटाच्या शिवसेनेने स्वतंत्र गटनोंदणीसाठी हालचाली केल्याची माहिती समोर आली होती. काही नगरसेवक कोकण भवन येथे स्वतंत्र नोंदणीसाठी जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, अचानक हा निर्णय बदलण्यात आला आणि अखेर महायुतीकडून दोन्ही पक्षांची एकत्रित गटनोंदणी करण्यावर सहमती झाल्याची माहिती आहे. यामुळे महापालिकेतील समिती प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर ठाकरे गटाच्या शिवसेनेला शह देण्याची रणनीती आखण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महापौरपदासाठी चार नावे चर्चेत मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत भाजप आणि शिवसेनेच्या संचालन समितीमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांची मते जाणून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौरपदासाठी सध्या चार नावे आघाडीवर असल्याचे समजते — राजश्री शिरवडकररितू तावडेशीतल गंभीरयोगिता कोळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील अंतिम बैठकीनंतरच महापौर, उपमहापौर तसेच अन्य महत्त्वाच्या पदांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत मिळत आहेत. पीठासीन अधिकारी कोण? मुंबई महापालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदांच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर निवडीची संपूर्ण प्रक्रिया त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. विशेष म्हणजे, मागील महापालिका सभागृहाचा कार्यकाळ संपून आता जवळपास तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे ‘मावळते महापौर’ ही संकल्पना लागू होत नाही. मुंबई महापालिकेच्या जुन्या नियमानुसार ज्येष्ठ नगरसेवक पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहू शकतो. त्या नियमानुसार ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचा अधिकार होता. मात्र, हा अधिकार काढून घेऊन तो प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आला आहे. परिणामी, विद्यमान महापालिका आयुक्त भूषण गगराणी हेच पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकांचा परिणाम बुधवारपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात व नियोजनात व्यस्त होणार असल्याने, मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेचा निर्णय काहीसा लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल आणि त्यातून निर्माण होणारी राजकीय समीकरणे मुंबईतील सत्तावाटपावर अप्रत्यक्ष परिणाम करू शकतात. भाजप-शिंदे शिवसेना युतीला मुंबई महापालिकेत बहुमत मिळाले असले, तरी गटनोंदणी, पदवाटप आणि जिल्हा परिषद निवडणुकांची व्यस्तता यामुळे मुंबईचा महापौर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच ठरण्याची शक्यता अधिक आहे. तोपर्यंत मुंबईच्या राजकारणात चर्चांचा आणि रणनीतींचा खेळ रंगत राहणार, हे निश्चित. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

मुंबईचा महापौर फेब्रुवारीतच; जिल्हा परिषद निवडणुकीनंतर निर्णय Read More »

माणगावात जि.प. ४ जागांसाठी १७, पं.स. ८ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात

जहेंद्र हरिभाऊ मुंढेमाणगाव तालुका प्रतिनिधी | कोंकणधारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत होती. या प्रक्रियेनंतर माणगाव तालुक्यातील निवडणूक चित्र स्पष्ट झाले असून, जिल्हा परिषदेसाठी ४ जागांवर एकूण १७ उमेदवार, तर पंचायत समितीसाठी ८ जागांवर २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांमध्येही चुरशीची लढत होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत. माणगाव तालुक्यात ४५ निजामपूर, ४६ तळाशेत, ४७ मोर्बा आणि ४८ गोरेगाव असे चार जिल्हा परिषद गट आहेत. तर पंचायत समितीमध्ये ८९ पाटणूस ते ९६ लोणेरे असे एकूण आठ गण आहेत. प्रत्येक गट व गणात वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमुळे प्रचाराला आता वेग येणार आहे. जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवार🔹 ४५ निजामपूर गट अविनाश अनिल नलावडे – शिवसेनाजनार्दन सुदाम मानकर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)साबळे राजीव अशोक – राष्ट्रवादी काँग्रेसदत्ता काशीराम गोरेगावकर – अपक्षसंजय अर्जुन धाग – अपक्षराजू मोहन रोडेकर उर्फ सुतार – अपक्ष या गटात सहा उमेदवार रिंगणात असून शिवसेना (दोन्ही गट) विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट राजकीय लढत, तर अपक्षांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. 🔹 ४६ तळाशेत गट दिशा दिपक जाधव – राष्ट्रवादी काँग्रेसस्वाती अनिल नवगणे – शिवसेनाभारती विलासराव सुर्वे – काँग्रेसरिया राजू रोडेकर उर्फ सुतार – अपक्षतळाशेत गटात चार उमेदवार असून येथे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात त्रिकोणी लढत पाहायला मिळणार आहे. 🔹 ४७ मोर्बा गट आरिफ सुलेमान मणेर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)रमेश पांडुरंग मोरे – शिवसेनाअस्लम इब्राहिम राऊत – राष्ट्रवादी काँग्रेस मोर्बा गटात तीन प्रमुख पक्षांचे उमेदवार असून ही लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. 🔹 ४८ गोरेगाव गट नरेश रामा अहिरे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)भारत विष्णु गोरेगावकर – राष्ट्रवादी काँग्रेसदिनेश जनार्दन हरवंडकर – शिवसेनाभूषण संघरत्न जाधव – अपक्ष गोरेगाव गटात चार उमेदवार रिंगणात असून शिवसेनेचे दोन गट समोरासमोर असल्याने ही लढत विशेष लक्षवेधी ठरणार आहे. 🏘️ पंचायत समिती गणनिहाय उमेदवार🔹 ८९ पाटणूस संजोग एकनाथ मानकर – राष्ट्रवादी काँग्रेसविलास यशवंत शिंदे – शिवसेना 🔹 ९० निजामपूर अक्षय कृष्णा जाधव – शिवसेनागणेश सोनू पवार – राष्ट्रवादी काँग्रेसप्रशांत पांडुरंग हिलम – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 🔹 ९१ तळाशेत उभारे विद्या विपुल – शिवसेनामनिषा संदेश मालोरे – राष्ट्रवादी काँग्रेस 🔹 ९२ साई संगिता संजय बक्कम – राष्ट्रवादी काँग्रेसनिष्ठा नंदुराज वाढवळ – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)रचना निलेश थोरे – अपक्षबक्कम संगीता अमित – अपक्ष 🔹 ९३ वडवली खिडविडे सचिन तुकाराम – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पदरत ज्ञानदेव मारुती – शिवसेनाप्रकाश सखाराम लाड – राष्ट्रवादी काँग्रेसमहेश देवदास सावडेकर – मनसे 🔹 ९४ मोर्बा अल्का सुभाष केकाणे – राष्ट्रवादी काँग्रेसपल्लवी विजय मोरे – शिवसेना 🔹 ९५ गोरेगाव स्वाती अरुण करकरे – शिवसेनावैदही विनोद बागडे – राष्ट्रवादी काँग्रेसअक्षता युवराज मुंढे – भाजपहर्षदा चंद्रकांत सत्वे – अपक्ष 🔹 ९६ लोणेरे प्रदीप प्रकाश जाधव – काँग्रेसरवींद्र महादेव टेंबे – शिवसेनाशिवाजी चंद्रकांत टेंबे – राष्ट्रवादी काँग्रेसप्रभाकर रामचंद्र ढेपे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिताराम पांडुरंग उभारे – अपक्ष राजकीय हालचालींना वेग उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता माणगाव तालुक्यात निवडणूक प्रचाराला वेग येणार आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचार यंत्रणा सज्ज केली असून, स्थानिक प्रश्न, विकासकामे, पाणी, रस्ते, रोजगार आणि सामाजिक योजनांवर आधारित प्रचार रंगणार असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यातील लढती अत्यंत चुरशीच्या ठरणार आहेत. पक्षीय लढतींसोबतच अपक्ष उमेदवारांची भूमिका काही गटांत निर्णायक ठरू शकते. येत्या काही दिवसांत प्रचाराचा ताप वाढत जाणार असून, मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

माणगावात जि.प. ४ जागांसाठी १७, पं.स. ८ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात Read More »

पुनाडे घाटात खासगी बस पलटी; रायगडहून परतणारे 4 जण गंभीर

दिनेश चाफळकर :महाड | प्रतिनिधी – किल्ले रायगड दर्शनासाठी गेलेल्या शिवभक्त पर्यटकांचा परतीचा प्रवास शुक्रवारी सायंकाळी पुनाडे घाटात भीषण अपघातात बदलला. अवघड वळणावर खासगी टेम्पो ट्रॅव्हल्स बस पलटी झाल्याने चार प्रवासी गंभीर जखमी झाले, तर इतर प्रवाशांनाही किरकोळ दुखापती झाल्या. प्राथमिक माहितीनुसार बसचे ब्रेक निकामी (ब्रेक फेल) झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या घटनेमुळे घाटरस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपघातग्रस्त वाहन साई निरंजन टूर्स अँड ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीचे असल्याचे समजते. बसमध्ये पुणे जिल्ह्यातील अहिल्यानगर परिसरातील एकूण १७ प्रवासी प्रवास करत होते. अपघात नेमका कसा घडला? मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन आटोपून सायंकाळच्या सुमारास ही खासगी बस पुण्याच्या दिशेने रवाना झाली होती. पुनाडे घाट येथील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघाताचा जोर इतका तीव्र होता की बसमधील प्रवासी एकमेकांवर आदळले; काहीजण जागेवरच गंभीर जखमी झाले. जखमींवर तातडीने उपचार अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतीस धाव घेतली. जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारांसाठी पाचाड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. त्यापैकी चार प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना माणगाव ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. उर्वरित १३ प्रवाशांवर पाचाड येथे प्राथमिक उपचार सुरू आहेत. प्राथमिक अंदाज व पोलिस तपास घटनास्थळी उपस्थित असलेल्या पाचाड येथील ग्रामस्थ रघुवीर देशमुख यांनी प्राथमिक माहिती देताना बसचे ब्रेक फेल झाल्याचा संशय व्यक्त केला. मात्र अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अपघाताची माहिती मिळताच महाड पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. वाहनाची तांत्रिक स्थिती, चालकाचा अनुभव, वेग, तसेच प्रवासपूर्व तपासणी झाली होती का, या सर्व बाबींची चौकशी करण्यात येत आहे. घाटरस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न दरम्यान, पुनाडे घाटातील धोकादायक वळणे आणि अरुंद रस्ता यामुळे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होत असतानाही घाटरस्त्यांवरील सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः पर्यटन हंगामात किल्ले रायगड परिसरात खासगी बस व ट्रॅव्हल्सची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे वाहनांची तांत्रिक तपासणी, चालकांचे प्रशिक्षण, वेगमर्यादेचे काटेकोर पालन, रस्त्यावरील संरक्षक कठडे, चेतावणी फलक आणि रात्रीच्या वेळेस अतिरिक्त बंदोबस्त यांची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. वाहतूक काही काळ विस्कळीत या अपघातामुळे काही काळ पुनाडे घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने बस बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही; मात्र हा प्रकार गंभीर इशारा देणारा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. रायगड दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असताना घाटरस्त्यांवरील सुरक्षिततेकडे दुर्लक्ष परवडणारे नाही. ब्रेक फेलसारख्या प्राथमिक संशयांच्या पार्श्वभूमीवर खासगी प्रवासी वाहनांची नियमित व कडक तांत्रिक तपासणी, चालकांचे प्रशिक्षण आणि रस्ते-सुरक्षा उपाय तातडीने बळकट करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अन्यथा अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळणे कठीण ठरेल.

पुनाडे घाटात खासगी बस पलटी; रायगडहून परतणारे 4 जण गंभीर Read More »

शांततेसाठी मार्गदर्शन की नियंत्रणाची चाहूल? गोरेगावचा प्रश्न

जहेंद्र हरिभाऊ मुंढेमाणगांव तालुका प्रतिनिधी आगामी २०२६ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत शांतता कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत आणि कायद्याच्या चौकटीत पार पडावी, हा प्रशासनाचा हेतू निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र या बैठकीत मांडण्यात आलेल्या काही मुद्द्यांबाबत सुज्ञ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. ही बैठक केवळ प्रशासकीय सूचना देणारी होती की, निवडणूक काळात नियंत्रणाची चाहूल देणारी, असा प्रश्न आता खुलेपणाने विचारला जात आहे. कायदा-सुव्यवस्था आणि लोकशाही : समतोलाचा प्रश्न बैठकीदरम्यान बोगस मतदान रोखणे, वाहन तपासणी, ड्राय डेचे काटेकोर पालन, सोशल मीडियावरील मर्यादा, तसेच रॅली व सार्वजनिक कार्यक्रमांच्या परवानग्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने या सूचना आवश्यकच आहेत, याबाबत कुणाचाही वाद नाही. मात्र प्रश्न हा आहे की, या सूचनांची अंमलबजावणी करताना लोकशाही मूल्यांचा समतोल राखला जाईल का? लोकशाही व्यवस्थेत निवडणूक म्हणजे केवळ मतदानाचा दिवस नसतो, तर चर्चा, टीका, प्रचार आणि मतदारांशी थेट संवाद यांची प्रक्रिया असते. ही प्रक्रिया सुरक्षित ठेवताना ती दडपली जाणार नाही, याची खात्री महत्त्वाची ठरते. सहाय्य आणि संशय यामधील सीमारेषा वयोवृद्ध आणि अपंग मतदारांना मतदानासाठी सहाय्य करताना अनेक व्यक्ती नियुक्त करण्याचा सल्ला देण्यात आला. उद्देश पारदर्शकतेचा असला, तरी “मतदारावर अविश्वास दाखवला जातोय का?” अशी भावना काही नागरिकांमध्ये उमटताना दिसते. मदतीच्या नावाखाली प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाली, तर मतदारांचा आत्मविश्वास कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मतदान ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत लोकशाही कृती आहे; ती करताना संशयापेक्षा सन्मान आणि विश्वास अधिक महत्त्वाचा असल्याचे मत जाणकार व्यक्त करतात. वाहन तपासणी : सुरक्षितता की गैरसोय? निवडणूक काळात कडक वाहन तपासणी आणि ड्राय डेचे काटेकोर पालन आवश्यकच आहे. मात्र याचा फटका सामान्य नागरिक, व्यापारी, मजूर आणि ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या लोकांना बसणार नाही ना, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, याबाबत सर्वांचे एकमत आहे. पण तपासणीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना तासन्‌तास थांबवले गेले, तर त्यातून प्रशासनाविषयी नाराजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोशल मीडिया आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन अत्यंत योग्य आहे. अफवा, द्वेषमूलक संदेश आणि वैयक्तिक टीका यांना आळा घालणे आवश्यकच आहे. मात्र टीका आणि अफवा यातील सीमारेषा स्पष्ट ठेवली जाईल का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. निवडणूक काळात प्रश्न विचारणे, धोरणांवर चर्चा करणे आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करणे ही लोकशाहीचीच प्रक्रिया आहे. यावर मर्यादा आल्या, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल, अशी भीती काही नागरिक व्यक्त करत आहेत. परवानग्यांमध्ये समानता कितपत? रॅली किंवा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ‘First Come, First Service’ हे तत्व लागू राहील, असे सांगण्यात आले. तत्त्वतः हे नियम समानतेचे आहेत. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना समान वागणूक मिळेल का, याबाबत पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे. जर नियम निवडकपणे वापरले गेले, तर निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो. त्यामुळे परवानगी प्रक्रियेत स्पष्टता आणि सार्वजनिक माहिती देणे गरजेचे असल्याचे मत पुढे येत आहे. शांतता राखताना विश्वासही तितकाच महत्त्वाचा पोलीस प्रशासनाकडून “जनतेला जाणूनबुजून त्रास दिला जाणार नाही” अशी हमी देण्यात आली आहे. ही बाब निश्चितच दिलासादायक आहे. मात्र निवडणूक काळात कारवाईच्या इशाऱ्यांपेक्षा संवाद, विश्वास आणि समन्वय यावर अधिक भर दिला गेला, तर वातावरण अधिक सकारात्मक राहील, अशी अपेक्षा अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. गोरेगाव आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याची सामाजिक व सांस्कृतिक परंपरा शांतताप्रिय आणि सुसंस्कृत राहिली आहे. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था आणि लोकशाही स्वातंत्र्य यांचा योग्य समतोल साधला जाणे ही काळाची गरज आहे. शांतता कमिटीच्या बैठका केवळ नियम आणि इशारे देणाऱ्या न राहता, विश्वास निर्माण करणाऱ्या ठराव्यात, अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासन आणि जनता यांच्यातील संवाद जितका खुला आणि पारदर्शक राहील, तितकी निवडणूक प्रक्रिया अधिक शांत, निर्भय आणि लोकशाही मूल्यांना साजेशी ठरेल. ✍️ लेखक : कोंकणधारा प्रतिनिधी

शांततेसाठी मार्गदर्शन की नियंत्रणाची चाहूल? गोरेगावचा प्रश्न Read More »

अलिबागमध्ये 77व्या प्रजासत्ताक दिनाचा भव्य शासकीय सोहळा

अलिबाग (पोलीस परेड ग्राउंड) | 26 जानेवारी 2026 :देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस परेड ग्राउंडवर मुख्य शासकीय समारंभ अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या प्रसंगी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. पोलीस दलाने सादर केलेल्या अत्यंत शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली. रायगड जिल्ह्याच्या वतीने शासकीय ध्वजारोहणाचा मान मिळाल्याबद्दल वक्त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत, ही संधी अत्यंत गौरवाची असल्याचे नमूद केले. यावेळी उपस्थित मान्यवर, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार आणि नागरिकांनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. शिस्तबद्ध संचलन व मानवंदनामुख्य समारंभात पोलीस दलाने केलेले संचलन हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. तिरंगा ध्वज उंचावताच राष्ट्रगीताच्या सूरांत संपूर्ण मैदान निनादले. पोलीस दलाच्या तुकड्यांनी दिलेली मानवंदना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वीकारली. या संचलनातून शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेची भावना प्रकर्षाने दिसून आली. कृतज्ञता व शुभेच्छांचा संदेश या सोहळ्याच्या निमित्ताने राज्याच्या नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक, आणीबाणी सत्याग्रही, सर्व मान्यवर, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार बंधू-भगिनी आणि तमाम रायगडवासियांना मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या. देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली. संविधानिक मूल्ये व विकासाची प्रतिज्ञाछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यभूमीत संविधानिक मूल्यांचे पालन करत, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा जपत रायगड जिल्ह्याच्या तसेच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याची प्रतिज्ञा यावेळी व्यक्त करण्यात आली. लोकशाही, समता आणि न्याय या मूल्यांना अधिक बळ देण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. गुणवंतांचा सत्कारया समारंभात प्रशासनातील शौर्याचे कार्य करणारे अधिकारी, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू तसेच प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.हा सन्मान किशन जावळे (जिल्हाधिकारी), नेहा भोसले (मुख्य कार्यकारी अधिकारी), आँचल दलाल (जिल्हा पोलीस अधीक्षक) यांच्या उपस्थितीत आणि हस्ते प्रदान करण्यात आला. सत्कारप्राप्त अधिकारी व खेळाडूंनी आपली भावना व्यक्त करत, हा सन्मान अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. मान्यवरांची उपस्थिती या शासकीय सोहळ्यास शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासह प्रशासनातील सर्व सहकारी अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. अलिबाग येथील पोलीस परेड ग्राउंडवर पार पडलेला 77व्या प्रजासत्ताक दिनाचा हा शासकीय सोहळा राष्ट्रभक्ती, शिस्त आणि एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. ध्वजारोहण, शिस्तबद्ध संचलन, गुणवंतांचा सत्कार आणि विकासाची प्रतिज्ञा यांमुळे हा दिवस रायगडवासियांसाठी अविस्मरणीय ठरला. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

अलिबागमध्ये 77व्या प्रजासत्ताक दिनाचा भव्य शासकीय सोहळा Read More »

श्री गणरायाच्या आशीर्वादाने शिंदे गटाच्या प्रचाराचा शुभारंभ

जहेन्द्र मुंडे , तालुका प्रतिनिधीमाणगाव | २3 जानेवारी २०२६ : श्री माघी गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर, माणगाव तालुक्यातील श्री क्षेत्र मुगवली येथे असलेल्या प्राचीन व श्रद्धास्थान असलेल्या श्री गणपती मंदिरात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य व मंगल शुभारंभ करण्यात आला. अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात झाली. सकाळी मंदिर परिसरात भक्तांची वर्दळ, मंत्रोच्चार, आरती आणि गणरायाच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. या पावन क्षणी गणरायाच्या चरणी श्रीफळ अर्पण करून उमेदवारांच्या विजयासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. 🛕 मुगवलीतील श्रद्धास्थानात मंगल प्रारंभ हा शुभारंभ सोहळा श्री गणपती मंदिर, मुगवली येथे पार पडला. दक्षिण रायगड जिल्ह्यातील हे प्राचीन मंदिर श्रद्धेचे केंद्र मानले जाते. माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. याच पावन स्थळी प्रचाराचा प्रारंभ केल्याने शिवसैनिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या मंगलप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके साहेब, जिल्हा महिला आघाडी प्रमुख नीलिमाताई घोसाळकर, तसेच जिल्हा, तालुका व स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य निष्ठावान शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आणि प्रचारासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. उमेदवारांच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात गणरायाच्या चरणी विधीवत श्रीफळ अर्पण करून पुढील उमेदवारांच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली—दिनेश हरवंडकर – गोरेगाव जिल्हा परिषद उमेदवाररवींद्र टेंबे – लोणेरे पंचायत समिती गणस्वातीताई करकरे – गोरेगाव पंचायत समिती गणया वेळी उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्यांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया” तसेच “शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.विकास, विश्वास आणि विचारधारेचा निर्धार या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, “जनतेच्या विश्वासावर, विकासाच्या ठाम संकल्पावर आणि शिवसेनेच्या विचारधारेवर ही निवडणूक लढवली जाणार आहे.” ग्रामीण विकास, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मुद्द्यांना प्राधान्य देत प्रचार केला जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिवसेना शिंदे गट हा विकासाभिमुख आणि प्रशासनाशी समन्वय साधणारा गट असल्याचे सांगत, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून प्रभावी काम करून जनतेला दिलासा देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. 🚩 एकजूट, उत्साह आणि विजयाचा आत्मविश्वास संपूर्ण कार्यक्रमात शिवसैनिकांमधील एकजूट, शिस्त आणि विजयाचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला. माघी गणेश चतुर्थीच्या शुभदिनी प्रचाराचा प्रारंभ झाल्याने ही लढत गणरायाच्या कृपाशीर्वादाने निश्चितच यशस्वी ठरेल, असा विश्वास उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी उमेदवारांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत प्रचारात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. मुगवली येथील श्री गणपती मंदिरात झालेल्या या भक्तिमय शुभारंभाने शिवसेना शिंदे गटाच्या निवडणूक प्रचाराला सकारात्मक आणि ऊर्जादायी सुरुवात मिळाली आहे. आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होत जाणार असून, विकास आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत या कार्यक्रमातून मिळाले आहेत. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

श्री गणरायाच्या आशीर्वादाने शिंदे गटाच्या प्रचाराचा शुभारंभ Read More »

आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत होईल – आदिती तटकरे

माणगाव | १९ जानेवारी २०२६ : जहेंद्र हरिभाऊ मुंढेमाणगाव तालुका प्रतिनिधी | कोंकणधारा आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होत असून, रायगड जिल्ह्यात पक्ष पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकून अग्रस्थान राखेल, असा ठाम विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. माणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नामांकन अर्ज दाखल कार्यक्रमानिमित्त आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आदिती तटकरे म्हणाल्या की, विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. “पक्षाची विचारधारा, विकासाभिमुख भूमिका आणि कार्यकर्त्यांची निष्ठा यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे लोकांचा कल वाढत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. राजीव साबळे, अस्लम राऊत यांचे उमेदवारी अर्ज दाखल या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व कोकण विभागीय संघटक ॲड. राजीव साबळे यांनी निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर अस्लम राऊत यांनी मोरबा जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केला. याचवेळी पंचायत समिती मतदारसंघासाठी अलका केकाणे, संजोग मानकर आणि गणेश पवार यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थिती पाहता पक्षातील उत्साह आणि आत्मविश्वास स्पष्टपणे जाणवत होता. भव्य प्रचार रॅलीने माणगाव दणाणले उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माणगाव शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. हॉटेल आनंद भवन, माणगाव येथून तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या या रॅलीत ढोल-ताशांचे गजर, जोरदार घोषणाबाजी आणि मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. संपूर्ण माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणांनी दणाणून गेले होते. विशेष बाब म्हणजे या रॅलीत महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. यामुळे पक्षाच्या वाढत्या जनाधाराची आणि महिलांमधील विश्वासार्हतेची ताकद अधोरेखित झाली, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. संघटनात्मक ताकद आणि सकारात्मक वातावरण जाहीर सभेत बोलताना आदिती तटकरे यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेसची खरी ताकद ही तिची संघटना आणि तळागाळातील कार्यकर्ते आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत विकास पोहोचवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने केले आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, रायगड जिल्ह्यातील पाणीपुरवठा, महिला सक्षमीकरण, बालकल्याण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रमांमुळे पक्षाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. “हेच सकारात्मक वातावरण आगामी निवडणुकीत निर्णायक ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हाभरात राजकीय वातावरण तापले उर्वरित उमेदवार उद्यापासून आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांकडून शक्तीप्रदर्शन, प्रचार सभा आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शक्तीप्रदर्शनामुळे आगामी निवडणुकीत पक्षाची वाटचाल निर्णायक ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतसे राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होतील, असे जाणकारांचे मत आहे. माणगावमधील आजच्या भव्य शक्तीप्रदर्शनातून राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मविश्वास आणि संघटनात्मक ताकद स्पष्टपणे समोर आली आहे. उमेदवारांची निवड, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नेतृत्वाचा ठाम संदेश यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूक रायगड जिल्ह्यात अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत होईल – आदिती तटकरे Read More »

निजामपूर व मोर्बा गटातील शिवसेना उमेदवारांचे भव्य शक्तीप्रदर्शन

माणगाव | १९ जानेवारी २०२६ : ✍️ लेखक : जहेंद्र हरिभाऊ मुंढेमाणगाव तालुका प्रतिनिधी | कोंकणधारा जिल्हा परिषद रायगड व पंचायत समिती माणगाव सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून, शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांनी हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल करत आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली. निजामपूर आणि मोर्बा जिल्हा परिषद गटांसह पाटनुस पंचायत समिती गणात शिवसेनेच्या या शक्तीप्रदर्शनामुळे निवडणूक रणधुमाळीला वेग आला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अविनाश अनिल नलावडे (जिल्हा परिषद – निजामपूर गट), विलास यशवंत शिंदे (पाटनुस पंचायत समिती गण) तसेच रमेश मोरे (जिल्हा परिषद – मोर्बा गट) यांनी आज अधिकृतपणे आपले नामांकन अर्ज दाखल केले. साई दर्शनाने कार्यक्रमाची सुरुवात नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्व उमेदवार, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माणगाव येथील श्री साई मंदिर, माणगाव येथे साईबाबांचे दर्शन घेतले. धार्मिक वातावरणात सुरू झालेल्या या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. साई दर्शनानंतर उमेदवारांचा ताफा जल्लोषात तहसील कार्यालयाकडे रवाना झाला. हजारो शिवसैनिकांची उपस्थिती या नामांकन मिरवणुकीत शिवसेनेचे हजारो शिवसैनिक, युवासेना, महिला आघाडीचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगवे झेंडे, घोषणा आणि ढोल-ताशांच्या गजरात माणगाव शहर काही काळ शिवसेनामय झाले होते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखवणारे हे दृश्य असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. भरतशेठ गोगावले यांचे आवाहन या वेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री (रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास) तथा आमदार भरतशेठ गोगावले यांनी उपस्थितांना संबोधित केले.ते म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या हातात असतील, तर गावाचा विकास अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रभावीपणे करता येतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण विकासाचा कणा आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.” “शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाला मौल्यवान मत देऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवावा,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 🏛️ स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व या निवडणुकांच्या निमित्ताने जिल्हा परिषद व पंचायत समितींचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार हमी योजना आणि सामाजिक विकासाच्या योजनांची अंमलबजावणी या संस्थांद्वारेच होते. त्यामुळे या निवडणुकांकडे केवळ राजकीय स्पर्धा न पाहता, विकासाची दिशा ठरवणारा टप्पा म्हणून पाहिले जात आहे. शिवसैनिकांमध्ये उत्साह नामांकन प्रक्रियेनंतर शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. “यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकणार,” असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. दिवसभर माणगाव तालुक्यात निवडणूक चर्चांना उधाण आले होते. निजामपूर व मोर्बा जिल्हा परिषद गट तसेच पाटनुस पंचायत समिती गणात शिवसेनेच्या उमेदवारांनी केलेले हे भव्य शक्तीप्रदर्शन आगामी निवडणुकीच्या दृष्टीने निर्णायक मानले जात आहे. प्रचाराच्या पुढील टप्प्यात विकासाचा अजेंडा आणि स्थानिक प्रश्न मतदारांपर्यंत कसे पोहोचवले जातात, यावर निकाल अवलंबून राहणार आहे.

निजामपूर व मोर्बा गटातील शिवसेना उमेदवारांचे भव्य शक्तीप्रदर्शन Read More »

खोपोली मंगेश काळोखे हत्याकांड: फरार भरत भगत अटकेत

खोपोली | प्रतिनिधी :खोपोली शहरात मोठी खळबळ उडवणाऱ्या मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणात खोपोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील फरार आरोपी भरत भगत याला खोपोली पोलिसांनी खालापूर परिसरातून अटक केली आहे. या अटकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. 🕯️ राजकीय वैमनस्यातून निर्घृण हत्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 16 डिसेंबर रोजी राजकीय वैमनस्यातून अत्यंत निघृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण खोपोली व रायगड जिल्हा हादरून गेला होता. 🔍 मुख्य मारेकरी आधीच अटकेत या हत्याकांडातील थेट हल्ला करणाऱ्या मुख्य मारेकऱ्यांना खोपोली पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. मात्र, हत्येचा कट रचणारे सूत्रधार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांची नावे समोर आली होती. त्यानंतर दोघेही फरार झाले होते. 🚓 खालापूरमधून अटक गोपनीय माहितीच्या आधारे खोपोली पोलिसांनी सापळा रचत भरत भगत याला खालापूर परिसरातून ताब्यात घेतले. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून, हत्येच्या कटाबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ⚠️ सुधाकर घारे अजूनही फरार दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे अजूनही फरार आहेत. खोपोली पोलिसांची पथके विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत असून, घारे यांच्या अटकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 📌 पोलीस तपास निर्णायक टप्प्यात भरत भगतच्या अटकेनंतर मंगेश काळोखे हत्याकांडाचा तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या हत्येमागील राजकीय कट, आर्थिक व्यवहार आणि इतर सहभागींची नावे उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. ✍️ कोंकणधारा न्यूज डेस्क

खोपोली मंगेश काळोखे हत्याकांड: फरार भरत भगत अटकेत Read More »

मलंगगड फ्युनिक्युलर रेल्वे सुरू; 2 तासांचा प्रवास आता 7 मिनिटांत

मलंगगड फ्युनिक्युलर रेल्वे अखेर सुरू; भाविकांसाठी मोठा दिलासा

दिनेश चाफळकर प्रतिनिधी महाड१९ जानेवारी २०२६: अंबरनाथ तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मलंगगडावर जाण्यासाठी अखेर बहुप्रतिक्षित फ्युनिक्युलर रेल्वे सेवा सुरू झाली आहे. या सेवेचा शुभारंभ आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या रेल्वेमुळे मलंगगडावर जाण्यासाठी लागणारा जवळपास दोन तासांचा पायी प्रवास आता अवघ्या पाच ते सात मिनिटांवर आला आहे. भाविक आणि पर्यटनासाठी ‘गेमचेंजर’ प्रकल्प मलंगगड हे राज्यातील महत्त्वाचे श्रद्धास्थान आणि पर्यटनस्थळ आहे. आतापर्यंत गडावर पोहोचण्यासाठी भाविकांना तीव्र चढण असलेली सुमारे दोन तासांची पायपीट करावी लागत होती. यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी मलंगगड यात्रा अवघड ठरत होती. फ्युनिक्युलर रेल्वे सुरू झाल्याने आता भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पर्यटन, रोजगार आणि परिसराच्या आर्थिक विकासालाही यामुळे चालना मिळणार आहे. प्रकल्पाचा इतिहास आणि पूर्णत्व हा प्रकल्प अनेक वर्षांपासून चर्चेत होता. आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती. त्या काळात स्वित्झरलँडमधील अशाच प्रकारच्या फ्युनिक्युलर प्रकल्पाचा अभ्यास करण्यात आला होता. मात्र विविध कारणांमुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. अखेर 2026 मध्ये हे स्वप्न साकार झाले आहे. क्षमता, वेळ आणि पुढील टप्पे या फ्युनिक्युलर रेल्वेतून एकावेळी 90 प्रवासी प्रवास करू शकतात. एका तासात सुमारे 1200 प्रवासी मलंगगडावर नेण्याची क्षमता या सेवेची आहे. सुरुवातीला मर्यादित फेऱ्यांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने फेऱ्यांची संख्या वाढवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 🎟️ तिकीट दर आणि सवलतीये–जा तिकीट : ₹5075 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट12 वर्षांखालील मुलांनाही अर्धे तिकीटरेल्वे चालवणाऱ्या कंपनीने ही सेवा पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. २४ तास, १२ महिने सेवा ही फ्युनिक्युलर रेल्वे सेवा बारा महिने, चोवीस तास सुरू राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी मलंगगडावर जाणे भाविकांसाठी शक्य होणार आहे, ही बाब विशेष मानली जात आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवत सुरू झालेली मलंगगड फ्युनिक्युलर रेल्वे ही केवळ वाहतूक सेवा नसून, श्रद्धा, पर्यटन आणि पायाभूत विकासाचा संगम आहे. या प्रकल्पामुळे मलंगगडाचा विकास नवा वेग घेईल, अशी अपेक्षा भाविक आणि स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

मलंगगड फ्युनिक्युलर रेल्वे अखेर सुरू; भाविकांसाठी मोठा दिलासा Read More »