konkandhara.com

Editorial

विलीनीकरणाचा विषय संपला : विकास लवांडे; सुनील तटकरेंवर दुतोंडीपणाचा आरोप

विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून संपलाय;सुनील तटकरेंकडून दुतोंडीपणा: विकास लवांडे

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत राज्यात सुरू असलेल्या चर्चांवर शरद पवार गटाने ठाम भूमिका घेत या विषयाला पूर्णविराम दिला आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी स्पष्ट केले की, विलीनीकरणाचा मुद्दा त्यांच्या पातळीवरून पूर्णपणे संपला असून आगामी निवडणुका पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहे. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे संभ्रम अधिक वाढला. 16 फेब्रुवारी रोजी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेबाबत माहिती नसल्याचे सांगितले होते. मात्र, 31 मार्च रोजी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चर्चेबाबत माहिती असल्याचे सांगत, विलीनीकरण झाल्यास त्याचे स्वागतच केले जाईल, असे मत व्यक्त केले. या बदलत्या भूमिकेवर टीका करत लवांडे यांनी तटकरे यांच्यावर दुतोंडीपणाचा आरोप केला. “सुनील तटकरे हे खोटे बोलतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यांच्या वक्तव्यांमध्ये सातत्य नाही,” असे ते म्हणाले. “कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा,” अशी म्हण उद्धृत करत त्यांनी तटकरेंवर टोला लगावला. लवांडे यांनी पुढे सांगितले की, पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी यापूर्वीच विलीनीकरणाच्या शक्यतांना नकार दिला आहे. त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत म्हटले की, कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये. “पक्ष स्वतंत्रपणे संघटन मजबूत करत पुढील निवडणुकांना सामोरे जाणार आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. यावेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही वेळोवेळी विलीनीकरणाच्या चर्चांना फेटाळल्याचे अधोरेखित केले. या चर्चांना काही जण स्वार्थी राजकारणाच्या हेतूने हवा देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील मतभेद अधोरेखित झाले आहेत. एकीकडे विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असताना, दुसरीकडे शरद पवार गटाने स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्धार पुन्हा स्पष्ट केल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून संपलाय;सुनील तटकरेंकडून दुतोंडीपणा: विकास लवांडे Read More »

आंबा-काजू उत्पादकांचे नेतृत्व राजू शेट्टी करणार | शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

आंबा-काजू उत्पादकांचे नेतृत्व राजू शेट्टी करणार

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची आर्थिक मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या बैठकीत आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी एकदिलाने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. औषध फवारणी, खते, मजुरी आणि वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, लाखो रुपयांचा खर्च होत असताना केवळ २२ हजार रुपयांची मदत अपुरी ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एका आंबा बागेचा वार्षिक खर्च पाहता ही रक्कम फवारणीच्या एका टप्प्यासाठीही पुरेशी नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली. वारंवार होणाऱ्या नैसर्गिक नुकसानीमुळे कोकणातील शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. अशा परिस्थितीत सरकारची मदत ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची टीका करण्यात आली. तसेच पीकविमा कंपन्यांकडून होत असलेल्या अन्यायकारक वागणुकीबाबत आणि कर्जमाफीतील कठोर अटींबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. दरम्यान, ४ एप्रिल रोजी देवगड येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. या बैठकीस माजी आमदार बाळा माने, सुशांत नाईक, राजेंद्र गड्यान्नावर, विनायक कदम, प्रकाश साळवी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

आंबा-काजू उत्पादकांचे नेतृत्व राजू शेट्टी करणार Read More »

वणव्यात होरपळून ७० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

वणव्यात होरपळून ७० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू, चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली परिसरातील घटना; चार-पाच दिवसांपासून होत्या बेपत्ता

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : तालुक्यातील गाणे-खडपोली परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. जंगलात लागलेल्या वणव्यात होरपळून तारामती तुकाराम वाघे (वय ७०) यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तारामती वाघे या मागील चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्या काही अंशी मानसिक आजाराने त्रस्त होत्या. त्यामुळे त्या अनेकदा घरातून निघून जात असत आणि काही वेळाने पुन्हा घरी परतत असत. यामुळे सुरुवातीला कुटुंबीयांनाही त्या पुन्हा परत येतील, अशी अपेक्षा होती. दरम्यान, गाणे परिसरातील जंगलात चार दिवसांपूर्वी मोठा वनवा लागला होता. त्यानंतर एका व्यक्तीने जंगलातून लाकडाची फाटी आणण्यासाठी जंगलात गेल्यानंतर त्याला जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळील साडीवरून तो मृतदेह तारामती वाघे यांचाच असल्याची ओळख पटली.या घटनेची माहिती तत्काळ अलोरे-शिरगाव पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, जंगलात लागलेल्या वणव्याच्या तीव्रतेमुळे तारामती वाघे या होरपळून मृत्यूमुखी पडल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे जंगल परिसरात लागणाऱ्या वणव्यांच्या वाढत्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वणव्यांच्या घटना वाढत असल्याने जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासन आणि स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

वणव्यात होरपळून ७० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू, चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली परिसरातील घटना; चार-पाच दिवसांपासून होत्या बेपत्ता Read More »

चिपळूणमध्ये १ ते १० मे दरम्यान बालनाट्य शिबिर | मराठी नाट्य परिषद आयोजन

आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणतर्फे १ ते १० मे दरम्यान बालनाट्य शिबिर

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बालनाट्य शिबिराचे तिसरे वर्ष उत्साहात आयोजित करण्यात आले असून, हे शिबिर दि. १ मे ते १० मे या कालावधीत पार पडणार आहे. बालकांमधील अभिनय, वक्तृत्व, संवादकौशल्य, आत्मविश्वास, रंगभूमीची आवड आणि सर्जनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मुलांना नाट्याभिनय, संवादफेक, आवाजाचा वापर, देहबोली, रंगमंचावरील वावर, समूह सादरीकरण, व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध कलात्मक व उपयुक्त घटकांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यंदाच्या शिबिरासाठी प्रवेश मर्यादित असल्याने नियमितपणे शिबिरात सहभागी होणाऱ्या मुलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक पालकांनी पुढील दोन दिवसांत आपल्या मुलांची नावनोंदणी करून प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिराच्या वेळापत्रकाबाबत माहिती देताना आयोजकांनी सांगितले की, दि. १ मे रोजी शिबिराची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ४ अशी राहणार आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे दररोज सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत शिबिराचे सत्र होणार आहे. गेल्या दोन वर्षांत या बालनाट्य शिबिराला चिपळूण व परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. अनेक मुलांनी या शिबिरातून रंगभूमी, अभिनय आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आपली कला खुलवली आहे. त्यामुळे यंदाच्या तिसऱ्या वर्षीही या शिबिराबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. बालकांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्यात सांस्कृतिक जाण निर्माण व्हावी आणि रंगभूमीशी त्यांचा जवळचा संबंध निर्माण व्हावा, या उद्देशाने हे शिबिर सातत्याने राबवले जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. अधिक माहितीसाठी तसेच नावनोंदणीसाठी ॲड. विभावरी रजपूत +917796729587 व दिलीप आंब्रे मो. +91 82910 89302 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.

आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणतर्फे १ ते १० मे दरम्यान बालनाट्य शिबिर Read More »

konkandhara 63

सामाईक वाड्याच्या वादातून मायलेकावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : खेड तालुक्यातील हेदली बाजारवाडी येथे सामाईक वाड्यातील वादातून मायलेकासह सुनेवर लोखंडी पाईपने हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अपर्णा जनार्दन शिंदे (वय ५२) या आपल्या मुलासह सामाईक वाड्यात राहत आहेत. ३० मार्च रोजी रात्री सुमारे १०:३० वाजता घरदुरुस्तीचे साहित्य ठेवण्याच्या कारणावरून त्यांचा मुलगा करण हा बोलण्यासाठी गेला असता, पुतण्या मयूर मनोहर शिंदे याने जागा देण्यास नकार देत शिवीगाळ सुरू केली. वाद वाढताच अपर्णा शिंदे व त्यांची सून काव्या घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी मयूरची पत्नी मयुरी शिंदे हिने सुनेला पकडून मारहाण केली. त्यानंतर मयूर शिंदे याने घरातून लोखंडी पाईप आणून अपर्णा शिंदे यांच्या हाताच्या मनगटावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. तक्रारीनुसार, मयुरी शिंदे, कलावती मनोहर शिंदे आणि सुप्रिया केतन शिंदे यांनीही फिर्यादींना पकडून ठेवत मारहाणीला साथ दिली. घटनेनंतर जखमींना तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. खेड पोलिसांनी मयूर मनोहर शिंदे (३६), मयुरी मयूर शिंदे (२८), कलावती मनोहर शिंदे (५५) आणि सुप्रिया केतन शिंदे (२८) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार अस्मिता साळवी करत असून, पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सामाईक मालमत्तेच्या वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सामाईक वाड्याच्या वादातून मायलेकावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा Read More »

उन्हवरे फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर

उन्हवरे फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर

प्रतिनिधी : कोकणधारा दापोली: दापोली तालुक्यातील दापोली-खेड मार्गावर वाकवलीजवळ असलेल्या उन्हवरे फाट्याजवळ मंगळवारी पहाटे एका दुचाकीचा भीषण अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी पहाटे सुमारे ३ वाजता नरेश चंद्रकांत रुके (वय ३४, रा. जालगाव बौद्धवाडी, ता. दापोली) आणि त्यांचा मित्र अमित अरुण माने (वय ३५, रा. काळकाई कोंड, ता. दापोली) हे अ‍ॅक्टिव्हा (क्र. MH 08 BF 3766) दुचाकीवरून प्रवास करत होते. उन्हवरे फाट्याजवळ आल्यावर चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारावर आदळली. हा अपघात अत्यंत भीषण होता. धडकेमुळे दुचाकीचा पुढील व मागील भाग पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला. अपघातानंतर दोघेही रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. दरम्यान, नरेश रुके रात्री घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी सकाळी फोन केला असता पोलिसांनी अपघाताची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर नरेश रुके यांना पहाटे ५:०५ वाजता मृत घोषित केले. गंभीर जखमी अमित माने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार बुरोंडकर करत आहेत.

उन्हवरे फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर Read More »

भोस्ते घाटात भीषण अपघात; कंटेनर दरीत लटकला, दोघे गंभीर

भोस्ते घाटात भीषण अपघात; कंटेनर दरीत लटकला, दोघे गंभीर

प्रतिनिधी : कोकणधारा खेड: भोस्ते घाट येथे मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता एक भीषण अपघात घडला. मुंबईच्या दिशेने शीतपेयांचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या कंटेनर ट्रकचा चालकावरील ताबा सुटल्याने वाहन थेट घाटातील संरक्षक भिंतीवर आदळले. धडक इतकी जबरदस्त होती की संरक्षक भिंत तुटून ट्रकचा पुढील भाग दरीत कोसळण्याच्या स्थितीत हवेत लटकून राहिला. या अपघातात ट्रकच्या केबिनचा पूर्ण चक्काचूर झाला असून, त्यामधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावरील प्रवासी तसेच स्थानिक मदत गटातील प्रसाद गांधी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ट्रक हवेत लटकलेल्या अवस्थेत असल्याने जखमींना बाहेर काढणे अत्यंत धोकादायक होते; मात्र उपस्थितांनी धाडस दाखवत दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त कंटेनरमध्ये थम्सअप कंपनीच्या शीतपेयांचा साठा असल्याचे समोर आले आहे. घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. उशिरापर्यंत अपघातग्रस्त वाहन हटवण्याचे काम सुरू होते.

भोस्ते घाटात भीषण अपघात; कंटेनर दरीत लटकला, दोघे गंभीर Read More »

प्रभात रोड फाउंडेशनतर्फे वनअधिकारी गिरीजा देसाई यांचा जाहीर सत्कार

प्रभात रोड फाउंडेशनतर्फे वनअधिकारी गिरीजा देसाई यांचा जाहीर सत्कार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : प्रभात रोड फाउंडेशनतर्फे वन विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल वन विभागीय अधिकारी गिरीजा देसाई यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या धाडसी व यशस्वी कामगिरीबद्दल सुवर्णपदकाने सन्मानित झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष उमेशशेठ काटकर, उपाध्यक्षा सुमती जांभेकर, सेक्रेटरी संतोष इनामदार, विश्वस्त शर्मिला मोरे, स्मिता सरदेसाई, प्रमोदशेठ लाड, संजय अवटी, सहा सेक्रेटरी धनश्री जोशी, सदस्य संपदा लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच चिपळूण नगरपालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांनीही उपस्थित राहून देसाई यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात बोलताना सेक्रेटरी संतोष इनामदार यांनी प्रभात रोड फाउंडेशनच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेतला. सन 2000 पासून नारायण तलाव संवर्धन, परिसरातील मूलभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण तसेच आपत्ती काळात मदत अशा विविध उपक्रमांद्वारे फाउंडेशनने समाजात भरीव योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. गिरीजा देसाई यांनी वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि जनजागृती या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी ठाणे वन विभागात कार्यरत असताना 30 हून अधिक बिबट्यांची सुखरूप सुटका केली, तसेच 200 हून अधिक वन्यप्राण्यांचे प्राण वाचवले. अवैध तस्करीविरोधात कारवाई करत 50 हून अधिक वाहने जप्त करण्याचे धाडसही त्यांनी दाखवले. वन्यप्राण्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर उपाययोजना करणे, झाडे लावणे व ती जगविणे, तसेच जनजागृती मोहीम राबविणे या बाबींमध्ये त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या कार्यामुळे वन विभागाचे कामकाज अधिक प्रभावी व सुबक झाले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी गिरीजा देसाई यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सत्कार करताना अभिमान वाटत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

प्रभात रोड फाउंडेशनतर्फे वनअधिकारी गिरीजा देसाई यांचा जाहीर सत्कार Read More »

bhaskar-jadhav-fuel-shortage-criticism-government-chiplun

इंधन तुटवड्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप;भास्कर जाधव यांचा सरकारवर निशाणा

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : राज्यात इंधन तुटवड्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते, असा इशारा देतात, तर दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे सांगतात. या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. “जर राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, तर मग केरोसिन वितरणाचा निर्णय का घेण्यात आला?” असा सवाल उपस्थित करत जाधव यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच अफवा पसरवण्याच्या बाबतीत भाजपचा कुणीच हात धरू शकत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. इंधन पुरवठा, संभाव्य संकटाची चर्चा आणि सरकारच्या निर्णयांमुळे सध्या राज्यात चर्चांना उधाण आले असून, या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे

इंधन तुटवड्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप;भास्कर जाधव यांचा सरकारवर निशाणा Read More »

रत्नागिरीत ज्वेलर्स दुकान फोडून चोरी; सुमित्रा ज्वेलर्समध्ये चांदीचे दागिने लंपास

रत्नागिरीत ज्वेलर्स दुकान फोडून चोरी; चोरट्यांचा शोध सुरू

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी :- शहरातील मारुती मंदिर परिसरातील सुमित्रा ज्वेलर्स येथे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत ज्वेलर्समधून चांदीचे दागिने लंपास करण्यात आल्याचे समोर आले असून, ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच दुकानातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत. या तपासात प्रभारी शहर पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, सहायक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी परिसरात पाहणी करून काही धागेदोरे मिळतात का, याचा शोध घेतला.

रत्नागिरीत ज्वेलर्स दुकान फोडून चोरी; चोरट्यांचा शोध सुरू Read More »