माणगाव | जहेंद्र हरिभाऊ मुंढे माणगाव | रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव शहरात दररोज हजारो नागरिक, पर्यटक आणि प्रवासी ये-जा करत असल्यामुळे शहरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून दिवा ते वीर मेमू रेल्वे सेवा सुरू करावी तसेच अधिकाधिक एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना माणगाव स्थानकात थांबे द्यावेत, अशी ठाम मागणी माणगाव रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव सुरेश जैन यांनी केली आहे. माणगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई–गोवा महामार्गावर रोजच वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रखडलेल्या महामार्गाच्या कामांमुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे सेवा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित होत आहे. माणगाव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने दररोज हजारो पर्यटक आणि प्रवासी येथे येत असतात. त्यामुळे माणगाव रेल्वे स्थानकावर सर्व प्रकारच्या रेल्वे गाड्यांना थांबे देण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून काही एक्स्प्रेस गाड्यांना थांबे मिळाले असले तरी अद्यापही अनेक महत्त्वाच्या गाड्या माणगाव स्थानकावर थांबत नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन आणि तळा या विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांचा माणगाव स्थानकाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या थांबा असलेल्या रेल्वे गाड्यांना अक्षरशः हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत असून त्यामुळे रेल्वे प्रशासनालाही आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होत असल्याचे प्रवासी संघटनेने सांगितले आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून रोहा येथे मडगाव, संपर्क क्रांती, इंदोर, कोईम्बतूर आणि तिरुनेलवेली या एक्स्प्रेस गाड्यांना थांबे मिळाले आहेत. त्याच धर्तीवर माणगाव येथेही जनशताब्दी, मंगला, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोकणकन्या आणि ऋषिकेश यांसारख्या महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबे मिळाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. याशिवाय दिवा ते रोहा या मार्गावर ज्या पद्धतीने रेल्वे सेवा सुरू आहे, त्याचप्रमाणे दिवा ते वीर मेमू रेल्वे सेवा दिवसातून तीन ते चार वेळा सुरू केल्यास माणगावसह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असा दावा प्रवासी संघटनेने केला आहे. माणगाव एसटी बस स्थानकातून दररोज शेकडो एसटी बस मुंबई व कोकणात धावत असल्या तरी दुपारच्या वेळेत रेल्वे उपलब्ध नसल्यामुळे अनेक प्रवाशांना खासगी बस किंवा वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी वाढण्यासोबतच शासनालाही अपेक्षित महसूल मिळत नाही. दरम्यान, रोहा ते वीर या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले असून वीर येथे रेल्वे गाड्या थांबविण्यासाठी आवश्यक ट्रॅक व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे दिवा ते वीर मेमू सेवा सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचे प्रवासी संघटनेचे मत आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रवाशांची हेळसांड थांबवून मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी दिवा–वीर मेमू रेल्वे सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, माणगाव येथे अधिकाधिक रेल्वे गाड्यांना थांबे मिळावेत यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.