konkandhara.com

7 मार्च 2026

konkandhara 26

शिमगोत्सवातील वादातून चाकू हल्ला; रत्नागिरीत व्यक्ती गंभीर जखमी

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा रत्नागिरी, ७ मार्च : शिमगोत्सवातील किरकोळ वादाचा राग मनात धरून तिघांनी मिळून एका व्यक्तीवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (७ मार्च) सकाळी सुमारे ११ वाजता मिरकरवाडा जेटीच्या पहिल्या गेटजवळ घडली. या हल्ल्यात जयेंद्र दत्ताराम नार्वेकर (५५, रा. भाटिमिऱ्या, रत्नागिरी) गंभीर जखमी झाले आहेत. जखमी नार्वेकर यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी शशांक सावंत, संजू आणि रुपेश सावंत उर्फ छोटा भाई (तिघेही रा. सडामिऱ्या, रत्नागिरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (१ मार्च) रात्री सुमारे १० वाजता शिमगोत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी पालखी येणार असल्याने भाटिमिऱ्या येथील दत्त मंदिराजवळ रस्त्यावर मंडप उभारणे आणि रांगोळी काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी तीन मुली दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीचा धक्का मंडपाचे काम करणाऱ्या फिर्यादींच्या भाचा विरेंद्र किरला याला लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्या वादादरम्यान एका मुलीने “मी सडामिऱ्या गावातील लोकांना बोलावते,” अशी धमकी दिली. काही वेळाने शशांक सावंत, संजू आणि अन्य काहीजण तेथे आले आणि वादाचे रूपांतर गंभीर वादात झाले. मात्र, त्या वेळी जयेंद्र नार्वेकर, रुपेश कमलाकर सावंत, मनोज सावंत, परेश सावंत व इतर प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. दरम्यान, शनिवारी (७ मार्च) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जयेंद्र नार्वेकर हे आपल्या एमएच-०८-बीएफ-२३२३ क्रमांकाच्या दुचाकीवरून मिरकरवाडा जेटी येथे बोटीचे काम पाहण्यासाठी जात होते. ते जेटीच्या पहिल्या गेटजवळ आले असता संशयित शशांक सावंत आणि संजू यांनी दुचाकी त्यांच्या समोर आडवी लावून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर दोघांनीही चाकूने त्यांच्या पाठीवर, हातावर व खांद्यावर सपासप वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर नार्वेकर खाली कोसळले. त्याच वेळी रुपेश सावंत उर्फ छोटा भाई दुचाकीवरून घटनास्थळी आला आणि त्यानेही चाकूने त्यांच्या पाठीवर वार केले. परिसरात गर्दी वाढू लागल्याने तिघेही संशयित तेथून पसार झाले. जखमी अवस्थेत नार्वेकर यांनी तेथे उपस्थित असलेल्या एका दुचाकीस्वाराला आपल्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याची विनंती केली. दरम्यान, त्यांच्या ओळखीचे राहुल नावाचे व्यक्तीही तेथे आल्याने दोघांनी मिळून नार्वेकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामूनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

शिमगोत्सवातील वादातून चाकू हल्ला; रत्नागिरीत व्यक्ती गंभीर जखमी Read More »

दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे शेती व बागायती परिसरात अचानक आग लागली. नगरपंचायत व अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे शेती व बागायती परिसरात अचानक आग लागली. नगरपंचायत व अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

दोडामार्ग / भूषण सावंत दोडामार्ग : तालुक्यातील सासोली गावातील शेती व बागायती परिसरात अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती सोसायटी अध्यक्ष मनोज गवस यांनी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांना दिली. माहिती मिळताच संतोष नानचे यांनी तत्काळ कसई-दोडामार्ग नगरपंचायत प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर नगरपंचायत प्रशासन व अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी पोहोचला. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टळले. घटनास्थळी ग्रामस्थांनीही मदत करत आग विझविण्यासाठी सहकार्य केले. वेळीच मिळालेल्या माहितीमुळे आणि अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. यावेळी सासोली ग्रामस्थांनी नगरसेवक संतोष नानचे तसेच कसई-दोडामार्ग नगरपंचायत प्रशासन व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.  

दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे शेती व बागायती परिसरात अचानक आग लागली. नगरपंचायत व अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. Read More »

अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुरस्कार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुरस्कार

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा मुंबई : मालवणी सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ७ मार्च २०२६ रोजी प्रभादेवी, मुंबई येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (रविंद्र नाट्यगृह) येथे आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला महिला दशावतार मंडळ सुरू करून गेली पंधरा वर्षे कला क्षेत्रासोबतच सामाजिक कार्य करत महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अक्षता कांबळी यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. त्यांच्या या कार्याची नोंद महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, कोकण विभाग अध्यक्षा सुनीता गणगे आणि मुंबई–पुणे विभाग प्रमुख लक्ष्मण मानकर यांनी घेतली. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अक्षता कांबळी या पहिल्या मानकरी ठरल्या. या पुरस्कारामध्ये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाची शाल, सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक आणि भेटवस्तू देण्यात आल्या. दरम्यान, अक्षता कांबळी यांना शासनाचा जिल्हास्तरीय ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ देखील जाहीर झाला असून या दुहेरी सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या पुरस्कारांसाठी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.  

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुरस्कार Read More »

दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश

दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा देवरुख : इस्राईल तसेच अमेरिका–इराणदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हवाई वाहतूक बंद झाल्याने दुबईमध्ये अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील नागरिक अखेर सुखरूप मायदेशी परतले आहेत. यात देवरुख येथील जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांच्यासह एकूण १३ जणांचा समावेश आहे. हे सर्व जण गुरुवारी (ता. ५) सकाळी हैद्राबाद व बेंगळुरू विमानतळावर पोहोचले. त्यानंतर विविध वाहनांनी ते आपल्या गावी परतले.मायदेशी परतलेल्या नागरिकांमध्ये सुरेश सप्रे, ज्योती सप्रे, नगरसेविका श्रद्धा इंदुलकर, जितेंद्र निमकर, कृतुजा निमकर, अभिषेक निमकर, मानसी निमकर, साखरप्यातील संदेश (बापू) शेट्ये, सोनम शेट्ये यांच्यासह अन्य चार जणांचा समावेश आहे. तसेच चिपळूण येथील सनी व रुची जागुष्टे हेही चिपळूणला सुखरूप परतले आहेत. दुबईत विमानसेवा बंद झाल्याने या सर्वांना काही दिवस हॉटेलमध्ये थांबावे लागले होते. नंतर दुबई प्रशासन आणि केंद्र सरकारने विमानसेवेची व्यवस्था केल्यानंतर बुधवारी (ता. ४) एक जण मुंबईत, तर सहा जण हैद्राबाद आणि सहा जण बेंगळुरू येथे विमानाने दाखल झाले. यानंतर गुरुवारी ते सर्वजण आपल्या गावी परतले असून त्यांच्या आगमनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश Read More »

mahila-din-arohi-cyber-surakshit-nari-program-chiplun

महिला दिनानिमित्त चिपळूणमध्ये ‘आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी’ कार्यक्रम

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा चिपळूण : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेसह डिजिटल सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन – WDW महाराष्ट्र आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने “आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून महिलांनी ऑनलाइन फसवणूक, आर्थिक गुन्हे तसेच सोशल मीडियाशी संबंधित धोके याबाबत सजग राहणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महिलांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात सायबर सुरक्षा जनजागृतीपर व्याख्यान, सायबर तज्ज्ञ, पोलीस अधिकारी, डॉक्टर, वकील आणि पत्रकार यांच्या सहभागातून पॅनेल डिस्कशन होणार आहे. तसेच IMA WDW महाराष्ट्र महिला डॉक्टर हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याशिवाय समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना “आरोही नारी गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमात “छावा” हे विशेष आकर्षण तसेच ‘डिजिटल जागर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचाही समावेश आहे. हा कार्यक्रम दि. १२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, मार्कंडी (चिपळूण) येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महिला दिनानिमित्त चिपळूणमध्ये ‘आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी’ कार्यक्रम Read More »

रत्नागिरीत ३०० आसनक्षमतेचे मिनी थिएटर; उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरीत ३०० आसनक्षमतेचे सुसज्ज मिनी थिएटर; पालकमंत्री उदय सामंत यांच्या आज हस्ते उद्घाटन

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा रत्नागिरी : रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि कला क्षेत्रासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शहराची वाढती सांस्कृतिक गरज लक्षात घेऊन तसेच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत सुसज्ज मिनी थिएटर उभारण्यात आले आहे. या मिनी थिएटरचे उद्घाटन ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अरिहंत मॉल येथील रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र येथे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.या नव्या नाट्यगृहामुळे रत्नागिरीतील सांस्कृतिक चळवळीला नवी चालना मिळणार असून स्थानिक कलाकारांना विविध कार्यक्रम सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या मिनी थिएटरची एकूण आसन क्षमता ३०० असून लघु नाट्यप्रयोग, नाट्यछटा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलने तसेच विविध कलात्मक उपक्रमांसाठी हे नाट्यगृह उपयुक्त ठरणार आहे.रत्नागिरी जिल्ह्याला कला व संस्कृतीची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे या परंपरेला अधिक बळ मिळणार असून या मिनी थिएटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, कलाकार व रंगकर्मींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरीत ३०० आसनक्षमतेचे सुसज्ज मिनी थिएटर; पालकमंत्री उदय सामंत यांच्या आज हस्ते उद्घाटन Read More »