रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी : शासनाच्या वाळू/रेती निर्गती धोरण २०२५ अंतर्गत घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, पात्र लाभार्थ्यांना स्थानिक वापरासाठी कमाल 5 ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण टप्पा 1 व 2), पी.एम. जनमन आवास, रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत तसेच मोदी आवास योजना या योजनांतील लाभार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
महसूल व वन विभागाच्या 30 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार, लिलावात न गेलेल्या वाळू गटांमधून तसेच अवैध उत्खनन प्रकरणांमध्ये जप्त केलेली वाळू रॉयल्टी न आकारता उपलब्ध करून दिली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी गट विकास अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर तहसिलदारांकडून ऑनलाईन वाळू पासेस जारी करण्यात येणार असून, लाभार्थ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
हे पास ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी यांच्या मार्फत 15 दिवसांच्या आत लाभार्थ्यांना घरपोच देण्यात येतील. पास मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत वाळू उचलणे बंधनकारक असून, अन्यथा पास रद्द होईल. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास ऑफलाईन पासेस देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे घरकुल बांधकामाचा खर्च कमी होऊन ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

















