konkandhara.com

महाराष्ट्र

डिझेल दरवाढीने मच्छिमार अडचणीत; केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी – नितेश राणे

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी केंद्रीय मंत्री, पंचायती राज तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय,राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह जी यांच्या कडे सविस्तर पत्र पाठवून केली आहे. राज्यातील 136 मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या सुमारे 7,550 यांत्रिक मासेमारी नौकांसाठी डिझेल कोटा मंजूर असला तरी प्रत्यक्षात वाढत्या दरांमुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारांमुळे डिझेल दरात झालेली वाढ ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.सहकारी संस्थांना ‘बल्क कन्झ्युमर’ म्हणून वर्गीकृत केल्याने मच्छीमारांना किरकोळ दरांपेक्षा जास्त दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे. यामुळे सामान्य ग्राहकांपेक्षा मच्छीमारांवर अधिक आर्थिक भार पडत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.वाढत्या इंधन खर्चाचा भार सहकारी संस्थांना सहन करणे कठीण जात असून, हा खर्च अखेरीस वैयक्तिक मच्छीमारांवर टाकला जात आहे. परिणामी अनेक मच्छीमारांना मासेमारीच्या फेऱ्या कमी कराव्या लागत असून, याचा थेट परिणाम मासळी उत्पादन आणि उत्पन्नावर होत आहे. या परिस्थितीमुळे मच्छीमार, मजूर, मासळी विक्रेते आणि संबंधित व्यवसायांवर अवलंबून असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या उपजीविकेला धोका निर्माण झाला आहे. मत्स्यव्यवसाय हा अन्नसुरक्षा आणि निर्यातीसाठी महत्त्वाचा क्षेत्र असतानाही, शेतीप्रमाणे इंधन अनुदान किंवा संरक्षण यंत्रणा उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये मच्छीमार सहकारी संस्थांचे पुनर्वर्गीकरण करून किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून देणे, लक्षित डिझेल अनुदान किंवा थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना लागू करणे, तसेच मत्स्यव्यवसायाला इंधन संरक्षण योजनांमध्ये समाविष्ट करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, मत्स्यव्यवसायासाठी इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याचीही मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष दिल्यास महाराष्ट्रातील मच्छीमारांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, Read More »

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये २७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाची परिस्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्याच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये या हवामान बदलाचा प्रभाव जाणवू शकतो. या काळात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः 18 ते 20 मार्चदरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी Read More »

commercial-gas-shortage-hostel-pg-hotel-business-impact

व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉस्टेल-पीजी, हॉटेल व्यवसाय अडचणीत, अभिनेता हेमंत ढोमे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : बाजारात व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉस्टेल्स, पेइंग गेस्ट (PG) व्यवस्था आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. स्वयंपाकासाठी आवश्यक असणारा गॅस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना तसेच कामानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की अनेक हॉस्टेल्स आणि पीजी व्यवस्थापकांनी तात्पुरते बंद करण्याचा विचारही सुरू केला आहे. गॅस टंचाईचा परिणाम हॉटेल व्यवसायावरही मोठ्या प्रमाणात जाणवत असून अनेक ठिकाणी स्वयंपाकघर चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि ग्राहक दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या परिस्थितीवर अभिनेता हेमंत ढोमे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आज व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे अनेक हॉस्टेल्स आणि पीजी व्यवस्थांवर मोठा परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांना आणि बाहेरगावी राहणाऱ्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती आपल्याला एका मोठ्या वास्तवाची जाणीव करून देते की, युद्धं आता फक्त बातम्यांमधील घटना राहिलेली नाहीत. त्याचे परिणाम थेट आपल्या दैनंदिन आयुष्यावर दिसू लागले आहेत.” ते पुढे म्हणाले की, जगात कुठेही संघर्ष किंवा युद्ध झाले तरी त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर आणि सामान्य लोकांच्या जीवनावर होतो. “युद्ध ही दूर घडणारी घटना नसून त्याचे पडसाद आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे कुठलेही युद्ध हे वाईटच,” असेही त्यांनी नमूद केले. सध्या गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हॉस्टेल चालक, पीजी व्यवस्थापक आणि हॉटेल व्यावसायिकांकडून होत आहे.

व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉस्टेल-पीजी, हॉटेल व्यवसाय अडचणीत, अभिनेता हेमंत ढोमे यांची प्रतिक्रिया Read More »

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे, मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची रायगडावरून सुरुवात

विशेष प्रतिनिधी : कोकणधारा रायगड : “आज महाराष्ट्रात हजारो लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सदस्य व्हायचे आहे. फक्त सदस्य नव्हे तर सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मनसैनिकांनी पुढे येत राज्यभर सदस्य नोंदणी मोहीम राबवावी,” असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी त्यांनी रोपवेने रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत अभिवादन केले. वर्धापन दिनानिमित्त मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “९ मार्चला वर्धापन दिन आणि १९ मार्चला गुढीपाडव्याचा मेळावा असल्यामुळे दोनदा भाषण करण्यापेक्षा सर्व मुद्द्यांवर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सविस्तर बोलणार आहे. मात्र आजपासून पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करत आहोत.” ते पुढे म्हणाले की, राज्यभरातील वर्दळीच्या ठिकाणी मनसेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल्स उभारावेत. मनसैनिकांनी लोकांपर्यंत जाऊन संवाद साधावा आणि इच्छुकांना पक्षाचे सदस्य करून घ्यावे. “आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावरून पक्षाच्या सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहोत. महाराजांचा आशीर्वाद घेऊन ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.तसेच १९ मार्च रोजी होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी सर्व मनसैनिकांनी आणि महाराष्ट्राच्या हितचिंतकांनी शिवतीर्थावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही त्यांनी सांगितले.

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे, मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची रायगडावरून सुरुवात Read More »

mumbai-goa-highway-inauguration-nitin-gadkari-statement

मुंबई–गोवा महामार्गाच्या उद्घाटनाबाबत संकोच; उद्घाटन करणार नाही: नितीन गडकरी

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा मुंबई : मुंबई–गोवा महामार्गाच्या कामाला मोठ्या प्रमाणावर विलंब झाल्याने या महामार्गाचे उद्घाटन करण्याबाबत आपल्यालाच संकोच वाटत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या महामार्गाचे उद्घाटन आपण करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई–गोवा महामार्गाच्या कामाबाबत अनेक वर्षांपासून विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडत कामाला झालेल्या उशिराबद्दल खंत व्यक्त केली. महामार्गाच्या कामातील अडथळे दूर करून काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई–गोवा मार्ग हा कोकणातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो पूर्ण झाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान होणार आहे.

मुंबई–गोवा महामार्गाच्या उद्घाटनाबाबत संकोच; उद्घाटन करणार नाही: नितीन गडकरी Read More »

अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुरस्कार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुरस्कार

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा मुंबई : मालवणी सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ७ मार्च २०२६ रोजी प्रभादेवी, मुंबई येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (रविंद्र नाट्यगृह) येथे आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला महिला दशावतार मंडळ सुरू करून गेली पंधरा वर्षे कला क्षेत्रासोबतच सामाजिक कार्य करत महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अक्षता कांबळी यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. त्यांच्या या कार्याची नोंद महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, कोकण विभाग अध्यक्षा सुनीता गणगे आणि मुंबई–पुणे विभाग प्रमुख लक्ष्मण मानकर यांनी घेतली. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अक्षता कांबळी या पहिल्या मानकरी ठरल्या. या पुरस्कारामध्ये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाची शाल, सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक आणि भेटवस्तू देण्यात आल्या. दरम्यान, अक्षता कांबळी यांना शासनाचा जिल्हास्तरीय ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ देखील जाहीर झाला असून या दुहेरी सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या पुरस्कारांसाठी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.  

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुरस्कार Read More »

दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश

दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा देवरुख : इस्राईल तसेच अमेरिका–इराणदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हवाई वाहतूक बंद झाल्याने दुबईमध्ये अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील नागरिक अखेर सुखरूप मायदेशी परतले आहेत. यात देवरुख येथील जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांच्यासह एकूण १३ जणांचा समावेश आहे. हे सर्व जण गुरुवारी (ता. ५) सकाळी हैद्राबाद व बेंगळुरू विमानतळावर पोहोचले. त्यानंतर विविध वाहनांनी ते आपल्या गावी परतले.मायदेशी परतलेल्या नागरिकांमध्ये सुरेश सप्रे, ज्योती सप्रे, नगरसेविका श्रद्धा इंदुलकर, जितेंद्र निमकर, कृतुजा निमकर, अभिषेक निमकर, मानसी निमकर, साखरप्यातील संदेश (बापू) शेट्ये, सोनम शेट्ये यांच्यासह अन्य चार जणांचा समावेश आहे. तसेच चिपळूण येथील सनी व रुची जागुष्टे हेही चिपळूणला सुखरूप परतले आहेत. दुबईत विमानसेवा बंद झाल्याने या सर्वांना काही दिवस हॉटेलमध्ये थांबावे लागले होते. नंतर दुबई प्रशासन आणि केंद्र सरकारने विमानसेवेची व्यवस्था केल्यानंतर बुधवारी (ता. ४) एक जण मुंबईत, तर सहा जण हैद्राबाद आणि सहा जण बेंगळुरू येथे विमानाने दाखल झाले. यानंतर गुरुवारी ते सर्वजण आपल्या गावी परतले असून त्यांच्या आगमनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश Read More »

mahad fire

महाडमध्ये दोन ठिकाणी आगीच्या घटना; लाखोंचं नुकसान

महाड | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर: महाड शहर आणि नडगाव गावाच्या परिसरात रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही आगीत मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शहरातील एका डायग्नोस्टिक लॅबला आणि नडगाव येथील भंगार गोदामाला आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. रोहिदास नगरमधील लॅब जळून खाक महाड शहरातील रोहिदास नगर परिसरात प्रगती विराज दळवी यांच्या मालकीच्या ‘आयकॉन डायग्नोसिस लॅब’ला रविवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. दरवाजा तोडून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती रहिवासी विराज दळवी यांनी दिली. या आगीत लॅबमधील महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फर्निचर, संगणक तसेच एक्स-रे मशिनरी जळून खाक झाली. प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत तपास सुरू आहे. नडगावमध्ये भंगार गोदामाला आग दुसरी घटना रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास नडगाव गावाजवळ घडली. येथील कलाम यांच्या मालकीच्या भंगार गोदामाला आग लागली. आगीमुळे गोदामातील मोठ्या प्रमाणात साहित्य जळून गेले. गोदामाच्या शेजारी असलेल्या पॅलेट तयार करणाऱ्या एका लघुउद्योगालाही या आगीचा फटका बसला. लाकडी भुसा व इतर साहित्य जळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती व्यवसायिक शाम सुरेश गुडेकर यांनी दिली. भंगार गोदामाचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाची तत्पर कारवाई दोन्ही घटनांमध्ये अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सध्या दोन्ही घटनांबाबत तपास सुरू असून आग लागण्याचे कारण शोधले जात आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर महाड शहरात अल्पावधीत दोन आगीच्या घटना घडल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. व्यापारी आणि नागरिकांनी अग्निसुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. एक्स-रे लॅब आणि भंगार गोदाम या दोन्ही ठिकाणी झालेल्या नुकसानीमुळे संबंधित व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला असून प्रशासनाकडून मदत व तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाडमध्ये दोन ठिकाणी आगीच्या घटना; लाखोंचं नुकसान Read More »

'मोसाद' पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे

‘मोसाद’ पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे

Written By : विवेक ताम्हणकर बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न असतानाच, आमदार रोहित पवार यांनी या घटनेमागे मोठ्या घातपाताची शक्यता वर्तवून खळबळ उडवून दिली आहे. हा केवळ अपघात नसून एक पूर्वनियोजित कट असू शकतो, असा संशय त्यांनी एका सादरीकरणाद्वारे (प्रेझेंटेशन) उपस्थित केला. “माझा काका आणि राज्याचा मोठा नेता गेला आहे, आम्हाला उत्तरे मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनापूर्वीच्या काही दिवसांतील त्यांच्या बदललेल्या वागणुकीवर प्रकाश टाकला. त्यांच्या दाव्यानुसार, अजित पवारांना स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल काहीतरी शंका येत असावी, असे त्यांच्या कृतीतून दिसत होते. दादांनी अलीकडच्या काळात आपली पिण्याच्या पाण्याची बाटली बदलली होती. इतकेच नव्हे तर, त्यांनी एका जवळच्या मित्राला स्वतःचे विमान खरेदी करण्याचा सल्ला दिला होता आणि मि त्याना माझ्या मित्राने हेलीकॉप्टर घेतल्याचे सांगितले, “जर मित्र विश्वासू असेल, तर त्याच्याच हेलिकॉप्टरमधून फिरत जा,” असा सल्लाही त्यांनी आपल्याला दिला होता. यावरून त्यांना भविष्यात काहीतरी दगाफटका होऊ शकतो याची चाहूल लागली होती का, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. यावेळी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अलीकडच्या काळात अजित पवार वापरत असलेली पाण्याची अत्यंत सुरक्षित बाटलीही दाखविली.  रोहित पवार यांनी या अपघाताचा संबंध इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या कार्यपद्धतीशी जोडला. मोसादच्या पुस्तकाचा संदर्भ देत ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला संपवण्यासाठी त्याच्या चालक किंवा वैमानिकाला आपल्या बाजूने वळवणे किंवा त्याला लक्ष्य करणे हा सर्वात सोपा मार्ग असतो. या प्रकरणातील मुख्य वैमानिक सुमित कपूर याच्या ट्रॅक रेकॉर्डवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कपूर हा मद्यपान केल्याप्रकरणी तीन वर्षे निलंबित होता. अशा वादग्रस्त पार्श्वभूमीच्या वैमानिकावर कोणाचा दबाव होता का आणि त्याने मुद्दाम अवघड रनवेची निवड का केली, याकडे रोहित यांनी लक्ष वेधले. याशिवाय, तांत्रिक बाबींवर बोट ठेवताना रोहित पवार यांनी अनेक विसंगती मांडल्या. विमान उड्डाणाची वेळ, पायलट आणि नियोजित दौरा ऐनवेळी का बदलला? एटीसी (ATC) ट्रान्सस्क्रिप्ट आणि केंद्रीय विमान मंत्रालयाच्या अहवालातील वेळेत फरक का आहे? खराब दृश्यमानता असूनही लँडिंगचा धोका का पत्करला आणि विमानाचा ट्रान्सपॉन्डर (Transponder) नेमका कोणाच्या सूचनेवरून बंद होता की केला होता? मृत्यू समोर दिसत असतानाही मुख्य वैमानिक गप्प का होता, हे प्रश्न उपस्थित करून त्यांनी या घटनेच्या मुळाशी जाण्याची मागणी केली आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने तपासाच्या विश्वासार्हतेवरही त्यांनी शंका व्यक्त केली असून, हा विमान क्रॅश करण्याचाच कट होता का, असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.

‘मोसाद’ पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे Read More »

राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती

राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती

मंत्रिमंडळ बैठक: 19 महत्त्वाचे निर्णय; विकासकामांना वेग मुंबई | कोंकणधारा डेस्क:राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीत एकूण 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीला भावनिक वातावरण होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती जाणवली, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रथमच मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत काही निर्णय हे अजित पवार यांच्या कार्यकाळात प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांशी संबंधित असल्याने त्यांना प्राधान्याने मंजुरी देण्यात आली. त्यात बारामती जिल्हा क्रीडा संकुलासाठी 75 कोटी 13 लाख रुपये मंजूर करण्यात आले. 🗂️ मंत्रिमंडळ बैठकीतील 19 महत्त्वाचे निर्णय (ठळक मुद्दे) सिंचन प्रकल्पांना गती:नाबार्ड कडून 15,000 कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज. 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प व 193 प्रकल्पांच्या वितरण प्रणालीत सुधारणा; 8 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचन. (जलसंपदा) कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम:करवीर तालुक्यात 12 हेक्टर 76 आर शासकीय जमीन उपलब्ध. (महसूल) पुरंदर विमानतळ:विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना; भूसंपादन व अनुषंगिक कामांसाठी 6,000 कोटींचे कर्ज; एमआयडीसी, एमएडीसी, सिडको सहभाग. (उद्योग) ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान:2026–27 कालावधी; वार्षिक 80.75 कोटींची तरतूद; ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरावर पुरस्कार. (सार्वजनिक आरोग्य) एमआयडीसी—रत्नपुरी मळा (इंदापूर):1,000 एकर जमीन नव्या औद्योगिक वसाहतीसाठी हस्तांतरण. (महसूल) मुंबईत महाटेनिस पायाभूत सुविधा:म्हाडाच्या भूखंडांवर संयुक्त भागीदारीत विकास. (गृहनिर्माण) अटल सेतू प्रभाव क्षेत्र विकास धोरण:नव नगर विकास प्राधिकरण क्षेत्रात भूसंपादन व भूवाटप धोरणास मान्यता; ‘तिसरी मुंबई’ला गती. (नगर विकास) राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन बक्षिसांत वाढ:विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा परिचरांना लाभ. (शालेय शिक्षण) PPP धोरण–2026:25 कोटींपेक्षा मोठ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीकडून मंजुरी; नियोजन विभागात स्वतंत्र कार्यासन. (नियोजन) ई-मेल नोटीस वैध:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मध्ये दुरुस्ती. (महसूल) परभणी—इंद्राणी सहकारी सूतगिरणी:शासन अर्थसहाय्य. (वस्त्रोद्योग) अपर जिल्हाधिकारी पदनिर्मिती:11 पदांना मान्यता. (महसूल व वन) नागपूर—कोल टू केमिकल प्रकल्प:117.19 हेक्टर जमीन एमआयडीसीला. (महसूल) बारामती क्रीडा संकुल (कटफळ):75.13 कोटींची मंजुरी; पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी, बास्केटबॉल. (शालेय शिक्षण व क्रीडा) धान्य वितरण—एकत्र निविदा प्रक्रिया:मुंबई–ठाणे क्षेत्रातील 5 परिमंडळे व 34 जिल्ह्यांत सुसूत्रता. (अन्न व नागरी पुरवठा) अकोला—लघू पाटबंधारे दुरुस्ती:6.60 कोटी; 255 हेक्टर सिंचन. (मृद व जलसंधारण) कर थकबाकी तडजोड अध्यादेश:कर, व्याज, दंड/विलंब शुल्काबाबत सुधारणा. (वित्त) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दुरुस्ती:कलम 109(3)(घ). (उच्च व तंत्र शिक्षण) खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम दुरुस्ती:प्रवेश व शुल्क विनियमनात सुधारणा. (उच्च व तंत्र शिक्षण) आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांमुळे सिंचन, आरोग्य, उद्योग, क्रीडा व शहरी विकास या क्षेत्रांना चालना मिळणार आहे. निवडणुकांनंतरच्या पहिल्या महत्त्वाच्या बैठकीत व्यापक विकासाचा अजेंडा पुढे नेण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती Read More »