konkandhara.com

कोकणची बातमी

RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख

रत्नागिरी पोलीसांच्या RAIDS App मुळे नागपूरमध्ये अवघ्या २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टीतून आणि नाविन्यपूर्ण उपक्रमातून विकसित करण्यात आलेल्या RAIDS App च्या मदतीने नागपूर जिल्हा पोलीसांना मोठे यश मिळाले आहे. नागपूर येथील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जंगलमय परिसरात एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. संबंधित व्यक्तीची ओळख पटविणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत असताना नागपूर पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांशी समन्वय साधला. यानंतर RAIDS App च्या सहाय्याने मृत व्यक्तीच्या चेहऱ्याचे डिजिटल पुनर्निर्माण (Photo Reconstruction) करण्यात आले. या तांत्रिक प्रक्रियेच्या मदतीने अवघ्या २ तासांत मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. सदर मृत व्यक्ती ही दौलामेटी, आठवा मैल, नागपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराचे उत्कृष्ट उदाहरण ठरली असून, गुन्हे तपास प्रक्रियेला गती देणारी आणि पोलिसांच्या तांत्रिक क्षमतेची साक्ष देणारी असल्याचे मानले जात आहे.

रत्नागिरी पोलीसांच्या RAIDS App मुळे नागपूरमध्ये अवघ्या २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख Read More »

पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा

पीपास रसायनावरून लोटे एमआयडीसीत तणाव; ६ एप्रिलला खेडमध्ये लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरात पीपास या घातक रसायनाच्या उत्पादनावरून वातावरण तापले असून या मुद्द्यावरून कोकणात जनआंदोलनाची ठिणगी पडली आहे. ६ एप्रिल रोजी खेड येथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. लोटे एमआयडीसीत कार्यरत असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये पीपास रसायनाचे उत्पादन सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. हेच रसायन इटलीमध्ये प्रदूषणाच्या कारणास्तव बंद करण्यात आलेल्या प्रकल्पाशी संबंधित असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांमध्ये चिंता वाढली असून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी (दि. ६ एप्रिल) खेड येथे मोठा मोर्चा निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, वाद वाढत असतानाच लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने पहिल्यांदाच अधिकृत भूमिका मांडली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चिपळूणऐवजी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. कंपनीकडून सांगण्यात आले की, पीपास रसायनाचे उत्पादन करताना सर्व पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे आणि या प्रक्रियेमुळे पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.तसेच, इटलीतील प्रकरणाशी तुलना करणे चुकीचे असल्याचे कंपनीने स्पष्ट केले असून स्थानिक नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत माहिती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही कंपनीने नमूद केले.

पीपास रसायनावरून लोटे एमआयडीसीत तणाव; ६ एप्रिलला खेडमध्ये लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा Read More »

konkandhara 75

पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील पुष्कर कंपनीच्या आवारात टाकलेले भंगार गोळा करत असताना गरम मातीच्या संपर्कामुळे भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कंपनीतील एच.आर. मॅनेजर, सेफ्टी मॅनेजर, मालक आणि व्यवस्थापक अशा चौघांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव शकुंतला बबन सोनवणे (वय ४८) असे आहे. ही घटना दि. १२ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्या वेळी शकुंतला सोनवणे या कंपनीच्या आवारात पडलेले भंगार गोळा करत असताना गरम मातीमुळे त्यांच्या साडीला व हाताला भाजल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, दि. २२ मार्च २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ललिता चंद्रकांत सोनवणे (सध्या रा. चिपळूण, मूळ रा. पाचगणी, ता. शिराळा, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांची चुलत सासू शकुंतला सोनवणे या पुष्कर कंपनीच्या आवारात टाकलेले भंगार गोळा करत असताना दुर्घटनाग्रस्त झाल्या होत्या. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनी परिसरातील गरम मातीमुळे अपघात होण्याची शक्यता असूनही संबंधितांनी आवश्यक ती खबरदारी घेतली नाही, तसेच निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निष्काळजीपणामुळेच महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पुष्कर कंपनीचे सेफ्टी मॅनेजर सुधाकर जगताप, एच.आर. मॅनेजर सचिव बाळकृष्ण मनवळ (वय ४३, रा. भरणे बाईतवाडी, खेड), रविंद्रकुमार सवरमल भुतिया (वय ५३, रा. बांदल हायस्कूल परिसर, चिपळूण), मालक गौतम मखरिया तसेच व्यवस्थापक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल Read More »

साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले

साखरपा येथे खासगी आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप

प्रतिनिधी : कोकणधारा संगमेश्वर : साखरपा येथील जाधववाडी जवळ, गद्रे पेट्रोल पंपासमोर आज पहाटे साडेतीनच्या सुमारास खासगी आराम बसला भीषण आग लागून बस पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व ३० प्रवासी सुखरूप बचावले असून मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, चालक गोविंद धोंडीराम साळुंखे (वय ३५, रा. लातूर) हे एनएल ०१, बी २४४२ क्रमांकाची आराम बस पुणे येथून गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ३० प्रवाशांना घेऊन रत्नागिरीकडे निघाले होते. आज पहाटे बस साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपासमोर आली असता गाडीने अचानक पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने तत्काळ प्रसंगावधान राखत बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी.घटनेची माहिती मिळताच देवरूख अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत बस पूर्णतः भस्मसात झाली होती. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलिस फौजदार शांताराम पंदेरे, हेडकॉन्स्टेबल मनस्वी पावसकर आणि चालक तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली तसेच प्रवाशांना सहकार्य केले.

साखरपा येथे खासगी आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप Read More »

सुभाषराव चव्हाण यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर

आदर्श जीवनगौरव पुरस्काराने सुभाषराव चव्हाण यांचा सन्मान

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा संस्थेला गेली अनेक वर्षे प्रगतीपथावर नेणारे ज्येष्ठ सहकार नेते आदरणीय श्री. सुभाषराव चव्हाण यांना ‘नवभारत–नवराष्ट्र समूहातर्फे आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या सहकार, सामाजिक आणि संस्थात्मक कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात येत असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुभाषराव चव्हाण यांनी जिल्हा बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असताना आपल्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि लोकाभिमुख कामकाजाची छाप उमटवली. सेवेत असतानाच त्यांनी सहकार क्षेत्रातील दूरदृष्टी आणि लोकहिताचा विचार डोळ्यासमोर ठेवून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली. पुढे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी या पतसंस्थेला केवळ चिपळूणपुरते मर्यादित न ठेवता कोकणासह महाराष्ट्रातील विविध भागांत नावारूपाला आणले. पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक व्यवहारांच्या पलीकडे जाऊन अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, तसेच अनेक युवक-युवतींना स्वावलंबी होण्यासाठी दिशा आणि बळ दिले. संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जाणारे, गरजूंना आधार देणारे आणि सामाजिक जाणीव जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. महापूर आणि कोरोना काळात सुभाषराव चव्हाण यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून समाजाप्रती आपली बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. विविध सामाजिक उपक्रम, जनहिताचे निर्णय आणि लोककेंद्री कामामुळे त्यांनी सहकार क्षेत्रात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले कार्य, सहकार क्षेत्रातील योगदान, सामाजिक बांधिलकी आणि अनेकांना दिलेला आधार याचा सर्वांगीण विचार करून त्यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

आदर्श जीवनगौरव पुरस्काराने सुभाषराव चव्हाण यांचा सन्मान Read More »

रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई; ११० मालमत्ता सील, ७० नळजोडण्या खंडित

रत्नागिरी नगर परिषदेची थकबाकीदारांवर कारवाई; ११० मालमत्ता सील, ७० नळजोडण्या खंडित

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेअंतर्गत असलेल्या ३१ हजार मालमत्तांपैकी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी प्रशासनाने मोहीम तीव्र केली असून, आर्थिक वर्षअखेरीस थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. नगर परिषदेने ११० मालमत्तांना सील ठोकले, तर ७० नळपाणी जोडण्या तोडल्या आहेत. नगर परिषद प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षासाठी १५ कोटी ८७ लाख ५० हजार ६४८ रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३१ मार्चअखेर ११ कोटी ६२ लाख ७ हजार ८३९ रुपये वसूल करण्यात आले असून, ही ७३.२० टक्के वसुली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष समाप्तीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडून घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर करांची वसुली अधिक तीव्र करण्यात आली होती. शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांना वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारला. या मोहिमेत थकबाकीदार नागरिकांवर कारवाई करताना ७० नळपाणी वाहिन्यांच्या जोडण्या खंडित करण्यात आल्या, तर ११० मालमत्तांवर सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.ही विशेष वसुली मोहीम मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेत कर अधिकारी नरेश आखाडे, उत्तम पाटील, सागर सुर्वे, हेमंत वायंगणकर, प्रशांत वरक, प्रथमेश शिवलकर, राजेंद्र पवार, निरंजन जाधव तसेच वसुली पथकाने सक्रिय सहभाग घेतला.

रत्नागिरी नगर परिषदेची थकबाकीदारांवर कारवाई; ११० मालमत्ता सील, ७० नळजोडण्या खंडित Read More »

मंगेश पेढाबंकर यांना ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्कार जाहीर

मंगेश पेढाबंकर यांना ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढाबंकर यांना त्यांच्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, लोकाभिमुख आणि संवेदनशील कार्याची दखल घेत नवभारत–नवराष्ट्र वृत्तपत्र समूहातर्फे ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीमुळे चिपळूण परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रशासनात काम करताना कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या समस्येकडे केवळ कागदोपत्री विषय म्हणून न पाहता, ती एक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याची त्यांची कार्यशैली विशेष ठरली आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी तत्परतेने काम करणारा अधिकारी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच चिपळूणकरांच्या मनात ते एक विश्वासार्ह आणि लोकाभिमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जातात. मंगेश पेढाबंकर यांनी आपल्या सेवाकाळात चिपळूण नगर परिषद, रत्नागिरी नगर परिषद तसेच गुहागर नगर पंचायत येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. बदल्या, पदोन्नती आणि विविध प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या प्रवासात त्यांनी नेहमीच कार्यतत्परता, शिस्त आणि जनहिताचा दृष्टिकोन कायम ठेवला. विशेष म्हणजे, संकटसमयी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करणे, नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणे आणि प्रशासनाला मानवी चेहरा देण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला आहे. प्रशासकीय सेवेसोबतच त्यांनी सामाजिक, सहकारी आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय योगदान दिले आहे. त्यामुळेच ते केवळ अधिकारी म्हणून नव्हे, तर समाजाशी जोडलेला, माणुसकी जपणारा चेहरा म्हणूनही परिचित आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून जाहीर झालेला ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ हा सन्मान केवळ वैयक्तिक पुरस्कार नसून, प्रामाणिक आणि लोकांसाठी झटणाऱ्या प्रशासनाच्या विचाराला मिळालेली दाद असल्याची भावना व्यक्त होत आहे.

मंगेश पेढाबंकर यांना ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्कार जाहीर Read More »

पत्रकार दीपक भागवत हल्लाप्रकरणी अटकेची मागणी; १४ एप्रिलपासून उपोषणाचा इशारा

पत्रकार दीपक भागवत हल्लाप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा १४ एप्रिलपासून बेमुदत उपोषण, चिपळूणमधील पत्रकारांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा १४ एप्रिल २०२६ पासून चिपळूणमधील पत्रकार बेमुदत उपोषण आंदोलन छेडतील, असा इशारा देत पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, २५ मार्च २०२६ रोजी शहरातील बहादूरशेख नाका येथे भरदिवसा वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी नियोजनपूर्वक जीवघेणा हल्ला केला. या घटनेची चित्रफीत उपलब्ध असून हल्लेखोर स्पष्टपणे ओळखू येत असतानाही, घटनेला आठ दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे पत्रकारांनी नमूद केले आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले हे भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित वेगाने तपास व कारवाई होत नसल्यामुळे पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी मागणी केली की, या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून गुन्ह्यातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी. अन्यथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, १४ एप्रिल रोजी, चिपळूणमधील पत्रकार लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करतील. हे उपोषण चिपळूण येथील मा. प्रांताधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. पत्रकारांनी निवेदनात म्हटले आहे की, संविधान रचणाऱ्या महामानवाच्या जयंतीदिनी न्यायासाठी उपोषण करण्याची वेळ पत्रकारांवर येणे हे अत्यंत दुर्दैवी असून, पोलीस प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी चिपळूणमधील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.

पत्रकार दीपक भागवत हल्लाप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा १४ एप्रिलपासून बेमुदत उपोषण, चिपळूणमधील पत्रकारांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध : आमदार शेखर निकम | विघ्नसंतोषींना यश नाही

राष्ट्रवादी काँग्रेस परिवार एकसंध; विघ्नसंतोषी प्रवृत्तींना यश मिळणार नाही : आमदार शेखर निकमप्रतिनिधी

प्रतिनिधी: योगेश बांडागळे चिपळूण : आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराने सर्व आव्हानांचा एकजुटीने सामना केला असून, विभाजनानंतरही पक्ष पुन्हा एकदा ताकदीने उभा राहिल्याचा विश्वास चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार निकम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या प्रवासात प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी परिवारातील सर्व सदस्यांनी अत्यंत खंबीर भूमिका बजावली. पक्षावर आलेल्या विविध राजकीय संकटांनाही कार्यकर्त्यांनी न डगमगता तोंड दिले आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. ते पुढे म्हणाले की, आदरणीय अजितदादा पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी परिवाराच्या भावना लक्षात घेत आदरणीय श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवार दुःखातून सावरत असतानाच काही विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी या परिवारात मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र अशा प्रवृत्तींना कधीही यश मिळणार नसल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार निकम यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे स्पष्ट केले की, आदरणीय अजितदादांच्या आशीर्वादाने, सुनेत्रावहिनी पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार आजही एकसंध आहे आणि यापुढेही तसाच राहणार आहे. पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकदिलाने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करत राहतील, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, आदरणीय अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी परिवार शेवटपर्यंत लढत राहील, असा निर्धारही आमदार शेखर निकम यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस परिवार एकसंध; विघ्नसंतोषी प्रवृत्तींना यश मिळणार नाही : आमदार शेखर निकमप्रतिनिधी Read More »

सचिन जोशी यांची उमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट | चिपळूण

उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव सचिन जोशी यांचीउमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे स्वीय सचिव सचिन जोशी यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान शिवसेना चिपळूण शहर प्रमुख उमेश धोंडीराम सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान शिवसेनेच्या संघटनात्मक घडामोडी, विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) अभियान, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक सक्षम करण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी संवाद वाढवणे आणि मतदार संपर्क अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला. या प्रसंगी शिवसेना रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख राजेश मोरे, तसेच विपुल कदम, अनिल नवगणे, स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. सचिन जोशी यांच्या या भेटीमुळे चिपळूणमधील शिवसेना संघटनात्मक हालचालींना अधिक वेग मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव सचिन जोशी यांचीउमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट Read More »