konkandhara.com

कोकणची बातमी

mahad election

महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ताब्यात

महाड | कोंकणधारा डेस्क:महाड तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या पाचही गटांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले, तर पंचायत समितीच्या दहा पैकी नऊ जागांवर या गटाने विजय मिळवला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी पराभव मान्य करत मतमोजणी केंद्रातून निघून जाणे पसंत केले. जिल्हा परिषद गटांचे निकाल महाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांमध्ये खालील उमेदवार विजयी ठरले— या निकालांमुळे जिल्हा परिषदेवर शिवसेना शिंदे गटाची पकड अधिक मजबूत झाली आहे. पंचायत समितीवर नऊ जागांवर विजय पंचायत समितीच्या गणांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या खालील उमेदवारांनी विजय मिळवला याशिवाय सवाने पंचायत समिती गणातील अनिल जाधव हे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. दरम्यान, बिरवाडी पंचायत समिती गणात मयूर पुंडलिक जाधव यांनी विजय मिळवत राष्ट्रवादी–भाजप आघाडीचे एकमेव खाते उघडले आहे. चुरशीच्या लढतीत निर्णायक विजय या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या लढतींपैकी नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गट महत्त्वाचा ठरला. येथे राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास भरत गोगावले यांनी तब्बल पाच हजार मतांची आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश महाडिक यांचा दारुण पराभव केला. त्याचप्रमाणे करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेल्या निलेश ताठरे यांनी सतत चर्चेत असलेले सोमनाथ ओझर्डे यांचा पराभव करत विजय संपादन केला. निवडणूक जिल्हा परिषदेची, गुलाल विधानसभेचा महाड नगरपालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी सुनील तटकरे यांनी भाजपसोबत युती करत ताकद लावली होती. मात्र, मजबूत जनसंपर्क असलेल्या मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा महाड–पोलादपूर तालुक्यावर आपली पकड कायम असल्याचे दाखवून दिले. नगरपालिका निवडणुकीनंतर दोन गटांत झालेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर विकास गोगावले यांचा हा विजय प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. मात्र मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर महाडमध्ये विधानसभा निवडणुकीप्रमाणे गुलाल उधळण्यात आला. राष्ट्रवादी बॅकफूटवर; ठाकरे गटाची मते स्थिर या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, त्याचा पहिला फटका महाड नगरपालिकेत बसल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही त्यांच्या कुटुंबाची राजकीय ताकद कमी झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मते तुलनेने स्थिर असल्याचे चित्र दिसत असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय मतदारांना पसंत न पडल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. निष्कर्ष महाड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालामुळे महाड–पोलादपूर पट्ट्यातील आगामी स्थानिक व विधानसभा राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लेखक : कोंकणधारा डेस्क

महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ताब्यात Read More »

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान

पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73 टक्के मतदान पोलादपूर | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यात यंदा ‘दुबार मतदार’ हा कळीचा मुद्दा ठरला आहे. तालुक्यातील २५ ते ३० टक्के मतदार ग्रामीण भागात वास्तव्यास असताना सुमारे ७० टक्के मतदार हे चाकरमानी असल्याने, त्यांना मतदानासाठी गावाकडे आणण्यासाठी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांचा खर्च सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे, एवढा खर्च करूनही मतांची खात्री नसल्याने अनेक उमेदवार संभ्रमात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाहेरून येणाऱ्या मतदारांसाठी ने-आण, जेवण-खाणे, निवास आणि कथित आमिष स्वरूपातील खर्च जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या उमेदवारांना करावा लागत आहे. परिणामी, यंदा रायगड जिल्हा परिषदेच्या दोन गटांतील सहा उमेदवारांपैकी तुल्यबळ लढतीतील चार उमेदवारांना, तसेच पोलादपूर पंचायत समितीच्या चार गणांतील आठ उमेदवारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागल्याचे दिसून आले. 55.73 टक्के मतदान; शेवटच्या तासांत फारशी वाढ नाही सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पोलादपूर तालुक्यात 55.73 टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासांत मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नसल्याचे प्रशासनाच्या नोंदींवरून स्पष्ट झाले आहे.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 11,163 पुरुष आणि 10,705 महिला, असे एकूण 21,868 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील उमेदवार अजय सलागरे यांनी कापडे बुद्रुक शाळेत सपत्नीक मतदान केले. निलेश कुंभार यांनी वाकण शाळेत मतदान केले. तर लोहारे गटातील उमेदवार चंद्रकांत कळंबे यांनी उमरठ येथे आणि कृष्णा कदम यांनी ओंबळी येथील प्राथमिक शाळेत मतदान केले. कुठल्या मतदान केंद्रांवर कुणाचे भवितव्य ठरणार? कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गट अंतर्गत माटवण पंचायत समिती गणातील गोवेले, उमरठ, धारवली, कालवली, मोरसडे, बोरघर, आडावळे बुद्रुक, बोरावळे, माटवण, देवळे, वाकण, कापडे बुद्रुक, कापडे खुर्द, चांभारगणी बुद्रुक आणि बोरज येथील मतदार साक्षी कांबळेकर विरुद्ध हर्षदा वरवाटकर, तसेच अजय सलागरे विरुद्ध निलेश कुंभार यांचे भवितव्य ठरवणार आहेत. कापडे बुद्रुक पंचायत समिती गणात देवळे, करंजे, दाभिळ, लहुळसे, केवनाळे, वाकण-१, वाकण-२, नानेघोळ, कापडे खुर्द, कापडे बुद्रुक (१ ते ३), रानकडसरी, रानबाजिरे, चांभारगणी बुद्रुक, निवे, किनेश्वर, साखर येथील मतदारांनी अनिल दळवी विरुद्ध अनिल मालुसरे यांच्यासाठी मतदान केले आहे. लोहारे गटात चौरंगी लढत लोहारे जिल्हा परिषद गटात कृष्णा कदम (कमळ), अ. रझाक करबेलकर (हात), चंद्रकांत कळंबे (शिवसेना) आणि कृष्णा कदम (ढोबळी मिरची) अशी चौरंगी लढत असून, कोतवाल गणातील सुरेंद्र चव्हाण विरुद्ध अविनाश शिंदे यांचेही भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.लोहारे पंचायत समिती गणात युगज्ञा दीपक उतेकर विरुद्ध अनिता अनिल भिलारे यांच्यासाठी विविध गावांतील मतदारांनी मतदान केले. मतदान केंद्रांबाहेर वाहनांची गर्दी तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिघाबाहेर लक्झरी बसेस, मोटारकार, जीप आणि खासगी आरामगाड्यांची मोठी गर्दी दिसून आली. सुमारे ७० टक्के मतदार पोलादपूरबाहेरील असल्याने हा खर्च सर्वसामान्य उमेदवारांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची चर्चा आहे. दुबार मतदार’ प्रश्नावर तोडगा हवा या पार्श्वभूमीवर भविष्यात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधील खर्च टाळण्यासाठी पोस्टल मतांचा पर्याय, किंवा आधारकार्डशी मतदार ओळखपत्र जोडून एकाच ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.पोलादपूर तालुक्यातील अनेक मतदार मुंबई व ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असून, काहीजण तिकडील महापालिकांमध्ये नगरसेवकही झाले आहेत. त्यामुळे आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग सक्तीचे केल्यास दुबार मतदारांचा प्रश्न स्पष्ट होऊ शकतो, अशी मागणी पुढे येत आहे. निकाल सोमवारी सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, मतमोजणी सोमवारी होणार आहे. पोलादपूर तालुक्यातील ‘दुबार मतदार’ प्रश्नाचा निकालांवर नेमका किती परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान Read More »

श्रीराम महादेववाडीतील चिमुकल्यांनी भरवले अंडर-14 क्रिकेट सामने

महादेववाडी | कोंकणधारा डेस्क:श्रीराम महादेववाडी येथे चिमुकल्यांनी आयोजित केलेल्या १४ वर्षांखालील वयोगटातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडून सामने सुरू झाले आहेत. ही स्पर्धा आजपासून सुरू असून उद्या पर्यंत सामने सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या स्पर्धेत विभागातील आंबेवाडी, मोहोल्ला, महादेववाडी, बैतवाडी, कोलाडवाडी, पुई तसेच परिसरातील इतर संघांनी सहभाग नोंदवला आहे. रायगड जिल्ह्यात क्रिकेटची मोठी परंपरा असून प्रामुख्याने प्रौढ वयोगटातील भव्य स्पर्धा पाहायला मिळतात. मात्र, चिमुकल्यांनी स्वतः पुढाकार घेत भरवलेली ही स्पर्धा विशेष कौतुकास्पद ठरत आहे. 🏏 सामने रंगात; चिमुकल्यांचा उत्साह शिगेला स्पर्धेच्या उद्घाटनानंतर सामने चांगलेच रंगले असून मैदानावर खेळाडूंचा उत्साह, शिस्त आणि संघभावना पाहायला मिळत आहे. लहान वयातच स्पर्धात्मक खेळाचा अनुभव मिळाल्याने भविष्यातील खेळाडू घडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. 🏆 पारितोषिकांची घोषणा; वितरण उद्या या स्पर्धेसाठी पारितोषिकांची आधीच घोषणा करण्यात आली असून,प्रथम पारितोषिक – संतोष बैत (अण्णा)द्वितीय पारितोषिक – चिरंजीव भिंगारेतृतीय पारितोषिक – प्रणय सागवेकर तसेच मॅन ऑफ द मॅच (बॉलर) आणि मॅन ऑफ द मॅच (बॅट्समन) या विशेष पुरस्कारांचे वितरण उद्या अंतिम सामन्यानंतर करण्यात येणार आहे. या विशेष पारितोषिकांसाठी VRO समूहाकडून सहकार्य लाभत आहे. 🧒 स्थानिकांकडून कौतुक या स्पर्धेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, लहान वयातच अशा उपक्रमांमधून खेळाडू घडतात, अशी भावना पालक व क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

श्रीराम महादेववाडीतील चिमुकल्यांनी भरवले अंडर-14 क्रिकेट सामने Read More »

महावितरणच्या कोलाड विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याची मुजोरी ! वैयक्तिक थकबाकी न भरल्यास कंपनीचा वीजपुरवठा तोडण्याची धमकी; नियमांची पायमल्ली?

कोंकणधारा प्रतिनिधी | रोहामहावितरणच्या सोनवणे ह्या कनिष्ठ अभियंत्याकडून (JE) वैयक्तिक वीजमीटरवरील थकबाकी न भरल्यास खासगी मर्यादित कंपनीच्या (Pvt Ltd) नावावरील वीजपुरवठा तोडण्याची उघड धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या नावावरील वीजबिल नियमितपणे भरलेले असून कोणतीही थकबाकी नसताना हा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप संबंधित ग्राहकाने केला आहे. हा प्रकार महावितरण च्या नियमांनाच नव्हे, तर विद्युत अधिनियम आणि प्रशासकीय शिस्तीलाही थेट आव्हान देणारा ठरत आहे. दोन मीटर, दोन स्वतंत्र ग्राहक – तरीही दबाव का? संबंधित ठिकाणी एकाच जागी दोन स्वतंत्र वीज कनेक्शन आहेत. एक कनेक्शन वैयक्तिक नावावर असून त्या मीटरचा वीजपुरवठा खंडित असतानाही तब्बल एका वर्षासाठी किमान (Minimum) वीजबिल आकारण्यात आले. त्यामुळे सुमारे ४२ हजार रुपयांची थकबाकी निर्माण झाली. या थकबाकीबाबत ग्राहकाने हरकती नोंदवल्या असतानाही, त्याच ठिकाणी असलेल्या आणि नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या खासगी कंपनीच्या वीजपुरवठ्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप आहे. ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, “वैयक्तिक थकबाकी भरली नाही, तर कंपनीचा वीजपुरवठा कापू,”अशी थेट तोंडी धमकी कनिष्ठ अभियंत्याकडून देण्यात आली. कायदा स्पष्ट असताना अधिकारांचा गैरवापर? विद्युत अधिनियम, 2003 च्या कलम 56 नुसार, कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी त्या त्याच ग्राहकाला लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही कारवाई केवळ त्या ग्राहक क्रमांकापुरतीच मर्यादित असते. तसेच महाराष्ट्र वीज नियामक आयोग (MERC) च्या पुरवठा संहितेत स्पष्टपणे नमूद आहे की, “एका ग्राहकाची थकबाकी दुसऱ्या स्वतंत्र ग्राहकाच्या वीजपुरवठ्यावर लागू करता येत नाही.” तज्ज्ञांच्या मते, वैयक्तिक ग्राहक आणि खासगी मर्यादित कंपनी हे कायदेशीरदृष्ट्या दोन स्वतंत्र घटक (Independent Legal Entities) आहेत. त्यामुळे एका ग्राहकाच्या थकबाकीचा आधार घेऊन दुसऱ्या ग्राहकावर दबाव टाकणे हे नियमबाह्य असून प्रशासकीय मनमानी ठरू शकते. तोंडी धमकी, लेखी आदेश नाही महावितरणच्या कार्यपद्धतीनुसार कोणतीही वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई ही लेखी नोटीस, वरिष्ठ अधिकाऱ्यांची मान्यता आणि नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच केली जाते. मात्र या प्रकरणात कोणतीही लेखी नोटीस किंवा आदेश नसून केवळ तोंडी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांच्या मर्यादा ओलांडल्याची चर्चा सुरू झाली आहे. ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण या घटनेमुळे औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.“आज वैयक्तिक थकबाकीपोटी कंपनीवर कारवाई होत असेल, तर उद्या कुणाच्याही वीजपुरवठ्यावर मनमानी होऊ शकते,” अशी भावना अनेक उद्योजक आणि व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. पुढे काय? प्रशासनाची भूमिका काय असणार या गंभीर प्रकरणाबाबत संबंधित ग्राहकाने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच गरज भासल्यास ग्राहक तक्रार निवारण मंच (CGRF) आणि वीज लोकपाल (Ombudsman) यांच्याकडेही दाद मागण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नियम स्पष्ट असताना आणि कंपनीचे वीजबिल नियमित भरलेले असतानाही दबाव टाकण्यासाठी वीजपुरवठा तोडण्याची धमकी दिली जात असेल, तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

महावितरणच्या कोलाड विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याची मुजोरी ! वैयक्तिक थकबाकी न भरल्यास कंपनीचा वीजपुरवठा तोडण्याची धमकी; नियमांची पायमल्ली? Read More »

पनवेल महापालिका: भाजपकडून महापौर–उपमहापौर उमेदवार जाहीर

पनवेल महानगरपालिकेसाठी भाजपकडून महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर पनवेल | प्रतिनिधी – संकेत गायकवाड:पनवेल महानगरपालिकेच्या आगामी सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष यांनी महत्त्वाचा निर्णय घेत महापौर व उपमहापौर पदासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून महापौर पदासाठी श्री. नितीनभाई पाटील तर उपमहापौर पदासाठी सौ. प्रमिला रवींद्र पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या घोषणेमुळे पनवेलच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, महापालिकेच्या नेतृत्वाबाबतचे चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे.सत्तास्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा पनवेल महानगरपालिकेतील सत्तास्थापनेसाठी भाजपकडून करण्यात आलेली ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महापौर आणि उपमहापौर हे महापालिकेतील सर्वोच्च पदे असल्याने, या पदांवर कोण नेतृत्व करणार याकडे शहरातील नागरिकांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वांचे लक्ष लागले होते. उमेदवार जाहीर होताच आता सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. विकासकेंद्री नेतृत्वावर भाजपचा भर भाजपने नितीनभाई पाटील आणि प्रमिला रवींद्र पाटील यांची निवड करताना शहराच्या विकासासाठी सक्षम, अनुभवी आणि समन्वयात्मक नेतृत्व देण्याचा विचार केल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पनवेल शहर झपाट्याने विकसित होत असून, वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी सुविधा हे प्रमुख प्रश्न आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह उमेदवारांच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी अभिनंदनाचे संदेश, सोशल मीडियावर शुभेच्छा आणि कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. आगामी महापालिका कामकाजात भाजपचे नेतृत्व कसे राहील, याबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. 🔍 पुढील घडामोडींवर लक्ष महापौर व उपमहापौर उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष निवड प्रक्रिया, पदभार स्वीकारण्याची तारीख आणि महापालिकेतील सत्तावाटप याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच विरोधी पक्षांची भूमिका काय असेल, यावरही पनवेलच्या राजकारणात पुढील समीकरणे ठरणार आहेत. पनवेल महानगरपालिकेसाठी भाजपने महापौर व उपमहापौर पदांचे उमेदवार जाहीर करत सत्तास्थापनेच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे. नितीनभाई पाटील आणि प्रमिला रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहराच्या विकासाला कोणती दिशा मिळते, याकडे आता नागरिकांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

पनवेल महापालिका: भाजपकडून महापौर–उपमहापौर उमेदवार जाहीर Read More »

महाड ZP–पं.स. निवडणूक: ७ फेब्रुवारीला कडक पोलीस बंदोबस्त

महाड ZP–पं.स. निवडणूक: अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त महाड | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी महाड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मतदान प्रक्रिया निर्भय, शांततामय आणि पारदर्शक पार पडावी, यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी एकूण ४५८ होमगार्ड, ३२३ पोलीस अंमलदार, १७ अधिकारी आणि दोन स्पेशल फोर्स निवडणूक काळात कार्यरत राहणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक; संवेदनशीलतेची पार्श्वभूमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यात ७ फेब्रुवारी रोजी महाड तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ५ गट आणि पंचायत समितीसाठी १० गण यांची निवडणूक होत आहे. काही दिवसांपूर्वीच महाड नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्या मतदानाच्या दिवशी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात झालेल्या राडा-प्रकरणामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती ग्रामीण भागात होऊ नये, यासाठी यावेळी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. संचलन व प्रतिबंधात्मक उपाय निवडणूकपूर्व तयारीचा भाग म्हणून दासगाव, खर्डी आणि बिरवाडी बाजारपेठ या तीन संवेदनशील ठिकाणी पोलिसांमार्फत दोन दिवसांपूर्वी संचलन (रूट मार्च) करण्यात आले. या संचलनाद्वारे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे, समाजकंटकांवर वचक ठेवणे आणि संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालणे, हा उद्देश असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. २०३ मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त महाड तालुक्यात एकूण २०३ मतदान केंद्रे आहेत. या अंतर्गत महाड शहर, महाड तालुका आणि एमआयडीसी अशी तीन पोलीस ठाणे कार्यरत आहेत. निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून हा बंदोबस्त ६ आणि ७ फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी राहणार आहे. पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्ताची आकडेवारी निवडणूक बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाने पुढीलप्रमाणे मनुष्यबळ तैनात केले आहे— एमआयडीसी पोलीस ठाणे:१०५ होमगार्ड, ६५ पोलीस अंमलदार महाड शहर पोलीस ठाणे:२१२ होमगार्ड, १८८ पोलीस अंमलदार आणि १२ अधिकारी महाड तालुका पोलीस ठाणे:१४१ होमगार्ड, ७० पोलीस अंमलदार आणि ५ अधिकारी या तिन्ही पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीत एकूण ४५८ होमगार्ड, ३२३ पोलीस अंमलदार आणि १७ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, एक प्लाटून (१ अधिकारी व २३ पोलीस अंमलदार) तसेच एक सेक्शनमध्ये ८ पोलीस अंमलदार स्वतंत्रपणे तैनात राहणार आहेत. गावपातळीवरही सतर्कता महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा-प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, यावेळी गावपातळीवरील पोलीस पाटील यांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संशयास्पद हालचाली, जमाव जमवणे, दारू-प्रलोभन किंवा अफवा पसरवण्याचे प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यावर भर पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन, जमावबंदी आदेशांचे उल्लंघन, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा मतदान प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल. शांततामय निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. महाड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ, स्पेशल फोर्स, संचलन आणि गावपातळीवरील सतर्कतेच्या उपाययोजनांमुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न स्पष्ट दिसून येतो. आता ७ फेब्रुवारी रोजी मतदारांचा प्रतिसाद आणि निवडणूक प्रक्रियेतील शिस्त याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

महाड ZP–पं.स. निवडणूक: ७ फेब्रुवारीला कडक पोलीस बंदोबस्त Read More »

ZP निवडणूक: रामदास कदमांची सुनील तटकरे व भास्कर जाधवांवर टीका

जिल्हा परिषद निवडणूक: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोकणात आरोप–प्रत्यारोप कोकण | कोंकणधारा डेस्क:जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना विविध पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप–प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी “गलिच्छ राजकारण” केले. शरद पवार यांना शह देण्यासाठी वहिनींना तातडीने शपथ घ्यायला लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधीच शपथविधी करण्यात आला. दहा दिवस थांबले असते तर काय झाले असते?” असा सवालही कदम यांनी उपस्थित केला. तटकरेंवर गंभीर आरोप रामदास कदम यांनी पुढे असा दावा केला की, शरद पवार ताबा घेतील या भीतीपोटी हा निर्णय घेण्यात आला. तटकरेंची ही कृती निंदनीय असून महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटले. “सुनील तटकरे हे विश्वासघातकी असून, ज्यांनी त्यांना मोठे केले त्यांनाच संपवण्याचे काम त्यांनी केले,” असा आरोपही कदम यांनी केला. लोकसभेच्या संदर्भात बोलताना कदम म्हणाले की, “मी त्यांना लोकसभेत निवडून आणले; मात्र योगेश कदम यांना पाडण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला. या सर्व आरोपांवर सुनील तटकरे यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. भास्कर जाधवांवरही प्रत्युत्तर दरम्यान, याच दिवशी भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला उत्तर देताना कदम यांनी जाधव यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली. भास्कर जाधव यांचा “तोल गेला असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे,” असा आरोप करत त्यांनी गुहागर मतदारसंघात पराभव दिसत असल्यानेच ते अशी वक्तव्ये करत असल्याचे म्हटले. कदम यांनी जाधव यांच्याशी संबंधित काही जुने राजकीय संदर्भ देत, “१९९५ मध्ये त्यांना आमदारकीची संधी मीच दिली आणि शिवसेनेत आणले,” असा दावा केला. या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राजकीय वातावरण तापले जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अशा आरोप–प्रत्यारोपांमुळे कोकणातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार, सभांमधील भाषणं आणि माध्यमांतील आरोप यामुळे मतदारांमध्येही चर्चा रंगताना दिसत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय नेत्यांमधील आरोप–प्रत्यारोप हे निवडणूक वातावरणाचा भाग बनले असले, तरी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, हे मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, रामदास कदम यांच्या वक्तव्यांमुळे कोकणातील राजकारणात नवी खळबळ उडाली असून, संबंधित नेत्यांच्या प्रतिक्रियांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

ZP निवडणूक: रामदास कदमांची सुनील तटकरे व भास्कर जाधवांवर टीका Read More »

ZP निवडणूक: भास्कर जाधवांची रामदास कदमांवर तीव्र टीका

रत्नागिरी | कोंकणधारा डेस्क:जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने विविध पक्षांचे नेते कमी वेळेत अनेक ठिकाणी हजेरी लावत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान आरोप–प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी माजी मंत्री व रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. खेड येथील प्रचार सभेत बोलताना भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्यांवर आणि भूमिकेवर टीकात्मक टिप्पणी केली. भास्कर जाधवांचे आरोप भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात रामदास कदम यांच्यावर वैयक्तिक पातळीवरील आरोप करताना म्हटले की, “रामदास कदम कुठेही गेले तरी दुसऱ्यांच्या नावाने टीका करतात.” त्यांनी कदम यांच्या वागणुकीवर आणि राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच, “रामदास कदम यांना स्वतःच्या कृतींचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,” असेही त्यांनी सांगितले. यावेळी जाधव यांनी आपल्या कुटुंबाविषयी बोलताना, “माझा मुलगा मेहनतीने पुढे गेला आहे,” असे सांगत अप्रत्यक्षपणे कदम यांच्या टीकेला उत्तर दिले. या भाषणात त्यांनी काही जुने राजकीय संदर्भ मांडत रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. विकासकामांवरूनही टीका भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्या कार्यकाळातील काही विकासकामांचा उल्लेख करत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खाडी पुलावरील कर्जी पुलाचा संदर्भ देत त्यांनी, “टेंडर निघालेल्या पुलाच्या अंदाजपत्रकाबाबत चुकीच्या सूचना देण्यात आल्या,” असा आरोप केला. या माध्यमातून त्यांनी कदम यांच्या प्रशासकीय निर्णयक्षमतेवर टीका केली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वातावरण तापले आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार प्रचार सभा झाल्या. या सभांमध्ये अनेक नेत्यांनी एकमेकांवर आरोप–प्रत्यारोप केले. भास्कर जाधव यांच्या टीकेनंतर रामदास कदम यांनीही प्रत्युत्तर दिल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापल्याचे दिसून आले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारण अधिक आक्रमक झाले आहे. नेत्यांमधील आरोप–प्रत्यारोपांमुळे निवडणूक प्रचाराला धार आली असली, तरी अंतिम निर्णय मतदारांच्या हाती आहे. मतदानानंतरच या राजकीय संघर्षाचा निकाल स्पष्ट होणार असून, तोपर्यंत अशा वक्तव्यांमुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चा रंगत राहण्याची शक्यता आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

ZP निवडणूक: भास्कर जाधवांची रामदास कदमांवर तीव्र टीका Read More »

महाड औद्योगिक वसाहतीत फार्मा कंपनीत भीषण आग; सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

महाड औद्योगिक वसाहतीतील फार्मा कंपनीत भीषण आग; सुरक्षा नियमांवर प्रश्नचिन्ह महाड | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:महाड औद्योगिक वसाहतीतील एका बल्कड्रग फार्मा कंपनीत गुरुवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने आग वेळेत आटोक्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली; मात्र या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आगीच्या धुराचे प्रचंड लोट आणि ज्वाळांमुळे आसपासच्या कंपन्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. घटना कुठे व कशी घडली? महाड औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या एम्बायो या फार्मा कंपनीत गुरुवारी दुपारी इन्फ्लुएंझर (इम्फ्यूझन/इन्फ्लुएंझर) विभागात मेंटेनन्सचे काम सुरू होते. वेल्डिंगच्या सहाय्याने नट-बोल्ट तोडण्याचे काम चालू असताना सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता वेल्डिंगमधील ठिणगी/ड्राफ्ट खाली पडून तिथे आधीच सांडलेल्या रसायनांशी संपर्कात आला. परिणामी क्षणार्धात पेट घेऊन आग भडकली. आगीमुळे काही वेळातच दाट काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले. यामुळे औद्योगिक वसाहतीतील इतर कंपन्यांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र कंपनीतील अंतर्गत फायर सेफ्टी सिस्टिम तत्काळ सक्रिय करण्यात आल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. अग्निशमन दलाची तत्परता घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहतीतील तसेच महाड नगरपालिकेचे एकूण चार अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. समन्वयाने कारवाई करत अग्निशमन दलाने आग अल्पावधीत आटोक्यात आणण्यात यश मिळवले. त्यामुळे आगीचा प्रसार रोखता आला आणि मोठे नुकसान टळले. कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक सुभाष काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत सुदीप देबनाथ शंतनु हा कामगार जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुरक्षा नियमांचे उल्लंघन? या घटनेनंतर औद्योगिक वसाहतीतील कामगारांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत तीव्र चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आग “किरकोळ” असल्याचे कंपनी प्रशासनाकडून भासवले जात असले तरी आगीचे लोट आणि ज्वाळांची तीव्रता पाहता परिस्थिती गंभीर होती. विशेष म्हणजे, रसायन हाताळणीच्या परिसरात वेल्डिंगचे काम चालू असणे हेच औद्योगिक सुरक्षा नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे. वेल्डिंगदरम्यान ठिणगी पडूनच आग लागल्याचे कंपनी प्रशासनानेही मान्य केल्याने सुरक्षा मानकांचे पालन झाले का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिथे ज्वलनशील रसायने सांडलेली असण्याची शक्यता आहे, तिथे “हॉट वर्क” (वेल्डिंग/कटिंग) करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या, गॅस-फ्री सर्टिफिकेशन, परिसर स्वच्छता आणि फायर वॉचची व्यवस्था अनिवार्य असते—ती काटेकोरपणे पाळली गेली का, याबाबत शंका व्यक्त होत आहेत. कामगारांचा आरोप आणि अपेक्षा औद्योगिक वसाहत परिसरातील कामगारांचे म्हणणे आहे की, उत्पादन आणि मेंटेनन्सचा दबाव असताना अनेकदा सुरक्षा प्रक्रियांकडे दुर्लक्ष होते. “आजची घटना ही अपघात नसून दुर्लक्षाचे फलित आहे,” अशी चर्चा कामगारांमध्ये ऐकू येत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी— हॉट वर्क परवानगी प्रणालीची सक्तीरसायन साठवण व सांडलेल्या रसायनांची तत्काळ स्वच्छतानियमित सेफ्टी ऑडिटकामगारांना सुरक्षा प्रशिक्षण आणि पीपीई (PPE)आपत्कालीन प्रतिसादाची मॉक ड्रिल्सया बाबींची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाची भूमिका आणि पुढील कारवाई या घटनेनंतर संबंधित यंत्रणांकडून प्राथमिक माहिती संकलन सुरू असून, औद्योगिक सुरक्षा नियमांचे पालन झाले का, याची चौकशी होण्याची शक्यता आहे. दोष आढळल्यास नियमांनुसार कारवाई अपेक्षित असल्याचे औद्योगिक वसाहतीतील सूत्रांचे म्हणणे आहे. महाड औद्योगिक वसाहत ही रसायन व फार्मा उद्योगांसाठी संवेदनशील क्षेत्र असल्याने, भविष्यातील जोखमी लक्षात घेऊन कठोर देखरेख गरजेची असल्याचे मत व्यक्त होत आहे. एम्बायो फार्मा कंपनीतील आगीची घटना वेळीच आटोक्यात आली असली तरी तिने औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेतील उणिवा अधोरेखित केल्या आहेत. जीवितहानी टळली हे दिलासादायक असले, तरी नियमांचे काटेकोर पालन, कामगारांची सुरक्षितता आणि प्रशासनाची प्रभावी देखरेख—या त्रिसूत्रीवरच भविष्यातील अपघात रोखता येतील. या घटनेतून धडा घेतला जाईल का, याकडे औद्योगिक वसाहतीतील कामगारांपासून स्थानिक नागरिकांपर्यंत सर्वांचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

महाड औद्योगिक वसाहतीत फार्मा कंपनीत भीषण आग; सुरक्षा प्रश्न ऐरणीवर Read More »

म्हसळ्यात ZP–पं.स. 2026 साठी मतदार जनजागृती; SVEEP उपक्रम यशस्वी

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६: म्हसळा तालुक्यात मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न म्हसळा | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर: दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनासह म्हसळा तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान प्रक्रिया सुलभ, निर्भय आणि पारदर्शक व्हावी, तसेच जास्तीत जास्त मतदारांनी आपला हक्क बजावावा, या उद्देशाने प्रशासनाने विविध उपक्रम राबवले असून त्यात SVEEP (Systematic Voters’ and Electoral Participation) अंतर्गत आयोजित मतदार जनजागृती कार्यक्रम विशेष ठरले आहेत. ३९ गावांमध्ये व वाड्यांत जनजागृती SVEEP उपक्रमांतर्गत म्हसळा तालुक्यातील सुमारे ३९ गावे व वाड्या येथे मतदार जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना पालक, विद्यार्थी, युवक-युवती आणि ज्येष्ठ मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढावा, मतदानाचा टक्का उंचावावा आणि प्रत्येक मतदाराला प्रक्रियेची माहिती मिळावी, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मतदानाचे महत्त्व व मतदारांची जबाबदारी कार्यक्रमादरम्यान विस्तार अधिकारी (शिक्षण) अ. बा. मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मतदानाचे महत्त्व स्पष्ट केले. “मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मताचे महत्त्व असते. कोणत्याही दबावाशिवाय, निर्भयपणे मतदान करणे हीच खरी लोकशाही आहे,” असे त्यांनी सांगितले. यासोबतच मतदार नोंदणी, मतदान केंद्रावरची प्रक्रिया, मतदार ओळखपत्राचे महत्त्व, तसेच आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशासनाची भूमिका व समन्वय निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे, तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन खाडे, तसेच गट शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांच्या सूचनांनुसार हे सर्व कार्यक्रम राबवण्यात आले. मतदानाच्या दिवशी काय काळजी घ्यावी, मतदारांना कोणत्या सुविधा उपलब्ध असतील, तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विशेष व्यवस्थांबाबतही माहिती देण्यात आली. पथकाचे योगदान हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका पातळीवरील पथकाने समन्वयाने काम केले. पथकातील अनिल बेडके, दीपक देशमुख, प्रभाकर खलतकर आणि प्रमोद शिरसाठ यांनी नियोजन, अंमलबजावणी आणि जनसंपर्क यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. विविध ठिकाणी पोस्टर, घोषवाक्ये, संवाद सत्रे आणि प्रात्यक्षिकांद्वारे मतदारांपर्यंत संदेश पोहोचवण्यात आला. मतदारांमध्ये वाढलेली जागृती या जनजागृती कार्यक्रमांमुळे मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबतची समज वाढल्याचे चित्र दिसून आले. अनेक ठिकाणी मतदारांनी प्रश्नोत्तर सत्रात सहभाग घेत आपल्या शंका मांडल्या. मतदान केंद्र कुठे आहे, वेळ काय आहे, ओळखपत्र नसल्यास पर्याय कोणते, तसेच कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शन देण्यात आले. प्रशासनाचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी सर्व मतदारांना आवाहन करताना सांगितले की, “लोकशाहीचा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. निर्भय, मुक्त आणि पारदर्शक मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.” म्हसळा तालुक्यात SVEEP अंतर्गत राबविण्यात आलेले मतदार जनजागृती कार्यक्रम हे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहेत. प्रशासन, शिक्षण विभाग आणि स्थानिक पथकाच्या समन्वयातून राबविलेल्या या उपक्रमांमुळे मतदारांमध्ये जागरूकता वाढली असून, मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता ७ फेब्रुवारी रोजी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद किती मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

म्हसळ्यात ZP–पं.स. 2026 साठी मतदार जनजागृती; SVEEP उपक्रम यशस्वी Read More »