konkandhara.com

Editorial

konkandhara 59

लोटे परिसरात रासायनिक सांडपाण्याचा टँकर पकडला; PFAS असल्याचा संशय, कारवाईची मागणी

प्रतिनिधी : कोकणधारा लोटे : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील CETP (सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) परिसरात लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचा रासायनिक सांडपाण्याने भरलेला टँकर स्थानिक ग्रामस्थांनी पकडल्याची घटना घडली आहे. या सांडपाण्यात PFAS (Per- and Polyfluoroalkyl Substances) या घातक रसायनाचा अंश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राजेंद्र आंब्रे, रवी गोवळकर, सचिन चाळके, गंगाराम चाळके, नितीन कडू, अजय चाळके, संजय चाळके, रोशन कालेलकर, सचिन काते, अंकुश चाळके, नंदू काते, अक्षय दिवेकर, संकेत हुमणे आदी ग्रामस्थांनी हा टँकर अडवला. संबंधित टँकर CETP प्रकल्पात सांडपाणी सोडण्यासाठी आणण्यात आला होता. मात्र प्रकल्प व्यवस्थापनाने तपासणीनंतर हे सांडपाणी स्वीकारण्यास नकार दिला. ग्रामस्थांनी टँकर पकडूनही पोलीस प्रशासन घटनास्थळी उपस्थित असताना पंचनामा न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. PFAS हे मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक रसायन मानले जाते. त्यामुळे या सांडपाण्याच्या सुरक्षित विल्हेवाटीबाबत कंपनीकडून करण्यात आलेले दावे संशयास्पद ठरत असल्याचा आरोप आहे.यापूर्वीही ग्रामपंचायतींनी CETP मध्ये अशा प्रकारचे रेसिड्यू सोडण्यास विरोध दर्शवला होता. मात्र प्रत्यक्ष टँकर पकडल्याने हा प्रकार अधिक गंभीर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने माजी खासदार हुसेन दलवाई यांनी या घटनेची दखल घेत संबंधित सर्व यंत्रणांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टँकर जप्त करून नमुना तपासणी करावी, जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामा करावा, तसेच पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, घातक कचरा व्यवस्थापन नियम 2016 आणि BNS 2023 अंतर्गत कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाईची तरतूद असल्याचेही त्यांनी नमूद केले. PFAS सारख्या घातक रसायनांबाबत स्पष्ट व कठोर धोरण आखून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.

लोटे परिसरात रासायनिक सांडपाण्याचा टँकर पकडला; PFAS असल्याचा संशय, कारवाईची मागणी Read More »

konkandhara 58

ईद निमित्त चिपळूणमध्ये सौहार्दाचा संदेश; मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : सर्वधर्म समभाव आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर प्रत्यय देणारा एकात्मतेचा संदेश ईद-उल-फितरच्या निमित्ताने चिपळूणमध्ये अनुभवायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मापारी मोहल्ला मस्जिद (प्रभाग क्र. ४) येथे ईदच्या नमाजानंतर मुस्लिम बांधवांना पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमातून सणांच्या माध्यमातून समाजात बंधुभाव, प्रेम, एकात्मता आणि सौहार्द वाढवण्याचा संदेश देण्यात आला. “ईदचा सण केवळ धार्मिक उत्सव नसून समाजाला एकत्र आणणारा आणि मानवतेचा संदेश देणारा आहे,” अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.या प्रसंगी नगरसेवक अजय भालेकर, वैशाली कदम, संजय गोताड, युवसेना चिपळूण शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांच्यासह प्रसाद म्हापुस्कर, लावेश म्हापुस्कर, सुरेश पाथरे, विलास चिपळूणकर, संदिप मनोरकर, प्रकाश साडविलकर, परिमल साडविलकर, गणेश गांधी, सचिन लकेश्री आणि पंकज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे सामाजिक सलोखा आणि परस्पर आदराची परंपरा अधिक दृढ होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

ईद निमित्त चिपळूणमध्ये सौहार्दाचा संदेश; मुस्लिम बांधवांना शुभेच्छा Read More »

konkandhara 57

नागावेतील भंगार गोडावूनला भीषण आग; इमारत भस्मसात, सहा कामगार बचावले

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : तालुक्यातील नागावे नदीपात्रालगत असलेल्या भंगार प्लास्टिक साठ्याच्या गोडावूनला अचानक लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाली. या घटनेत सहा कामगारांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडून आपला जीव वाचवला. ही घटना सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पालांडे नामक व्यवसायिकाची नागावे येथे डबर-खडी क्रशर होती. ती बंद पडल्यानंतर संबंधित जागा भंगार व्यवसायिकाला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. या ठिकाणी भंगार प्लास्टिक पिशव्या धुणे व सुकवून त्यापासून कच्चा माल तयार करण्याचे काम सुरू होते. गोडावूनमध्ये सुमारे तीन ट्रक इतका प्लास्टिक साठा होता. दरम्यान, इमारतीलगत वाढलेले गवत शेतीकामासाठी पेटवण्यात आले होते. कडक उन्हामुळे ही आग वेगाने पसरत जाऊन प्लास्टिक साठ्यापर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वणव्यामुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आग लागल्यानंतर जवळपास अर्धा तास पोलीस व अग्निशमन दलाला कळवण्यात विलंब झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. त्यानंतर महाजनको, पोफळी येथून अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र पाणीसाठा अपुरा पडल्याने आग विझवण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर चिपळूण नगरपालिकेचा अग्निशमन बंबही घटनास्थळी पोहोचला असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.आगीची तीव्रता इतकी मोठी होती की काही वेळातच संपूर्ण गोडावून भस्मसात झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनेची पुढील चौकशी सुरू असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

नागावेतील भंगार गोडावूनला भीषण आग; इमारत भस्मसात, सहा कामगार बचावले Read More »

विकास निर्देशांकात रत्नागिरी अव्वल; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान

विकास निर्देशांकात रत्नागिरी अव्वल; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी, दि. २० (जिमाका) : दै. लोकसत्ता यांच्या जिल्हा निर्देशांक उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या विश्लेषणात रत्नागिरी जिल्ह्याने विकास निर्देशांकात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे सांख्यिकी विभागाच्या तपशीलांच्या आधारे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले होते. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबईतील ‘द ताज बाय विवांता’, कफ परेड येथे आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्याने सर्वांगीण विकासाच्या विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान मिळविल्याने जिल्ह्याच्या प्रगतीची नोंद राज्यस्तरावर झाली आहे.

विकास निर्देशांकात रत्नागिरी अव्वल; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान Read More »

रत्नागिरी जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी २ एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू; पाचपेक्षा जास्त जणांच्या जमावास बंदी.

रत्नागिरी जिल्ह्यात २ एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी, दि. २० (जिमाका) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १९ मार्च २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ते २ एप्रिल २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१)(३) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केला आहे. जिल्ह्यात आगामी काळात रमजान ईद (२१ मार्च), श्रीराम नवमी (२६ मार्च), कामदा एकादशी (२९ मार्च), महावीर जयंती (३१ मार्च) आणि हनुमान जयंती (२ एप्रिल) यांसारखे विविध सण-उत्सव साजरे होणार आहेत. यासोबतच विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून आंदोलन, मोर्चे व कार्यक्रमांचे आयोजन होण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. खेड, चिपळूण, अलोरे-शिरगाव, रत्नागिरी, जयगड आणि देवरुख परिसरात औद्योगिक प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या मागण्यांवरून अचानक आंदोलन होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामावरूनही आंदोलन सुरू आहेत. ओबीसी व मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता देखील प्रशासनाने व्यक्त केली आहे.या आदेशानुसार शस्त्रे, दांडके, तलवारी, बंदुका, स्फोटक किंवा दाहक पदार्थ बाळगणे, दगडफेकसाठी साधने गोळा करणे, भडकावू भाषणे करणे, घोषणा देणे किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी परवानगीशिवाय एकत्र येणे यास मनाई करण्यात आली आहे. मात्र अंत्ययात्रा, धार्मिक विधी, विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम तसेच सिनेमागृहे व नाट्यगृहे यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. मोर्चा, मिरवणूक किंवा सभा आयोजित करण्यासाठी संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात २ एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बाटू’ उपकेंद्रासाठी तात्काळ कार्यवाही करा – पालकमंत्री उदय सामंत

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (बाटू) चे उपकेंद्र तात्काळ सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. आज पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतनच्या कामकाजाचा व विविध अडचणींचा आढावा घेण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, जि.प. सदस्य बाबू म्हाप, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य अजय हुंबरीकर, प्रा. पियुष गजबे, प्रा. उत्तमसखाने काकडे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य यू. व्ही. पाटील व ‘बाटू’चे कुलगुरू कारभारी काळे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. बैठकीत महाविद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी संख्या, प्रवेश प्रक्रिया, वसतिगृह सुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी उपकेंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासोबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. “महाविद्यालय परिसर स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवावा. पुढील शनिवारी पुन्हा भेट देणार असून त्यापूर्वी स्वच्छता व आवश्यक कामे पूर्ण करावीत,” असे निर्देशही त्यांनी दिले.तत्पूर्वी पालकमंत्री सामंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कामकाजाचाही आढावा घेतला.

पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बाटू’ उपकेंद्रासाठी तात्काळ कार्यवाही करा – पालकमंत्री उदय सामंत Read More »

खेडमध्ये कुकरची वाफ लागून १३ वर्षीय मुलगी भाजली; रत्नागिरीत उपचार सुरू

खेडमध्ये कुकरची वाफ लागून १३ वर्षीय मुलगी भाजली; रत्नागिरीत उपचार सुरू

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : घरगुती काम करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे खेड येथे १३ वर्षीय मुलगी गंभीररीत्या भाजल्याची घटना घडली आहे. वर्षा सोमनाथ जाधव (वय १३, रा. भरणे नाका, खेड) असे जखमी मुलीचे नाव असून तिच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. १२ मार्च रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भूक लागल्याने वर्षाने गॅसवर शिजवून ठेवलेल्या भाजीचा कुकर स्वतः उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुकरमधील वाफ पूर्णपणे निघाली नसताना झाकण उघडल्याने गरम वाफेचा झोत तिच्या अंगावर आला. या प्रकारात वर्षाचा चेहरा, छाती व पोटाचा भाग गंभीररीत्या भाजला असून त्वचेवर फोड आले आहेत. घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने तिला कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने १९ मार्च रोजी पुढील उपचारासाठी तिला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.दरम्यान, या घटनेची नोंद जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

खेडमध्ये कुकरची वाफ लागून १३ वर्षीय मुलगी भाजली; रत्नागिरीत उपचार सुरू Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

चवदार तळे सत्याग्रह शताब्दीची सुरुवात; समतामूलक समाजाचा संकल्प : मुख्यमंत्री फडणवीस

प्रतिनिधी : कोकणधारा महाड, दि. २० : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाड येथे आयोजित या कार्यक्रमात शताब्दी वर्षाची सुरुवात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी चवदार तळ्याच्या जलशुद्धीकरण व परिसर सुशोभीकरणासाठी ५५ कोटी ८० लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजनही करण्यात आले. कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री अदिती तटकरे, डॉ. उदय सामंत, संजय शिरसाट, भरत गोगावले, अण्णा बनसोडे, खासदार सुनील तटकरे, धैर्यशील पाटील, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, १९२३ मध्ये सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याचा कायदा असूनही समाजातील भेदभाव कायम होता. त्या अन्यायाविरोधात उभारलेला चवदार तळे सत्याग्रह हा सामाजिक समतेचा क्रांतिकारी टप्पा ठरला. “भारतीय संविधानाने प्रत्येकाला समान हक्क दिले आहेत. विषमता आणि अस्पृश्यता दूर करून समतामूलक समाज निर्माण करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा,” असे आवाहन त्यांनी केले.यावेळी अनुसूचित जाती अत्याचार प्रकरणातील ९८ वारसांना शासकीय सेवेत नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ‘भीमसृष्टी’ उभारण्याची मागणी केली, तर भरत गोगावले यांनी महाडचा विकास शताब्दीपूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या ऐतिहासिक स्थळाचा सर्वांगीण विकास करून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगितले.

चवदार तळे सत्याग्रह शताब्दीची सुरुवात; समतामूलक समाजाचा संकल्प : मुख्यमंत्री फडणवीस Read More »

खेड तालुक्यात लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात ११ ग्रामपंचायतींचे ठराव; कंपनी बंदच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात ११ ग्रामपंचायतींचे ठराव; आंदोलनाला अधिक धार

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील वादग्रस्त लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून परिसरातील तब्बल ११ ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत कंपनी बंद करण्याच्या मागणीचे ठराव एकमुखाने मंजूर केले आहेत. संबंधित ठरावांसह निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आले असून आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील आंदोलनाला आता अधिक धार मिळाली असून बुधवारी प्रमुख आंदोलकांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल तसेच पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन पुढील भूमिका स्पष्ट केली. कंपनी बंद होईपर्यंत संविधानिक व लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार असल्याचा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीस लोटे, चिरणी, आंबडस, भेलसई, सोनगाव, कालुस्ते बुद्रुक, घाणेखुंट, आवाशी, गुणदे, शेल्डी आदी ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व सदस्य उपस्थित होते. तसेच रवींद्र गोवळकर, संजय आंब्रे, संजय साळवे, अविनाश आंब्रे, किशोर आंब्रे, उदय घाग, सुबोध सावंत-देसाई आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.या ११ ग्रामपंचायतींनी मिळून “लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती” या नावाने ४५ सदस्यांची समिती स्थापन केली असून स्थानिक नागरिकांच्या भावना प्रशासनापुढे मांडण्यात आल्या. कंपनीमुळे होणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय व आरोग्यविषयक परिणामांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, दि. १८ मार्च २०२६ रोजी धामणदेवी, आंबडस, भेलसई, लोटे, गुणदे, आवाशी, चिरणी, घाणेखुंट, सोनगाव, कालुस्ते बुद्रुक व शेल्डी या ग्रामपंचायतींनी मंजूर केलेले ठराव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. “जनतेच्या हितासाठी व न्यायासाठी कंपनी बंद होईपर्यंत लढा सुरूच राहील,” अशी ठाम भूमिका ग्रामपंचायतींनी घेतली आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील या कंपनीकडून घातक ‘पिफास’ (PFAS) रसायनाचे उत्पादन होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू असून, आता ग्रामपंचायतींच्या ठरावांमुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. प्रशासनासमोर या वाढत्या विरोधामुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात ११ ग्रामपंचायतींचे ठराव; आंदोलनाला अधिक धार Read More »

chiplun-tar-melting-fire-fire-brigade-control

चिपळुणात डांबर वितळवताना आग; अग्नीशमन दलाने अर्ध्या तासात मिळवले नियंत्रण

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी शहरातील पालिकेसमोरील खेडेकर क्रीडा संकुलाच्या मैदानात डांबर वितळवण्याच्या कामादरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी पहाटेपासून डांबर लाकडाच्या साह्याने वितळवण्याचे काम सुरू होते. दुपारच्या कडक उन्हात डांबर पूर्णपणे वितळून ड्रमच्या बाहेर पडल्याने अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने तीव्र स्वरूप धारण करत परिसरात धुराचे लोट पसरले. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुमारे अर्धा तास पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. यावेळी पालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. या आगीत ड्रममधील बहुतांश डांबर जळून खाक झाले असून काही काळ कामकाज ठप्प झाले होते. घटनेमुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

चिपळुणात डांबर वितळवताना आग; अग्नीशमन दलाने अर्ध्या तासात मिळवले नियंत्रण Read More »