konkandhara.com

13 मार्च 2026

महिलांनी कायदेशीर हक्कांबाबत जागरूक व्हावे – जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे

महिलांनी कायदेशीर हक्कांबाबत जागरूक व्हावे – जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : महिलांनी त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत जागरूक राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले. तालुका विधी सेवा समिती व सह्याद्री तंत्रनिकेतन महाविद्यालय, सावर्डे (ता. चिपळूण) यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी प्राचार्य मंगेश भोसले, प्रा. लिना जावकर, अॅड. वृषाली सावंत तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या अनुजा भोसले उपस्थित होत्या. डॉ. नेवसे यांनी विद्यार्थिनींना ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून का साजरा केला जातो याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. गेल्या १२० वर्षांच्या कालखंडात महिलांनी आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत विविध स्तरांवर लढा दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी त्यांनी महिलांना घटनेने दिलेले अधिकार तसेच महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांच्या तरतुदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. हुंडाबळी, छेडछाड, लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, स्त्रीधन, संपत्ती हक्क यांसारख्या विषयांवर माहिती देत महिलांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेले कायदे महत्त्वाचे मार्गदर्शक ठरतात, असे त्यांनी सांगितले. हुंडा प्रतिबंधक कायदा, पोटगीच्या तरतुदी, मुस्लिम महिला संरक्षण कायदा, हिंदू वारसा कायदा, हिंदू दत्तक व भरणपोषण कायदा, गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केल्या. समाजातील सर्व स्तरांतील महिलांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण झाल्यास संरक्षण यंत्रणांना त्यांना मदत करणे अधिक सोपे होईल, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात विद्यार्थिनींना प्रेरणा देण्यासाठी त्यांनी कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना समर्पित “पंख माया मुक्तीचे सावित्रीबाई फुले” ही कविता सादर केली.कार्यक्रमाला तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे नियोजन तालुका विधी सेवा समितीचे कनिष्ठ लिपिक श्री. जुगधर तसेच शिपाई श्री. मरके व श्री. इंगळे यांनी केले.

महिलांनी कायदेशीर हक्कांबाबत जागरूक व्हावे – जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे Read More »

konkandhara 25 1

गॅस बुकिंग नोंदणीसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची मदत घ्या | रत्नागिरी प्रशासन

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यात गॅस बुकिंग नोंदणीसाठी नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील गॅस ग्राहकांना गॅस बुकिंग नोंदणी व ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सेवा केंद्रांनी मदत करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) विश्वजीत गाताडे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात काही कारणास्तव गॅस टंचाईचा प्रश्न निर्माण होत असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. गॅस बुकिंगसाठी नागरिकांना वितरकांकडे रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्राहक व वितरक या दोघांचाही वेळ वाया जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जिल्ह्यातील नागरिकांना गॅस बुकिंग नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रक्रियेत काही अडचणी उद्भवल्यास संबंधित सेवा केंद्राला जबाबदार धरले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गॅस बुकिंग नोंदणीसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची मदत घ्या | रत्नागिरी प्रशासन Read More »

भाजप महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदी आदिती गुडेकर

भाजप महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदी आदिती गुडेकर

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण (प्रतिनिधी) : भाजप महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदी सौ. आदिती अविनाश गुडेकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण तालुका मंडळ अध्यक्ष विनोद भुरण तसेच जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव यांच्या हस्ते खेर्डी येथील ‘स्वामिनी’ निवासस्थानी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या निवडीबद्दल सौ. आदिती गुडेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. भिले गावच्या सरपंच म्हणून काम करताना त्यांनी गावाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका निभावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपने त्यांच्यावर महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. या प्रसंगी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, उपनगराध्यक्ष सौ. रूपाली दांडेकर, नगरसेवक शशिकांत मोदी, महिला मोर्चा शहराध्यक्ष व नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, नगरसेविका सौ. वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका सौ. अंजली कदम, खेर्डीच्या सरपंच सुगंधा माळी, माजी सरपंच प्रकाश पाथरूड, बाळा दाते, कुणाल आंबेकर आदी उपस्थित होते. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

भाजप महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदी आदिती गुडेकर Read More »

चिपळूण : शहरातील क्रीडाप्रेमी युवकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पवन तलाव येथील खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी १ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून अनेक वर्षांपासून पडून असलेल्या इमारतीचे सुशोभीकरण करण्यात येणार असून मैदानाचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. तसेच येथे कॉमेंट्री बॉक्स आणि इनडोअर स्टेडियम उभारण्याचेही नियोजन आहे. या कामामुळे चिपळूणमधील क्रीडापटूंना सराव व स्पर्धांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिक क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळणार आहे. आमदार शेखर निकम यांच्या या प्रयत्नांमुळे चिपळूणच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, अशी भावना क्रीडाप्रेमी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

चिपळूणच्या क्रीडापटूंना दिलासा, पवन तलाव मैदान विकासासाठी १.१४ कोटी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील क्रीडाप्रेमी युवकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पवन तलाव येथील खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी १ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून अनेक वर्षांपासून पडून असलेल्या इमारतीचे सुशोभीकरण करण्यात येणार असून मैदानाचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. तसेच येथे कॉमेंट्री बॉक्स आणि इनडोअर स्टेडियम उभारण्याचेही नियोजन आहे. या कामामुळे चिपळूणमधील क्रीडापटूंना सराव व स्पर्धांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिक क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळणार आहे. आमदार शेखर निकम यांच्या या प्रयत्नांमुळे चिपळूणच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, अशी भावना क्रीडाप्रेमी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

चिपळूणच्या क्रीडापटूंना दिलासा, पवन तलाव मैदान विकासासाठी १.१४ कोटी Read More »

चिपळूणमध्ये उद्या महिलांच्या गायनाचा ‘स्वर तरंग’ कार्यक्रम | नाट्य परिषद आयोजन

चिपळूणमध्ये उद्या स्थानिक महिलांच्या गायनाचा स्वर तरंग कार्यक्रम नाट्य परिषद शाखा चिपळूणचे आयोजन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या गायनाचा स्वर तरंग हा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका देवळेकर, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती हर्षाली पवार, तसेच गायिका उत्तरा भागवत-साडविलकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठीची निवड प्रक्रिया दि. ४ मार्च रोजी संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या निवड प्रक्रियेत एकूण २६ महिला तसेच काही गटांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षक म्हणून श्री. सतीश कुंटे, श्री. राहुल साडविलकर आणि कोकण गंधर्व श्री. राजाभाऊ शेंबेकर यांनी काम पाहिले. या प्रक्रियेतून एकूण १६ महिलांची अंतिम निवड करण्यात आली. प्रथमच स्थानिक महिलांसाठी अशा प्रकारचा गायनाचा कार्यक्रम नाट्य परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असून निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. श्री. सतीश कुंटे यांनी सहभागी महिलांना मोलाचे मार्गदर्शनही केले. उद्या स्थानिक महिलांच्या गायनाच्या होणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.

चिपळूणमध्ये उद्या स्थानिक महिलांच्या गायनाचा स्वर तरंग कार्यक्रम नाट्य परिषद शाखा चिपळूणचे आयोजन Read More »

konkandhara 23 2

लांजात मंदिराच्या वादातून ६३ वर्षीय वृद्धाला मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

प्रतिनिधी : कोकणधारा लांजा : मंदिराच्या जागेवरून झालेल्या वादातून ६३ वर्षीय वृद्धाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना लांजा तालुक्यातील भांबेड कुडेवाडी येथे बुधवारी (दि. ११) रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी लांजा पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष शामकांत मोरे (वय ६३, रा. भांबेड कुडेवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भांबेड कुडेवाडी येथे जांगल देवाचे जुने मंदिर असून ते पाडून त्याठिकाणी नवीन मंदिर उभारण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला होता. त्यानुसार सुभाष मोरे यांनी मंदिराच्या जागी नारळ ठेवला होता. याच कारणावरून गावातील काही व्यक्तींमध्ये वाद निर्माण झाला.या वादातून श्रीधर शंकर मोरे (वय ८०), तुळशीराम शंकर मोरे (वय ७२), तेजस तुळशीराम मोरे (वय ३५), श्रद्धेश तुळशीराम मोरे उर्फ बारक्या (वय ३२) आणि गणेश जयराम मोरे (वय ५५, सर्व रा. भांबेड कुडेवाडी, ता. लांजा) यांनी बुधवारी रात्री सुभाष मोरे यांच्या घरी जाऊन बेकायदा जमाव करून गोंधळ घातल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच त्यांनी शिवीगाळ करत हाताच्या थपडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सुभाष मोरे यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली असून त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर सुभाष मोरे यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी वरील पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे करीत आहेत.

लांजात मंदिराच्या वादातून ६३ वर्षीय वृद्धाला मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा Read More »

घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘कोडबिट्स ४.०’ राष्ट्रीय हॅकथॉन संपन्न

घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘कोडबिट्स ४.०’ राष्ट्रीय हॅकथॉन संपन्न

प्रतिनिधी : कोकणधारा लवेल : येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे संगणक विज्ञान व अभियांत्रिकी (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग) आणि संगणक अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय स्तरावरील २४ तासांचे हॅकथॉन ‘कोडबिट्स ४.०’ ११ व १२ मार्च २०२६ रोजी उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून एकूण ४८ विद्यार्थी संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या तांत्रिक कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. या हॅकथॉनमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक व औद्योगिक समस्यांवर आधारित समस्या विधान देण्यात आली होती. हेल्थकेअर तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, शिक्षणातील डिजिटल उपाय आणि पर्यावरण संरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांनी २४ तास अखंडित परिश्रम घेत नाविन्यपूर्ण तांत्रिक उपाय विकसित केले. या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना आयडिया जनरेशन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मशीन लर्निंग मॉडेल डिझाईन तसेच मोबाइल व वेब अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट या विविध क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. हॅकथॉनदरम्यान सहभागी संघांनी अत्यंत नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त प्रकल्प सादर केले. या प्रकल्पांचे मूल्यमापन तज्ज्ञ परीक्षक नंदिनी सिंग आणि कैलास शर्मा यांनी केले. प्रकल्पांची तांत्रिक गुणवत्ता, नवोपक्रमशीलता, प्रत्यक्ष वापरयोग्यता तसेच सादरीकरण कौशल्य या निकषांवर प्रकल्पांचे परीक्षण करण्यात आले. सदर स्पर्धेत इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवी मुंबई या कॉलेजच्या “लॉस्ट फ्रॉम लाईट” या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या “इटरेटिव्ह बाईट्स” या संघाने मिळवला. तर तृतीय क्रमांक फादर रॉड्रिग्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या “अँटी प्लेसमेंट” या संघाने पटकावला. विजेत्या संघांना उपप्राचार्य डॉ.सचिन पाटील, एआयएमएल विभागप्रमुख प्रा.सचिन लाटकर, संगणक विभागप्रमुख प्रा. ज्योती खालकर आणि परीक्षक कु.नंदिनी सिंग व श्री.कैलास शर्मा यांच्या हस्ते अनुक्रमे २५,००० रुपये, २०,००० रुपये आणि १५,००० रुपये अशी रोख पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या हॅकथॉनमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्यांवर तांत्रिक उपाय शोधण्याची संधी मिळाली असून त्यांच्या सर्जनशीलता, नवोपक्रमशील विचारसरणी, समस्या सोडवण्याची क्षमता आणि टीमवर्क कौशल्य विकसित होण्यास मोठी मदत झाली. २४ तासांच्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत सातत्याने काम करून अनेक उपयुक्त व नाविन्यपूर्ण कल्पना साकार केल्या. या राष्ट्रीय स्तरावरील हॅकथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील विभागप्रमुख, समन्वयक डॉ. अरुण ढंग , प्रा. श्रद्धा गोपाळ, इतर प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. ‘कोडबिट्स 4.0’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवोपक्रम आणि तांत्रिक कौशल्यांचा विकास होण्यास चालना मिळाली असून भविष्यातही अशा तांत्रिक स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘कोडबिट्स ४.०’ राष्ट्रीय हॅकथॉन संपन्न Read More »

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये २७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाची परिस्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्याच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये या हवामान बदलाचा प्रभाव जाणवू शकतो. या काळात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः 18 ते 20 मार्चदरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी Read More »

mahila-din-sanitary-napkin-poshtik-ahar-vatap-chiplun

महिला दिनानिमित्त डीबीजे महाविद्यालयाचा उपक्रमविद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन व पौष्टिक आहार वाटप

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून डी. बी. जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागामार्फत जिल्हा परिषद आदर्श शाळा, मुंडे तर्फे चिपळूण येथे विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन तसेच पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता आणि पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला दिनाचे महत्त्व विद्यार्थिनींना सांगण्यात आले. महिलांचे आरोग्य, स्वच्छता आणि सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखण्याचे महत्त्व, सॅनिटरी नॅपकिनचा योग्य वापर आणि त्याची योग्य विल्हेवाट कशी लावावी याबाबत विद्यार्थिनींना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहाराचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.यानंतर विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले तसेच पौष्टिक आहाराचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली. या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख सौ. वैशाली जाधव, मुख्याध्यापक श्री. विलास पवार, पदवीधर शिक्षक श्री. संजय सुर्वे, सहशिक्षिका श्रीमती ज्योती भोसले तसेच सहशिक्षक श्री. रोशन निकम उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थिनींना आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन डी. बी. जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी श्री. अविनाश शंकर पालशेतकर यांनी केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच उपप्राचार्य सौ. स्नेहल कुलकर्णी व पर्यवेक्षिका सौ. सुजाता खोत यांचे मार्गदर्शन लाभले.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व सेवा भावना निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महिला दिनानिमित्त डीबीजे महाविद्यालयाचा उपक्रमविद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन व पौष्टिक आहार वाटप Read More »