प्रतिनिधी : कोंकणधारा
रत्नागिरी : जुन्या वादातून तसेच एका तरुणीशी बोलतोय या संशयातून २९ वर्षीय तरुणाला चौघांनी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील राजीवडा येथील पुलाखाली गुरुवारी रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरमान नझीर होडेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रमजान नवाज मिरकर, साजिद बावा मिरकर, अझरुद्दीन अलीमिया मुजावर आणि महम्मद बावा मिरकर (सर्व रा. राजीवडा पुलाखाली, रत्नागिरी) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरमान होडेकर आणि आरोपी हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून परस्पर परिचित आहेत. जैतापूर (ता. राजापूर) येथील एका सामायिक मैत्रिणीने रमजान मिरकर याचे काही सामान अरमान यांच्याकडे दिले होते. ते सामान पोहोचवण्यासाठी जात असताना, फिर्यादी त्या तरुणीला का भेटतो आणि तिच्याशी का बोलतो, असा संशय रमजान मिरकर याने घेतला.
याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. पुढे या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी रमजान मिरकर याला इतर तिघांनी साथ देत चौघांनी मिळून अरमान याला रॉडने मारहाण केली.



















