konkandhara.com

राजकारण

आमदार बाई, पण फोटोबाजीवर स्टॉप! पती अधिकाऱ्याचं धडक पत्र व्हायरल

संभाजीनगर : भाजप आमदार पत्नीला पती अधिकाऱ्याचं थेट पत्र – “माझे फोटो वापरु नका!” संभाजीनगर : ग्रामीण भागात बहुतेक वेळा पत्नी पुढारी पण पती कारभारी असं चित्र दिसून येतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिला आरक्षणाचा फायदा घेत अनेक महिला सरपंचपदावर विराजमान झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष गावचा कारभार पतीच पाहतो, अशी प्रथा रूढ आहे. अगदी आमदार पातळीवरही हीच परिस्थिती काही वेळा पाहायला मिळते. मात्र, संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघात याच पार्श्वभूमीवर एक वेगळीच घटना घडली आहे. भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पतींनी – जे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आहेत – थेट आमदार पत्नीला पत्र लिहून कार्यकर्त्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी केली आहे. कारण, मागील काही दिवसांत भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये, वृत्तपत्र जाहिरातींमध्ये आणि बॅनरवर आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासोबत त्यांचे पती अतुल चव्हाण यांचे फोटो मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “माझा फोटो बॅनर किंवा जाहिरातींवर लावल्यामुळे माझ्या विरोधात तक्रारी दाखल होत आहेत तसेच माहिती अधिकारांतर्गत अर्ज येत आहेत. त्यामुळे हे टाळावं.” त्यांनी आमदार पत्नीला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी सूचना करण्याची मागणी केली आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर फुलंब्री मतदारसंघात राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. एका बाजूला पती हा वरिष्ठ अधिकारी, तर पत्नी आमदार – अशा या प्रकरणामुळे प्रशासनिक आचारसंहितेचा मुद्दाही पुढे येतोय. पती-पत्नीच्या या संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार बाई, पण फोटोबाजीवर स्टॉप! पती अधिकाऱ्याचं धडक पत्र व्हायरल Read More »

कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय कायम

कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय कायम; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली मुंबई/कर्जत — कर्जत विधानसभा मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयाला दिलेले आव्हान मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत मिळवलेला थोरवे यांचा विजय कायम राहिला असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने जल्लोष साजरा केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (महायुती) उमेदवार महेंद्र थोरवे यांनी केवळ 5,700 मतांच्या अल्पाधिक्याने विजय मिळवला होता. पराभूत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी निकालाला आव्हान देत, “थोरवे यांनी डमी उमेदवार उभा करून निवडणूक प्रक्रियेत फेरफार केला” असा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर सहा महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. मात्र अखेरीस न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने सुधाकर घारे यांचा अपेक्षाभंग झाला आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शक्तिप्रदर्शनात घारे यांना मताधिक्य असल्याचे वक्तव्य पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले होते. परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे या दाव्याचे वजन कमी झाले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर कर्जत व खालापूर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. राजकीय विश्लेषकांचे मत आहे की या निकालाचा परिणाम आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच सुमारे 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर दिसून येण्याची शक्यता आहे. यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट झाली असून, आमदार महेंद्र थोरवे यांचा राजकीय प्रभाव आगामी काळात आणखी दृढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय कायम Read More »

लडाख : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक अटकेत, लेहमध्ये कर्फ्यू कायम

लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना जेलमध्ये ठेवायचं की इतर कोणती व्यवस्था करायची, यावर निर्णय घेतला जाणार आहे. वांगचुक यांच्यावर केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांना उचकावल्याचा आरोप आहे. डीजीपी एस. डी. सिंह जामवाल यांच्या नेतृत्वाखालील लडाख पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. वांगचुक यांना अटक झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून लेहमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तर ब्रॉडबँड इंटरनेटची गती कमी करण्यात आली आहे. दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये हिंसक झडप झाली होती. यात ४ जणांचा मृत्यू झाला तर ९० जण जखमी झाले होते. या घटनेनंतर लेहमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पोलिस व अर्धसैनिक दलांकडून कर्फ्यूचे काटेकोर पालन करवून घेतले जात आहे. आतापर्यंत ५० हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लडाख : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक अटकेत, लेहमध्ये कर्फ्यू कायम Read More »

मराठा आरक्षणावरून छगन भुजबळांचा अजित पवारांना कडाडून विरोध

🌧️ “या वर्षी शेतकऱ्यांचे नुकसानभरपाईचे पैसे थेट नाहीत!” – अतिवृष्टीमुळे शेतकरी नारा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती, गुरं आणि घर-दार गमावलेल्या शेतकरी कुटुंबांवर संकटाचं विळखं वाढलं आहे. मात्र आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले की, यंदाच्या अतिवृष्टीसाठी शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळणार नाहीत. पीकविम्याच्या नव्या नियमानुसार केवळ कापणीअंती उत्पादनावर आधारित नुकसानभरपाई मिळू शकते. त्यामुळे आताच्या अतिवृष्टीतून नुकसान भरपाई मिळणे शक्य नाही. यासाठी शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत करण्यात येईल, असे पापळकर यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी पंचनाम्यांबाबतही माहिती दिली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे पूर्ण करून त्याचे अंतिम अहवाल सरकारला सादर केले गेले आहेत. आतापर्यंत नुकसानभरपाईसाठी 697 कोटी रुपये मिळाले असून, उर्वरित 721 कोटी रुपये येत्या काही दिवसांत प्राप्त होणार आहेत. जुन्या योजनेत पाच घटकांवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत होती – उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, मिड अॅडव्हर्सिटी, पोस्ट हार्व्हेस्टिंग आणि उत्पादन आधारित नुकसान. मात्र नव्या योजनेत केवळ उत्पादनावर आधारित नुकसानभरपाई मिळेल आणि मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत आहे. या कारणास्तव पूर्वीच्या योजनेप्रमाणे आजच्या अतिवृष्टीसाठी मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई मिळणे शक्य नाही. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई लवकर मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे पावले उचलली पाहिजेत. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, त्यांनी आपले ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने नुकसानभरपाई जमा होईल. सरकारकडून आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यासाठी तालुका पातळीवर कार्यरत एक टीम काम करत आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना भरलेल्या आर्थिक संकटात या नव्या नियमांनी आणखी मोठा ताण निर्माण केला आहे, त्यामुळे शेतकरी आता सरकारी मदतीवरच अवलंबून आहेत.

मराठा आरक्षणावरून छगन भुजबळांचा अजित पवारांना कडाडून विरोध Read More »

बार्शीत 76 हजार हेक्टर पिकांचे नुकसान; संतप्त शेतकऱ्यांनी भरत गोगावले यांचा ताफा अडवला

सोलापूर : राज्यात सलग मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री पूरग्रस्त भागांच्या पाहणीसाठी रवाना झाले. या पार्श्वभूमीवर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आज शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्या ताफ्याला संतप्त शेतकऱ्यांनी अडवत सरकारच्या मदतीवर जोरदार नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटींची मदत जाहीर केली आहे. मात्र, ती मदत तुटपुंजी असल्याचा आरोप शेतकरी सातत्याने करत आहेत. विरोधी पक्षाने हेक्टरी 30 ते 50 हजार रुपयांची मागणी केली आहे. त्याच धर्तीवर बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनीही सरकारने जाहीर केलेली मदत नगण्य असल्याचे सांगत संताप व्यक्त केला. कारी गावातील एका शेतकऱ्याने थेट भरत गोगावले यांना उद्देशून, “गोगावले शेठ, आमच्या तळवटाचे पैसे निघत नाहीत. एकरी फक्त 3400 रुपये सरकार देतंय, सोयाबिनला 6 हजार रुपयांचा भाव आहे, हे आम्ही टिंगल नाही म्हणणार तर काय?” अशा शब्दांत रोष व्यक्त केला. यावेळी, शेतकऱ्यांनी एकमुखीपणे सरकारने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली. दरम्यान, माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी संतप्त शेतकऱ्यांशी चर्चा केली, तर मंत्री भरत गोगावले यांनीही गाडीतून उतरून शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. “निवडणुका झाल्या की मदतीच्या निकषात बदल करता. फुकटातील विमा बंद करून शेतकऱ्यांचं नुकसान केलं,” असा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. 🌧️ अतिवृष्टीचे प्रमाणबार्शी तालुक्यात यंदा मे महिन्यापासूनच पावसाळा सुरू झाला. मे महिन्यात सरासरीच्या 12 पट पाऊस झाला. सप्टेंबरअखेर तालुक्यात 980 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, जी सरासरीपेक्षा दुप्पट आहे. सततच्या पावसामुळे सर्व प्रमुख नद्यांना पूर आला असून 35 गावांतील नागरिकांना मोठा फटका बसला. 🌾 पिकांचे व जनावरांचे मोठे नुकसानतहसील प्रशासनाच्या आकडेवारीनुसार बार्शी तालुक्यातील 78 हजार शेतकऱ्यांच्या 75 हजार 874 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबिनसह फळबागा, द्राक्षबागा यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय, 155 घरांची पडझड झाली, 40 जनावरे व 18 हजार कोंबड्या वाहून गेल्या. एकीकडे शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत, तर दुसरीकडे सरकारच्या मदतीवर असमाधान व्यक्त करून ते आंदोलनाच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

बार्शीत 76 हजार हेक्टर पिकांचे नुकसान; संतप्त शेतकऱ्यांनी भरत गोगावले यांचा ताफा अडवला Read More »

तर सरकारला स्वस्त बसू देणार – बच्चू कडूंचा इशारा

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा सरकारला कठोर शब्दांत इशारा देत माजी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. “जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारला स्वस्त बसू देणार नाही. वेळ आली तर नेपाळसारखे घरात घुसू,” अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी गावात झालेल्या जनसभेत ते बोलत होते. या सभेत कडू यांनी शेतकरी आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “सरकार शेतकऱ्यांना सातत्याने लुटत आहे. आम्हाला पेटवणं जमणार नाही, पण घरात बांधून ठेवण्याची ताकद आहे,” असं म्हणत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी कडू यांनी शेतकऱ्यांसाठी 28 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषाही स्पष्ट केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतमालाला भाव द्यावा यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी करत आहेत. “देशातील 200 उद्योगपत्यांचे 18 ते 24 लाख कोटी कर्ज सरकार माफ करू शकते, पण शेतकऱ्यांचे 30–40 हजार कोटींचं कर्ज माफ करायला तयार नाही. सोयाबीन, तूर, धान याला 20 टक्के बोनस आणि जीएसटीचा परतावा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी इशारा दिला की, “15 ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाही, तर आम्ही सोयाबीन कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन ठेवणार.” सभाेत बोलताना बच्चू कडू यांनी पुढे सांगितले, “मी कुठल्याही जातीसाठी बोलणार नाही. प्रत्येक जातीने आपले आरक्षणासाठी लढावं, पण मी फक्त शेतकऱ्यांसाठी लढणार. शेतकरी हा प्रत्येक जाती-धर्मात आहे. त्यांच्यासाठी मी आयुष्य वाहणार आहे.” गोरक्षणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. “गोरक्षणाच्या नावाखाली काही गुंड-कार्यकर्त्यांचे पोट भरते, पण गाईला शेतकऱ्यांकडे ठेवलं तर काहीच मदत मिळत नाही. गोरक्षकांना अनुदान देता, मग शेतकऱ्यांना का नाही?” असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, गोदावरी पट्टा पूरग्रस्त असतानाही मुख्यमंत्री फडणवीस दौऱ्यावर गेले नाहीत, अशी टीकाही कडू यांनी यावेळी केली. “हेच लोक उद्धव ठाकरेंना नाव ठेवत होते, पण आता स्वतः ऑनलाईन झाले आहेत,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

तर सरकारला स्वस्त बसू देणार – बच्चू कडूंचा इशारा Read More »

मुंबई : सदा सरवणकर यांच्या वक्तव्यावरून गदारोळ; महेश सावंतांची शिंदेंसमोर आक्रमक भूमिका

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शनिवारी मोठा गदारोळ झाला. शिवसेना (ठाकरे गट) आमदार महेश सावंत यांनी थेट पोस्टर दाखवत सरवणकरांच्या दोन दिवसांपूर्वीच्या वक्तव्याचा उल्लेख केला आणि सरकारवर जोरदार टीका केली. सरवणकर यांनी नुकतंच, “आमदारांना दोन कोटी निधी मिळतो, पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटींचा निधी मिळतो,” असं विधान केलं होतं. याच पार्श्वभूमीवर सावंत यांनी बैठकीत संताप व्यक्त केला. “तुमच्या आमदारांना तुम्ही निधी दिलात आणि त्यांनी स्वतःचा विकास केला. पण आम्हाला निधी मिळत नाही. माजी आमदार बोलत आहेत की त्यांना 20 कोटी निधी मिळतो, आणि आम्हाला निधी मिळत नाही,” असा सवाल सावंतांनी थेट पालकमंत्री एकनाथ शिंदेंसमोर केला. यावेळी सावंतांनी आणखी कठोर शब्दांत इशारा दिला – “तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे, पण आम्हीही ‘दादा’गिरीतून आलो आहोत. माजी आमदारांना खूप निधी दिला, पण कामे झाली नाहीत. त्यांनी तो निधी स्वतःचा विकास करण्यासाठी वापरला आहे. त्यामुळे साहेब, तुम्ही तुमच्या माजी आमदारांना समज द्यावी, त्यांना कानमंत्र द्यावा.” दरम्यान, सावंत यांनी स्थानिक विकासाच्या विविध मागण्याही पुढे केल्या. माहिम किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी निधी द्यावा, माहिममध्ये सायकलिंग ट्रॅक उभारावा, तसेच जीर्ण अवस्थेतील शाळांची डागडुजी करून विद्यार्थ्यांना वर्ग मिळावेत, अशी मागणी त्यांनी केली. सिद्धिविनायक मेट्रो स्थानकासमोरील आकर्षक हत्तीचा पुतळा आजही बसविला गेला नाही, कारण मेट्रो आणि पालिकेत ताळमेळ नाही, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. याशिवाय, दादर विभागातील पोलीस स्थानक म्हाडाच्या इमारतीत कार्यरत आहे, त्याला स्वतंत्र जागा द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. तसेच, मुंबईतील सर्व पुतळ्यांजवळ सीसीटीव्ही बसविण्याचं आवाहनही त्यांनी केलं. या सर्व प्रकरणामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वातावरण तापलं आणि विरोधी पक्षाचा आमदार निधी या प्रश्नावरून आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

मुंबई : सदा सरवणकर यांच्या वक्तव्यावरून गदारोळ; महेश सावंतांची शिंदेंसमोर आक्रमक भूमिका Read More »

महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा – सांगलीत डॉ. अमोल कोल्हेंचा जोरदार इशारा!

सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा: डॉ. अमोल कोल्हे यांचा सडेतोड इशारा सांगली – महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाच्या निमित्ताने सांगलीत उत्स्फूर्त जनसमुदाय एकत्र आला होता. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. जयंतराव पाटील यांचा वारसा आणि संस्कृत परंपरा यांचा गौरव करण्यात आला. मोर्चात भाषण करताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अलीकडच्या राजकीय वातावरणावर थेट हल्ला चढवला. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्राची भूमी ही शिव्यांचा नाही तर ओव्यांचा वारसा सांगणारी आहे. स्व. यशवंतराव चव्हाणपासून शरद पवार साहेबांपर्यंतच्या सर्व नेत्यांनी ही सुसंस्कृत परंपरा जपली. मात्र काही स्वयंघोषित नेत्यांनी वाचाळवीरांचा आधार घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ माजवला आहे.” यावेळी डॉ. कोल्हे यांनी विशेषतः स्व. राजारामबापू पाटील यांचा अपमान केल्याचा निषेध नोंदवला. सहकार चळवळीतील त्यांचे योगदान, शेतकऱ्यांना दिलेला समृद्धीचा मार्ग हा महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. “महाराष्ट्र हे सहन करणार नाही. तुमच्या सत्तेपेक्षा, राजकीय अस्तित्वापेक्षा महाराष्ट्राची संस्कृती मोठी आहे. या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सक्षम आहे, हेच सांगलीत अनुभवले.” – डॉ. अमोल कोल्हे मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक आणि सांस्कृतिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय वारशाचे रक्षण करण्याचा निर्धार या मोर्चातून व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा – सांगलीत डॉ. अमोल कोल्हेंचा जोरदार इशारा! Read More »

हाके यांचा ऑडिओ क्लिप वाद | नितीन गडकरींच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया

ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात आघाडीवर असलेले नेते लक्ष्मण हाके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांचा एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात एका तरुणाशी झालेल्या संभाषणात हाके यांनी आपला ड्रायव्हरचा यूपीआय नंबर देऊन पैसे घेण्याची तयारी दाखवल्याचा आरोप आहे. या संभाषणात तरुणाने “तुम्ही समाजासाठी एवढं धावताय, पेट्रोलसाठी मदत करतो” असं सांगत एक लाख रुपयांपर्यंत UPI द्वारे पाठवण्याची तयारी दर्शवली. त्यावर हाके यांनी “मी अकाउंटवर पैसे घेत नाही, ड्रायव्हरचा नंबर देतो” असं म्हटल्याचं ऐकायला मिळतं. परंतु शेवटी त्याच तरुणाने हाके यांना सुनावत, “तुम्ही सुपाऱ्या घेऊन समाजविरोधी काम करता, लाज कशी वाटत नाही?” अशी टीका करत फोन कट केल्याचं क्लिपमध्ये आहे. या क्लिपवर प्रतिक्रिया देताना हाके म्हणाले, “हा माझा नव्हे तर मला पैसे देणाऱ्या व्यक्तीचा हेतू संशयास्पद आहे. मला मुद्दाम बदनाम करण्यासाठी अशा क्लिप्स व्हायरल केल्या जात आहेत. ओबीसींचा आवाज दाबण्यासाठी हे षडयंत्र आहे, पण माझं आंदोलन थांबणार नाही.” दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात “मी ब्राह्मण जातीचा आहे, आमच्यावर परमेश्वराने सर्वात मोठा उपकार केला तर तो म्हणजे आम्हाला आरक्षण नाही” असे वक्तव्य केले होते. यावर हाके यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “मीही देवाला प्रार्थना करीन की पुढच्या जन्मी मला ब्राह्मण समाजात जन्म द्या, तेव्हाच त्यांना कळेल.” हाके यांनी पुढे मनोज जरांगेवरही टीका करत, “जरांगे यांनी दिल्ली नाही तर आफ्रिकेत आंदोलन करायला हवं, तिथे जास्त गरज आहे” असं म्हटलं.

हाके यांचा ऑडिओ क्लिप वाद | नितीन गडकरींच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया Read More »

सदा सरवणकर यांच्या वक्तव्याने खळबळ!

सदा सरवणकर यांचे वादग्रस्त वक्तव्य | आमदार निधी वाटपावरून माहिममध्ये राजकीय खळबळ मी आमदार नसतानाही मला 20 कोटी मिळतात” – माहिममधून नवा वाद पेटला मुंबई :माहिम मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना (शिंदे गट) उमेदवार सदा सरवणकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वादंग निर्माण झाले आहे. सरवणकर यांनी स्पष्टपणे सांगितले – “आजचा आमदार फक्त 2 कोटी रुपयांचा निधी घेतो. पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटी रुपयांचा निधी मिळतो. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या मागे ठामपणे उभे आहेत.” त्यांनी पुढे बोलताना दावा केला की, “काम करणाऱ्यांना पराभव पत्करावा लागतो, पण काम न करणारे जाती-पातीच्या आधारावर जिंकतात. माझा पिंड हा कामाचा असल्यामुळे मी सतत विविध कामांच्या उद्घाटनासाठी दिसतो.” 🔥 विरोधकांचा पलटवार सरवणकर यांच्या वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाला आहे. माहिमचे विद्यमान आमदार महेश सावंत यांनी पलटवार करत विचारले – “जनतेने पराभूत केलेल्या माजी आमदाराला 20 कोटी निधी देणे हा मतदारांचा अपमान आहे. निवडून दिलेल्या आमदारांना निधी न देणे हा सरळसरळ अन्याय आहे. आतापर्यंत त्यांना 500 कोटींपेक्षा जास्त निधी मिळाला. हा पैसा गेला कुठे?” सावंत यांनी जाहीर केले की, ते विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्याकडे औपचारिक तक्रार करणार आहेत. तर ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले –“सत्ताधाऱ्यांना मुजोरी चढली आहे. आमदार निधी वाटपाची पद्धत चुकीची आहे. या प्रकरणाची चौकशी ईडीकडून व्हावी.” 📌 पार्श्वभूमी आमदार निधी हा स्थानिक विकासासाठी देण्यात येणारा निधी असून, त्याचा वापर मतदारसंघातील सार्वजनिक कामांसाठी करणे अपेक्षित असते. पण अनेकदा या निधीचे वाटप सत्ताधारी- विरोधी गटातील भेदभावावर अवलंबून असल्याचे आरोप होत असतात. सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा निधी वाटपातील पारदर्शकता व न्याय्यतेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. या घडामोडींमुळे माहिम मतदारसंघासोबतच संपूर्ण राज्यातील आमदार निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विरोधी पक्ष आता या मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सदा सरवणकर यांच्या वक्तव्याने खळबळ! Read More »