konkandhara.com

राजकारण

खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; राष्ट्रवादीसमोर संघटनात्मक आव्हान

खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : दापोली विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अस्वस्थतेची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. पक्षाचे खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कदम यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे सादर केला आहे. वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामकाजाला अपेक्षित वेळ देता येत नसल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे. तसेच, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना जबाबदाऱ्या पार पाडण्यात काही अडचणी येत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. स.तु. कदम यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक पातळीवर मोठे आव्हान उभे राहिल्याचे मानले जात आहे. त्यांच्या कार्यकाळात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने पक्षात एक प्रकारची पोकळी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, मतदार संघातील काही सरपंच आणि स्थानिक पदाधिकारी शिवसेना (शिंदे गट) कडे झुकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव तसेच नुकतेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले अजय बिरवटकर यांच्याबाबतही काही कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात नाराजी व्यक्त होत असल्याचे समजते. विशेष म्हणजे, बिरवटकर हे सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय/नातेवाईक असल्याने त्यांच्या विरोधात उघडपणे बोलण्यास अनेक कार्यकर्ते टाळाटाळ करत असल्याचीही चर्चा आहे. या सर्व घडामोडींमुळे दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटन टिकवणे, नाराज गटांना सांभाळणे आणि कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा मिळवणे हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आता पक्ष नेतृत्व नव्या तालुकाध्यक्षाची निवड करून परिस्थिती कशी हाताळते आणि अस्वस्थ कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने एकत्र ठेवते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान Read More »

रोह्यात शिवसेनेचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त, मनोज शिंदे हकालपट्टी

रोह्यात शिवसेनेचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त,मनोजकुमार शिंदे यांची हकालपट्टी

प्रतिनिधी : कोकणधारा रोहा (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत रोहा तालुका कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त करण्यात आली असून, माजी तालुका प्रमुख व माजी उपजिल्हाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहा नगरपालिका निवडणुकीदरम्यान पक्षाच्या अधिकृत धोरणांविरुद्ध जाऊन विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा संशय मनोजकुमार शिंदे यांच्यावर व्यक्त करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश मिळाले असले, तरी मागील नगरपालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. या अपयशामागे पक्षविरोधी वर्तणूक कारणीभूत ठरल्याचा ठपका पक्षाने ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली रोहा येथे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत तालुक्यातील राजकीय घडामोडी, संघटनात्मक स्थिती आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणीचा आढावा घेण्यात आला.कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर मनोजकुमार शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर, केवळ व्यक्तीवर कारवाई करून न थांबता संपूर्ण रोहा तालुका कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णयही बैठकीत जाहीर करण्यात आला. पक्ष संघटना नव्याने उभारण्यासाठी लवकरच निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्त्यांची नवीन फळी जाहीर केली जाईल, असे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मनोजकुमार शिंदे यांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता, मात्र आता त्यांच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई झाल्याने रोहा तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राजा केणी यांचे वक्तव्य“पक्षामध्ये शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांनी पक्षविरोधी काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई करणे संघटनेच्या हिताचे आहे. लवकरच रोहा तालुक्यात नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल.”— राजा केणी, जिल्हाप्रमुख, शिवसेना (रायगड)

रोह्यात शिवसेनेचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त,मनोजकुमार शिंदे यांची हकालपट्टी Read More »

विलीनीकरणाचा विषय संपला : विकास लवांडे; सुनील तटकरेंवर दुतोंडीपणाचा आरोप

विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून संपलाय;सुनील तटकरेंकडून दुतोंडीपणा: विकास लवांडे

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत राज्यात सुरू असलेल्या चर्चांवर शरद पवार गटाने ठाम भूमिका घेत या विषयाला पूर्णविराम दिला आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी स्पष्ट केले की, विलीनीकरणाचा मुद्दा त्यांच्या पातळीवरून पूर्णपणे संपला असून आगामी निवडणुका पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहे. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे संभ्रम अधिक वाढला. 16 फेब्रुवारी रोजी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेबाबत माहिती नसल्याचे सांगितले होते. मात्र, 31 मार्च रोजी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चर्चेबाबत माहिती असल्याचे सांगत, विलीनीकरण झाल्यास त्याचे स्वागतच केले जाईल, असे मत व्यक्त केले. या बदलत्या भूमिकेवर टीका करत लवांडे यांनी तटकरे यांच्यावर दुतोंडीपणाचा आरोप केला. “सुनील तटकरे हे खोटे बोलतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यांच्या वक्तव्यांमध्ये सातत्य नाही,” असे ते म्हणाले. “कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा,” अशी म्हण उद्धृत करत त्यांनी तटकरेंवर टोला लगावला. लवांडे यांनी पुढे सांगितले की, पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी यापूर्वीच विलीनीकरणाच्या शक्यतांना नकार दिला आहे. त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत म्हटले की, कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये. “पक्ष स्वतंत्रपणे संघटन मजबूत करत पुढील निवडणुकांना सामोरे जाणार आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. यावेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही वेळोवेळी विलीनीकरणाच्या चर्चांना फेटाळल्याचे अधोरेखित केले. या चर्चांना काही जण स्वार्थी राजकारणाच्या हेतूने हवा देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील मतभेद अधोरेखित झाले आहेत. एकीकडे विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असताना, दुसरीकडे शरद पवार गटाने स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्धार पुन्हा स्पष्ट केल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून संपलाय;सुनील तटकरेंकडून दुतोंडीपणा: विकास लवांडे Read More »

रायगडमध्ये NCP बॅनर वाद: अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचे फोटो

रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचेच फोटो

प्रतिनिधी : कोकणधारा रोहे: रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमाच्या बॅनरवरून पक्षातील प्रमुख नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात लावलेल्या बॅनरवर मात्र खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांचेच फोटो झळकले. हा कार्यक्रम नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारासाठी आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे स्वतः उपस्थित होते. तरीही पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांचे फोटो बॅनरवर नसल्याने विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांच्यावर यापूर्वीही राष्ट्रवादी पक्षात फूट पाडल्याचे आरोप झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शरद पवार गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर रायगडमधील या बॅनर प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.या घटनेवर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “दादांचा पक्ष ताब्यात घेण्याचे तटकरेंचे मनसुबे आता उघड झाले आहेत. त्याची सुरुवात रायगडमधून होत आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “हिम्मत असेल तर प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत वेगळा पक्ष काढा किंवा भाजपमध्ये जा,” असा टोला देखील त्यांनी लगावला. या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचेच फोटो Read More »

अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

संगमेश्वर पंचायत समिती सभापतीपदी शर्वरी वेल्ये, उपसभापतीपदी प्रफुल्ल बाईत बिनविरोध अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख : संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना (शिंदे गट)च्या शर्वरी वेल्ये तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रफुल्ल बाईत यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीची घोषणा होताच महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन दोघांचे अभिनंदन केले. या निवडीनंतर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमेश्वर पंचायत समितीवर महायुतीची एकहाती सत्ता आल्यानंतर सभापती व उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि सभापतीपदासाठी शिवसेनेच्या शर्वरी वेल्ये तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल बाईत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सोमवारी पार पडलेल्या निवड प्रक्रियेदरम्यान या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दुसरा कोणताही अर्ज दाखल न झाल्याने शर्वरी वेल्ये यांची सभापतीपदी तर प्रफुल्ल बाईत यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. पंचायत समितीच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, राजेंद्र महाडिक, राजेश मुकादम, राजेश पत्याणे, प्रमोद पवार, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, रोहन बने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, भाजपचे तालुकाध्यक्ष रूपेश कदम, वैभव पवार, राजन कापडी, संजय कदम, राजेंद्र सुर्वे, हेमंत शिंदे, हनिफ हरचिरकर, बाळू ढवळे, दिलीप बोथले, नितीन भोसले, प्रफुल्ल भुवड, यशवंत गोपाळ, पंकज पुसाळकर, पप्पू नाखरेकर, बापू शिंदे, मंगेश दळवी, प्रसाद सावंत, सचिन मांगले, योगेश शिंदे आदींसह पंचायत समितीचे सदस्य, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल पंडित, राजेंद्र महाडिक, प्रमोद अधटराव व पूजा निकम यांनी नूतन सभापती व उपसभापतींना शुभेच्छा देत संगमेश्वर तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि जनतेच्या सेवेला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले. नूतन सभापती शर्वरी वेल्ये आणि उपसभापती प्रफुल्ल बाईत यांनीही वरिष्ठांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाही दिली. त्यानंतर दोघांनाही सभागृहात त्यांच्या पदाच्या खुर्चीवर विराजमान करण्यात आले.

संगमेश्वर पंचायत समिती सभापतीपदी शर्वरी वेल्ये, उपसभापतीपदी प्रफुल्ल बाईत बिनविरोध अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह Read More »

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे, मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची रायगडावरून सुरुवात

विशेष प्रतिनिधी : कोकणधारा रायगड : “आज महाराष्ट्रात हजारो लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सदस्य व्हायचे आहे. फक्त सदस्य नव्हे तर सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मनसैनिकांनी पुढे येत राज्यभर सदस्य नोंदणी मोहीम राबवावी,” असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी त्यांनी रोपवेने रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत अभिवादन केले. वर्धापन दिनानिमित्त मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “९ मार्चला वर्धापन दिन आणि १९ मार्चला गुढीपाडव्याचा मेळावा असल्यामुळे दोनदा भाषण करण्यापेक्षा सर्व मुद्द्यांवर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सविस्तर बोलणार आहे. मात्र आजपासून पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करत आहोत.” ते पुढे म्हणाले की, राज्यभरातील वर्दळीच्या ठिकाणी मनसेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल्स उभारावेत. मनसैनिकांनी लोकांपर्यंत जाऊन संवाद साधावा आणि इच्छुकांना पक्षाचे सदस्य करून घ्यावे. “आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावरून पक्षाच्या सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहोत. महाराजांचा आशीर्वाद घेऊन ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.तसेच १९ मार्च रोजी होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी सर्व मनसैनिकांनी आणि महाराष्ट्राच्या हितचिंतकांनी शिवतीर्थावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही त्यांनी सांगितले.

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे, मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची रायगडावरून सुरुवात Read More »

दोडामार्ग पंचायत समिती सभापती निवड आज; भाजपच्या पार्वती गवस की सोनिया नाईक?

दोडामार्ग पंचायत समिती सभापती निवड आज; भाजपच्या पार्वती गवस की सोनिया नाईक?

दोडामार्ग : भूषण सावंत  दोडामार्ग : पंचायत समिती दोडामार्ग येथे आज सभापती आणि उपसभापती पदाची निवड होणार असून या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी पहिल्या टप्प्यात भाजपला संधी मिळणार आहे. त्यामुळे भाजपच्या दोन महिला सदस्यांपैकी सभापतीपदाची संधी नेमकी कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सभापतीपदासाठी भाजपच्या माटणे पंचायत समिती सदस्य सौ. पार्वती महादेव गवस आणि मणेरी पंचायत समिती सदस्य सौ. सोनिया अंकुश नाईक यांची नावे चर्चेत आहेत. विजयानंतर या दोघींमधील कोणाला सभापतीपदाची संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदाचा कार्यकाळ सव्वा वर्ष (१५ महिने) असा राहणार आहे. त्यानुसार प्रत्येक सदस्याला ठराविक कालावधीसाठी संधी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे बिनविरोध कोलझर पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस यांची उपसभापतीपदी निवड जवळपास निश्चित मानली जात असून ते बिनविरोध निवडून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आज होणाऱ्या या निवड प्रक्रियेनंतर दोडामार्ग पंचायत समितीच्या नेतृत्वाची दिशा स्पष्ट होणार असून तालुक्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.  

दोडामार्ग पंचायत समिती सभापती निवड आज; भाजपच्या पार्वती गवस की सोनिया नाईक? Read More »

mumbai-goa-highway-inauguration-nitin-gadkari-statement

मुंबई–गोवा महामार्गाच्या उद्घाटनाबाबत संकोच; उद्घाटन करणार नाही: नितीन गडकरी

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा मुंबई : मुंबई–गोवा महामार्गाच्या कामाला मोठ्या प्रमाणावर विलंब झाल्याने या महामार्गाचे उद्घाटन करण्याबाबत आपल्यालाच संकोच वाटत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या महामार्गाचे उद्घाटन आपण करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई–गोवा महामार्गाच्या कामाबाबत अनेक वर्षांपासून विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडत कामाला झालेल्या उशिराबद्दल खंत व्यक्त केली. महामार्गाच्या कामातील अडथळे दूर करून काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई–गोवा मार्ग हा कोकणातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो पूर्ण झाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान होणार आहे.

मुंबई–गोवा महामार्गाच्या उद्घाटनाबाबत संकोच; उद्घाटन करणार नाही: नितीन गडकरी Read More »

'मोसाद' पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे

‘मोसाद’ पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे

Written By : विवेक ताम्हणकर बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न असतानाच, आमदार रोहित पवार यांनी या घटनेमागे मोठ्या घातपाताची शक्यता वर्तवून खळबळ उडवून दिली आहे. हा केवळ अपघात नसून एक पूर्वनियोजित कट असू शकतो, असा संशय त्यांनी एका सादरीकरणाद्वारे (प्रेझेंटेशन) उपस्थित केला. “माझा काका आणि राज्याचा मोठा नेता गेला आहे, आम्हाला उत्तरे मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनापूर्वीच्या काही दिवसांतील त्यांच्या बदललेल्या वागणुकीवर प्रकाश टाकला. त्यांच्या दाव्यानुसार, अजित पवारांना स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल काहीतरी शंका येत असावी, असे त्यांच्या कृतीतून दिसत होते. दादांनी अलीकडच्या काळात आपली पिण्याच्या पाण्याची बाटली बदलली होती. इतकेच नव्हे तर, त्यांनी एका जवळच्या मित्राला स्वतःचे विमान खरेदी करण्याचा सल्ला दिला होता आणि मि त्याना माझ्या मित्राने हेलीकॉप्टर घेतल्याचे सांगितले, “जर मित्र विश्वासू असेल, तर त्याच्याच हेलिकॉप्टरमधून फिरत जा,” असा सल्लाही त्यांनी आपल्याला दिला होता. यावरून त्यांना भविष्यात काहीतरी दगाफटका होऊ शकतो याची चाहूल लागली होती का, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. यावेळी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अलीकडच्या काळात अजित पवार वापरत असलेली पाण्याची अत्यंत सुरक्षित बाटलीही दाखविली.  रोहित पवार यांनी या अपघाताचा संबंध इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या कार्यपद्धतीशी जोडला. मोसादच्या पुस्तकाचा संदर्भ देत ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला संपवण्यासाठी त्याच्या चालक किंवा वैमानिकाला आपल्या बाजूने वळवणे किंवा त्याला लक्ष्य करणे हा सर्वात सोपा मार्ग असतो. या प्रकरणातील मुख्य वैमानिक सुमित कपूर याच्या ट्रॅक रेकॉर्डवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कपूर हा मद्यपान केल्याप्रकरणी तीन वर्षे निलंबित होता. अशा वादग्रस्त पार्श्वभूमीच्या वैमानिकावर कोणाचा दबाव होता का आणि त्याने मुद्दाम अवघड रनवेची निवड का केली, याकडे रोहित यांनी लक्ष वेधले. याशिवाय, तांत्रिक बाबींवर बोट ठेवताना रोहित पवार यांनी अनेक विसंगती मांडल्या. विमान उड्डाणाची वेळ, पायलट आणि नियोजित दौरा ऐनवेळी का बदलला? एटीसी (ATC) ट्रान्सस्क्रिप्ट आणि केंद्रीय विमान मंत्रालयाच्या अहवालातील वेळेत फरक का आहे? खराब दृश्यमानता असूनही लँडिंगचा धोका का पत्करला आणि विमानाचा ट्रान्सपॉन्डर (Transponder) नेमका कोणाच्या सूचनेवरून बंद होता की केला होता? मृत्यू समोर दिसत असतानाही मुख्य वैमानिक गप्प का होता, हे प्रश्न उपस्थित करून त्यांनी या घटनेच्या मुळाशी जाण्याची मागणी केली आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने तपासाच्या विश्वासार्हतेवरही त्यांनी शंका व्यक्त केली असून, हा विमान क्रॅश करण्याचाच कट होता का, असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.

‘मोसाद’ पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे Read More »

राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती

राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती

मंत्रिमंडळ बैठक: 19 महत्त्वाचे निर्णय; विकासकामांना वेग मुंबई | कोंकणधारा डेस्क:राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीत एकूण 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीला भावनिक वातावरण होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती जाणवली, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रथमच मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत काही निर्णय हे अजित पवार यांच्या कार्यकाळात प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांशी संबंधित असल्याने त्यांना प्राधान्याने मंजुरी देण्यात आली. त्यात बारामती जिल्हा क्रीडा संकुलासाठी 75 कोटी 13 लाख रुपये मंजूर करण्यात आले. 🗂️ मंत्रिमंडळ बैठकीतील 19 महत्त्वाचे निर्णय (ठळक मुद्दे) सिंचन प्रकल्पांना गती:नाबार्ड कडून 15,000 कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज. 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प व 193 प्रकल्पांच्या वितरण प्रणालीत सुधारणा; 8 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचन. (जलसंपदा) कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम:करवीर तालुक्यात 12 हेक्टर 76 आर शासकीय जमीन उपलब्ध. (महसूल) पुरंदर विमानतळ:विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना; भूसंपादन व अनुषंगिक कामांसाठी 6,000 कोटींचे कर्ज; एमआयडीसी, एमएडीसी, सिडको सहभाग. (उद्योग) ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान:2026–27 कालावधी; वार्षिक 80.75 कोटींची तरतूद; ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरावर पुरस्कार. (सार्वजनिक आरोग्य) एमआयडीसी—रत्नपुरी मळा (इंदापूर):1,000 एकर जमीन नव्या औद्योगिक वसाहतीसाठी हस्तांतरण. (महसूल) मुंबईत महाटेनिस पायाभूत सुविधा:म्हाडाच्या भूखंडांवर संयुक्त भागीदारीत विकास. (गृहनिर्माण) अटल सेतू प्रभाव क्षेत्र विकास धोरण:नव नगर विकास प्राधिकरण क्षेत्रात भूसंपादन व भूवाटप धोरणास मान्यता; ‘तिसरी मुंबई’ला गती. (नगर विकास) राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन बक्षिसांत वाढ:विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा परिचरांना लाभ. (शालेय शिक्षण) PPP धोरण–2026:25 कोटींपेक्षा मोठ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीकडून मंजुरी; नियोजन विभागात स्वतंत्र कार्यासन. (नियोजन) ई-मेल नोटीस वैध:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मध्ये दुरुस्ती. (महसूल) परभणी—इंद्राणी सहकारी सूतगिरणी:शासन अर्थसहाय्य. (वस्त्रोद्योग) अपर जिल्हाधिकारी पदनिर्मिती:11 पदांना मान्यता. (महसूल व वन) नागपूर—कोल टू केमिकल प्रकल्प:117.19 हेक्टर जमीन एमआयडीसीला. (महसूल) बारामती क्रीडा संकुल (कटफळ):75.13 कोटींची मंजुरी; पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी, बास्केटबॉल. (शालेय शिक्षण व क्रीडा) धान्य वितरण—एकत्र निविदा प्रक्रिया:मुंबई–ठाणे क्षेत्रातील 5 परिमंडळे व 34 जिल्ह्यांत सुसूत्रता. (अन्न व नागरी पुरवठा) अकोला—लघू पाटबंधारे दुरुस्ती:6.60 कोटी; 255 हेक्टर सिंचन. (मृद व जलसंधारण) कर थकबाकी तडजोड अध्यादेश:कर, व्याज, दंड/विलंब शुल्काबाबत सुधारणा. (वित्त) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दुरुस्ती:कलम 109(3)(घ). (उच्च व तंत्र शिक्षण) खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम दुरुस्ती:प्रवेश व शुल्क विनियमनात सुधारणा. (उच्च व तंत्र शिक्षण) आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांमुळे सिंचन, आरोग्य, उद्योग, क्रीडा व शहरी विकास या क्षेत्रांना चालना मिळणार आहे. निवडणुकांनंतरच्या पहिल्या महत्त्वाच्या बैठकीत व्यापक विकासाचा अजेंडा पुढे नेण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले. ✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती Read More »